Thursday, February 4, 2010

खॉंसाहेबांच्या एंट्रीलाच टाळ्या ---







कट्यारची तालीम सुरु असतानाचे हे छायाचित्र



तो गातो तेव्हा डोळे मिटून ऐकले की जणू वसंतराव देशपांडेच गातात.



त्याच गायकीची नजाकत राहूल देशपांडेंच्या गळ्यातून निघते. पण..आज आजोबांनी गाजविलेल्या कट्यार मधल्या खॉंसाहेव आफताफ हुसेन यांच्या भूमिकेत तो कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांची नजर एकवटली होती.



रंगमंचावर एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी या नव्या रुपातल्या खॉंसाहेबांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
राजस्थानी हवेलीचे दर्शन देणारा जयपूरच्या फिकट तपकीरी रंगाचा भव्य सेट नांदी नंतर डोळ्यांना सुखावतो. आणि कट्यार नाटकाच्या जुन्या आठवणी दूर निघून जातात. कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करुन ठेवलेल्या नाटकाला तब्बल 28 वर्षानंतर साकारण्याचे राहूल देशपांडे यांनी मनात आणले आणि ते सिध्दीस नेले. याचे कौतूक करावे तेवढेच थोडेच आहे. आजोबांचा वारसा नातवाने अशा पध्दतीने पुढे न्यावा ही खरी संस्कृतीची ओळख आहे. साकारताना आजोबांच्या भूमिकेत राहूल बसले पण ती साकारली आपल्या स्वतःच्या गायकी ढेंगाने. अगदी टेचात.


या निमित्ताने कट्यारच्या रुपाने गेले कांही वर्षे अस्तंगत पावत असलेल्या अभिजात संगीत नाटकाला नवसंजीवनी मिळाली असे म्हटले तरच ते वावगे ठरणार नाही.वंसतराव देशपांडे संगीत सभा निर्मित वंतराव देशपांडे प्रतिष्ठान प्रकाशित संगीत कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता होती.


त्यामुळेच चार फेब्रुवारीची गुरुवार संध्याकाऴ संगीत रसिकांसाठी एक आनंददायी पर्वणीच होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हाऊसपुल्लची पाटी झळकत होती.नाट्यसंपदेचे प्रभाकर पणशीकर ज्यांनी वसंतराव देशपांडें यांचे कट्यार आपल्या संस्थेमार्फत सादर केले ते ही प्रयोगाला हजर होते.


विद्याताई अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, रघुनंदन पणशीकर असे संगीत आणि नाटक अनुभवलेले अनेक रसिक सारेच नाटक पाहण्यासाठी अधिर झाले होते. नाटकाला पारंपारिक संगीत नाटकापेक्षा वेगळी ट्रीटमेंट देताना दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मूळ संहितेला धक्का न देता वंगळ्या पध्दतीने रंगमंचावर मांडले आहे. पं. भानुशंकराचे पात्र नाटकाच केवळ संवादातून प्रकटते. कांही वेळा वेगळे संवादही अभिराम भडकमकरींनी दारव्हेकरांच्या संवादाला साजेसे लिहले आहेत. घराणेदार गायकीची परंपरा आणि त्यातल्या अनिष्ट वृत्तीवरही नाटकात अखेरीस टिका करुन संगीत साधकांना दिशा देण्यासाठी नवा संवाद शेवटी नाटकातून भरत वाक्य या न्यायाने दिले आहे. तेही वेगळपण.


हेच वेगऴेपण काय आणि नाटक कसे उभे केलेय हे पाहण्यसाठी कट्यारचा प्रयोग पहायला हवा. रसिकांच्या चेहर्‍यावर याबद्दची उत्सुकता दिसत होती.



पुरुषोत्तम दारव्हेकरांचे दर्जेदार लेखन आणि पं. जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिग्दर्शनाच्या रुपाने चढविलेली रुपेरी झालर या दोन्हींचा मिलाफ या नव्या नाटकातून कसा होतो आहे ते पाहण्यासाठी पुणेकर मोकळ्या मनाने आले होते.



एकेकाळी शंकर घाणेकरांना गाजविलेल्या कविराजाच्या भूमिकेत सुबोध भावे कसा शोभतो तेही पाहणे आकर्षणाचा भाग होता.अखेरीस खॉंसाहेबांच्या रुपात राहूल देशपांडे यांची एंट्री झाली आणि..... उत्स्फूर्त टाऴ्यांनी प्रक्षागृह निनादले गेले. कट्यार मधल्या संवादाची पकड आणि स्वरांचे मधाळ पण धारदार घुसळत जाणारे स्वर प्रेक्षागृहात घुमु लागले. तेव्हाच ही कट्यार रसिकांच्या काळपर्यंत थेट पोचल्याची पावती मिळाली. घेई छंद मकरंदनंतर टाळ्यांनी दिलेली दाद अणि राहूलच्या रुपात नटलेल्या खॉंसाहेबांची उर्दू मिश्रीत भाषा सारेच ऐकण्यासाठी आतूर झालेले रसिक तृप्त होत गेले. तोच पण नवा पेहराव. वाक्यातली ती खास शैली. संयमीत पण संवादातले वेगळेपण टिपत रंगमंचावर फिरलेली व्यक्तिरेखा पाहताना मन मोहरुन जात होते. यातली नाट्यपदे तो इतरही वेळा गाजवत असे पण आज भूमिकेच्या आकृतीबंधात राहून इतरांना बरोबर घेऊन साकारली जाणारी व्यक्तिरेखा पाहण्यात नाविन्य होते.



राहूल देशपांडे भूमिकेत दिसले छान आणि रंगलेही उत्तम. संगीत रंगमंचावर अशी ताकदीची तीही आजोबांनी गाजविलेली साकारण्याचे शिवधनुष्य त्यांनी सहजी पेलले. तो सूर त्यांनी नेमका पकडून ठेवला होता. नाटक चढत जाताना दारव्हेकरांच्या संवादातली ताकद पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने बाहेर येत होती.


राहूलच्या दमदार गायकीचा अनुभव घेतानाच महेश काळे यांनी सदाशिवाच्या रुपाने साकारलेली भुमिका ठसत गेली ती त्याच्या संथ पण तळपत्या गायन शैलीने. दुसर्‍या अंकात शेवटी सूतर पियाकी नाट्यपदातून दोन गायकींची सुरेल मैफल ऐकताना येणारा आनंद शब्दापलिकडचा होता.



कविराजाच्या भुमिकेत संयमी आणि मोकळ्या संवादाची किनार सुबोध भावेंच्या सहजी अभिनयातून उलगडत गेली. वाक्यांचा तोल संवादातला पोत सांभाळत ते वावरले.दिप्ती माटे( राहूलची बहिण) अणि सौरभ काडगावकर,अमेय वाघ यांनी नटविले चांद-उस्मान हवेलीतल्या सूरांना सांभाळत रसिकांना आपल्याबरोबर घेउन जातात.वेदश्री ओक (उमा)यांच्या लडीवाळ सुरेल पदांनी नाटकाची उंची गाठली .



दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे यांनी नाटकात जिवंतपणा आणला. नेपथ्य, प्रकाशातून साकारलेला हे चार तासांचे हे नाटक कविराच्या रागमालिकेत गुरफटत नाही. स्वतःच्या रागांची मैफल मांडताना प्रकाशाच्या आणि हालचालीच्या सहाय्याने रागमालिका वेगळीच संगीत अनुभूती देते.संगीताची तोच बाज आणि नाटकाची गती अणि संवादफेकीतली गंमत यातून कट्यारचा प्रयोग एक नवा आनंद देउन जातो यात शंका नाही.राहूल देशपांडेंबराबरच महेश काळेया अमेरिकास्थित अभिषेकींच्या शिष्याने गायनात सादर केलेले कौशल्य पाहण्यासाठी ही नवी कट्यार आपल्या काळजात घुसवून घ्यायलाच हवी.



संगीत नाटकाचे हे वैभव , ती भव्यता, ते देखणेपण आणि नाट्यपदातली करामत पाहताना चार तास कसे जातात ते कळतच नाही.






सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmail.com(9552596276)

4 comments:

Mandar Joglekar said...

Apratim visleshan!! Dhanyawad.

Naniwadekar said...

> तब्बल 28 वर्षाच्या खंडानंतर कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करून ठेवलेल्या या संगीत नाटकाला पुन्हा साकरण्याचा मानस करून तो सिध्दीस नेण्याची जबाबदारी राहूल देशपांडे यांनी उचलली.
>---

श्री इनामदार : 'कट्यार'च्या या आधीच्या प्रयोगानंतर २८ वर्षांचा खंड पडलेला नाही. २००२ साली या नाटकाचे काही प्रयोग झाले होते. राजीव परांजपे यांनी त्या सुमारास काही नाटके रंगभूमीवर आणली होती. खानसाहेबांची भूमिका चारुदत्त आफळे यांनी केली होती. नक्की किती प्रयोग झाले होते याची मला कल्पना नाही. मी त्या वर्षी 'कट्यार' आणि 'मत्स्यगंधा' ही नाटके पाहिली होती.

- नानिवडेकर

subhashinamdar said...

'कट्यार'च्या या आधीच्या प्रयोगानंतर २८ वर्षांचा खंड पडलेला नाही. २००२ साली या नाटकाचे काही प्रयोग झाले होते. राजीव परांजपे यांनी त्या सुमारास काही नाटके रंगभूमीवर आणली होती. खानसाहेबांची भूमिका चारुदत्त आफळे यांनी केली होती. नक्की किती प्रयोग झाले होते याची मला कल्पना नाही. मी त्या वर्षी 'कट्यार' आणि 'मत्स्यगंधा' ही नाटके पाहिली होती. -------------------------
नानिवडेकर सर, तुमच्या प्रतिसादाला मी दाद तर देतोच. पण उत्तरही पाढवित आहे. तेही मी ब्लॉगवर प्रसिध्दही केले आहे.तुमच्यासारखे रसिक हे आमचे भाग्य. नाहीतकर आम्ही लिहायचे आणि त्याला प्रतिसादाविनाच ब्लॉगमध्ये जागा मिळायची .
...... कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करुन ठेवलेल्या नाटकाला तब्बल 28 वर्षानंतर साकारण्याचे राहूल देशपांडे यांनी मनात आणले आणि ते सिध्दीस नेले. याचे कौतूक करावे तेवढेच थोडेच आहे. आजोबांचा वारसा नातवाने अशा पध्दतीने पुढे न्यावा ही खरी संस्कृतीची ओळख आहे. साकारताना आजोबांच्या भूमिकेत राहूल बसले पण ती साकारली आपल्या स्वतःच्या गायकी ढेंगाने. अगदी टेचात.

Vijay Deshmukh said...

are vaa !!! Lucky aahat tumhI...

ya natakachi CD milate ka ho ?