Saturday, August 2, 2008

वसंतरावांच्या स्वरांचे रसिले स्मरण!

आक्रमक, तडफदार आणि रसिल्या गायकीचे बादशहा असणारे वसंतराव देशपांडे यांच्या आठवणींचे एक दालन त्यांच्याच स्वरांच्या साक्षीने बुधवारी भरत नाट्य मंदीरात उलगडले. सोबत त्यांच्या शिष्यांनी सांगितलेल्या आठवणी आणि त्यांची "याद' जागवणारे स्वरही होते.


व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

वसंतरावांच्या पंचविसाव्या स्मरणदिनी "नादब्रह्म परिवारा'तर्फे वंदना घांगुर्डे यांनी "वसंतराव देशपांडे ः एक स्मरण' हा कार्यक्रम आयोजित केला होता. खुद्द वसंतरावांचे ध्वनिचित्रमुद्रित गायन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. रागसंगीताप्रमाणेच नाट्यसंगीताला वसंतरावांनी आपल्या गायकीतून दिलेले वेगळे रूप, त्यांच्या आवाजातील "रवी मी', "मना तळमळसि' आदींच्या सादरीकरणातून पुनःप्रत्ययास आली.
वसंतरावांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक विजय कोपरकर यांनी "सावरे'; तसेच "शतजन्म शोधताना' या रचना सादर करून गुरूंच्या आठवणी जागवल्या.
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी म्हणाले, ""जबरदस्त साधना आणि अफाट बुद्धिमत्ता असूनही अतिशय साधा आणि नम्र कलाकार म्हणजे वसंतराव! समाजाने त्यांना कर्मठपणाने वागवले, पण वसंतरावांनी त्याविषयी नाराजीचा सूर काढला नाही.''
डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी "सावधान होई मनुजा' हे चित्रपटगीत, "बगळ्यांची माळ फुले' हे भावगीत सादर केले. प्रसिद्ध गायिका शैला दातार यांनी "भावबंधन' नाटकातील "सकळ चराचरि या तुझा असे निवास', "दारुणा स्थिती' ही पदे; तसेच "रवी मी', "शूरा मी वंदिले' या नाट्यपदांची झलक ऐकवली. "लावणीतील तान कशी घ्यायची, हे मला त्यांनीच शिकवले. त्यानंतर त्या लावणीला मी प्रत्येक वेळी वन्समोअर घेतला,' अशी आठवण त्यांनी सांगितली.
""वसंतरावांकडे मी बारा वर्षे शिकलो. तालाचा अंदाज कसा घ्यायचा, हे त्यांनी मला शिकवले,'' असे सांगून "तिलककामोद'मधील "सूरसंगत रागविद्या' ही रचना पं. चंद्रकांत लिमये यांनी सादर केली. वसंतरावांच्या कन्या नंदा देशपांडे यांनीही घरेलू आठवणींना उजाळा दिला.


वींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. नाना मुळे (तबला), विश्‍वनाथ कान्हेरे (हार्मोनिअम), गौरी पाध्ये (तानपुरा) यांनी साथ केली. कान्हेरे यांनी "सुरत पिया' हे पद हार्मोनिअमवर पेश केले.

स्नेह मैत्रीचा, आठवण स्मृतींची

नाते एकच मैत्रीचे
अतूट बंधन स्नेहाचे
भेटीला नसतो काळ
काळाची नाळ न तुटणारी
तुटताना न दुभंगणारी
दुभंग अशा नात्याला
नात्यातल्या प्रितीला
प्रितीतल्या शब्दांना
शब्दातल्या नादांना
नादातल्या स्मृतीतून
स्मृतींच्या धाग्यातून
धाग्यांच्या धगीतून
धगीच्या बंधनातून
बंधनाच्या वेलीतून
वेलींच्या गंधातून
गंधाच्या वासांनी
वासांच्या तृप्तीने


स्नेह मैत्रीचा, दरवळत राहो
नाते आपुले सदासर्वदा बहरत राहो.


सुभाष इनामदार
(धागे मैत्रीच्या निमित्ताने)
२ ऑगस्ट २००८

Friday, August 1, 2008

सांगलीकर कलावंतांनी आणली स्वरबहार

"सारेगमप'च्या फेरीत चमकलेल्या सांगलीच्या तीन शिलंदारांनी गेल्या रविवारी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठी गीतांच्या भावविश्वात रसिकांना गुंतवून ठेवले.महेश मुतालिक, संगिता चितळे आणि अनुजा वर्तक या तीन गायकांनी "स्वप्न सुरांचे' हा कार्यक्रम सादर केला. चाळीशीनंतरच्या तारूण्यावस्थेतील हे कलावंत. स्वरांची पक्की बैठक आणि शब्दातल्या भावना पोचविण्याचे कसब त्यांच्या गाण्यातून स्पष्ट दिसत होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

झीच्या छोट्या पडद्यावर चमकलेले हे तीघे कलावंत सांगलीचे. आधी चमकले आणि मग दर्शकांनाही ओळखीचे झाले. आता स्वतंत्र कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपली गाणी गावोगावी पोहोचवताहेत. अभिजित कुलकर्णी यांनी निवेदकाच्या भुमिकेतून गाण्यांच्या शब्दांना आणि गायक कलावंतांही बोलते करत हा सूरांचा प्रवास शब्दांनीही समृध्द केला. गेली कांही शतके जे कवी ,गीतकार, संगीतकार आणि गायकांचा मराठी मनावर पगडा होता त्या सर्व गाण्यांनी हा कार्यक्रम उलगडत गेला.

गाण्याच्या सादरीकरणाला अधिक उठावदार करणारे वादकही तेवढेच आठवणीत राहतात .
तीन गायकांच्या गायन शैली वेगळ्या . गाण्याची निवडही वेगळी . तरीही इथे त्यांनी जो सांघिक परिणाम साधला तो थेट रसिकांच्या मनापर्यंत पोचला आणि त्यांचा संगीत प्रवासही उलगडत गेला.
वयाची चाळीशी पार केलेल्या या कलावंतांनी सादर केलेली ही स्वरमैफल "बहारदार' रंगली. नटली आणि स्मरणात उरली.

ढोल - ताशांचे आवाज घुमू लागले !

नदीपात्रा लगतच्या रस्त्यावर नारायण पेठेच्या बाजूला तंबू टाकून ढोल-ताशा पथकांनी रविवारी आपली प्रॅक्‍टीस सुरू केली .
"श्री गणेश प्रतिष्ठानच्या वाद्य पथकात' मुले तर आहेतच पण यात मुलींचाही समावेश आहे. इथे त्या ढोल-ताशा आणि झांजा वाजवताना दिसत होत्या.
३५ ढोल अणि १० ताशांसह ह्या पथकाने कुणाचीही मदत न घेता स्वतःचे पैसे जमवून हा ग्रुप केल्याचे सांगीतले.


व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.