Monday, April 20, 2015

मी माझा..ऐन पंचवीशीत..



मी माझा या माझ्या (धाडस करून ) छापलेल्या पुस्तकाला पंचवीस वर्ष पूर्ण होतायत... 


पंचवीस वर्ष कशी गेली कळलं सुद्धा नाही... अशी म्हणायची पद्धत आहे
पण खरं सांगायचं तर.. कशी गेली ते कळतं.. आपण आपल्याला नव्याने समजत जातो
नशिबाने यश पदरात पडलं तर आपली आपली म्हणणार्या माणसांची तोंडाची कडवट झालेली चव आपल्याला विदारून जाते कोणी अकल्पीत पणे दुरावतं कोणी अवचीत येऊन जोडलं जातं...शालेत असताना भरपूर मार्क मिळवणार्‍या मुलाला हुशार म्हणून गणलं जातं मोठेपणी भरपूर पैसा मिळवणार्‍या मुलाला यशस्वी म्हणून वाखणलं जातं..
त्याच न्यायाने पुस्तकाच्या खपावर पुस्तकाचा दर्जा धरला जातो...तेंव्हा माई मला धीर देत म्हणाली होती पुस्तक नाही खपलं तर आपण पुस्तकं संपेपर्यंत लग्न मुंज बारसं वाढदिवस वास्तूशांत उदक शांत सहस्त्र चंद्रदर्शन प्रत्येक ठिकाणी आवर्जून हजेरी लावायची आणि हे पुस्तक गिफ्ट करायचं पण साईकृपेने खरच अशी वेळ आली नाही ... त्यावेळी विलेपार्ल्याचं जवाहर बूक डेपो विलेपार्ल्याचच आनंद बूक सेंटर , दादरच आय्डियल यानी अक्षरश: मी माझा वारेमाप खप केला.. चर्नीरोडचा लखानी बूक स्टालही विसरून चालणार नाही...जसा खप वाढला तशी प्रसिद्धी वाढली आणि एक अनामिक पोकळी नातेसंबंधात डोकावायला लागली... ती कशामुळे याचं उत्तर मला अजूनही मिळालेल नाही.


पण काही माणसं अवचीत जवळ येतात म्हंटलं त्यात इंद्रायणी प्रकाशनाचे कोपर्डेकर काका आणि अक्षर धाराचे राठिवरेकर दंपत्य जन्माचे जोडले गेले..
घरातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला व्यवहाराचा अंदाजच येत नव्हता मिळक्तीचे साधन फक्त मी माझा आणि पून्हा मी माझाचा खप होता छापायीची जबाब्दारी कोपर्डेकर काकानी घेतली होती आणि हसत मुखाने विना तक्रार आम्हला धीर देत ते निभवत होते..
असं करता करता एक दिवस त्यांच्या माणसाने निरोप दिला साठ हजार भरा नाहीतर पुढे पुस्तक छापणं कठीण आहे... पायाखालची जमीन सरकली.. जेंव्हा आई पुस्तकाचा व्यवहार बघायची तेंव्हा पैसे आले की सगळ्यात आधी प्रिंटरचे पैसे बाजूला काढायची त्या बाबत ती फार आग्रही असायची त्यातील अर्थ तेंव्हा माझ्या लक्षात आला ... पैसे एक रकमी यायचे नाहीत आणि जे यायचे ते घरभाडं आणि इतर खर्चात ते कामी यायचे...

साठ हजार भरणं शक्यच नव्हतं...आणि तेंव्हा एकाने सुचवलं की मी माझाचे हक्क देऊन टाक म्हणजे साठ हजार द्यायची गरज नाही आणि तेंव्हा गोकुळधाम मधे आम्ही छोटसं घर घ्यायच्या प्रयत्नात होतो घर छोटं होतं पण त्यासाठी तीन लाख भरावे लागणार होते... सगळा विचार करून मी काकांजवळ धीर करून हा विषय काढला म्हंटल मी माझाचे हक्क तुम्ही घ्या मला पैशांची खूप गरज आहे... एखादा असता तर हाट केक सारख्या विकल्या जाणार्‍या पुस्तकाचे हक्क हवरेपणाने ताब्यात घेतले असते.. पण ते आमचे काका होते... ते ओरडलेच असा वेडेपणा कधीच करू नकोस.. ती तुझी जन्मभराची कमाई आहे.. परिस्तिथी काय अत्ता बदलेल... आणि पैशांचं टेंशन घेऊ नकोस..तू छान छान लिहित रहा...कोपर्डेकर काका आणि त्यांची पत्नी जिला मी मनापासून ताई अशी हाक मारतो या दोघानी कायम आधाराचा हात पुढे केला
आणि खरच सुरुवातीची दोन तीन वर्ष थोडी डळमळीत गेली पण नंतर छान घडी बसली... आमच्या वर चित्रपटांचे संस्कार, दर दहा वर्षाने घर एक मंदीर, स्वर्गसे सूंदर, घर हो तो ऐसा असे टिपिकल चित्रपट येणार आणि गल्ला भरून जाणर आई वडिलांशीपटत नाही म्हणून घराबाहेर पडलात की तुमचा बट्याबोळ झालाच समजा त्या मुलाचा बट्याबोळ दाखवला की चित्रपट हीट



... मी उमाला म्हणायचो आपलं खरच वाईट झालं तर आपण अजिबात त्यांच्याकडे जायचं नाही
पण खरच चांगलं झालं तर मग वाटलं तर पाया पडायला जाऊ पण तसा योग कधी आला नाही ना त्यांचं आमच्या वाचून अडलंना आमचं त्यांच्या वाचून
ज्यांच्याशी ऋणानुबंध ठरलेले असतात त्यांच्याशी तुम्ही जन्माचे जोडले जाता.. तसं झालं कसा योग बघा या सोळा जुनला कोपर्डेकर काका अचानक हे जग सोडून गेले.. 



हल्ली चेक पाठवताना ते कधी फोन करायचे नाहीत पण जायच्या आदल्या दिवशी त्यानी मला फोन केला चेक पाठवत असल्याचं सांगितलं जुजबी चौकशी केली आणि फोन ठेवला तो आमचा शेवटचा संवाद होता या वर माझा अजून विश्वास बसत नाही पण शेवटचा फोनही पैसे पाठवत असल्याचाच होता..
राठिवरेकर पण तसेच खूप आधीची गोष्ट आहे एकदा पुस्तकाना मागणी कमी होती तर मागवलेली नसताना मी अक्षर धाराकडे पुस्तकं पाठवून दिली आणि रमेशनी ती ठेऊनही घेतलीआणि त्या बद्दल नाकधी तो बोलला ना रसिका बोलली
मला जाहीर कार्यक्रमाची सवय राहिली नव्हती तर या ना त्या निमित्ताने अक्षर धारा मला रसिकांसमोर उभं करत राहयचं अजूनही हा सिलसिला चालू आहे.... खास सांगायचं म्हणजे रसिकाच्या हातचं गरमागरम रुचकर जेवण.त्यातही झटपट सगळे व्याप सांभाळून ती ताटात वाढते ते गरम गरम रुचकर उकडीचे मोदक.. गेल्या पंचवीस वर्षात यात बदल झालेला नाही... सध्याच्या काळात फक्त लिखाणावर आपली सुखात गुजराण करणारा मी एकमेव लेखक असावा.. नाहीतर आपल्या भारतात लिखाण हौसेखातर करावं लागतं पोट्भरीचा वेगळा व्यवसाय शोधावाच लागतो... उमाची समर्थ साथ, उमाच्या माहेरचा भक्कम आधार आणि मालिकांच समृद्ध माध्यम यातीन गोष्टिनी आमची पंचवीस वर्ष तोलून धरली


म्हणूनच पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहुर्तावर काकांचा आशीर्वाद घेऊन पून्हा नवी सुरुवात करतोय मी माझा२५ या पुस्तकाने ...
. काकांची देखरेख अजूनही असेलच पण तरी मुग्धा त्यांची सून आणि सागर काकांचा मुलगा जो मला मामा म्हणतो आणि मानतो सुद्धा त्यांनी जबाब्दारी घेतली आणि एक देखणं पुस्तक आज हाती आलं जे मी समस्त रसीक जनाना समर्पीत केलय कारण तुम्हीसांभळलत जपलत राखलत
या पंचवीस वर्षात कोण कोण भेटत गेलं आमचा शेखर पदे आमची मेधा पदेत्यांची गूणी मुलं,आमचे पाटकर बंधू सचीन मोरे ऋचा मोरे सारखे जिवलग


फेस्बूक मुळे भेटलेले असंख्य स्वकिय सोयरे प्रसाद मिळ्ये रचना मुळ्ये, सुब्बू, अरुंधती, तुषार जोशी सीमा जोशी बीना, मंजुषा,सुरज,मनोबा,साईनाथ,विद्या... अ ब ब ब किती नावं घेऊ

पण उद्या परत तुम्हा सर्वांच्या सोबतीनेच.. नव्या सुरुवातीची उत्कंठा मी आज पून्हा तशीच नव्याने अनुभवतोय.. पंचवीस वर्ष कशी गेली कळलच नाही असं म्हणायचा मोह मलाही होतोय..
खरच एकदाचं म्हणून टाकतो
पंचवीस वर्ष कशी गेली कळलच नाही......




-चंद्रशेखर गोखले
(चंदॅशेखर गोखले यांनी फेसबुकवर ळू्दातून मांडलेला हा पंचवीस वर्षांनंतरचा इतिहास..केवळ त्यांच्या सौजन्याने)

No comments: