Thursday, November 19, 2009

सुनिताबाईंच्या प्रतिभेचे देणे

पुलोत्सवाच्या सातव्या महोत्सवात रसिकांनी अनुभवली सुनीताबाई देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
पुलं ऊर्फ भाईंनी लिहिते राहावे. त्यांच्या अंगच्या गुणांनी विविधरंगी बनावे यासाठी सुनिताबाईंनी कित्येकांचा रोष ओढवून घेतला. पुलंजवळ जायचे असेल तर सुनिताबाईंच्या मर्जीत आधी उतरा मग पुलदर्शन घडेल असा संकेतच जणू बनला होता.मात्र स्वतःमधील कला, लेखनाची ताकद, अभिनयाचे पैलू दडवून ठेवून त्यांनी पुलंसाठी एका अर्थाने आपल्या गुणांचा होम करून भाईंचा लेखन कुंड सतत प्रज्वलित ठेवला.
त्या स्वतः कवी नाहीत. पण कवींबद्दल विलक्षण आदर. त्यातूनच मर्ढेकर, बोरकर आणि आरती प्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम ज्या ताकदीने त्यांनी सादर केला त्याला तोड नाही. पुलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आशय संस्थेच्या संयोजकांनी सुनिताबाईंच्या प्रतिभेला रसिकांजवळ उलगडण्याचा प्रयत्न केला.ज्यांनी तो अनुभवला त्यांना धन्य वाटले. आणि सुनिताबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा मान मिळाला.
त्यांच्या ध्वनिचित्रफितीतून जे विलक्षण उलगडले ते थोडक्‍यात दाखविण्याचा प्रयत्न इथे केला आहे, इतकेच.त्यांच्या कवीतेतल्या सादरीकरणातपण त्यांच्या अंगचे विविधअंगी पैलू स्पष्टपणे दिसून येत होते. पण स्वतःला जाळत पुलंना उजळविण्याचा यज्ञ केवढा महान होता याची दखल घेण्यासाठी हा शब्दप्रपंच.

सुभाष इनामदार,पुणे

1 comment:

Jayant Karnik said...

Surekh aani samarpak.

Jayant Karnik