Saturday, October 9, 2010

कावळ्यांनो पिंडाला शिवा रे.......


काव ...काव ... खारे पाटणजवळच्या नानिवड्यातील चार मुले ही हाक देऊन कावळ्याला हाकारा देत होती. घराच्या मागच्या शेतीच्या भागातच ९२ वर्षांच्या आजींचा दहावा केला जात होता. पंचक्रंशीत एकच भटजी त्याच्या वेळेनुसार सारे विधी होत होते. सर्व आप्तजन नातेवाईक यांनी पिंडाला नमस्कार केला. सुना नातवांनी आजीला जे आवडते असे वाटते ते शेजारी ठेवले. आता त्यांच्या मनासारखे सारेच झाले असावे. कोणतीही इच्छा अपुरी राहिली असे वाटत नाही. सगळे काही मिळाले. असेच आपसात कुजबूजत होते.
अखेरचे महणजे कावळ्याने पिंडाला शिवण्याचे काम अधुरे होते. कोकणातल्या परिसरातल्या त्या इतरवेळी निसर्गरम्य वातावरणाला भावनेची काळी नजर लागल्यासारखे भासत होते.
गुरूजी बाजू झाले. भाताचा तयार केलेला पिंड कावळ्याने येउन टोच मारावी व तो खावा यासाठी बाजूस ठेवला होता. तसे केले तरच आईच्या इच्छा पूर्ण झाल्या असे मानले जाणार होते.
भाताच्या शेतीच्या एका मध्यभागच्या मोकळ्या शेतात. नारळ, आंब्यांच्या उंच वाढलेल्या वृक्षातून कावळे येतील आणि पिंडाला शिवतील अशी आशा होती. आरंभी कावळ्यांची सावलीही दिसत नव्हती.आजींची ७०-६० वयाची मुले आता कावळ्यांनी यावे आणि आपल्या आईच्या पिंडाला शिवावे यासाठी हाका मारायला लागली...काव..काव.. काव.....
पण कावळे कुठेले. इतर पक्षांच्या किलबीलाटाने शेतीचा परिसर या भर दुपारी साडेबारच्या शांततेचा भंग करीत होता. पण कावळा मात्र दिसत नव्हता. आता मात्र हाका मारणा-या मुलांनी आर्ततेने कावळ्याची आराधना चालू ठेवली. इतरही सुना-मुली आईच्या इच्छेची आठवण करत हात जोडून प्रार्तना करीत होत्या. पण कुठले काय... कावळे मात्र दिसत नव्हते.
तासाच्या प्रतिक्षेनंतर यांच्या हाकामारण्याने म्हणा किंवा कसे झाडांच्या आडून तीन कावळ्य़ांचे आगमन झाले. पण ते खाली इतरून पिंडाला शिवतील असे चिन्ह नव्हते. वरून घिरट्या घालत होते पण पिंड जिथे ठेवला होता तिथे फिरकायला तयार नव्हते. तिस- चाळीस नातेवाईक मंडळी हे सारे चित्र निमूटपणे पहात होती. आलेले भटजी निवांतपणे घराच्या सावलीत कावळी शिवला की मग मला सांगा अशा स्थितीत घरात निवांत होते. वर घरातल्या बाईमाणसांशी चर्चा करण्यात ते सामिल झाले होते. या गावात ना कावळा फारसा कुणालाच शिवत नाही, काय़ समजले.पण ती वयाने ज्येष्ठ असलेली मुले जिवांच्या आकांताने कावळ्याची आर्तपणे वाट पहात होती. कावळा शिवल्याशिवाय दहाव्याचा विधी पूर्ण होऊ शकत नव्हता. तोपर्यंत कुणी मुखी काहीच टाकू शकत नव्हते. त्याही स्थितीत ज्यांना गाडी पकडायची होती ते पुन्हा एकदा पिंडाला नमस्कार करून चालते झाले.
कावळ्यांना किती महत्व आहे. ते मला तिथे जास्त जाणवले. पुण्यात ओंकारेश्वरावर कावळ्यांची फौज दहाव्याचे पिंड खायला तयारच असते. पिंड ठेवायचा अवकाश टोच मारून ते सारा भात फस्त करतानाचा अनुभव पंधरादिवसांपूर्वींच घेतला होता. आणि इथे मात्र कावळ्यांची चाहूलही नव्हती. तसे पहायला एका झाडावर कावळा दिसत होता पण तो पिंडाला शिवायला तयार खाली येतच नव्हता.
दोन तासाच्या कावळ्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस दर्भाचा कावळा करून पिंडदान केले गेले. सर्वांनी तिलांजली दिली. आमच्या वडिलांच्या वेळेसही असेच झाल्याचे त्यांचा एक मुलगा म्हणाला देखील. पोटात कावळे भुकेने व्याकूळ झालेले पण प्रत्यक्षात कावळे यायला ही स्थिती. तेव्हा भूकेने कावळे ओरडतात हे काय तेव्हा प्रत्यक्षात उमजले.
खरच, तेव्हाच मी ठरवून टाकले की ... आपणही सांगून टाकायचे. माझ्या बाबतीत असे काही करू नका.
पण हे झाले माझ्यापुरते. मात्र एक नक्की श्रध्दा मग ती अंध का असेना अनेक जण आजही अधुनिक युगात ती पाळताहेत. आणि तीही डोळे उघडे ठेऊन . माणूस मेल्यानंतर काय होते... याचे संशोधन सुरू आहे. पण अधुनिक युगातला माणूस प्रत्यक्षात आपल्या घरात असे काही घडले की जनइच्छेमुळे म्हणा किंवा इतरांसाठी... सारे क्रिया-कर्म जुन्या चालीरितीप्रमाणे आजही करत आहे. मग ते देहदानाचे मृत्यूपत्र केलेला माणूस का असेना घरचे आजही पुढचे संस्कार लोक-लज्जेस्तव हे सारे विधी करत असतो.

जे पाहिले ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा कुणाच्या भावनेशी केलेला खेळ नक्कीच नाही.
मात्र यातून जे पाहिले ते सांगावे यातून काहीतरी चर्चा व्हावी आणि यावर कुणाचे काही मत असल्यास पहावे म्हणूनच हा प्रपंच.
.यातून कुणाला क्लेष झाला तर तर मी त्यांची माफी मागतो. तुमची मते मात्र अवश्य नोंदवा......



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamar@gmail.com
9552596276

Sunday, October 3, 2010

सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा फसलेला प्रयोग

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राज्याबाहेरच्या आणि राज्यातल्या ४८ संस्थांनी १ ते ३ आक्टोबरपर्यत सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलन भरविण्याचा एक हास्यास्पद प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे.
अखिल भारतीय स्तरावचे नाट्य संमेलन राज्यात न होता ते विश्र्व नाट्य संमंलन म्हणून न्यू जर्सीला झाले हे काही पुण्यातल्या नाट्यवर्तूळातल्या मंडळींना खटकले. नाट्य संमेलन ही नाट्य परिषदेची मक्तेदारी नसावी असा सूर या मंडळींनी लावला आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जावून हा स्वतंत्र नाट्यसंमेलन भरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्यक्षात या संमेलनाला मिळालेली दाद पहाता तो सपशेल फसला असेच म्हणावे लागेल.

नाट्यक्षेत्राने याची दखलही घतली नाही. पुण्यात नाट्य परिषदेचे कार्यालय आहे. त्यातले फारसे पदाधिकारी इकडे फिरकेलेही नाही. जे दिसले ते ह्या संमेलनात काय होते ते पाहण्यासाठी हजर राहिले .पहिल्या दिवशीच्या पूर्वसंध्येला एक दिंडी काढण्याचा प्रयत्न झाला पण आयोध्येच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर त्यांना तो संयमित ठेवावा लागला.

