Saturday, February 8, 2014

भक्तिमय भाविकतेत रसिक चिंब





स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यातले त्यांचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी जय जय राम कृष्ण हरी..चा गजर सुरु केला आणि उद्यान कार्यालयातल्या सभागृहातील वातावरणच बदलून गेले. एका मागोमाग अशा रचना तिथे स्वर आणि शब्दातून जसजशा गायक सादर करु लागले तसा हा सारा भक्तिमय भावीकतेने रसिक चिंब भिजून गेला...आणि दोन तास सुरु झालेला हा स्वरोत्सव त्या ज्येष्ठ गुरुंना खरी भावांजली ठरली.
संगीतासह सर्व कलांचा प्रसार व्हावा आणि गुरुंच्या स्वरातील चार स्वर रसिकांच्या कानी पडावेत यासाठी साधना करुन त्याचे विविध माध्यमातून सादरीकरण करण्याच्या उद्देशाने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे अनेक काळ शिष्य असलेले राजेद्र दिक्षित यांनी आपल्या श्री गुरु संगीत प्रसारक मंडळाची स्थापना केली. संस्थेच्या उद्दंशांपैकी असलेल्या पं. भीमसेन जोशी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने म्हणजेच तिथीप्रमाणे रथसप्तमीला स्वरोत्सवाचे आयोजन केले होते.
केवळ पंडीतजींवरची असीम श्रध्दा आणि त्यांच्यासोबतीने मिळालेला ठेवा रसिकांसमोर देताना त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देणे हाच केवळ उद्देश मनी बाळगून त्यांनी हा कार्यक्रम गुरुवारी सहा फेब्रुवारी २०१४ ला संध्याकाळ साजरी केली स्वरांच्या पुजेने.


ही स्वरपूजा बांधताना केवळ आपले गुरु न समोर ठेवता पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. शरद गोखले अशा दोन गुरुंच्या शिष्यांना हा स्रमंच उपलब्ध करुन दिला..ही मोठी गोष्ट असल्याचे स्वतः  डॉ. मोहन दरेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्टही केले. म्हणून या कार्यक्रमाचे मूल्य अमूल्य आहे..
तबला, पखवाज, टाळ, व्हायोलीन आणि हार्मोनियम यांच्या साथीने सारा परिसर दुमदुमून गेला त्यात मिळाली ही सुंदर स्वरांची सुरेल साथ....एकूणच वातावरणात  ते भाव सहजीपणे उतरले होते.
पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य स्वतः राजेंद्र दिक्षित. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ. मोहन दरेकर आणि पं. शरद गोखले यांच्या कन्या आणि शिष्या भक्ति पागे-गोखले यांचा सहभाग असलेली ही संध्याकाळ अभंग, भक्तिगीत आणि नाट्यगीतांने रंगली.
राजेंद्र दिक्षीत- 
राजस सुकुमार, इंद्रायणी काठी,
 माझे माहेर पंढरी,
कान्होबा तुझी घोंगडी चांगली,
ध्यान करु जाता मन हरपले आणि
अगा वैकुंठीचा राया..
डॉ. मोहन दरेकर- 
संत भार पंढरी,
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
सावळे सुंदर..
भक्ति पागे-गोखले-
अवघाची संसार सुखाचा करेन,
उगवला चंद्र पुनवेचा,
शंकरा भरणम्,


...शेवटी पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजीतल भजनाने कार्यक्रमाची सांगता.. जो भजे हरि को  सदा, सोही परम पद पावना...

राजेंद्र दिक्षीत यांच्या माझे माहेर पंढरी आणि कान्होबाने दाद तर मिळविवीच पण गाण्यात तो पंडीतजींचा स्पर्शही उतरल्याचे जाणविले.
संतभार पंढरी आणि सावळा सुंदर या दोन रचनातून मोहन दरेकरांचे पांडित्य .त्यांची स्वरावरची हुकूमत आणि आवाजाला साजेशी फिरत ऐकताना मन त्प्त झाल्याचे समाधान मिळाले.
या दोन गायकांच्या तुलनेत भक्ति पागे-गोखले यांची पदे कमजोर पडली. त्यात जीवंतपणा होता पण भारदस्तता आणि आवाजाचा पातळ पोत यामुळे पदांना आणि अभंगाची रंगत थोडी कमी नटली.
ह्या लेखनाचा उद्देश हा टिकात्मक नसला तरी या घटनेचा उद्देश साध्य झाला की नाही हे सांगण्याचा आहे. स्वरभास्कराच्या नावाने श्री गुरु संगीत प्रसारक मंडळाने आपले कर्तव्य चोक बजावले..पण त्यातली रंगत आणि उंची गाठायची आवश्यकता आहे. केवळ हे स्वरांचे आणि शब्दांचे बुडबुडे न रहाता संगीत विषयक काम केल्याचे ठोस पुरावे इथे दिसायला हवे होते.मग या व्यासपीठाला एक अभ्यासापूर्णतेचे वलय निर्माण होईल.मात्र राजेंदर् दिक्षीत यांचा प्रामाणिक प्रयत्न होता..हे मान्यच करायला हवे..त्यांची ही तळमळ त्यांच्याकडून अधिक काम करवून घेईल यात शंका नाही.

ही मैफल पांडुरंग मुखडे (तबला), संजय गोगटे आणि प्रवीण कासलीकर (हार्मानियम), चारूशीला गोसावी (व्हायोलीन), पंढरीनाथ दरेकर, गणेश टाके, निखिल ताकभाते ( पखवाज आणि तालवाद्य), ,  यांच्या साथसंगीत रंगली. कार्यक्रमाचे निवेदन अनिल स्वकूळ यांनी केले पण त्यात जोश कमी आणि आवेश अधिक होता..याला अधिक निवेदनाची उत्तम साथ लाभली असती तर कार्यक्रमाची सफाई अधिक वाढली असती,





 -सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276