Thursday, August 4, 2011

महाराष्ट्रीय कलोपासकाच्या नाटकाची नांदी


कलोपासना करणारे निष्ठावान कार्यकर्ते हे जांच्या जवळ आजही आहेत तेच हे महाराष्ट्रीय कलोपासकाचे उपासक...
ऑगस्टच्या ३ तारखेला संस्थेने आयोजित केलेला मेळावा...हे त्याचे प्रतिक होते...
१९३६ साली संस्थेचे आपला अधिकृत नामफलक लावला. आणि आज बरोबर ३ ऑगस्ट २०११ ला संस्थेने ७४ वर्ष पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पाऊल टाकले. .

मोजक्याच पण नाटकवेड्या मंडळींसमवेत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यंदा संस्था नवीन नाटक करणार असण्याची घोषणा संस्थेचे सचिव धनंजय गोळे ( जे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे नातू होत) यांनी केली. त्याचे दिग्दर्शनही आपण करणार असल्याचेही जाहिर करून कलोपासकांच्या पुढील वाटचालीचा अंदाज येत गेला. केवळ पुरूषोत्तम करंडक स्पर्धा भरविणे हा संस्थेचा हेतू असल्याचे सध्या बोलले जाते. या पार्श्वभूमिवर संस्था एक हौशी नाटकवेड्या कार्य़कर्त्यांची आहे हे मंडळी विसरून चालली होती.

आता पुन्हा नाटक करणे. राजाभाऊ नातूंनी केलेल्या विविध ध्वनिमुद्रणातील निवडक भागांचे दरमहा कार्यक्रम करणे. आणि पुरूषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरच्या स्पर्धोंची पुण्याबाहेर नेण्याची योजना कार्यान्वयीत करणे. अशा काही मह्त्वाच्या निर्णयांचे या स्नेहमेळाव्यात जाहिर कौतूक झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात नवी चेतना निर्माण झाली.

ज्या ठिकाणी संस्थेने आपली पहिली मूहूर्तमेढ रोवली , त्या नूमवि शाळेच्या जवळच्याच वास्तूत कलोपासकाने योजलेल्या अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडला. या समारंभात डॉ. सुरेश गरसोळे, डॉ. प्र.ल गावडे, आणि गेली ५५ वर्षे व्यावसायिक रंघभूमिवर आणि चित्रपटाच्या ऑफर नाकारून महाराष्ट्रीय कलोपासक आणि भालबा केळकरांच्या पीडीएत काम करणा-या सेवा चौहान यांनी तो भूतकाळ जागा करून इतिहासातल्या संस्थेच्या मोलाच्या कार्याचे कथन केले.
ज्येष्ठ्य अभिनेते श्रीकांत मोघे यांनी अपूर्व बंगाल या कलोपासकाने केलेल्या नाटकात पहिली भूमिका करून रंगभूमिवरचे पहिले पदार्पण कसे केले आणि तिथे आपणाला रंगभूमिवर काम करण्याचा सूर सापडल्याची प्रांजल कबूली दिली.

भगवान पंडित, प्रमिलाताई बेडेकर आणि राजाभाऊ नातू यांच्या नंतर महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेला पुढे नेण्याचे काम अनेक नाट्यप्रेमी कार्य़कर्त्यांनी केल्यामुळेच संस्था आजही ओळखली जात असून यापुढेही आपल्या नवीन योजनातून संस्थेची वाटचाल सुरू राहिल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष निनाद बेडेकर यांनी दिला.

एके काळी पुण्यातून स्पर्धेला कुठले नाटक येतेय याची वाट मुंबईचे व्यावसायिक लोक पहात असत. यापुढेही अशी नाटके काढा की व्यवसायीक पुण्याकडे अशा दृष्टीकोनातून बघतील ...

श्रीकांत मोघे यांच्या बोलण्यातून चांगल्य़ा गुणवत्तेची नाटके आली तर मराठी प्रेक्षक पुन्हा नाटकांकडे खेचला जाईल, असा आशावादी सूर आला.


सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

No comments: