Sunday, November 19, 2017

वसंत कानेटकरांच्या स्वप्नातील व्यक्तिरेखा मत्स्यगंधेत साकारल्यात...






वसंतरांव आणि गोवा हिंदू असो. याचे एक अतूट नाते १९६०च्या सुमारास आकाराला आले, ते त्यांच्या `रायगड` नाटकामुळे. गोवा हिंदू कलाविभागाचे सर्व सदस्य भिकू पै आंगले, रामकृष्ण नायक, गुडे आणि अनेक , यांच्यातला स्नेहभाव अकृत्रिम होता.त्यामुळे असो. च्या येऊ घातलेल्या शताब्दि निमित्त, `मत्स्यगंधा`, या नाटकाचे पुनरूज्जीवन होणे,  ही अत्यंत सुयोग्य घटना घडते आहे. या निमित्ताने वसंतरांवांच्या जुन्या नाट्यकृतींना उजाळा देऊन, आपण आपण रंगदेवतेचा सन्मान करीत आहात यात काही शंका नाही.  हे कार्य पुढील वाटचालीमध्ये आपल्या सर्वांना प्रोत्साहित करेल, अशी मला खात्री वाटते..




पहिली पाच नाटके लिहून कानेटकरांनी आपला मोहरा संगीत नाटकाकडे वळविला  आणि १९६४ साली `मत्स्यगंधे`चा जन्म झाला.  तो पर्यंत `रायगड`ने एक इतिहास घडविला होता. वसंतरावांची मूळ प्रेरणा कविता हीच होती. कुसुमाग्रजांनी त्यांच्या  रसिकप्रिय नाटककार या लेखात म्हटलय ….`वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रतिभेचे पालनपोषण काव्याच्या वातावरणात झालं.  त्यामुळे त्यांनी संगीत नाटकाकडे वळणे, ही एक अपरिहार्य घटना होती`.





`गोवा हिंदू` ने ६४  सालूी मत्स्यगंधा हे नाटक मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणले.  संगीत नाटक लिहिण्याचा वंसतरांवांचा हा पहिलाच प्रयत्न  होता. या नाटकात प्रसंगानुरूप पदे लिहिण्याचे कौशल्य त्यांनी सिध्द केलेच, शिवाय ..गर्द सभोती रानसाजणी, ही बालकविंची आणि ..अर्थशून्य भासे मजला.. ही गिरीशांची कविता यांचा संहितेत समावेश करून आपल्या तरल प्रतिभेची जाणीव करून दिली.  या नाटकातील व्यक्तिरेखा उभ्या करताना त्यांनी लयबध्द, कवितेच्या अंगाने जाणारे चिंतनशील संवाद निर्माण केले.  त्यांच्याच शब्दात लिहायचे तर..`एका उत्कट काव्याला, प्रखर तेजस्वी नाट्याला आणि मूलभूत जीवनमुल्यांना आवाहन करणारी सत्यवती मी रंगवली . त्याचवेळी तेवढ्यांच ताकदीचा भीष्म मी तिच्यासमोर ऊभा केला आणि भीष्मासमोर एक जबरदस्त जीवनसंघर्ष अंबेच्या रुपांत निर्माण केला`.






त्यावेळी संगीत रंगभूमिच्या दृष्टीने  एक अपूर्व घटना घडली ती पं. जीतेंद्र अभिषेकींच्या आगमनाने. संगीतकार म्हणून त्यांचे यशस्वी पदार्पण , या नाटकाच्या निमित्ताने झाले आणि संगीत मत्स्यगंधेची कीर्ति वायू वेगाने महाराष्ट्रभर पसरली.  त्यातील नाट्यसंगीतांच्या रेकॉर्डस् निघाल्या.  अभिषेकींना `युगकर्ता संगीतकार`, हा सन्मान मिळाला . या संगीताने आणि त्यातील लयबध्द संवादाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला.  कानेटकर आणि अभिषेकीबुवांचे `ट्यूनींग` झकास जमले.  हा एक मराठी रंगभूमिच्या कुंडलीतला अपूर्व योग म्हणावा लागेल. पारंपारिक संगीत नाटकांचे सादरीकरण नव्या आकृतीबंधात झाले. पुणे..मुंबईकरांना गंधर्व युगाची पुन्हा प्रचिती एका वेगळ्या पध्दतीने झाली, हे मुद्दाम नमूद करावे लागेल.





