Saturday, January 25, 2014

..मनात साठवावा असा `अनुभव`

डिस्कव्हर कर्नाटकाची सफर

शनिवारी ११ जानेवारीला रात्री साडेनउपासून १८ जानेवारी पर्यंतच्या सहलीसाठी १३ जणांची आमची टीम  आधी मित्रमंडळ मग कात्रज दूध डेअरी मागच्या व्हीआरएल च्या स्लीपर कोचने हुबळी साठी निघाली आणि खरा आनंदसोहळा सुरु झाला...आता मागे वळून पाहताना हे अधिक जाणवतं आहे. स्लिपर कोचने प्रथमच प्रवास असल्याने मनावर दडपण होते..पण प्रत्यक्ष प्रवास फारच सुरेख झाला...

शनिवारी रात्री निघालेली ही बस हुबळीला सकाळी सातच्या सुमाराला पोचली...अनुभवच्या राम पटकुरेो आमि सहका-यांनी आम्हीला बरोबर ओळखून आमचे सामान एका मीनी ट्रॅव्हलमध्ये टाकले आमि सावती हॉटेलच्या दिशेने आमची ही हुबळी वारी निघाली. फ्रेश होऊन..हवा तो नाष्टा घेण्याची आज्ञा अनुपभवचे मालक अरुण भट यांनी केली . आम्ही मसाला डोसा, उपमा, शिरा आणि चहा-कॉफी घेऊन शिरसीच्या रिसॉर्टकडे निघालो.
आमच्यासाठी एक स्वतंत्र मिनी बस असल्याने बेंगलोरकडे जाणा-या महामार्गावरून कुंदगोळच्यामार्गी गाडी शिरसीकडे वळाली .रिसॉर्टपर्यतचा रस्ता..दुतर्फी आंबा, नारळ, सुपारी यांच्या हिरव्यागार बागांनी डोळ्यांना सुखद गारवा जाणवत होता आणि साडेदहाच्या सुमारास निसर्गाच्या कुशीत शिरून मुंडगोड नजीकच्या शिरसीच्या अलिकडे २० कि.मी.वरील `ग्रीन वर्ल्ड फॉरेस्ट रिसॉर्ट`चा मोठा बांबूबनातला बोर्ड दिसला..गाडी आत शिरली...आपण एक वेगळ्या निसर्गाच्या वातावरणात आल्याचा हा पहिला अनुभव इतका आनंददायी होती..की परिसराच्या प्रेमातच पडले.

जंगलात इतक्या उत्तमरित्या बांधलेल्या टुमदार खोल्या पाहिल्या की केव्हा एकदा आत जाऊन पहातो असे झाले. प्रत्येक बंगलीत दोन खोल्या होत्या. सर्व अत्याधुनिक सोयींनी परपूर्ण अशा या रहाण्यासाटी अगदी सुयोग्य होत्या..तेव्हाच वाटले इथले सारे काही वेगळे आणि छान असेल...

रिसॉर्टवर पोहोचल्यावर गरम गरम पाण्याने आंघोळ केली आणि भोजनकक्षात पोहोचलो.. काय सुखद आश्चर्य आज चक्क पुरण पोळी, कोशींबीर, चटणी, मटार रस्सा, दूध. तूप, साधी पोळी. वरणःभात..असा फक्कड बेत अनुभवाला...अगदी पहिला पाहुणचार उत्तमच होता....खूप समाधान झाले..
 खोलीवर मस्त झोप काढली..आधीच प्रवासाचा शिण त्यात जायफळ घातेलेल्या पुरणपोळीचा नैवंद्य...भरीस भर म्हणून सानकेळींची स्वतः भट साहेबांनी केलेली आग्रही विनंती..
बरोबर दुपारी चार वाजता चहा घ्यायला चला..ची आरोळी आली. चहा घेऊन..आज धर्मा जलाशय. पाहण्यासाठी आमची मंडळी निघाली..जलाशयाच्या बाजुने पायवाटेने गाडी थेट धरणाच्या माथ्यावर गेली.



जलाशयातले विस्तीर्ण पाणी  आणि सनसेट दोन्हीचा अनुभव घेत..किना-यावर बसून सूर्यांचा तो त्या दिवसाचा असेरचा स्पर्श अंगात.मवात भरून घेतला आणि परत मुक्कामाच्या जागी येऊन पोहोचलो.




सोमवारी सकाळी साबुदाणा वडा, खिचडी आणि मेदूवडाृचटणी -सांबार असा भरपेट नाष्टा करुन जवळच्या म्हणजे सुमारे २२ कि. मी.वरच्या मुंदगोड या गावी असलेल्या तिबेटी लोकांची वस्ती असलेल्या मॉनेस्ट्रीच्या दिशेने निघालो..आमच्याबरोबर स्वतः अनुभवचे संचालक अरुण भट असल्यामुळे याबाबतची सविस्तर माहिती त्यांनीच दिली.


चीनने तिबेटी लोकांना हाकलून दिल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना इथे ५०० एकर जमीन उपलब्ध करुन दिली. भारतातरली ही दुस-या नंबरची बुद्ध मॉनेस्ट्री आहे..















धर्मशाला नंतर हीच देशातली मोठी वसाहत मानली जाते.





सगळीकडे सुबक आणि सुंदर बुध्दांची भली मोठी पितळी मूर्ती आहेत. कलाकुसर तरुन त्यांची शोभा अजुनच व्दिगुणीत झाली आहे.
कमालीची शांतता आणि स्वच्छता इथे अधिक उठून दिसते.
साडेबाराच्या सुमारासही गाडीत कोकम सरबत आणि कलाकंदची यांची जी टेस्ट दिली..ती वाटेत कुठेतरी चहा -भजी खाण्यापेक्षा फारच छान वाटली.
अडीचच्या सुमारास आमची फेरी पुन्हा शिरसीच्या रिसॉर्टवर दाखल झाली. गरमा गरम पूरी भाजी- केसरी भात, दोडका भजी, आणि बासुंदीचे जवण ताटात असल्यावर ..`अन्नदाता सुखी भव...` म्हणण्यापलिकडे  काय म्हणू शकत होतेो. शिवाय सकाळ संध्याकाळी फळांचा आहार सुरुच होता..आणखी काय हवे होते..

जानेवारी १४. २०१४- सकाळी ७ चा चहा..८ वाजताचा नाश्ता..त्यात डोसे, चटणी आणि दडपे पोहे..त्यावर शेव असा फक्कड बेत होता. संक्रांत असल्याने आमच्या बरोबरच्या सगळ्याच महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या




नेसून काळी सकाळीच एकमेकींनी आणि बाकीच्या सा-यांना तिळगूळ देऊन संक्रातीची आठवण ताजी केली.








जेवणाच्या सभागृहात दोन टेबलावर सौ. प्राची शेट्ये यांनी आपली फारच मनमोहक रांगोळी अगदी कोरीव कामासारखी काढून



संक्रातीचा हलवा एका कुंडात..





तर दुस-यात बालुशाही हलवा मोठ्या मोहक रांगोळीच्या नजराण्यात पेश केला होता..




जेवणाच्या ठिकाणी जो फळा होता..तिथे रोजचा मेनू लिहला जात होता..आज लिहलेल्या चार ओळी म्हणजे..
एक तीळ फुगला व रडला
रडता रडता गुळाच्या पाकात पडला
तिथे भेचले तीळ, दाणे व चणे व तो खुदकन् हसला
हातावर पडताच चुरुचुरु बोली लागला
तिळगूळ घ्या गोड बोला..
दुस-या फळ्यावर ईद होती म्हणून नमाज पढणारा मुस्लीम गृहस्थही रेखीवपणे कोरला होता..



सुंदर चित्रकला आणि तेवढेच सुबक अक्षर पाहून सा-यांचेच डोळे सुखावले.



 आज शिवगेगा फॉलला सकाळीच निघालो. निघताना गाडी शिरसी गावातूल्या गणपतीच्या मंदीरातील



श्री गणेशाच्या मंदीरातील सुरेख काल्या दगडात कोरलेला आणि फणा असलेल्या गणपतीचे दर्थन घेतले
आणि पुढचा प्रवास सुरु केला.




 
शिवगंगा फॉल पाहण्यासाठी ७५ पाय-या उतरून खाली जावे लागते..धबधब्याचा खळखळाट सध्यातरी लांबूनच पहावा लागतो. मात्र लांबूव का असेना पाण्याचे लोंढे डोगराच्या कड्यावरून पाहण्यातला अनुभव मन आणि शरीर प्रसन्नचित्त करणारा होता..

धबधबा पाहून वर आल्यावर सरबत आणि मिश्रा पेढ्याची मुखशुध्दी थोड्याफार श्रमलेल्या पायांना आणि मनाला उबारी देणारी होती.












थोडा वेळ थांबून पुन्हा केलेला जंगलातील परताची प्रवासही आजही स्मरणात रहातो. दुपारी एकचे उन असूनही वागा आणि अजुबाजुची झाडी यामुळे उन्हाची झळा ती काय ती कळतही नव्हती. 

येताना शिरसीची ग्राम देवता मरिकांबा मातेचे दर्शन घेतले. गर्दी खूप होती तरीही दर्शनाचला फार वेळ लागला नाही..मात्र समाधान मिळाले.





केवळ अर्धातासात रिसॉर्टवर आलो..दुपारचे अडीच वाजता साखरी भात, पोली, फ्लॉवर दोडका- ग्रेवीची भाजी होती. कोशींबीर, वेगवेगळेय् त-हेच्या चटणी...रोड एक गोड. भरपूर फळे.आणि सारे कसे घरच्यासारखे..विशेष म्हणजे आग्रही भोजन.
संध्याकाळी दीड तास शिरसीतले गायक श्रीधर हेगडे यांचे खास गाणे सर्व रिसॉर्टमधल्या पाहुण्यासाठी अरुण भट यांनी मुद्दाम आयोजित केले होते.
प्रथम..एक शास्त्रीय राग आणि मग मराठी अबंग, भजेने..त्यांनी सादर केली..यात वसंतराव देशपांडे, जीतेंद्र अभिषेका आमि पं. भीससेन जोशी यांनी गायलेली लोकप्रिय अभंगांची मालीकाच होती..भक्तीगीताला त्यांचा आवाज फारच सुरेख आहे..तयारी आणि सादरीकरण दोन्हीही आवडले..




स्वतः अरुण भट यांनी आपल्या खास मराठी शैलीतले किस्से आणि हे आपण का करतो त्याचे वर्णन केले..त्यांच्या निवेदनात सच्चेपणा अधिक भावला.

रात्रीच्या जेवणाचा बेत  बिशी बेली नावाची कानडी लोकांची पर्सिध्द खिचडी सारखा भात..त्याबरोबर चिंचेची चटणी..खेकडा भजी, खुसखुशीत कारल्याची काजू घातलेली भाजी..असा वेगळाच मेनू होता..जेवणानंतरच्या बटर स्कॉच आईस्क्रिम आणि नंतर पपई- आमि  चिक्कूचा आहार..सारेच बहारदार..ऐशारामी.

रॉक गार्डन हुबळी
१५ जानेवारी....सकाळी ७ चा चहा .पोटभर कटलेट आणि शेव घातलेला उपमा याचा समाचार घेतल्यानंतर आज लवकर दौरा सुरु झाला..तो बेळगांवकडे जाणा-या रस्त्यावर कर्नाटक संस्कृतीचे दर्शन देणारा `रॉक उत्सव `पाहण्यासाठी उत्सुक होतो..

तिथे पोहोचलो आणि गर्दीचे स्वरुप पाहूनच जरा मनात छान वाटले..कारण ती सारी मंडळी हेच पाहण्यासाठी आली होती..रोज सुमारे वीस हजार लोक येतात..असा त्चांचा अनुभव आहे..तशी आज गर्दी कमीाच आहे.
लोक डबे. खाणे सरेच घेऊन सहलीसारखे हा सारा परिसर आनंदमयी करुन सोडतात. चाळीस एकर जमीनीवर फार वर्षापूर्वीचे उत्तर कर्नाटक कसे होते हे मूर्ती स्वरुपात ..अगदी जीवंत वाटतील असे वास्तव उभे केले आहे.
लोहार, चांभार, कासार, वीणकर, धनगर, दळण कांडणकरणा-या महिला, सरपंच, गाई-गुरे, वासरु, शेळी, करडू..सारेच या मूर्ती सिमेंटच्या बनविलेल्या आहेत. परंतु त्यांचे धोतर, मुंडासे, साड्या..साडीच्या नि-या ..ख-या वाटतील अशा पध्तीने उभ्या केल्या आहेत. खरचं या कारागीरांना सलामच करायला हवा.
गाई-म्हशींचा गोठा. त्यांच्यासमोरील चारा. पाणी पिण्यासाठीचे पाणवठा.प्राण्याच्या डोळ्यातील भाव..जीवंत असल्याचे भासते. खेड्यात खेळणारी मुले. जसे विटी-दांडू, गोट्या, क्रिकेट. उड्याची दोरी..असा सर्व देखावा अगदी सुरेख उभा केला आहे..शेतकरी शेत नांगरणे. त्याला मदत करणारी मुले. त्याची बायको. त्यांच्यासाठी भाकरी-चटणी आणणारी मुलगी असा पाहून तर मन गहिवरुन आले.
कर्नाटक मधील निसर्ग आणि त्यातील नैसर्गीकता याचा पुरेपुर उपयोग करुन श्री. निपण्णा यांनी केला आहे. तिथे स्वतः ते रहातात. हे सारे उन्हात पाहतानाही घाम येत नाही. 
आमच्याबरोबर अनुभवचे श्री. राम फटकुरे यांनी आमची अतिशय उत्तम बडदास्त ठेवली होती.. गाडीत बसल्यावर बदामी हलवा आणि लिंबाच्या सरबताने तृप्त करुन सोडले.


दुपारी साडेतीनच्या सुमारास रिसॉर्टवर येताच गरम गरम जेवणाचे ताट आमच्यासमोर हजर असे. अॉफिसमधून आल्या-आल्या आई असे लगेच जेवायला वाढते..अगदी तसेच मला वाटले..आई जशी मुलांची काळजी घ्यायची तसाच अनुभव इथल्या वास्तव्यात येतो. सकाळी आयता चहा. उत्तम.भरपेट नाश्ता. जेवण. रोज आवडीचे पक्वान्न. रोज नेमाने फलहार..आईस्क्रिम..बरोबरच आग्रह आणि आपुलकीने बोलणारी.. आग्रह करणारी सारी मंडळी..सारेच माहेरपण अनुभवण्याचे सूख इथे मिळाले.

जानेवारी-१६,..सकाळी साडेनऊला दडपे पोहे..इडली सांबार खाऊन..सारे निघालो..`मिरजान फोर्ट `पहायला...



घाट सुरु व्हायतच्या आधी क्षेत्रपालेश्वर मंदीरात दर्शऩ घेऊन सह्याद्रिच्या रांगासारख्या पर्वतराजीत हिरवेगार वनराई पाहून इथे किती निसर्गाचे वरदान लाभले आहे ..याचा नजारा डोळ्यात साठवून पुढे गाडी पळत होती..


दुतर्फा झाडी. गगनचुंबी वृक्ष..हातात हात घालून उभे असलेल्या द्वारपाला सारखे दिसते होते. घनदाट जंगल हे असे असते हे कर्नाटकात आल्यावर अनुभवण्यास मिळाले.  जंगलातून नागिणीसारखी वळणे घेत रस्त्यावरुन आमची बस सूसाट धावत होती.
मिरजान किल्ला आल्यावर राम पटकुरे यांनी यांनी जे सांगितले त्याप्रमाणे..







किल्ल्याभोवती अघनाशिनी नदी वाहत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाटी नावेचा उपयोग करावा लागत असायचा. राजासाठी, प्रजेसाठी आणि 
 सैनींकांसाठी सभेत जाण्यास वेगवेगळे मार्ग आहेत.
जे आजही दिसतात..परंतू बंद केलेले आहेत.



राणीने मसाल्याचे पदार्थांसाठी या नदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. म्हणून तिला `पेपर क्विन `म्हणून ओळखली जायची. मिरजान किल्ला हा  अदिलशहाने मग मराठ्यांचे हैदर अली व टिपू सुलतान आणि नंतर ब्रिटिशांनी काबीज केला. तिथून कुमठा गावी काजू, खोरे काजू असा मेवा खरेदी केला जात आणि तो व्यापारी मार्गाने बॆटीने रवाना होत असे.

मिरजान किल्ल्यावरील आठवणी साठवत आम्ही शरावती नदीवरच्या बॅकवॉटर असलेल्या प्रचंड अशा जलाशयात मार्वीन कुर्वे इथे बोटिंगसाठी आलो..


सुमारे तासभर ही आनंद लुटून..आजुबाजुला नारळ पोफळीच्या बागांची दृष्ये बोटीतूनच टिपली..किना-यावरचे ते सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवले. 










नंतर अप्सरा कुंडा पाहण्यासाठी निघालो. तिथे म्हणे पूर्वी अप्सरा स्नानासाठी येत अशी आख्यायीका आहे.



 पुढे सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा डोंगरावरून उतरुन खाली म्हणजे १६० पाय-यांवरुन खाली आलो तर आसन कोंडाचा भव्य समुद्र किनारा दिसला..




.पुन्हा एकदा समुद्राच्या लाटांवर आरुढ झालो..सूर्यास्ताचे ते प्रतिबिंब समुद्राच्या अतांग सागरात बुडून गेले आणि मग  रात्री नऊच्या सुमारास परत मुक्कामानर आलो.





आमच्या पैकी एक असलेल्यांचा वाढदिवस तिथे मोठ्या उत्साहात साजरा केला..त्यांचेसाठी अनुभवच्यावतीने केकही कापण्यात आला..लेडिज स्लीपर म्हणून स्लीपरच्या आकाराच्या फुलांनी रांगोळी काढून जेवणाचे ताट सजविले..रात्रीच्या जेवणात खिचडी, कढी, कादा बटाटा रस्सा, बटाटा भाजी....नंतर अननसाच्या फोडी....वर आईस्क्रिमची मेजवानी असे बहारदार जेवण. ...आपल्या घरापासून दूर असूनही वाढदिवसाचा हा आनंद वेगळ्या तृप्ततेचा होता.

आदल्या दिवशीची दमणूक झाल्याने १७ जानेवारीला थोड्या उशीराने उठलो..चहा, बटाटेवडा चटणी, शिरा आणि  सॅंडवीच असा भरपून नाश्ता करुन दहाच्या सुमारास यल्लारपूरकडे सारे निघालो.
 आमच्या रिसॉर्टपासून सुमारे १०० कि.मि. आणि मुख्य रस्त्यापासून २५ कि.मी. वर असलेल्या झाडीच्या आत...डोंगररांगाच्या कुशीत एका डोंगरावरुन वाहणा-या सातोडी फॉलकडे जाणे आमचा आजचा खरा उद्देश होता. डांबरी सडक. पुढे कच्चा रस्ता आणि 




.............सर्वात पुढचा पायी अर्धा-पाऊण कि.मी.पायी चालत जाण्यासारखा निमुळता रस्ता असा प्रवास करत जेव्हा काळी नदीच्या खळखळाटाचा आवाज जवळ येत होता..तसे सारेच उत्सुक होत होतो...केव्हा हे सारे पहायला मिळते असे झाले होते..




.
तिथे आम्ही सर्वांनी आंघाळीही केल्या..वातावरणात गारवा..पाण्यात गारवा..वर उन..निसर्गात मजा घेण्याची ही संधी आम्ही सोडणार थोडेच..
तिथल्या वातावरणात वनभोजनाचा आनंद घेताना तर फारच मजा आला. 


तिथल्या वातारणात केळीच्या पानावरचा वरण भात.मटार बटाटा भाजी, गुलाबजामुन, फणसाचे पापड..पाटवडी ...
सारेच चवदार वातावरणाला आस्वाद अधिक वाढविणारा होता.. नविन प्रकार म्हणजे ताक , ओले खोबरे घालून खमंग फोडणी देऊन केलेल सुंदर पेय कढीसारखे मिळाले..

या सातोडी फॉलच्या वातारणाने भारूनच आम्ही गाडीत केव्हा बसलो आणि रिसॉर्टकडे केव्हा निघालो हे कळालेच नाही.
साडेसातच्या सुमारास आलो तर पुन्हा डायनिंग टेबलवर हजर..पुन्हा आईस्क्रीम ....रात्री उशीरा नाशिकच्या शरद जोशी यांनी मेंडोलीनवर हिदी जुनी गामी सादर करुन आनंदात रात्रीच्या वातारणाला मोहवून टाकले.. आता मात्र ओढ लागली ते पुन्हा एकदा घरी जावून कुटंबीयात कधी पोहोचतो याची..कारण उद्या तसे काहीच पहायचे नव्हते..सारा दिवस संध्याकाळची वाट पहात बसायचे..आराम करायचा...
जानेवारी १८ हा दिवस निवांतपणे ऊगवला..असे  जाणवले..उठायची गडबड नव्हती. साडेसातला चहा..९ ला कांदा बटाटा पोहे..त्यावक शेव आणि साबुदाणा वड्याची खैरात झाली..आता एक वाजता जेवायचे ..तोवर आमच्या एका सहका-यांनी तयार केलेले ..या सर्व सहलीचे व्हीडीओ चित्रिकरण बघितले ..पुन्हा एकदा त्या त्या ठिकाणी मनाने जाऊन आलो..खरं तर हुरहुर लागली..आता ते दिवस पुन्हा येणार नाहीत याची.. 
अखेरच्या दिवशीचे दुपारचा पाहुणचार झोडपला खरा पण मन स्थिर नव्हते काही तरी वेगळे जाणवत होते.. तशातच जडेवण जाले..एकमेकांच्या सोबतीने गप्पा मारल्या .दुपारचा चहा घेतला...सारे सामान आवरले.. पाचला चहा घ्यायला आलो...गाडीत बसलो..
आम्हाला सोडायला..टाटा करायला पुन्हा आमच्या गाडीत `अनुभव`चे `अरुण भट` जातीने होते..
आमची रवानगी पुण्याच्या आरामदायी बसमध्ये करुन पुन्हा नव्या पाहुण्यांचे स्वागत करायला ते रविवारी सकाळी हजर होणार होते..आता नवा पाहुणा..त्याचे तसेच स्वागत..आम्ही मात्र आता जुने `अनुभव`चे प्रवासी...
हुबळीतला कर्नाटकी खाऊ घेतला..आणि साडेनऊच्या सुमारास बसपाशी आलो..आता उद्यापासून पुन्हा रुटीन सुरु..पुन्हा इथे येऊ. नक्की सांगता येत नाही...पण आठवणी मनात जपत पुण्याचा प्रवास सुरु झाला..खरा..पण पुन्हा कर्नाटकात त्याच ठिकाणी रेंगाळत होत्या...




-सौ. उज्वला अजय चौधरी, पुणे.
09420732959







.

सावरकर रचित उर्दू गीत-गजल स्वरबद्ध


अमिताभ बच्चन -कवितांचे निवेदन


स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान मध्ये जन्मठेप भोगत असताना तेथे उर्दू शिकले आणि त्यांनी उर्दूत काव्य रचनाही केली. दोन गजल आणि एक कविता असलेली एक वही स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांना मिळाली. या रचना आणि अन्य मराठीतून हिंदीत भाषांतर केलेल्या वीर सावरकरांच्या गाजलेल्या रचना हिंदीतील नामवंत गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आल्या आहेत.  
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या ज्वलंत राष्ट्रभक्तीपर कवितांचे निवेदन हिंदी सिनेसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन यांच्या स्वर्गीय आवाजात नुकतेच ध्वनीमुद्रित झाले.