प्रत्यक्षात जेव्हा संमेलन सुरू झाले तेव्हा जेमतेम साडेतीनशे मंडळी बालगंधर्वाच्या खूर्च्यात विराजमान झाली होती. त्यातले काही विद्यार्थी डि.वाय पाटील यांच्या संस्थेतले होते कारण खुद्द तेच या संमेलनाचे उदघाटक होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विश्वास मेहेंदळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर साध्या खूर्चीत आणि एकटे डी वाय पाटील सिंहासानासारख्या खूर्चित विराजमान झाल्याचे चित्र केवीलवाणे होते.
फारशी दखल घेण्यामागचे नेमके कारण शोधायचा प्रयत्न केला तेव्हा तर खरच भारी गोष्ट कानावर पडली. हे नाट्यसंमेलन आपण पुढे ढकलू. आत्ता पुरेशी तयारी झालेली नाही. मात्र विश्वास मेहेंदळे यांनी हट्टाने परस्पर तारखा, वक्ते आणि कार्यक्रम पत्रकार परिषदेत जाहिरही करून टाकला. अशी माहिती मिळाली. त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून मिरवायचे होते हेच यातून सिध्द होते.

तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला गेला असाल तर ते तुम्हलाही जाणवेल.
मराठी नाटक काल,आज आणि उद्या या परिसंवादाचे अध्यक्ष होते खुद्द विश्वास मेहेंदळे पण त्यांनीच वादसंवाद प्रमाणे उपेंद्र लिमये, लालन सारंग आणि राम हेजीब यांच्याशी संवाद केला.
स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉ. दिपक टिळक पण ते हजरच नव्हते. कारणाची चौकशी केली तेव्हा कळाले की, त्यांना व्य़क्तिशः निमंत्रणही देण्यात आले नव्हते आणि अखेरच्या क्षणापर्यत त्यांच्याशी संपर्क सुरू होता. पण ते आले नाहीत. याला कारण मेंहेंदळे यांचा हट्टच.
परिसंवादात मेहेंदळेयांनी जाहिरपण सांगितले की आम्हाला मुख्यमंत्री येतील असे अजूनही वाटते. मी व्यक्तिशः त्यांना २५ वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पीएकडून ते मिटींगमध्ये आहेत. असेच उत्तर मिळाले. अपेक्षा होतील ते येतील पण ते आले नाहीत.

एकूणातच समारोपाच्या कार्यक्रमात खुद्द मेहेंदळे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकले नाही हा माझा नव्हे, तर नाट्य परिषदेचा अपमान होता. त्याला सकारात्मक उत्तर म्हणून हे संमेलन आम्ही हे संमेलन यशस्वी केले., असे म्हटले आहे.

एकूणातच हा सारा मेंहेंदळे यांचा हट्ट होता असे दिसते. ते त्यांनी का केले याला उत्तरच त्यांनाच दिले आहे. पुण्यातल्या योगेश सोमण, सुनिल महाजन, प्रकाश पायगुडे आणि प्रकाश यादव आणि एक सातारच्या शिरीष चिटणीस यांच्या मदतीने हा सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा घाट घातला. बालगंधर्वाच्या तीन दिवसांचे पालेकेचे भाडे वाया घालविले आणि एक नाट्यक्षेत्रात वेगळाच पायंडा पाडण्याचे काम केले आहे.
यातून काय सिध्द झाले ते काळ ठरवेल. पण हा सारा खटाटोप दुस-यांना नावे ठेवत स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी केलेला खेळ होता. याची दखल आणि यातून नेमके साय साधले ते आपोआपच कळेल. पण जे घडले ते फार समाधान कारक नव्हतेच पण पोरखेळ होता असे मेंहेंदळे यांचा चाहता असूनही क्लेषाने म्हणावेसे वाटते. यातून कुणाला वाईट वाटले असले तर मी क्षमा मागतो. पण जे झाले, दिसले ते फार काही चांगले नव्हते.....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com