एकाच वेळी रायगड मत्स्यगंधेचे लेखन चालू होते, याचे कारण वंसतरावांची बहुप्रसव प्रतिभा.  त्यांनी म्हटलेय.. `मत्स्यगंधा हे माझ्या कॉलेज जीवनाला जोडलं गेलेलं नाटक. १९४२ साली विलिंग्डन  कॉलेज , सांगली इथे बी. . च्या वर्गात शेक्सपिअरचा अभ्यास करताना मला याचे सूत्ररूपाने आकलन झाले. शंतनुमध्ये किंग लिअर, भीष्मामध्ये हॅम्लेट आणि मत्स्यगंधेमध्ये क्लिओपात्रा या तीनही कॅरॅक्टर्स एकत्र आणून मानवी जीवनाचे आकलन करायला प्रेक्षकांना उद्युक्त करावे, अशी अफलातून कल्पना मला सुचली. बीजरूपाने ती अंतर्मनात  रूजली.  १९६४  साली बीज अंकुरले आणि नाटक साकार झाले. मात्र यात हॅम्लेटचे एकमात्र  चित्र १९६४  भीष्माच्या चित्रणात प्रतिबिंबिंत झाले.



अशी ही नाटकाची जन्मकथा,  त्यांच्या तोंडून ऐकताना माझ्या अंगावर आलेले शहारे आजही आठवतात. चिंतनातून आणि एकाग्र तपश्र्चर्येतून नाटकाचे लेखन पुढे सादरीकरण यशस्वी ठरले. एक नवा इतिहास रचला गेला. शेक्सपिरियन ट्रॅजिडिच्या त्यानी केलेल्या अभ्यासाला, महाभारतातील अश्रू हरविलेल्या भीष्माने खराखुरा न्याय दिला, हे सुजाण रसिक जाणतील.





आणखी एक ह्द्य आठवण त्यांच्या प्रत्यक्ष लेखनकालाशी निगडित आहे. तिचा संबंध त्यांच्या सुविद्य पत्नी सिंधूताई यांच्याशी आहे. पत्नी म्हणून त्यांनी त्यांच्या लेखनकालात अनेकविध जबाबदा-या पेलल्या. ती त्यांची लेखनिक तर होतीच, शिवाय पहिला श्रोता, वाचक आणि एकमेव प्रेक्षक म्हणूनही ती सतत साथ सोबत करत होती. आणखी एक अगदी वेगळी ओळख म्हणजे ती त्यांची परखड  टीकाकार होती.  कारण स्वतंत्र प्रज्ञेची कवचकुंडले तिला लाभली होती . वसंतरावांना खरीखुरी   intellectual companionship  तिने दिली. त्यामुळे वसंतरावांचे नाट्यलेखन एका  गुणवत्तेच्या  विशिष्ठ  पातळीच्या  कधीही खाली गेले नाही. , त्यातील गुणवत्तेचा कस कधीही कमी झाला नाही.

वाचन -लेखन करताना तिला जरा कुठे शंका आली, तर पुनर्लेखन करायला ती त्यांना भरिस पाडे. तिने ही सेन्सॉरशिप आपणहून स्वीकारली होती. आणि कडक नियमातून, वसंतरांवांचे लेखन तावून सुलाखून निघे.  मला आठवते की मत्स्यगंधेचा शेवटचा प्रवेश लिहिल्यावर नेहमीप्रमाणे वसंतरावांनी हाक मारली. तिला बोलावले आणि विचारले ..`काय कसे काय झाले आहे ? `.परखडपणाणे तिने आपले मत प्रगट केले की ,…`अहो, हे तर भीष्मावर नाटक झाले आहे. मत्स्यगंधा आहे कुठे त्यात.? ` हे ऐकल्यावर नाटककारानी रागारागाने लिहलेले हस्तलिखिताचे कागद फाडून टाकले आणि तुकडे अंगावर भिरकवीत म्हणाले..`इतके शहाणपण उतूं जातयं..तर तुच लिही ना !`




खरतर तो त्यांच्या स्वत:वरचा व्यक्त झालेला राग होता. पण यातून पुन:र्लेखन, पुन्हा चिंतन आणि संहितेची पुन:र्बांधणी हे असेच घडत होते जेव्हा दिग्दर्शकाच्या ओटीत ती पडे, तेव्हा त्यातून सुंदर नाट्यशील्प आकाराला येइ, अविस्मरणिय  कलाकृती निर्माण होई.. ज्याचा अनुभव `मत्स्यगंधे`मधे आपण घेत आहात.. मग अशा गुणवत्तापूर्ण नाटकाचे हजारो प्रयोग होत असत...` रंगदेवतेला अभिवादन करून, दी गोवा हिंदू असोशिएशन , कलाविभाग.. सहर्ष सादर करीत आहे.. प्रा. वसंत कानेटकर लिखित संगीत नाटक मत्स्यगंधा प्रयोग क्र. 999  ` .. हे शब्द पडदा उघडण्यापूर्वाच्या अंधारात मायबाप प्रेक्षकांच्या  मनावर कोरले जात..



असा हा मंतरलेला काळ, ज्याचा मी शब्दांच्या माध्यमातून Flash Black सादर केला. , त्या काळाचा एक साक्षीदार म्हणून..आणि आजचा प्रयोग पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आणि वसंतरांवांचे स्वप्न इतक्या वर्षांनी का होईना साकार झालेले पाहिले. ते असते तर म्हणाले असते की सत्यवती, भीष्म आणि अंबेच्या माझ्या स्वप्नातील व्यक्तिरेखा आज इतक्या वर्षांनी माझ्या मनाप्रमाणे साकार झाल्या..

 


-अरूण कानेटकर,
शितल अपार्टमेंट्स, बी. एम. सी. सी. रोड,
पुणे.. ४११००४
Mob. 9503005089
E-mail: kma943@rediffmail.com

Wednesday, November 15, 2017

नादरूपच्या नृत्याविष्काराने रसिक भारावले





अनेकदा कलाकारांच्या सत्कार समारंभानंतर त्यांचे कलेतील स्थान आणि त्यांनी केलेले कर्तुत्व दाखविण्यासाठी रंगमंचीय आविष्करण केले जाते..पण मिडीयामध्ये सत्कार समारंभाची दखल घेतली जाते..पण ज्या कलावंतांनी मेहनत घेऊन नंतर केलेले सादरीकरणाचा फक्त एका वाक्यात उल्लेख होतो..ते त्या कलावंताच्या कलागुणांना काही प्रमाणात मारक ठरते..तारक नाही..


रविवारी टिळक स्मारक मंदिरात गानवर्धनच्या वतीने ख्यातनाम कथ्थक गुरू शमा भाटे यांना डॉ. विजया भालेराव पुरस्कार नृत्यगुरू सुचेता नातू यांच्या हस्ते दिला गेला..सन्मान समारंभानंतर  `नादरूप `,या शमा भाटे यांच्या नृत्यालयामार्फत त्यांच्या शिष्यवर्गाने जो अविस्मरणीय आनंद दिला त्याची नोंद एक रसिक म्हणून घ्यावीशी वाटली..हाच याचा मुख्य उद्देश..

पंडिता रोहिणी भाटे यांच्या शमा भाटे ह्या नात्याने सून. पण मला रोहिणी भाटे य़ांच्या पहिल्यापासूनच्या शिष्यात गणल्या जातात. डेक्कनवर पूर्वीच्या कॉफि हाऊसच्या मागे रोहिणी भाटे यांचा नृत्यवर्ग.तर टिळक रोडवर शमा भाटे यांची `नादरूप `ही संस्था कथ्थक थडे देणारी संस्था..काळओघाप्रमाणे रोहिणीताई गेल्या आणि त्यांचे अस्तत्व नादरूपने मनोमन जपले..ते आपल्या शिष्यवर्गाच्या उत्तम सादरीकरणाने काल पुन्हा एकदा सिध्द झाले.



त्या बोलतात त्या आपल्या कलेतून आणि विद्यार्थ्यांच्या कलेतून..











काल प्रेक्षागृहात दर पाच मिनिटांनी टाळ्यांचा नाद घुमत होता..याचे सारे श्रेय जाते  ते शमा भाटे यांना आणि त्यांच्या उत्तम तयारीने सादर केलेल्या शिष्यवर्गाला.


नादरूपच्या वतीने अर्पिता पाटणकर यांनी सुजाता नातू, शमा भाटे आणि उपस्थित सर्व रसिकांचे स्वागत करताना जी मने जिंकली..ती पुढच्या सर्व कार्यक्रमाची नांदीच होती. नृत्यकार्यक्रमाची सुरवात भगवान शंकरांचे वर्णन असणारा शिववंदना सादर करून..



रंगमंचावर उत्तम रित्या दर्शन घडवून खिळवून ठेवणारी हालचाल करत रसिकांची मने जिंकली. सादर केलेल्या सगळ्याच मोहक रचना..त्याचा सामूहिक आविष्कार आणि आपल्या उत्तम आणि प्रसन्न आविष्काराने रसिकांची पावती मिळविली.


पुढे ताल रुपक..नंतर केदार चतरंग...कालिया थाडे आवे मोहन..अर्थात कालिया मर्दन सर्व नर्तकांचा सुंदर आविष्कार पहाणे एक मन प्रसन्न करणारी गोष्ट होती.







द्रुत तिनतालात काही शिष्यांनी  आपल्या तरल अशा नृत्याविष्कारातून केलेली नृत्य आराधना किती प्रगल्भ होत गेली आहे याचे प्रतिक देत होती. हाताची मोहक हालचाल..गिरक्या, पदन्यास आणि केवळ  पायातल्या घुंगरातून साधलेली तपळाई.. सारचे कौशल्य दाखवित होती.

समुद्रमंथन  करणारा सर्व कलावंताचा आविष्कार केवळ अनुभवणे महत्वाचे होते. एकमेकांच्या उत्तम संगतीने तो सादर होताना..त्याला लाभलेली संगीत आणि  गायनाची साथ अंगावर रोमांच ऊभे करीत होती.



शेवटच्या भैरवीतून साकार केलेले  निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील लालित्य,संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते.





अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, कृपा तेंडूलकर, भार्गवी सरदेसाई, इषा नानल, निखिल परमार, निकिती कराळे, गिरीश मनोहर या नृत्यनिपुण कलाकारांचा सहभाग होता. यात प्रत्येक कलाकाराचे योगदान तेवढेच मोलाचे होते.




त्यांच्या उत्तम गुणग्राहक कालाविष्काला प्रत्यक्षात आणणारे शमा भाटे यांच्या सारखे गुरू हे आपल्या सांस्कृतिक परंपरेचे खरे पाईक..त्यांनी आपली सांस्कृतिक परंपरेची विरासत आपल्या खांद्यावर मोठ्या हुकमतीने पेलली आहे..हा कार्यक्रम याचेच ठळक उदाहरण होता.   




शेवटच्या भैरवीतून साकार केलेले  निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील सासित्य..संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते




गानवर्धन संगीत , संगीतावरची चर्चा आणि नृत्यकलेलाही किती महत्व देते ते अशा कार्यक्रमातून ठळकपणे सिध्द होते.





- सुभाष इनामदार, पुणे
9552596276