Friday, December 23, 2011

साधनेला दे बळ नवे

भावनेला दूर सारा
साधनेला बळ द्या
गुंतून प्रेमात त्या
कलेचा गंध घ्या....
आजचा बाजार सारा
धग कुणाची कुणाला
आवरोनी मन आता
चिंतनाला पुजू या...
चित्त हवे स्थिर तेव्हा
रियाजाची बैठक हवी
सूर, तान, तालही
आत्मरंगात रंगूनी जा....
नजर एक, धेय्यही एक
मंत्र जपाया मन हवे
संगीताच्या सूरातून
सप्तरंग झंकारले....
नको घाई करू साधका
गुरूचें स्मरण हवे
चित्त एकाग्र करुनी
साधनेला दे बळ नवे



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, December 20, 2011

दाराआड डोकावताना

दाराआड डोकावताना नजरेत काय होते?
हूरहूर, प्रेम, व्याकूळता की ओढ होती?

झपाटलेल्या एकांताची चेह-यावर मागणी होती
विसारू न शकणारी आश्वासक धिटाई होती
साशंकता, मार्दवता दूर सारणारी तीव्र भावना होती


अकर्षकता, प्रेमभाव सारेच कसे एकवटले होते
आशेच्या सोज्वळ नजरेत ते सारे व्यक्त होत होते

काळजी करणारा स्वभाव आज मात्र चिंतीत होता
गुंतून तुझ्यात अबोल विरह स्पष्ट होता

सौंदर्यात साठलेले प्रेम एका कटाक्षात पोहचोत होते
चंद्राच्या शितलतेची ,सूर्याच्या प्रखरतेची किरणे त्यात विखुरली होती

पुन्हा पुन्हा आठवताना डोळ्यासमोर तेच येते
मनातल्या मनातली प्रतिमा घुसून आक्रंदत होती



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 19, 2011

गोवा मुक्ती संग्राम आठवताना


गोवा मुक्ती लढा आठवतो कारण आज गोवा मुक्ती स्वातंत्र्याचा ५१ वे वर्ष.
पुण्यात या दिवशी भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेने गोमंतक मुक्ती चळवळीवर आधारीत
शशीकांत मांडके लिखित पुस्तकाचे प्रकाशन
केसरीचे संपादक दिपक टिळक यांच्या हस्ते केले.
या निमित्ताने हा मुक्ती संग्रामाचा आठवा...


-----------------------------
१८४५ पासून गोव्याला पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये र्मयादित मताधिकार मिळाला. १९१0 मध्ये पोर्तुगालमध्ये राजसत्ता नष्ट होऊन प्रजासत्ताक अस्तित्वात आले. त्यामुळे गोमंतकाला प्रांतिक स्वायत्ततेचा फायदा झाला; परंतु १९२६ मध्ये पोर्तुगाल
मध्ये पुन्हा राज्यक्रांती होऊन सालाझारची हुकूमशाही सुरू झाली. त्यामुळे तेथील स्वायत्तता संपुष्टात आली. विसाव्या शतकात पोर्तुगीजांची सत्ता झुगारून देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. १९२८ मध्ये मुंबई येथे गोवा कॉँग्रेस कमिटी स्थापन झाली. १९४८ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर गोवामुक्तीच्या हालचाली अधिक तीव्र झाल्या. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपविण्याचे पोर्तुगालने फेब्रुवारी १९५0 मध्ये नाकारले. सन १९५४ मध्ये दादरा-नगरहवेली हा भाग पोर्तुगालने मुक्त केला; मात्र तेथे आपल्या फौजांना जाण्यासाठी मोकळीक असावी, या मागणीसाठी पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज दाखल केला. १२ एप्रिल १९६0 रोजी त्याचा निकाल पोर्तुगालच्या विरोधात लागला. सन १९५५ मध्ये मोठय़ा संख्येतील सत्याग्रहींनी गोमंतकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आझाद गोमंतक दल, गोवा लीग, गोवा मुक्ती फौज, विमोचन समिती अशा अनेक संघटनांनी गोव्याचे स्वातंत्र्य जवळ आणले. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने लष्करी कारवाई केली. पुढच्याच वर्षी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. सुरुवातीला लष्करी प्रशासकाकडे कारभार होता. नंतर निवडणुका होऊन २0 डिसेंबर १९६३ रोजी लोकनियुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. २२ जानेवारी १९६५ रोजी गोवा विधिमंडळाने हे राज्य महाराष्ट्रात विलीन करावे, असा ठराव केला होता; परंतु १६ जानेवारी १९६७ रोजी यासंदर्भात घेतलेल्या सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित राज्य असावे, असे ठरले. गोव्यात निवडणूक होऊन दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता आली. बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर १९७३ मध्ये शशिकला काकोडकर त्याच पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री झाल्या.

