Wednesday, July 31, 2013

माणसातला देव शोधणारे सविता भावे


ज्येष्ठ चरित्र लेखक सविता भावे यांचा आज  80व्या वर्षानिमित्त गौरव करण्यात येत आहे.

14 नोव्हेंबर 1933 रोजी मळवली येथे जन्मलेल्या भावे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पेण येथे झाले. पुढे फर्ग्युसनमधून बीए आणि भारतीय विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी घेतली. मात्र तातडीने विवाह करावा लागल्याने वकिलीऐवजी मुंबईतील "वेस्टर्न इंडिया लाइफ इन्शुरन्स'मध्ये नोकरीला त्यांनी प्राधान्य दिले.

नोकरीदरम्यान, "नारळकर इन्स्टिट्यूट'चे एन. जी. नारळकर भेटले. त्यांच्या प्रेरणेतून 1967 मध्ये त्यांचेच पहिले चरित्र लिहिले. त्याचे आचार्य अत्रे यांनी कौतुक करीत "मराठा'तून अग्रलेख लिहिला. त्यातून प्रोत्साहन घेत लोकमान्य टिळक, वालचंद हिराचंद, शंतनुराव किर्लोस्कर, विनोबा भावे, जे. पी. नाईक आदींसह एकूण छत्तीस चरित्रे भावे यांनी लिहिली. निळकंठ कल्याणी यांचे चरित्र लिहिण्याचा योग आला आणि भावे स्थिरावले.

भरभक्कम व्यायाम, संतुलित आहारामुळे प्रकृती ठणठणीत होती. त्यानंतर हृदयविकाराचे झटके येऊनही उदंड उत्साह आणि लिहिण्याची इच्छाशक्ती यामुळे त्यातून तरल्याचे भावे सांगतात. पत्नी कुमुदिनीनेही साथ देत तिन्ही मुलींचा उत्तम सांभाळ केला. आज नातवंडे, पतवंडे असा परिवार पाहण्याचे भाग्य लाभल्याचे ते नमूद करतात.

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने घरातून विरोध झाला. घर सोडावे लागले. वकिली करता आली नाही. संसारात पडल्याने राजकारणात जाण्याची इच्छा अपुरी राहिली. मात्र, अनेकांची चरित्रे आपल्या हातून लिहिली गेल्याचा आनंद वाटतो.
 
आपल्या `माणसातील माणूस` या आत्मचरित्रांच्या प्रस्तावनेत सविता भावे यानी नमूद केलेले त्यांचे मत त्यांच्याच शब्दात देत आहे.

आयुष्यातल्या माझ्या सा-याच धडपडीच्या तळाशी एक गोष्ट कायम राहिली आहे, ती म्हणजे माणसाच्या मनाचा आणि त्यातही माणुसकीचा शोध घेणे. थोड्याच काळात मला उमगले की, सर्वांत अनाकलनीय गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणूस.  जितका अनुभव जास्त तितके हे कोडे अधिकच गहन होत जाते.  पण प्रत्येक माणूस मुळात चांगलाच असतो, हा विश्वास असल्याने प्रत्येकामधील चांगुलपणा जाणून घेण्याचा माझा यत्न राहिला आहे. 
अगदी क्वचित उदाहरणांमध्ये माणसांच्या ठायी दुष्ट प्रवृत्ती वास करताना आढळते. मलाही आयुष्यात अशा दोघांना सामोरे जावे लागले. पण काय योग असेल तो असो, त्या दोन्ही बाबतीत त्यांना परस्पर शासन घडल्याचेही प्रत्ययाला आले. पण काही अपवाद वगळले तर मला समोरच्या प्रत्येकाच्या ठायी काहीतरी गुण किंवा चांगुलपणा वास करताना आढळतो आणि त्यामुळेच जगण्यातली गंमत कायम रहाते.

स्वतःमधील माणसाचा शोध घेणेही माझे सतत चालू असते. आपल्या वागण्याचा काय अर्थ होऊ शकतो याची मी सदैव फिकीर बाळगतो. आपल्याकडून कुणावरही अऩ्याय होऊ नये यासाठी सतत मी दक्ष राहात आलो आहे. शक्यतो माझे मतही कोणावर मी लादत नाही. म्ङणून कोणत्याही नव्या वृत्तीला किंवा आव्हानाला सामोरे जाण्याची माझी तयारी राहिली आहे. .

व्यक्तिगत-व्यावसायिक जीवनात अडचणी, अपेक्षाभंगाचे प्रकार अनेक घडले, पण त्या सा-यातून वाट काढीत पुढे चाता आले. व्यक्तिगत-कौटुंबिक आयुष्य समाधानाचे होते. व्यावसायिक जीवनात कष्टसाध्य पण भरपूर यश पदरी आले. पैश्या -अडक्याला कधी ददाद पडली नाही. ऐहिक सुखे सारी मिळाली. जो छंद जोपासला त्यात यश मिळाले, नाव झाले. प्रकृती उत्तम राहिली.




त्यांच्या सहवासात कांही काळ घालविता आला..त्यांचे स-दय मन आणि त्यांच्यातला माणूल अनुभवता आला..याचे समाधान मला अदिक आहे.माणसातला देव शोधणा-या या.........
 सविता भावे यांना विनम्र दंडवत.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com