Friday, April 18, 2008

जेव्हा स्वरसत्ता आणि काव्यसत्ता एकाच वेळी कोसळते...

कविवर्य ग्रेस आणि संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकरांनी पुणेकरांना आपापल्या राज्याची सफर करून आणली, त्या कार्यक्रमाचे नाव होते- "ताऱ्यांच्या प्रहरापाशी'. यात दुर्बोध वाटणाऱ्या काव्याचे भाष्यकार नागपूरचे कवी ग्रेस यांनी शब्दांच्या भावविश्वात रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या वेगळ्या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफित पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा......ग्रेस याच्या भाषेत अबोधता असली तरी भावनेत बहर सामावलेला होता. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांच्या हिंदोळ्यावर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातला प्रेक्षक झुलत होता.
शिरीष थिएटर्सच्या शिरीष रायरीकर यांनी "ताऱ्यांच्या प्रहरापाशी' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संत ज्ञानेश्वर, मीराबाईंच्या रचनांबरोबरच ग्रेस यांच्या रचनांचे इथे सादरीकरण झाले.
कवीच्या प्रतिभेची ताकद आणि संगीतामुळे येणारी नादमयता याचे मिश्रण होऊन हे स्वरमय अमृत रसिकांच्या कानी पडते. त्याचे वर्णन शब्दात करणे अवघड. मृदंग-तबला आणि एकतारीच्या साथीने संगीताला श्रीमंती प्राप्ती झाली होती. कवीच्या शब्दांतली ताकद आणि संगीतकाराने दिलेली चाल यात कधी संगीतकार प्रभावी होतो, तर कधी काव्याला अधिक साद मिळते. शब्द-सूरांचा हा प्रवास आपण प्रत्यक्ष ऐकलेलाच बरा.
ही दोन प्रतिभेची लेणी जेव्हा समोरा-समोर येतात तेव्हाच रसिकांच्या मनावर स्वरसत्ता आणि काव्यसत्ता एकाचवेळी कोसळते. स्वरांच्या जादूचा आनंद घेताना आता काव्यशिल्पातून ग्रेस काय बोलणार, याची उत्सुकता रसिकतेला पडते. मधूनच राधा मंगेशकरही काही गीते सादर करतात.
एखाद्या मंद हळव्या बोलामध्ये आयुष्याला स्पर्शून जाण्याची जर ताकद येत असेल आणि ती ताकद कोणत्या पद्धतीने येते, ते सांगताना ग्रेस काव्यात सांगतात-
"सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला...'
दुःख आणि निर्मितीच्या क्षेत्रातले सगळे ऐवज बायकांच्या स्वाधीन आहेत हे खरे आहेत, हे सांगताना स्त्रियांच्या शापाविषयी सांगताना ते बोलून जातात-
निर्मिती आणि सौंदर्याची अधिसत्ता यांच्या अमृताचे आणि जहराचे सगळे बेमालून घटक स्त्रीच्या आत्म्यात अणि व्यक्तिमत्त्वात नियंत्याने इतके सैरभैर करून मिसळून दिलेले आहेत की तिच्या प्रत्येक ग्लोरीला ग्लॅमरचा शाप भोगतो.
कवितेच्या सुबोधतेविषयी ग्रेस बोलतात... ज्या डंखदार पद्धतीने आपण सुबोधतेची अपेक्षा करता अशी कुठलीही सुबोधता जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही,
ग्रेस यांचे गूढ बोलणे आणि हृदयनाथांच्या भावस्पर्शी चालींतून दोन वेगवेगळ्या झऱ्यांचे पाणी रसिकांची तहान भागवते, यात शंका नाही.
अशा पद्धतीचे प्रतिभेला बोलते करण्याचे कार्यक्रम अधिकाधिक होणे, यातच मराठी रसिकांच्या रसिकतेची साक्ष पटते.

Tuesday, April 15, 2008

सांगलीच्या बाल कलाकारांनी पुणेकरांना ऐकविले गीतरामायण...

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली शिक्षण संस्थेने बाल कलाकारांच्या गायनाने पुण्यात कुश-लव रामायण गातीचा आविष्कार सादर करून पुणेकरांची शाबासकी मिळविली.
या गीतरामायणाची झलक ऐकण्यासाठी ईथे क्‍लिक करा....
आंतर्नाद ही बाल कलाकारांच्या सुप्तगुणांना व्यासपीठ देणारी संस्था.संस्थेच्या विविध शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन ह्या कार्यक्रमासाठी बाल गायकांची निवड केली गेली.माजी आणि आजी विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीतरामायण स्वर-तालाने मंत्रमुग्ध करणारे होते.
प्रा. अशोकराव घारपूरे यांच्या प्रेरणेतून आणि तुषार आपटे यांच्या मार्गदर्शनातून गीत रामायणाचा हा तेजस्वी आविष्कार सिद्ध झाला.माधव आणि आशा खाडिलकरांनी मुलांना मार्गदर्शन केले.त्यातून घडलेले हे गीतरामायण मुलांच्या सांगीेतिक कौशल्याची प्रचिती देतात.
अमृता जोशीच्या निवेदनाने रामायणपर्व उलगडत जाते.सायली जोशी,सुकृत ताम्हणकर,छोटी गायीका शिरीन केळकर,श्रीरंग जोशी,अभिषेक काळे,स्वराली अभ्यंकर,आर्या खाडिलकर,यशश्री जोशी स्वप्नावी कुलकर्णी या विद्यार्थी गायक-गायीकांनी स्वराला परिश्रमाची जोड देऊन सुधीर फडके-ग.दि.मांच्या गीतांना भावभावनांनी समृद्ध करून शब्दांना तालीच्या बांधेसूद परिमाणात तोलून पुन्हा त्या गीतरामायणाची आठवण करून दिली.वाद्यवृंदातली विद्यार्थीवर्गच होता.संवादिनी-स्वानंद कुलकर्णी,आणि तबला-परेश पेठे यांचा उल्लेख करायलाच हवा.मुलांच्या आंतर्नादला साद दिलेल्या सांगलीच्या संस्थेचे खरच कौतूक करायला हवे.
पुण्यतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातल्या प्रयोगाला दाद देण्यसाठी पु.ना. गाडगीळचे मालक दाजीकाका गाडगीळ आणि चेकमेट या मराठी चित्रपटाचे संगीतकार चंद्रशेखर महामुनी हजर होते.दोघांनीही मुलांच्या कलेला मनापासून दाद दिली.

Sunday, April 13, 2008

...आता कापूसकरांना स्वतःची कलाकृती साकारायचीय !