गोव्याचा इतिहास

महाभारताच्या ‘भीष्मपर्वा’त (अध्याय ९) आणि ‘स्कंदपुराणा’त (सह्याद्री खंड) ‘गोमंत’, तर ‘सूतसंहिते’त ‘गोवापुरी’ या नावाने गोव्याचा उल्लेख आढळतो. पुरातन काळी गोधनाची विपुलता असल्याने या प्रदेशाला ‘गोवा’ हे नाव पडले असावे. परशुरामाने सोडलेला गौ (बाण) गोव्यापर्यंत पोहोचला. त्या बाणाचा जेथे अंत झाला, तो प्रदेश म्हणजे गौमान्त-गोमन्त-गोमंतक अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते.
इसवीसन पूर्व तिसर्‍या व दुसर्‍या शतकात गोव्यावर मौर्यांचा अंमल होता. अर्बेली (साखळी महाल) येथील गुहेत सापडलेल्या शिलालेखांवरून इसवीसन पहिल्या शतकात गोवा हे मोठे शहर व व्यापारी केंद्र असावे, असा अंदाज लावता येतो. अंत्रूज (फोंडा) महालातील दोन ताम्रपटांप्रमाणे चंद्रपूर (चांदर) येथे चौथ्या शतकात देवराज राज्य करीत होता, असे कळते; परंतु तो कोणत्या घराण्यातील होता, याचा बोध होत नाही. या शतकातच गोव्यात बनवासी येथे कदंबांची सत्ता सुरू झाली. पाचव्या शतकात कदंब बादामीच्या चालुक्यांचे मांडलिक बनले; मात्र त्यांची गोमंतकावरील सत्त नष्ट झाली नाही. चालुक्यांशी विवाहसंबंध जोडून जयकेशी कदंबाने आपली सत्ता वाढवली. कदंबांच्या सत्तेचा काळ हा गोव्याच्या भरभराटीचा काळ. या घराण्यातील पहिला व दुसरा गुहल्लदेव, पहिला आणि दुसरा जयकेशी, विजयादित्य हे राजे विशेष पराक्रमी होते. संपूर्ण कोकणपट्टीवर त्यांचा दबदबा होता. कदंब राजांनी आपली राजधानी चांदरहून गोपकपट्टण येथे हलवली. याच बंदरातून परदेशी व्यापार्‍यांशी व्यापार चालत असे. बाराव्या शतकात आपले प्रभुत्व टिकविण्यासाठी कदंबांना होयसळांशी संघर्ष करावा लागला. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी कदंबांना मांडलिक बनवून गोवा आपल्या सत्तेखाली आणला. गोव्यात यादवांची सत्ता १0१ वर्षे होती. त्यांनी गोव्याच्यायांचे योगदान अविस्मरणीय..

भारताच्या लष्करी कारवाईमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळाले खरे; मात्र त्यापूर्वीही पोर्तुगीजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. गोव्याच्या मुक्तीसाठी लढणार्‍या या स्वातंत्र्यसैनिकांमुळे पोर्तुगीजांवर दबाव वाढला. भारतभरात क्रांतीची मशाल पेटली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात या विभूतींचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांपैकी काही व्यक्तींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप : वैभवात भर घातली. असे आहे गोवा..गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान, तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे लहान राज्य आहे. ते भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्‍चिमेला अरबी समुद्र आहे. ११ मार्च १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून, वास्को हे राज्यातील सर्वांत मोठे, तर पोतरुगीजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगाव हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे.
गोवा राज्याला निसर्गसौंदर्याची देणगी लाभली असून, तेथील समुद्रकिनारे देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहेत. पर्यटन हा गोव्यातील महत्त्वाचा व्यवसाय. प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठीही गोवा प्रख्यात आहे. ‘बसिलिका ऑफ बोम जीझस’ हे आशियातील सर्वांत मोठे ख्रिश्‍चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये जैवसंपदादेखील वैविध्यपूर्ण आहे.
डॉ. टी. बी. कुन्हा
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी डॉ. टी. बी. कुन्हा यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना गोव्याच्या ‘राष्ट्रवादी चळवळीचे जनक’ म्हटले जाते. डॉ. कुन्हा पॅरिसहून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. सन १९२८ मध्ये गोवा कॉँग्रेस समितीची स्थापना केली. त्यांना पोर्तुगीजांनी अनेकदा अटक करून कारागृहात डांबले. डॉ. कुन्हा यांनी काही काळ ‘फ्री गोवा’ हे वृत्तपत्रही चालवले. डॉ. कुन्हा यांच्या गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाबद्दल आज (दि. १९) त्यांचे तैलचित्र लोकसभा व राज्यसभेत लावण्यात येणार आहे.
डॉ. राम मनोहर लोहिया
ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ काळ लढा दिला. १८ जून १९४६ रोजी गोव्यातील मडगाव येथे त्यांनी मोठी सार्वजनिक सभा घेऊन जनक्रांतीची ज्योत पेटविली. त्यांच्या भाषणातून शेकडो स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली. ‘पोर्तुगीजांच्या राज्यात भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी मूल्यांना काडीचेही मोल नाही. गोमंतक हा भारताचाच भाग असून, भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच गोवादेखील मुक्त झाला पाहिजे’, अशा शब्दांत डॉ. लोहिया यांनी भाषणाला प्रारंभ केला. हे ऐकून पोर्तुगीज अधिकारी कॅप्टन मिरांद यांनी त्यांनी अडवले; मात्र डॉ. लोहिया यांनी निर्भीडपणे भाषण सुरू ठेवले. ते पाहून मिरांदने त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि बोलले, ‘भाषण बंद कर, अन्यथा गोळी झाडेन’; पण डॉ. लोहिया यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कॅप्टन मिरांदला न जुमानता ते बोलत राहिले. शेवटी मिरांदने त्यांना अटक केली.
डॉ. लोहिया यांच्या अटकेनंतर त्यांच्या भाषणाच्या प्रती जनसमुदायाला वाटण्यात आल्या. पुढे ही चळवळ फोफावत गेली. गोवा मुक्तीसाठी देशभरातून सत्याग्रही गोव्याकडे येऊ लागले. काही आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेत पोर्तुगीजांच्या पोलीस ठाण्यांवर हल्ले केले. डॉ. लोहिया यांच्या लढय़ामुळे लोकांमध्ये गोव्याच्या स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतले.
टेलो द मास्कारेन्हस
लेखक, कवी आणि पत्रकार असलेल्या टेलो द मास्कारेन्हस यांनीही गोवा मुक्तीसाठी आयुष्यभर लढा दिला. २३ मार्च १८९९ रोजी गोव्यात जन्मलेल्या मास्कारेन्हस यांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे पोर्तुगीज शासनाने त्यांना तडीपार केले. दहा वर्षांचा तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगाल सरकारने सन १९७0 मध्ये सुटका केली.
मुंबईमध्ये असताना मास्कारेन्हस हे सन १९५0 ते ५९ या काळात ‘रिसर्ज गोवा’ या नावाचे वृत्तपत्र प्रसिद्ध करीत असत. पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटून परत गोव्याला आल्यानंतर त्यांनी हे वृत्तपत्र पुन्हा सुरू केले. पोर्तुगीज भाषेत त्यांनी उत्तम कविता लिहिल्या. महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचा त्यांनी पोतरुगीज भाषेत अनुवाद केला. रवींद्रनाथ टागोर यांच्या अनेक कादंबर्‍याही त्यांनी भाषांतरित केल्या. सन १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.
मोहन रानडे
मोहन रानडे हे गोवा मुक्ती संग्रामातील महत्त्वाचे नेते. ‘आझाद गोमंतक दला’चे ते प्रमुख नेते होते. प्रारंभी व्यक्तिगत पातळीवर व नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात प्रवेशले. नंतर मात्र त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. सन १९५५ मध्ये ते पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना २६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकार त्यांची सोडवणूक करू शकले असते; परंतु सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना पुढेही तुरुंगवास भोगावा लागला. अखेर १४ वर्षांच्या कैदेनंतर जानेवारी १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. गोवा मुक्ती संग्रामातील अनुभवांवर रानडे यांनी ‘सतीचे वाण’ (मराठी), ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ (इंग्रजी) ही पुस्तके लिहिली असून, त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने सन १९८६ मध्ये त्यांना गोवा पुरस्काराने, तर भारत सरकारने सन २00१ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
ल्ल याशिवाय महाराष्ट्रातील समाजवादी नेते नानासाहेब गोरे, सेनापती बापट, मधु लिमये, एस. एम. जोशी, संगीतकार सुधीर फडके, सुधाताई जोशी, सिंधूताई देशपांडे, हिरवेगुरुजी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी गोवा मुक्ती संग्रामात स्वत:ला झोकून दिले होते.
परकीय आक्रमणे
चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणेवर स्वारी करणार्‍या मलिक काफूरने गोव्यावर हल्ला केला, गोपकपट्टणचा नाश करून मंदिरे पाडली. १३२५ मध्ये मोहम्मद तुघलकाने त्याची पुनरावृत्ती केली. कदंबांची सत्ता खिळखिळी झालीच होती, त्याचा फायदा घेऊन होन्नावरच्या नवाब जमालुद्दिनने गोवा पादाक्रांत केला; परंतु याच काळात दक्षिणेस स्थापन झालेल्या विजयनगरच्या सम्राटांनी गोव्यावर आपली सत्ता स्थिर केली. त्यांनी गोव्याची भरभराट केली. यानंतर गोव्यावरील सत्तेसाठी विजयनगरचे सम्राट व बहमनी सुलतान यांच्यात संघर्ष सुरू झाला. सन १४६९ मध्ये बहमनी राज्याचा मुख्य प्रधान महमूद गावान याने गोव्यावर स्वारी करून विजयनगरची सत्ता नष्ट केली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्यातून फुटून विजापूर येथे स्वतंत्र राज्य स्थापन करणार्‍या युसूफ आदिलशहाने गोवा आपल्या राज्याला जोडला. युसूफने जुन्या गोव्यात आपले राजवाडे बांधले.

पोर्तुगीजांचे आगमन

२२ मे १४९८ रोजी वास्को द गामा या खलाशाच्या रूपाने पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम पाय ठेवला. हिंदी महासागरातील व्यापारातून मुस्लिम राज्यकर्त्यांना हुसकावून लावण्याच्या उद्देशाने पोर्तुगीज सरदार अफांसो द अल्बुकर्क याने १६ फेब्रुवारी १५१0 रोजी गोवा हस्तगत केले. त्यात त्याला विजयनगरचा नौदलप्रमुख तिम्मय्या याची मदत झाली. १५४२ पासून ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेव्हीअर यांनी गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातील युद्धांमुळे १६0३ व १६३९ मध्ये डचांनी गोव्याची नाकेबंदी केली होती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी राज्यविस्तार केला.

पोतरुगीज -भारत

‘वास्को द गामा’ने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे सन १५0५ मध्ये केरळमधील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याची पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली आणि तेव्हापासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशाला ‘पोर्तुगीज भारत’ असे म्हटले जात असे. १५१0 मध्ये पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलविण्यात आले. सन १७५२ पर्यंंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंतच्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना ‘पोर्तुगीज भारत’ ओळखले जात असे.

पोर्तुगीजांविरुद्ध उठाव

पोर्तुगीज सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले. पैकी काही स्थानिक स्वरूपाचे होते. गोवा आदिलशाहीला जोडण्यासाठी कास्त्रू या पाद्रय़ाने १६५४ मध्ये, तर १७७८ मध्ये पिंटो मंडळींनी केलेले कट यशस्वी झाले नाहीत. सत्तरी महाल पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यापासून तेथील राणे मंडळींनी पोर्तुगीजांविरुद्ध अनेकदा उठाव केले. त्यातील दीपू राणे (१८५२-५५) व दादा राणे (१८९५-९६) यांची बंडे प्रसिद्ध आहेत. पहिले बंड शेतजमिनीवर लावलेल्या करामुळे उद्भवले, तर दुसरे गोवेकर शिपायांनी आफ्रिकेत पाठविण्याचा बेत हाणून पाडण्यासाठी होते. १८७0 मध्ये गोव्यात लष्करी बंडही झाले. १९१२ मध्ये बाळ्ळी महालातील झील सावंत व सत्तरी महालातील हिरबा राणे यांचा उठाव मोडून काढण्यासाठी आफ्रिकेतून सैन्य आणले गेले.ल्ल

अन् ठिणगी पडली..
गोवा मुक्तीसाठी १९५0 पासून संघर्ष जोर धरू लागला. १९५४ मध्ये आंदोलकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या साथीने दादरा-नगरहवेली मुक्त केले. १५ ऑगस्ट ११५५ रोजी गोव्याला मुक्त करण्यासाठी तीन हजार सत्याग्रहींनी आंदोलन सुरू केले. या निशस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगालच्या सैन्याने अमानुष गोळीबार केला. त्यात तीन सत्याग्रही मृत्युमुखी पडले. या घटनेने संपूर्ण देशभरातील वातावरण तापले. देशातील वाढत्या दबावामुळे भारताने पोर्तुगालशी राजकीय संबंध पूर्णत: तोडले; मात्र या कालावधीत पाकिस्तान पोर्तुगीजांच्या मदतीला धावला. त्यामुळे भारताच्या बहिष्काराचा पोर्तुगालवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. १९५६-५७ मध्ये जनमत चाचणी घेण्याचा पर्याय पुढे आला; मात्र तो पोर्तुगालने धुडकावून लावला. पुढील पाच वर्षे आंदोलने होत राहिली; परंतु पोर्तुगीजांनी गोव्यावरील ताबा सोडला नाही. भारत कधी ना कधी गोव्याच्या मुक्तीसाठी लष्करी कारवाई करीलच, ही बाब पोर्तुगालचे तत्कालीन पंतप्रधान अँँटोनियो द ओलिवेरा यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी सावध होत ब्राझील, इंग्लंड, अमेरिका व मॅक्सिको या देशांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे पाहून पोतरुगाल संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला. तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. अमेरिकेने आपल्या दुटप्पी भूमिकेचा तेव्हादेखील प्रत्यय आणून दिला. सुरुवातीला अमेरिकेने आपण भारतासोबत असल्याचे जाहीर केले. नंतर पोतरुगाल आणि भारत यांच्यातील मध्यस्थ म्हणून भूमिका निभावली आणि भारताच्या पोर्तुगालवरील लष्करी कारवाईनंतर याच अमेरिकेने भारताला संयुक्त राष्ट्रसंघातून बाहेर काढण्याची धमकी दिली.