Sunday, June 26, 2011

भक्तिची शक्ती




रविवारी पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या मुक्कामी दाखल झाल्या...लाखो वारकरी भावभक्तीची पताका हाती घेऊन.. मुखाने विठ्ठल नामाचा गजर करीत मिळेत त्या जागी आपली मुक्कामाची दिंडी घेऊन...पुणेकरांच्या विशाल मनाचे...पुण्यनगरीतल्या दानशूरांचे दर्शन घडवत .... वारक-यांची सगळी सोय करीताना पहाणे.....हा दुर्मिळ योग....या शहरात अनुभवला गेला.
संख्या कितीही असली तरी या निमित्ताने राजकीय, सामाजिक, सेवाभावी आणि विविध संघठनांचे फलक गल्लोगल्ली फडकत होते. उद्देश एकच वारक-यांची सेवा...
दरवर्षी प्रत्येक दिंडीचा मुक्कामाचा पत्ता एकच असतो.. कुणी बंगल्यात..तर कुणा आपल्या चाळीत..तर नाना पेठेतल्या मशीदतही मुक्कामाची, रहाण्याची आणि भोजनाची सोय केली जाते...
जात धर्म पंथ नसे उरे कांही
भक्तांची सेवा हाची उद्देश
पालखी आली की पांडुरंग पाऊस आणिल याची वारक-यांना खात्री असते...यंदा आता तरी पावसाने चिंब केले नसले तरी आपली उपस्थिती दर्शविली...
दिंडीत दरवरर्षी वाढ होत असते.. यंदा तर आयटीची दिंडी निघाली.. वारक-यांचा उत्साह पाहिला...त्यांचे हरिभक्तित गुंतलेले रूप पाहिले की, हे चैत्यन्य देणारी शक्ति नक्की चराचरात आहे याची खात्री होते.
तुम्ही साधे किलोमिटर चाला तुम्ही दमाल . थकाल..
पण हे भक्तिचे वारकरी हातात तुळशी वृंदावन..खांद्यावर आपले ओझे..हातात टाळ...अशा अवस्थेत रोज ३० ते ५० किलोमिटरचा प्रवास करत पंढरपूरकडे आनंदात नाचत, गात मोठ्या भक्तित तल्लीन होत चालत असतात...
कधी रिंगणात..तर कधी आपल्या दिंडीत नाचत असतात...
एके काळी यात वृध्द जास्त दिसत..पण आज तरूण... नोकरदार,,,स्त्रीवर्ग ..डोईवर मुलाला घेऊन निघालेला शेतकरीही दिसेल....यातच भर म्हणून की काय याचे आकर्षण वाटणारा परदेशी पाहुणा वारकरीही सहभागी होताना पाहिले की हे काही विलक्षण आहे.. वेगळे रसायन आहे.. हा भक्ति शक्तिचा वेगळा जिवंत आविष्कार घडतोय याची खात्री पटते.
महागाईचा राक्षस आवासून असताना... सारी चिंता..सारी भिती...सारी काळजी दूर सारून हा एवढा जनसमुदाय पंढरीच्या वाटेवर चालत निघालाय..हे चैत्यनमयी चित्र..प्रेरणादायी आहे...
एका बाजूला रोजचे जगणे हाच एक चिंतेचा विषय असताना असा लाखोंचा भक्तिसागर टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत विठ्टलाचा धावा करत पंढरपूरच्या दिशेने चालतो..धावतो आहे....काय आहे हे?
चाल त्यांची एकच ध्याती
अवघी विठ्ठल मुखी म्हणती
भावभक्तिचा सारा तो सुकाळ
मोहमाया दूर पळून जाय
काय वर्णू खुंटती ते शब्द
पंढरीच्या पाडुरंगी ठाव देवा
पालख्यांच्या मुक्काम सोमवारी सासवडच्या दिशेने चालू लागेल... जनांचा हा प्रवाह असाच पुढे चालू लागेल...हिच शक्ति ठरलेल्या वेळी...मुक्कामी दाखल होईल...चिंता चित्ती नाशवंत देहीचा हा प्रवास कित्येक शतके सुरू आहे....सुरू राहणार...
या शक्तिचे विराट दर्शन घडविणा-या त्या वारक-यांचा भक्तिला प्रणाम...
त्याच्या बहुरंगी व्यासंगाला प्रणाम...
घडो हिच सेवा...मज वाटे भास
होऊन भक्तरूप...घेई ध्यास

सुभाष इनामदार, पुणे
Mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com

No comments: