Tuesday, March 19, 2013

' आविष्कार ' चे आधारस्तंभ-अरुण काकडे


मुंबईतील प्रायोगिक चळवळीचे एक प्रणेते अरुण काकडे यांची प्रकट मुलाखत नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे घेणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी, २२ मार्चला सायंकाळी ६.०० वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन, ग्रंथाली आणि वैद्य साने ट्रस्ट यांच्या वतीने कृतार्थ मुलाखतमालेमध्ये काकडे – पाथरे संवादगप्पांचे हे पुष्प आयोजित करण्यात आले आहे.
काकडे यांनी सत्यदेव दुबे यांच्या नाट्यकृतींपासून अलिकडच्या सुषमा देशपांडे यांच्या ‘चित्रगोष्टीं’पर्यंत अनेक नाटकांचा पाठपुरावा केला आहे. ‘चित्रगोष्टी’मध्ये अरुण काकडे या वयातदेखील रंगमंचावर येऊन खणखणीत पोवाडा म्हणतात. त्यांनी ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाची ‘आविष्कार-चंद्रशाला’साठी निर्मिती केली. ते नाटक गेली एकोणतीस वर्षे मुंबईच्या रंगमंचावर, दरवर्षी नव्या संचात प्रकट होत असते. अरुण काकडे यांच्यामुळे गेली तेवीस वर्षे मराठी रंगभूमीची ध्वजा दिल्लीच्या राष्ट्रीय रंगभूमीवर फडकत राहिली आहे. ती कशी ते आणि अन्य रोमांचकारी गोष्टी काकडे यांच्या या मुलाखतीमधून श्रोत्यांसमोर उलगडल्या जातील...
' आविष्कार ' नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ किंवा ज्याच्या खांद्यावर आज संस्था उभी आहे असा मजबूत खांब म्हणून अरुण काकडे उर्फ काकडे काका यांच्याकडे पाहिलं जातं . गेली ६० वर्षे ते प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून आहेत आणि वयाची पंच्याहत्तरी पार करूनही तरुणांना लाजवील अशा उत्साहाने आजही नित्य नवीन नाटकं सादर करत आहेत . त्यांच्या या एकूण योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला आहे . 
 काकडे यांनी पुण्यातून आपल्या करिअरला सुरुवात केली , पण लवकरच ते मुंबईत आले . विजया मेहता , अरविंद देशपांडे , विजय तेंडुलकर , माधव वाटवे या तेव्हाच्या तरुण रंगकर्मींनी ' रंगायन ' ही संस्था सुरू केली होती . तिच्याद्वारे ते वेगवेगळी नाटकं करीत असत . या संस्थेशी अरुण काकडे जोडले गेले . ' रंगायन ' मध्ये वाद होऊन संस्था फुटली आणि अरविंद देशपांडे , विजया मेहता , सुलभा देशपांडे प्रभृतींनी १९७१ साली ' आविष्कार ' ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली . त्यावेळी काकडे या मंडळींच्या खांद्याला खादा लावून उभे राहिले . या संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून काकडे काका म्हणजे ' आविष्कार ' हे समीकरणच बनून गेलं , जे आजतागायत कायम आहे .
 ' आविष्कार ' ने छबिलदास चळवळ उभी केली . या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले . रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले . काकडे काका या चळवळीचे बिनीचे शिलेदार होते . आजही प्रत्येक नवा प्रयोग ' आविष्कार ' ने करावा हा त्यांचा ध्यास असतो . स्वतः पडद्यामागे राहून ते त्यासाठी अविरत झटत असतात . त्यांना प्रसिद्धीची हाव नाही की रंगमंचावर चमकण्याचा मोह नाही . त्यांनी कायमच निर्मिती सूत्रधार या भूमिकेत राहणं पसंत केलं . त्यासाठी त्यांनी आपल्यातील अभिनेतेपणालाही वेळोवेळी मुरड घतली आहे . तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी ' आविष्कार ' ने मोठ्या थाटात साजरी केली . त्यावर्षी काकडे काकांनी १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं ' आविष्कार ' तर्फे रंगमंचावर आणली . आपल्या ६० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी रंगकर्मींच्या तीन पिढ्या पाहिल्या आणि घडवल्याही . आविष्कारमध्ये सतत नवे , युवा कलाकार येत असतात . 
 कालांतराने पुढे निघून जातात . परंतु चळवळ चालवायची तर निष्ठावान आणि सच्च्या कार्यकर्त्याची गरज असते . अरुण काकडे हे असे हाडाचे कार्यकर्ते आहेत . ते स्वतः नवनव्या कलाकारांना ऊर्जा पुरवीत राहिले . त्यांच्या कामाला चालना देत राहिले . कलाकारांच्याही मनात त्यांच्याविषयी अतिशय आदराची आणि कृतज्ञतेची भावना आहे . मात्र , मृदुभाषी काकडे काका या सगळ्या यशाकडे तटस्थपणे पाहतात . नवं नाटक करायचं म्हटलं की मात्र त्यांच्या अंगात उत्साह वीज बनून संचारतो आणि त्यांचा वावर बघताना तरुण कोण असा प्रश्न संस्थेतल्या रंगकर्मींना पडतो .



काकडे यांनी सत्यदेव दुबे यांच्या नाट्यकृतींपासून अलिकडच्या सुषमा देशपांडे यांच्या ‘चित्रगोष्टीं’पर्यंत अनेक नाटकांचा पाठपुरावा केला आहे. ‘चित्रगोष्टी’मध्ये अरुण काकडे या वयातदेखील रंगमंचावर येऊन खणखणीत पोवाडा म्हणतात. त्यांनी ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाची ‘आविष्कार-चंद्रशाला’साठी निर्मिती केली. ते नाटक गेली एकोणतीस वर्षे मुंबईच्या रंगमंचावर, दरवर्षी नव्या संचात प्रकट होत असते. अरुण काकडे यांच्यामुळे गेली तेवीस वर्षे मराठी रंगभूमीची ध्वजा दिल्लीच्या राष्ट्रीय रंगभूमीवर फडकत राहिली आहे. ती कशी ते आणि अन्य रोमांचकारी गोष्टी काकडे यांच्या या मुलाखतीमधून श्रोत्यांसमोर उलगडल्या जातील...

No comments: