Thursday, October 25, 2007

गंभीर विषयावरचे विनोदी नाटक "सारखं छातीत दुखतय !"

थोडं जरी छातीत दुखायला लागलं तरी माणसाला शंका येते ती हृदयरोगाची. "सारखं छातीत दुखतंय!' नाटकाने याच गंभीर विषयावर चिंता दूर करणारे भाष्य केलेय, पण सहज, सोप्या आणि विनोदी धाटणीने. मध्यमवर्गीय माणसांना दिलासा देता देता छोट्या छोट्या गोष्टींचा आपण किती बाऊ करतो. त्यामुळे स्वतःचा तर गोंधळ उडतोच, पण घरचेही घाबरतात.संजय मोने यांनी गंभीर विषयातून लिहिलेले हे नाटक तुम्हाला सहजपणे विषयाकडे लक्ष द्यायला तर लावते, पण त्यानिमित्त आजाराची काळजी करा- बाऊ करू नका, असा सरळ सरळ संदेशही देते. अशोक सराफ असले तरी विनोदाचा अतिरेक नाही. निवेदिता सराफ आणि अशोक यांना एकत्रित काम करताना पाहण्यातला आनंदही देते. विजय केंकरे, संजय मोने आणि अशोक सराफ, राजन भिसे या चौकडीने सादर केलेला प्रयोग पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.कैलास तायशेट्ये हा कंपनीतून व्हीआरएस घेतलेला संशयी माणूस. छातीत कुठं खुट झालं की आपल्याला काहीतरी होणार या शंकेने डोक्‍यात विचार येणार. डॉक्‍टरांकडे जाऊन सगळे रिपोर्ट काढून तुम्हाला काहीही झालेले नाही असे एकदा कळले, की थोडी निश्‍चिंती लाभणार. शंकेला फूस मिळावी तशी डॉ. आत्माराम देसाई (संजय मोने) यांच्या घरी येण्याने दुसऱ्याच पेशंटची कहाणी ऐकताना ते आपल्याविषयीच बोलतात, असा कैलास समज करून घेतो. नाट्याला इथून रंग भरतो. आपण पंधरा दिवसांचे सोबती आहोत, या कल्पनेने ऍड. सदाशिव तुराडकर (विनय येडेकर) या मित्राशी पुढच्या भविष्याची चिंता चर्चिली जाते. कैलासच्या बायकोला- मालनला (निवेदिता सराफ) कैलासच्या स्वभावामुळे आधीच वैतागलेल्या संसारात अचानक तिच्या कॉलेजमधल्या मित्राचा (राजन भिसे) मनोहर देवचा प्रवेश होतो. संशयी कैलासच्या बघण्यात फरक पडतो. आपल्यानंतर या दोघांनी एकत्र यावं, अशी इच्छा मनात धरून त्यांना सिनेमाला पाठवितो. मात्र स्वतःच्या लायब्ररीतील मदतनीसाला मदत करण्यामुळे घरात संशयाची पाल चुकचुकते. मालन-कैलासचा सुखी संसार आधीच आजाराच्या संशयी वृत्तीने हललेला असतो. आता नव्या काळजीने दुभंगण्याची भीती निर्माण होते. प्रेमाच्या त्रिकोणाचा फुगा फुटतो आणि आजाराची काळजी अवश्‍य घ्या, पण बाऊ करू नका, सल्ला देऊन नाटकाचा पडदा पडतो.विश्राम बेडेकरांच्या "वाजे पाऊल आपुले'ची आठवण करून देणारे हे नाटक. संजय मोने यांनी मध्यमवर्गीय लोकांच्या आजाराच्या संशयी वृत्तीवर बोट ठेवून हा गंभीर विषय साध्या प्रसंगांतून फुलविला आहे. लेखनात सहजता आहे. साहित्यिक, पुस्तकी भाषा नाही. सोपी पण रोज वापरली जाणाऱ्या बोली भाषेतून नाटक घडविले आहे. संशयकल्लोळाचा खेळ निर्माण करताना रंगविलेला मनोहर देव झकास. कैलासच्या संसारातली गोडी वर्णन करणारे दोनच प्रसंग नाटकाची पोत आणि श्रीमंती वाढवितात. मोनेंनी औषधाचा डोसच पाजलाय, पण उत्तम वातावरणनिर्मिती करून.विजय केंकरेंचे दिग्दर्शन प्रसंगातील नेमका आशय व्यक्त करण्यात यशस्वी ठरले आहे. हालचालीत संयमितता आहे. भाषेतला सोपेपणा त्यांनी व्यक्तिरेखेतून खुलविला आहे. कैलासचे संशयीपण मालनचे पतिप्रेम, ऍड. तुराडकरचा वकिली डाव, मनोहरमधला थेटपणा, सारेच विजय केंकरेंच्या दिग्दर्शनातून व्यक्त होतात.अशोक सराफसारखा विनोदाचा बादशहा नाटकात असून कुठेही नाटक कलाकारांच्या आहारी जात नाही. संयमित आणि सहजपणा हे नाटकाचे वैशिष्ट्य ठरावे.राजन भिसे यांच्या श्रीमंती घरात नाटक रंगते. घरातला थाट उच्चमध्यमवर्गीय घराचे रूप दृष्टीलाही सुख देते. नजर घरातल्या वस्तूंवरही जाते. देखणेपणा आणि गरज दोन्ही भागविते.अशोक सराफ यांचा संयमित अभिनय. शब्दांमध्ये दडलेला विनोद ते शारीरिक अभिनयाने प्रेक्षकापर्यंत पोचवितात. ते भूमिका थेट पोचवितात. विचारी, पण संशयी व्यक्तिरेखा बंदिस्त चौकट राखून ते उत्तम सादर करतात. भाषेचे सौंदर्य अधिक खुलविताना कैलासच्या भूमिकेचे कंगोरे उलघडून दाखवितात.त्यांना तेवढीच संयमित साथ दिली आहे मालनच्या रूपातल्या निवेदिताने. दोघांचे प्रसंग पाहताना ते तुम्हाला नक्की दिसेल. व्यक्तिरेखेला त्या स्वतःचा चेहरा देतात. विनय येडेकरांनी हशे घेतलेत. नाटकात ते रमतात. रसिकांना बरोबर घेऊन जातात. राजन भिसे दिसतातच प्रभावी. वावरतातही आत्मविश्‍वासाने. त्यांचे बोलणे. मैत्रीचा धागा पकडून ते मालनबरोवरचा मोकळेपणा ते सहजी व्यक्त करतात. संजय मोनेंच्या छोट्या भूमिकेतही ते फॅमिली डॉक्‍टर म्हणून घरातलेच एक बनतात.अशोक पत्की यांचे पार्श्‍वसंगीत आणि शीतल तळपदेंची प्रकाशयोजना नाटकाला अधिक खुलविण्यात यशस्वी झाली आहेत.अजित भुरे यांनी सादर केलेले आणि स्वाती कारूळकरांनी निर्मिलेले हे नाटक पाहणे म्हणजे एक अनुभूती घेणेच आहे. नाटक पाहिल्यावर त्याच्या आठवणी जरूर घरी घेऊन जाल.
सुभाष
इनामदार.
subhashinamdar@esakal.com