श्री. अमिताभ बच्चन यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल असलेला आदर आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक यांनी  केलेली विनंती यामुळे सदर निवेदन स्वत:च्या आवाजात मुद्रित करण्याची तयारी दर्शविली आणि तातडीने त्यासाठी दोन तासही दिले. प्रसिद्ध लेखक-निर्देशक वेद राही यांनी ही संहिता लिहिलेली आहे.

ध्वनिमुद्रणानंतर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वा.सावरकरांच्या अंदमान मधील आठवणींवर आधारित "माझी जन्मठेप" हे त्यांचे आत्मवृत्त आणि त्यांच्या अंदमान मध्ये लिहिलेल्या हस्तलिखिताची प्रतिकृती श्री. बच्चन यांना भेट दिली. त्याच रात्री श्री. बच्चन यांनी अंदमान मध्ये क्रांतीकारकांचा झालेला छळ, त्यांचे बलिदान याबद्दल ट्विट करताना समाज या स्वातंत्र्ययोध्यांच्या त्यागाची उपेक्षा करत असल्याची खंत व्यक्त केली. 

वीर सावरकरांच्या या गजला आणि गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन दि. २१ जानेवारी २०१४ ला स्वा. सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता मराठी, हिंदी आणि गुजराथी मधील ख्यातनाम साहित्यिक श्री अरुण साधू, श्री विश्वनाथ सचदेव आणि डॉ. शरद ठाकर याच्या हस्ते झाले.

यात स्वा. सावरकरांच्या तीन मूळ उर्दू/हिंदी रचना असून हिंदु एकता गीत, स्वतंत्रतेचे स्तोत्र (जयोस्तुते), आत्मबल (अनादी मी अनंत मी), अमुचा स्वदेश हिंदुस्थान या मराठी कवितांचे हिंदी अनुवाद श्री. रणजित सावरकर यांनी केले असून उर्वरित ३ मराठी गीतांचा अनुवाद प्रभात प्रकाशन, दिल्ली यांच्या हिंदी समग्र सावरकर मधून घेतली आहेत. या गीतांचे संगीत दिग्दर्शन स्वराधीश भरत बलवल्ली यांचे असून संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार कै. अनिल मोहिले यांनी केले आहे. प्रसिद्ध गायक-गायिका सुरेश वाडकर, शंकर महादेवन, डॉ. जसपिंदर नरूला, साधना सरगम, शान, जावेद अली, वैशाली सामंत, राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर आणि स्वतः भरत बलवल्ली यांनी ही गीते गायली आहेत. ही ध्वनिफीत युनिव्हर्सल म्युसिक कंपनी द्वारा वितरीत होत आहे.

या कार्यक्रमात सुरेश वाडकर, साधना सरगम, डॉ. जसपिंदर नरूला, वैशाली सामंत आणि भरत बलवल्ली गाणी सादर करणार असून गुरुराज कोरगावकर यांच्या ध्वनिफितीतील गाण्यांवर आधारित नृत्य रचनाही सादर झाल्या.

लोकप्रिय गायक-गायिकांचे स्वर, उत्कृष्ट चाली आणि उत्तम संगीत संयोजन यामुळे ही ध्वनीफित लोकप्रिय होईल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे उत्कट देशभक्तीचा संस्कार तरुण मनावर होईल, अशी अपेक्षा अध्यक्ष अरूण जोशी यांनी व्यक्त केली. "हम ही हमारे वाली हैं" हा स्वा. सावरकर यांनी आयुष्यभर दिलेला संदेश आज ही सामर्थ्यशाली राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांना प्रेरित करेल असा विश्वास कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.

Wednesday, January 22, 2014

अरूण भट आणि अनुभव..तृप्ततेचा

खरच सांगतो मी रविवारी हुबळीतून पुण्यात परतलो..पण माझे मन मी शिरसीतल्या अरुण भट यांच्या जंगलमय वातावरणातील हिरव्या जगातल्या त्या मुक्त परिसरात हरवून आलो आहे.

रविवार ते शनिवार असा हा उलट्या वारांचा तिथला अनुभव  केवळ शब्दातीत आहे..खरं म्हणजे स्वर्ग पाहिलेला माणूस आहे मी असे म्हटले तर ते वावगं ठरणार नाही..इतका शांत..तरीही सर्व सोयींनी युक्त..निसर्गात रहाणे म्हणजे काय..त्याला जर आपल्याला हवे तसे सौंदर्यपूर्ण बनविले तर तोही तुमच्या जवळ कसा येतो..ते मला कळून आले..खरं तर मी पुन्हा तिथे केवळ निवांतपणा अनुभवण्यासाठी पुन्हा जाणार आहे.

खरं तर कुठल्याही टुरचा मालक आपले स्वागत करायला येतो, ही कल्पनाच नव्हती..पण इथे प्रत्यक्ष अरुण भटांचे दर्शन झाले ते हुबळीतल्या स्वातीमध्ये..इतका साधा..तसा भोंगळ वाटावा असा...पण तेवढाच फणसारखा भासणारा धिप्पाड  पण आतून पाहुणचाराने डबडलेला हा ७० वर्षांचा उत्साही गृहस्थ..
मुळात म्हणजे आपल्याबरोबर बसून स्वतः प्रत्येकाचा आस्वाद घेणारा हा खाण्यावर आणि खाणा-यांवर मनापासून लुप्त असलेले हे व्यक्तिमत्व.

आम्ही १३ जणांचा ५१ ते ८१ अशा वयोगटाचा आमचा ग्रुप. जेव्हा अरूण भट आपल्या शेलीत खुमासदारपणे सांगतात तेव्हा ते सा-यांनाच आवडत..कारण आम्ही थोड्या मागच्या पिढीचे...आणि भट आमच्या पिढीचे...`

तसा मी मुंबईचा. प्रभादेवीत रहातो..पण मोठ्या शहरात छोटा होऊन रहाण्यापेक्षा आपल्या छोट्या गावात मोठा माणूस होऊन रहाणे पसंत केले आणि त्यांनी ९५ साली शिरसीतली १५ एकरची ही जागा घेतली. अडीच वर्षात सारे बांधकाम पुरे झाले आणि रिसॉर्टला पाहुण्याचे लागले.`

आता मात्र ते अधिकाधिक काळ शिरसीतल्या या निसर्गरम्य जागेत रहातात. पत्नी मुंबईतले कार्यालय पहाते. मुलाने स्वताःहाची परदेशी टूर कंपनी अनुभव हॉलिडेज ..काढली..

एक मात्र छान की त्यांची मुलगी प्राची आपला पती अनिरुध्द शेटये सोबत सारा कारभार..
विशेषतः पाहुण्यांचे पोटभर स्वागत करते..
शिरसीतल्या या जंगलातील खोल्या म्हणजे जणू.. सुविधाजनक सोयी देणारे उत्तम रहाण्याचे ठिकाण...

परिसरातल्या पहिल्या दर्शनाने मन आनंदून जाते..बाहेरही सुंदरशा फरशा लावून हिरवळ खेळविली आहे. बंगल्याप्रमाणे रुबाबदार वाचावे असे ऐटबाज जीवन इथे सुखावते. केवळ परिसर नव्हे






 तर अगदी राम पटकुरेंपासून..खरतर ते हिशेबविभाग सांभाळतात...पण वेळेप्रमाणे पाहुण्यांच्या दिमतील हजर असतात.

किरण, सुनिल , सुशील आणि शक्ति राणा पर्यंत सारेच तुमची काळजी घेतात..सकाळच्या चहापासून रात्रीच्या आइस्क्रिमपर्यंत...पाहुणचार असावा तर असा..आता पुरे...नको.नको...बास ..असे म्हणण्याची पाळी येते...


इथला मंत्र म्हणजे...रोज रात्री सुखाने निरव शांततेत झोप काढा. सकाळी उठून निसर्गसफारी मनसोक्त करा...भरपेट नाष्टा घ्या..तोही रोज वेगवेगळ्या पदार्तांचा..थोडे आजुबाजुच्या परिसरातील निसर्गरम्य जग बघा.




आणि पुन्हा दुपारी यथेच्छ..भोजनाचा आस्वाद घ्या...दुपारी चहानंतर पुन्हा एक मीनी सफर मारा..खरेदी करा...रात्रीच्या जेवण्यास परत त्यांच्या त्या उत्तम त-हेने सुबक सजविलेल्या दालनात या...रोज ताजी फळं आणि पुन्हा वर आईस्क्रिमचा मारा...









 शिरसीतल्या नावाजलेल्या श्रीधर हेगडे यांचे गायन..ऐकताना त्यांची मेहनत आणि त्यांचे मराठीतले अभंग ऐकताना मन तृप्त होते..
मुळात त्याआधी स्वतः अरुण भट जे निवेदन करतात..तेही तेवढेच परिपूर्ण...मात्र ते ऐकण्याचे भाग्य लाभायला एखादा सहप्रवासी मिठाचा खडा टाकणार नाही..हे पहावे लागते..





अनुभवच्या सहली करताना जो काही ठरलेला कार्यक्रम असतो तो तर पार पडतोच..पण त्याशिवाय जर भट स्वतः तुमच्या गाडीत असतील तर मग काय. महलांना गजरे काय..खायला काय...आणि त्यांच्या मनातले भाव काय. सारेच ऐकता येतात..


मनाप्रमाणे हिंडलो
बागडलो
रोजच्या कामात बदल
विरंगुळा
निसर्ग अनुभवला
फिरलो
ताजेतवाने झालो
चाललो
किती वेगळा आनंद
समाधान

जे उतरले चेह-यावर
तळहातांवर
सहप्रवाशांची साथ
जोड
सारेच वेगळे
बोलके
पुन्हा तोच आनंद
हासरा
घेऊन निघायचे पुढच्या प्रवासाला...


शिरसीतल्या अनुबवानंतर मी तर पुरता भट सरांच्या नव्हे भट काकांच्या पुरत्या प्रेमातच पडलो आहे. त्यांनी जी आनंदी वृत्तीने आमची आठ दिवसांची ही चैन मनसोक्त रित्या आमच्या मनात कायमची घर करुन ठेवली..त्याला खरचं तोड नाही..याचा दुसराही अर्थ असा होतो की त्यांच्या बोलण्यावर , अदाकारीवर आणि सहवासावर आम्ही लट्टू झालो आहोत. जुलै, अॉगस्ट आणि गणपतीतले आठ दिवस सोडले तर इथे वर्षभर सतत माणसांचा वावर असतो...

हे सरे मी लिहले ती यांची जाहिरात व्हावी म्हणून नाही...तर डिस्कव्हर कर्नाटकाचा अनुभव घेताना मला हे सारे तुम्हाला सांगितल्यावाचून रहावेना..मी पुरता त्यात डूंबून गेलो आहे..कदाचित तो माझा वीकपॉईंटही असेल पण ते तुम्हाला सांगावेसे वाटते... 









 शिरसीतल्या विविध दिशेला रोड फिरायचे..

आज कुठे धर्मा जलाशय.




तिथून शिवगंगा फॉलकडे जायचे...वाटेत दिसणारा नुमुळता रस्ता आणि सभोवतालची हिरवीगार वनराई अनुभवायची..
मंडगुडची तिबेटी मॉनेस्ट्री तृप्त होऊन गाडीतच कोकम सरबत आणि खास धारवाडी करदंड खायचा खास पाहुणचार घेऊन..पुन्हा भोजनाच्या आग्रहाचा स्विकार करायचा..


रोज नवी दिशा ..नवा निसर्ग पहाून समाधान पावणारे आम्ही सारे..अरुण भटांच्या दिलदारपणाचे गोडवे गात..बाहेर पडायचो..पुन्हा पुन्हा इते येण्याचे ठरवूनच..

रॉक गार्डन हुबळी
आज दौरा होता..तो हुबळीजवळच्या रॉक फेस्टीव्हच्या गर्दीत स्वतःला हरखून जायचा.. इथे उत्तर कर्नाटकातली ती विरून गेलेली सारी संस्कृती पुन्हा जीवंत होउन दिसत होती.

 

मिरजान फोर्ट...हा कर्नाटक आणि मराठी राजांनी आपल्या अस्तकित्वाने टिकून ठेवलेला अघनाशिनी नदीच्या पाण्यातून व्यापार करण्यासाठी उभारलेला किल्ला ...आज केवळ अवशेष आहे..पण दूरदृष्टीचा इते स्पर्श होतो हे नक्की..






समुद्रकीनारा ..आणि  प्रचंड अशा नदीतल्या मार्वीन कुर्वे बंदरावरेचे बोटींग..








अप्सरा कुंडा ..म्हणजे इथे अस्परा स्नानासाठी येत असलेला धबधबा.











आणि असन कोंडा ..हा सूर्यास्ताची मजा पाहण्यासाठी समुद्रात उतरेला सूर्य..





अखेरच्या टप्प्यावर येताना...बोलका झालेला..डोळ्यांचे पारणे फेडणारा सावेडी फॉल....अवघड अशा वाटेवरून डोंगराच्या उंचीवरून काळी नदीच्या उगमस्थानावर असलेला हा प्रचंड खलखळाट करुन वाहणारा हा धबधबा..म्हणजे निसर्गाच्या कुशीतले हे पाण्याचे प्रचंड साठेच..

असा हा अनुभव कित्येकांना आला आसेल..त्यांनी ते आपल्या रुपाने व्रणनही केले असेल..म्हणूनच माझी विनंती आहे की मी फेसबुकवर ..https://www.facebook.com/pages/Anubhav-bandh%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/1397012083887007 Anubhav bandh/अनुभव बंध
असा हा अनुभव कित्येकांना आला आसेल..त्यांनी ते आपल्या रुपाने वर्णनही केले असेल..म्हणूनच माझी विनंती आहे की मी फेसबुकवर ..या नावानं अरुण भटांच्या या सहलीत गेलेल्यांचे अनुभव एकत्र करण्याची मनीषा ठेऊन तयार केलेले पेज आहे..आपणही त्यात लिहावे..यासाठी मी फार उत्सुक आहे...

पुन्हा पुन्हा असे अनुभव घडावेत हेच सांगणे करुन इथेच हा प्रदिर्घ अनुभव लिहिण्यासाठीचा विराम घेतो..





- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdfar@gmail.com
09552596276