Sunday, September 13, 2009

संगीत नाटकाचा प्राणवायू-विनायक थोरात


शिलेदारांच्या नाटक कंपनीत आजही जे नाव कायम आहे त्यात ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांचे नाव येते.

संगीत नाटकाचा ठेका आणि ताल सांभाळतच त्यांना संसाराचा तोल सांभाळला आहे. गायकाच्या गायनाला मदत करत गायकाचे गायन फुलवत नेणारे त्यांचे वादन आजही त्याच पद्धतीने सुरू आहे.

जयराम शिलेदारांबरोबर संगीत नाटकाला तबला वादनाची साथ करण्याची प्रतिज्ञाच जणू त्यांनी घेतली आहे. सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ अशा पारंपरिक नाटकात संगीत पदांचा भरणा आहे. यात साकी, दिंडीसारखी थिरकत नेणारी नजाकतही बेफाट आहे. त्याला त्याच पद्धतीचे खास वादन थोरातांच्या बोटातून निघत असते.

नाही म्हणायला "स्वरसम्राज्ञी' या विद्याधर गोखले यांच्या नाटकातल्या एका प्रसंगात रंगमंचावर येऊन वादन करायचा प्रसंग असल्यामुळे विनायकराव प्रकाशात झळकले. अन्यथा त्यांची जागा प्रेक्षकांना पाठकरून गायकांच्या पदांना बोटांच्या नजाकतीने साथ करणे.शिलेदार मंडळीचा कुठेही कार्यक्रम करणार असली तरी तबला वादक म्हणून विनायकराव ठरलेले.

त्यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांना तालमधुरता देण्याचे काम अविरत पार पाडले. मात्र ते करताना स्वतःचा बडेजाव त्यांनी कधीही मिरविला नाही. शांत आणि सहनशील स्वभावामुळेच जणू त्यांच्या साथातली संयम जाणवतो. उगाचच तबल्यावर थिरकत करून मला किती तबला येतो याचे दर्शन त्यांच्या वादनात कधीही आढळणार नाही.

गायकाला फॉलो करणे अवढेच कां ते नेटाने करीत असताना दिसतात.संगीत नाटकांची आज चलती नाही. प्रपंच मात्र पुढे न्यावाच लागतो. तशाही स्थितीत जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदारांच्या नाटकाशिवायच्या मैफली करीत आहेत. याशिवाय शिष्यांना मार्गदर्शन करून उदरनिर्वाह सुरू आहे.गेली सुमारे चाळीस वर्षे एकनिष्ठ सेवा करणारा हा ज्येष्ठ साधक पाहिला, अनुभवला की आपोआपच नतमस्तक व्हावेसे वाटते. प्रसार माध्यमांची चलती असलेल्या युगात संगीत कार्यक्रमांचे दालन खुले झाले आहे. तरी स्वतःचे स्वत्व जपून तबला वादनाचे कसब रंगदेवतेच्या चरणी अर्पण करणाऱ्या या साथीच्या कलावंतांची दखल घेण्याची गरज वाटली .म्हणूनच आज विनायकराव थोरांतावर लिहिले.

अशी शेकडो साधक मंडळी असतील. त्यांचेही मोल तेवढेच आहे. त्यांसाऱ्यांना वंदन !

सुभाष इनामदार, पुणे

बालकवितेत ठसा उमटविणाऱ्या डॉ. संगीता बर्वे


व्यवसायाने डॉक्‍टर; पण लहानपणापासूनच साहित्याकडे ओढा असणाऱ्या संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या कवितांची तीन पुस्तके बाजारात आली आहेत.

"गंमत झाली भारी,' "खारूताई आणि सावलीबाई'; तसेच "झाड आजोबा' ही ती तीन पुस्तके आणि "हुर्रे हुप्प' हे चौथे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मुलांच्या मनाला सुखावणाऱ्या कल्पनांना आपल्या कवितेतून साकारणाऱ्या त्यांच्या प्रतिभेला आता कुठे धार चढू लागली आहे. मुलांच्या विश्वात रममाण होता होता त्यांच्या कलाकलाने त्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातल्या शब्दांना कवितेत आणण्याची कामगिरी संगीता बर्वे यांनी केली. नुकत्याच "गंमत झाली भारी' आणि "सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडीही फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.

त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्‍टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे

कुठेतरी खोलवर

आत आत काही

उसळत फेकाळत

वर येऊ पाही

त्यांची प्रतिभा सतत काही तरी सांगत असते.

समाजाशी, त्यातल्या प्रश्‍नांची नोंद आणि कधी जीवनाचा अर्थही सांगून जाते. "पॉप्युलर'ने काढलेल्या "दिवसांच्या वाटेवरून' या पुस्तकात त्यांचे सामाजिक भान प्रत्येक कवितेत दिसेल.

बालपणीच्या आठवणींचा उजाळा घेताना लक्षात येते, की संगीता प्रभाकर गोंगे, मु. पो. बेलापूर, ता. श्रीरामपूरच्या. वडील शाळेत चित्रकला शिक्षक. संगीताला चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद. पहिल्या केलेल्या कवितेच्या चार ओळी जेव्हा वर्गात सर्वांसमोर म्हणून दाखवल्या तेव्हाच बाईंनी ही मुलगी पुढे कवयित्री होईल, असे भाकीत वर्तविले होते.

शाळेच्या सुट्टीत खेळापेक्षा नव्या नव्या कल्पनांना शब्दांत बांधून स्वतःच्या हाताने कथेचे हस्तलिखित करायचा छंद लागला. वडील मुखपृष्ठ तयार करायचे. अशा तशी बाडे तयार व्हायची. त्यात कधी कविताही उमटते.शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर बीएमएस केले. आता डायटेशियनचा अभ्यासक्रमही पुरी केलाय. मराठी घेऊन एमए केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा साहित्यभूषणचा अभ्यासक्रमही पुरा केलाय. ललितलेखनाची आवड आणि संवेदनशील मन यामुळे कवितेचा छंद जोपासला गेलाय. तसे त्यांना पुरस्कारही मिळालेत.

खरे म्हणाल, तर त्यांचे सांगणे आता कवितेतून व्यक्त होते. त्यांचे मनच कविमन आहे.

आता जे सुचते ते कवितेमधून.आठवी ते दहावीतल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा रसास्वाद घेणाऱ्या पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.

दहा वर्षांत लिहिलेल्या कवितांचा संग्रह "मृगतुष्णा'द्वारे रसिकांच्या भेटीला आला. त्याला प्रस्तावना शांता शेळके यांची आहे.

लग्नानंतर मालती पांडे-बर्वेच्या गाणाऱ्या घरात त्या सून म्हणून आल्या. दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या विश्वात रमल्या आणि त्यातूनच बालकवितांचा जन्म झाला. आज त्यांच्या कवितांचा स्वप्नांचे पंख लाभलेत. छोट्यांच्या दुनियेत शब्दाने त्या वावरताहेत. त्यांना कवयित्री म्हणून मिरवायला आवडेल.

तशी त्यांची प्रतिभा सर्वत्र संचार करणारी आहे. सुजाण रसिकांच्या मनात रेंगाळणाऱ्या कविता कागदावर उमटविणाऱ्या या कवीच्या आगामी प्रवासासाठी शुभंभवतू!

सुभाष इनामदार,

पुणे


(संगीता बर्वे यांच्याशी साधलेला संवाद पाहण्यासाठी "ई-सकाळ'च्या फीचर्स लिंकवर क्‍लिक करा)