Sunday, October 21, 2007

प्रसन्नतेची पखरण




सुमारे साडेतीनशे चौरस फूट जागा घरासमोर बागेसाठी निर्माण झाली. आता प्रश्‍न पडला बागेची हौस पुरी कशी करायची? बागेची कल्पना आपणच राबवायची हे नक्की केले. शेतीची माती आणि बांधकाम साहित्याचा उरलेला माल (यालाच रॅबीट म्हणतात) तिथे टाकला गेला. दोन आठवडे रोज रात्रपाळी करून दिवसा तिथेच राबलो, रॅबीट काढणे हाच एकमेव उद्योग झाला. वीटा, फरशी आणि बागेची माती आणून पुढच्या काही दिवसात रचना नक्की केली. आज घराला बागेचे रूप आले आहे. मी माळी न घेता बाग फुलवली. घरच्या लहान मुलाचे कलाकलाने वाढणे जेवढे आनंद देते ना तेवढाच आनंद बाग फुलविण्यात मिळतो. जागा किती हे महत्वाचे नाही. बागेसाठी रो-हाउस, बंगला महत्वाचा नाही. गच्ची, पॅसेज,बोळ, खिडकीवरच्या लोखंडी बारमधूनही हिरवाई डोकवेल. घर अणि मन प्रसन्न करेल.