-"शिल्प बनविताना त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव सर्वांत महत्त्वाचे. चेहरा पाहून त्या व्यक्तीच्या मनात काय असेल ते शिल्पातून व्यक्त व्हायला हवे. देहबोलीतून ते दिसायला हवे. करमरकरांसारखे काम व्हायला हवे आहे. त्यासाठी मेड टू ऑर्डरची कामे बंद करून स्वतःला जे भावते ते करण्यासाठी यापुढचा वेळ देणार आहे. पुण्याजवळच्या भूगावमधल्या आपल्या स्टुडिओत प्रसिद्ध शिल्पकार शरद कापूसकर ई-सकाळशी बोलत होते.
त्यांच्याशी झालेल्या गप्पा ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा..आर्ट रिन्युअल सेंटर या जगातल्या प्रतिष्ठेच्या ऑनलाइन संग्रहालयात शरद कापूसकरांचे अवचितबाबांचे शिल्प जगभरातल्या शंभर शिल्पातून निवडले गेले. जगन्मान्यता पावलेल्या कलासमीक्षकांकडून पुण्यातल्या या शिल्पकाराच्या शिल्पाची आणि चित्राची निवड झाली आहे. याचे निमित्त साधून शरद कापूसकरांच्या स्टुडिओत दाखल झालो.
एक एकरात विसावलेल्या या कलाउपासकाच्या स्टुडिओत सगळीकडे शिल्पांचे अवशेष. कुठे त्यांचे फोटो तर त्यांच्या छोट्या प्रतिकृतींचे आराखडे. कलाकार, संगीतकार, द्रष्टे नेते, प्रख्यात व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात काही काळ काढताना आपणही भारावले जातो.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कलाकृतीतून नंतर वेगवेगळ्या साच्यातून अवतरणारी कलाकृती कशी होते याची तांत्रिक माहितीही कापूसकरांनी दिली.
ंमुंबईच्या जुहू चौपाटीवर साकारलेल्या शिवाजीराजे आणि संभाजीराजांची मावळ्यासोबत शिल्पकृती १९९४ मध्ये हाती आली आणि कापूसकरांच्या स्टुडिओत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांची ये-जा सुरू झाली. चांदणी चौकापासून तीन किलोमीटरवरच्या भूगावात एक शिल्पकार राहतो याचे भान गावच्या सरपंचाला झाले. देऊसकर, व्यंकटेश माडगूळकर, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर अशा दिग्गज मंडळींत कापूसकरांच्या दालनात दाखल व्हायची. निवांतपणा आणि कलेविषयीची असक्ती यातून कापूसकरांची कलासेवा बहरत गेली. आजही ते आणि त्यांची पत्नी दोघेच घरट्यात स्वच्छंदी जगतात. बायकोलाही स्कल्प्चर करण्याचा नाद. त्याही अभिनव मधूनच शिकल्या. त्यांच्या वेगवेगळ्या छोट्या कलाकृतींचाही इथे पसारा दिसतो. दोघांच्या कलासाधक जीवनाची साक्ष हा परिसर देतो.
दोन मदतनिसांच्या सहवासात शिल्पे इथे तयार होत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिल्पकलेचा हा पुजारी अनेकांना पुतळ्यांमधून (कदाचित हा शब्द त्यांना आवडणार नाही) अजरामर करत शाडू, माती, दगड आणि मानवी चेहऱ्यांच्या भावपूर्ण वातावरणात स्वतःचे अस्तित्वच हरवून इतरांना घडवत आहे,
डॉ. विनय मांडके इथे शिल्प बनून हृदयमित्रांच्या मदतीसाठी ब्रॉंझमध्ये उभे आहेत. चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद साकारताहेत,
मास्टर दीनानाथ, माई मंगेशकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जे.डी. बिर्ला, गंगूबाई हनगल, पं. रामनारायण, सूर्यकांत-चंद्रकांत, बेळगावचे के. बी. कुलकर्णी, श्री. पु. भागवत अशा मातब्बर मंडळींच्या सहवासाने कापूसकरांचे दालन सधन बनले आहे.
मेणाच्या कलाकृतीची ऑफर आली होती पण ती त्यांनी मादाम पुसाच्या संग्रहालयाकडे पाठवून नम्रपणे नकार दिला. केस मोकळे सोडलेली सोनाली कुलकर्णी १९९५ सालची इथे आहे. स्त्रियांची विविध रूपांतली शिल्पे नजर खिळवून ठेवतात.
मंचरच्या मातीत कुस्ती खेळलेला हा मल्ल पुण्यात चंद्रकांत परब यांच्या सान्निध्यात गणपतीच्या मूर्ती बनवू लागला. चेहऱ्यांचे भाव-देहबोली शिकण्यासाठी सलग दोन वर्षे शिवाजीनगरच्या बस स्टॅंडवर रात्री दोनपर्यंत चित्रे काढत बसले. अभिनवच्या कलाशिक्षणानंतर कागदावरच्या रंगीत चित्रात कापूसकरांचे मन रमेना. थ्री-डायमेन्शन असलेल्या शिल्पकृतीतले भाव मातीच्या शाडूने काढण्याचे वेड घेतले. एस. एम. पंडित आणि देऊसकरांच्या शाबासकीने प्रेरणा दिली आणि कापूसकरांमधला शिल्पकार पाहता पाहता घडत गेला. एकसे एक कलाकृती हातून बनल्या गेल्या.
आता त्यांना वेध लागले आहेत मनाप्रमाणे स्वतःसाठी काम करण्याचे. साथीला कलावंत पत्नीची साथ आणि सोबतीला विस्तीर्ण निसर्ग.