Thursday, November 19, 2009

सुनिताबाईंच्या आठवणीला समर्पित सातवा पुलोत्सव

आताशा मी नसतेच इथं.... सुनिताबाईंच्या आवाजातल्या या कवितेने सातव्या पुलोत्सवाची सांगता झाली खरी पण ती दुखाःचे सावट घेऊनच.
पुलोत्सव रविवारी आणि सुनीताबाई शनिवारी रात्री निर्वतल्या. शो मस्ट गो ऑन ह्या सुनिताबाईंच्या शिस्तीनुसार ८ ते १८ नोव्हेंबरचा पुलोत्सव रद्द न करता ठरल्यावेळी पार पडला. सर्वच कार्यक्रम पार पडले. पण तरुणाईला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो शेवटच्या दिवशी होतो तो पुढे-मागे करावा लागला इतकेच.समारोप समारंभ सुनितार्बांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अर्पण केला गेला.
मंगला गोडबोले यांनी या खास त्यासाठी लेखन आणि निवेदन करून स्मिता तळवलकर, डॉ. गिरीश ओक यांनी सुनिताबाईंच्या पुस्तकातील उतारे वाचून गृहिणी-सखी आणि सचिव म्हणून पु लंच्या आयुष्याला कसे वळण दिले याचे भान रसिकांना आले. डॉ. जयंत नारळीकरांनी लंडन ते आयुकातल्या प्रवासात पु ल आणि सुनिताबाईंनी कशी आस्थेवाईक चौकशी करून आयुकाला देणगी दिली याच्या आठवणी सांगितल्या. प्राध्यापिका रेखा इनामदार-साने यांनी सुनिताबाईंच्या शिस्तीच्या कल्पनांची महती सांगून आहे मनोहर तरी..या पुस्तकाने संसार काटेकोरपणाने सांभाळून पु लं सारख्या लेखकाला कशा पद्धतीने सांभाळल्याचे चित्र तर आहेच पण ते करतानाच स्वतःच्या कवितांची आवड, आणि वाचनाची सवय कायम ठेवली हेच दिसून येते.
सातव्या पुलोत्सवाने सुनिताबाईंचे मोठेपण अधिक व्यापक प्रमाणात रसिकता पोचविले. त्यांच्या कविता सादर करण्याची पद्धती इतकी विलक्षण होती की समीक्षकांनी जे चारशे पानी पुस्तक लिहून सांगता येत नाही ते त्यांच्या स्वाभाविक आणि उत्कट वाचन सामर्थ्याने सहजी कळून येते.त्यांच्या कविता वाचनाची महती आणखी एक की त्याची कुणी नक्कल म्हणूनही सादर करू शकत नाही.
"फलाटदादा" ऐकताना आपण भान हरपून जातो. एवढी शक्ती त्यांच्या कवीता वाचनात असते हे इथे सिध्द झाले.
सुनिताबाईंच्या आयुष्याचा पटच जणू पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात साकार होत होता.कधी शब्दातून तर कधी चित्रफीतीतून सुनिताबाईचे आयुष्य इथे उलगडले होते. ते पाहताना एकच जाणवले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र प्रतिभा तर आहेच. पण पुलंमुळे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले हे नक्की.
आहे "मनोहर" तरी....
या पुस्तकाला नाव काय द्यायचे याची चर्चा सुरू होती. वेगळी नावे समोर येत होती. गाडी चालवत दोघे चालवत असताना इतका बेकरीसमोर थांबली होती. बेकरीचे नाव होते मनोहर बेकरी. पुलंनी सुनतीबाईंना विचारले आहे मनोहर तरी... हे नाव कसे वाटेल. आणि पुस्तकाचे नाव नक्की झाले. आहे मनांहर तरी.कधीतरी आम्हालाही गृहीत धरा... असा टोलाही त्यांनी मारला.

सुभाष इनामदार, पुणे.

1 comment:

Jayant Karnik said...

Punyala asatanna tya doghanchahi Kavita Wachanache Karyakram anek wela aikanyache bhagya labhale. Aapan mhatale te kharech aahe.

Jayant Karnik