हिरवळीने सकाळची वेळ आधिक प्रसन्न बनते. डोळे तृप्तीचे ढेकर देतात. दिवस चांगला जाणार याची खात्री पटते.कधीतरी, स्वप्नात असेल कदाचित असे घर मनात घर करून होते. पण ते साकारायला वयाची पन्नाशी यावी लागली.खाजगी नोकरी. घरच्या जबाबदाऱ्या यातून स्वतःचा कधी फ्लॅट होईल याची खात्री नव्हती. पण पत्नीचे सहकाय, मिळकतीतील काही भाग गुंतवणूक करण्याची वृत्ती, आजचे न पहाता उद्यासाठी राखून ठेवण्याची मानसिकता यातून घर झाले आणि तेही रो-हाऊस. घेताना उडी मोठी मारली. साठविलेली पुंजी दोन नंबरचे पैसे देण्यात सोडून दिली. घर ही कल्पनाच अशी आहे. तीथे कुणीही ओढ घेईल.रो-हाऊसचा घास मोठा असल्याने घर सजवायचे कसे? यापेक्षा पैसे कुठे वाचवू शकू ? याचीच यादी मनात तयार होत होती. घर तर होऊ दे, आतले फर्नीचर, सजावट-पडद्यांचे नंतर बघू, असाच विचार असायचा.






मोकळी जागा किती मिळेल याची कल्पना आधी नव्हती. पाठीमागे थोडी जागा मिळणार .त्यात भांडी घासायची जागा होणार. इतकेच वाटत होते. पाया, प्लींथ, पायऱ्या आणि स्लॅब पडत गेली.आणि घरासमोरची भिंतही झाली. गेट बसले. नेमकी जागा लक्षात आली. सुमारे साडेतीनशे चौरस फूट जागा घरासमोर बागेसाठी निर्माण झाली. मागे सव्वाशे. आता प्रश्‍न पडला बागेची हौस पुरी कशी करायची? माळी किती घेतो? माती, खते अणि रोपांसाठी किती पैसा लागेल? साराच खेळ पैशात सुरू झाला. कंजूष वृत्तीचा इथे उपयोग झाला.यासाठी एकच केले. राहण्याआधी वास्तुशांत करून घेतली. मात्र दुसरीकडे राहायची सोय असल्याने बागेची कल्पना आपणच राबवायची हे नक्की केले.






पुरती माती बिल्डकडून टाकून घेतली. अर्थात त्यात आली शेतीची माती आणि बांधकाम साहित्याचा उरलेला माल (यालाच रॅबीट म्हणतात). दोन आठवडे रोज रात्रपाळी करून दिवसा तिथेच राबलो, रॅबीट काढणे हाच एकमेव उद्योग झाला. वीटा, फरशी आणि बागेची माती आणून पुढच्या काही दिवसात रचना नक्की केली.तिरक्‍या वीटा लावणे.फरशी सफाईदार बसवणे आणि माती टाकून बागेची रचना सिध्द झाली. प्रश्‍न आली रोपे कोणती आणायची? अर्थातच फुलांच्या रोपांची निवड झाली. गुलाब, जास्वंद, मधुमालती, जाई, जुई, शेवंती आणि तगर, मोगरा यांच्याबरोवरच बोगनवेलीची रोपे व्यवस्थीत अंतरावर लावली .मार्च महिना असल्याने पाण्याची गरज होती; पण हळूहळू रोपांची वाढ होताना पाहण्यात ते श्रम वाटत नव्हते. मागे तुळस लावली; पण ती टिकत नव्हती. कारण शोधण्यासाठी एकदा परसदारी ठिय्या मारून टिकाव आणि खोरे घेऊन जमीन उकरून पाहिली; तर आत फरशांचे तुकडे, सिमेंटची मोकळी पोती खिळे, दगडांची चवड, लाईटच्या बॅटन पट्ट्या असा सांग्रसंगीत माल सापडला. रोपे यात कशी वाढणार ?रोपे पुन्हा लावली. पुन्हा मेहनत घेतली. जगवली आणि आज तिथे तगर, पांढरी जास्वंद, शेवंती, कळीचे जास्वंद आणि शोभिवंत रोपांची सावली आल्हाददायक वाटते आहे.कुणाकडे काही नवे पाहिले की त्याचे रोप घेऊन लावायचे. यात कॅंटीन मधल्या नारळाच्या रोपनेही साथ दिली. सुपारी आली. चिक्कू रूजला. मनीप्लॅंटतर सुसाट वाढला. पारिजातक, कडीपत्ता रूजला. आळी करून तण काढले गेले. माजलेले गवत काढत गेलो. तरी दर वेळी तण रहातातच. त्यातून दुर्वा मिळाल्या. तांबडी, पिवळी, गुलाबी, तपकीरी, पांढरी अशी विविध रंगी फुलांची रेलचेल झाली.आता खरंतर दाटी झाली आहे. पण स्वतःच लावलेल्या रोपांना कसे उपटायचे म्हणून ती डोलतच आहेत. मोकळ्या जागेत कोथींबीर, मेथी, पालक, टोमॅटो, मिरची घेणे सुरू केले. शोभेबरोबर घरच्या भाज्या मिळू लागल्या. दहा रुपयांची कोथिंबीर पेंडी मला विनामूल्य मिळाली.






त्यासाठीची मेहनत किती तर सव्वामहिना !



बागेचे रूप आले आहे. आम्ही घरात रहातो आणि बागेत फिरतो, पानात रमतो. आजूबाजूची मंडळी फुले नेतात. मात्र फांद्या ओढून ओरबाडून फुले नेताना कुणी दिसले की मन दुखावते. फुले झाली अनंत आता हवी फळझाडे. असे मनात आणले.मोठ्‌या-मोठ्या सिंमेटच्या कुंड्या थेट गच्चीवर थाटल्या. डाळींब, अंजीर अणि कागदी लिंबाची रोपे आणली. माती-खत आणि घरातल्या खताने उन्हात उभ्या असलेल्या रोपांना माया दिली. उद्या तीच झाडे आम्हाला फळे देणार आहेत.गच्चीवर काकडी, कारले, दुधीभोपळ्याचे वेल लावलेत. वेल वाढतील, बहरतील आणि खालच्या खोल्यांना सावलीही देतील.आज मधुमालतीचा वेल तिसऱ्या मजल्यावर फुलांनी डवरलाय. काही वर्षांनी नारळ येतील. काही दिवसांनी रामफळे येतील. चिकू खाता येतील. भाज्याचे प्रकार लावता येतील.बागेची फारशी माहिती नसताना, कुठलाही बागकामाचा अनुभव पाठीशी नसताना आपली बाग आपणच फुलवायची याच जाणीवेतून ही निर्मिती झाली. आज बाहेरून कोणेही सांगेल की, बाहेर गुलाबी जास्वंद .पारिजातक आणि जाईची फुले दिसतात ना तेच त्यांचे घर.रोपांना ठिकाण माहित नसते. पण त्यांना जाणवतो किंबहुना स्पर्श ओळखू येतो. मालकाच्या प्रेमाचा. त्याच्या जिद्दी स्वभावाचा.



मी माळी न घेता बाग फुलवली आहे. आता पैसा वाचविणे हा हेतू नाही. ती अधिक विस्तारीत करून फुलांपेक्षा फळांनी डवरलेली ठेवणे.त्यात मन रमवणे. बागेत काम म्हणजे चिंतापासून दूर.हात-पाय तंदुरूस्त राखण्याचा उपाय.वेळ कसा गेला ते कळत नाही.घरच्या लहान मुलाचे कलाकलाने वाढणे जेवढे आनंद देते ना तेवढाच आनंद बाग फुलविण्यात मीळतो.जागा किती हे महत्वाचे नाही. तुमची इच्छा हवी. बागेसाठी रो-हाउस, बंगला महत्वाचा नाही. गच्ची, पॅसेज,बोळ, खिडकीवरच्या लोखंडी बारमधूनही हिरवाई डोकवेल. घर अणि मन प्रसन्न करेल.घरात भिंतीइतकेच महत्त्व विविध कुड्यांना द्या. रासायनीक खते न वापरताही अगदी डबा किंवा बादलीतही ती तुमची सोबत करतील.