Sunday, August 12, 2018

बाबुजींना कोल्हापूरकरांनी पुन्हा अनुभवले..





गुरुपौर्णिमा आली तसं विद्यार्थ्यांना घेऊन काहीतरी छान करावं या विचाराने उचल खाल्ली आणि क्लास मध्ये सर्वाना “बाबूजी” ही थीम दिली. बाबूजींची जन्मशताब्दी असल्याने ती सर्वत्र जोरात साजरी होणार,श्रीधरजिंकडून किंवा पुण्यातून कुठल्याही कार्यक्रमात माझा सहभाग असू शकेल म्हणून मी इतर असाईनमेंटस घेतल्या नव्हत्या . पण मला कुठून बोलावणं आलं नाही त्यामुळे वेळ होता...मग आपल्या क्लास तर्फे काही करावं हे ठरवून मनात विचारचक्र सुरु झालं. मी विध्यार्थ्यांसमोर बाबूजींचं नाव घेतलं आणि सर्वांच्यात जणू नवीन उत्साह संचारला...२९ तारीख, संध्याकाळी ६ ची वेळ निश्चित केली. 



“ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके यांचे मराठी सुगम संगीतातील योगदान” या माझ्या प्रबंधाला मुंबई एस एन डी टी विमेन्स युनिवर्सिटी कडून डॉक्टरेट मिळाली असल्याने बाबूजींची जीवनगाथा, त्यांचे संगीत या विषयी आपण केलेल्या अभ्यासावर आधारित मीचबोलावं आणि विद्यार्थ्यांनी गीते सादर करावीत असं ठरलं. रीतसर निवेदक न बोलावता मीच अनौपचारिक सादरीकरण करावं असं मनात आलं. 



विद्यार्थ्यांनी गीते निवडण्यापासून माझ्याकडून नीट बसवून घेण्यासाठी खूप कष्ट घेतले, त्या आठवड्यात ऑफिस मधून आल्यावर संध्याकाळी उशिरा पर्यंत दोन दोन तास क्लास चालला....

राधाकृष्ण मंदिराचे ट्रस्टी माझे सन्मित्र रविराज भगवान ह्यांनी मंदिरात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याची तयारी दाखवली पण त्यांना काही अडचणी आल्याने तो बेत गोकुळाष्टमी पर्यंत पोस्टपोन झाला. आमचं गुरुपौर्णीमेचं सादरीकरण मंदिरालगतच्या इमारतीतील एका छोट्या हॉल मध्ये असत, त्या ऐवजी मुख्य मंडपात करावं असं माझ्या मनात आलं..... “बाबूजी” हा विषय असल्याने आपल्या क्लासपुरताच कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपले कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सगेसोयरे यांनाही ऐकायला आवडेल, तेव्हा त्यांच्यासाठी कार्यक्रम खुला ठेवावा असं वाटल्यामुळे सर्वाना बोलवा असं मी विद्यार्थ्यांना सांगितलं. कुठेही कोणतीही जाहिरात न करता सर्वांनी आपापल्या ग्रूपमधून कार्यक्रमाचं निमंत्रण सर्क्युलेट केलं.. लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली...मला तसे फोन ही येऊ लागले.




जय्यत तयारीनिशी मी आणि माझे सर्व विद्यार्थी त्या दिवशी वेळेआधी राधाकृष्ण मंदिरात जमलो. सुंदर अशी सजावट असलेलं, अनेक खांब असलेलं हे मंदिर खूपच प्रसन्न आहे... त्या दिवशी कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत लोकांची गर्दी झाली आणि ती वाढतच गेली..




मान्यवरांचा सत्कार आमचे हितचिंतक राजशेखर इंडी यांच्या हस्ते झाला. “नादब्रम्ह” चे मनोज गुणे, आमचे सदैव कौतुक करणारे “फायटो फार्मा”तर्फे पुढाकार घेऊन संगीतोपचार हा विषय रंगमंचावर आणण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारे दिलीप गुणे, “स्मृतिगंध” लिसनर्स क्लबचे धनंजय कुरणे, एल आय सी चे विकास अधिकारी महेश खाडिलकर, राधाकृष्ण मंदिराचे ट्रस्टी रविराज भगवान यांच्या मातोश्री, शंकरराव सरनाईक यांच्या शिष्या जुन्या जमान्यातील ज्येष्ठ गायिका श्रीमती सबनीस असे दिग्गज श्रोते आणि आमच्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, मंदिरात अनेक उपक्रमासाठी नियमितपणे येणारे भाविक, आलेले दर्दी लोक, इतर  विद्यार्थी, असे सर्व प्रकारचे श्रोते समोर होते.


कलेची देवता सरस्वती, विघ्नहर्ता गणपती, सुधीर फडके, माझे गुरु डॉ. भारती वैशंपायन,  प्रेरणादायी मार्गदर्शक डॉ अश्विनी भिडे – देशपांडे यांना वंदन करून ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते दीपप्रज्वलन केलं गेलं. 


साथीदार शिवाजी सुतार ( सिंथेसायझर ) आणि रमेश लोखंडे ( तबला ) स्थानापन्न झाले...


 सद्गुरूस्तवनाने कार्यक्रम सुरु झाला..... सुधीर फडके यांचे गुरु, गांधर्व महाविद्यालय, कोल्हापूरचे त्या वेळचे संचालक, ग्वाल्हेर घराण्याचे महान गायक वामनराव पाध्ये यांच्या स्मृतीला प्रणिपात करून सहज सुचत जाणाऱ्या निवेदनातून सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्वाचे एकेक पैलू उलगडू लागले....सुधीर फडकेंचे आदर्श सर्वश्री बालगंधर्व, गानहिरा हिराबाई बडोदेकर, महान गायक के एल सहगल, स्वा. सावरकर यांचंही गुरुतत्व सुधीर फडकेंनी निर्माण केलेल्या गीतांच्या रूपाने स्मरून ही पालखी चालू लागली.




कोल्हापूरच्या या गुरुशिष्यांच्या स्मृती जागवत आम्ही कलाकार आणि श्रोते १९२५ – ३० ते २००२ यादरम्यानच्या काळात मनाने कधी जाऊन पोचलो समजललंच नाही.

प्रथम “ज्योती कलश छलके” हे गीत प्रभा इंडी यांनी गायिलं.. बाबूजींच्या कारकीर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीतून झाली, प्रथमतः ते हिंदीतले मान्यवर संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीतले संगीतकार त्या तोडीची दर्जेदार गीते उदा. “दिन है सुहाना” बाबुजींसारख्या मराठी माणसाने केली आणि ती लताजी, किशोरजी यांसारख्या दिग्गज कलाकारांननी तेव्हा गायिली आहेत, अशा काहि गोष्टींची तपशीलवार माहिती मी दिली. त्यांच्याहिंदी गीतांची महती हिंदी संगीतकार आजदेखिल कसे मानतात हे उधृत केलं...


प्रभा इंडी यांनी “एकाच या जन्मी जणू” हे गीतही नंतर सादर केलं. तेव्हा त्यांची गीतसंपदा पन्नास वर्षे टवटवीत राहिली याचं रहस्य उलगडताना बाबूजींची संगीतकार म्हणून ओळख करून देणारी तत्वप्रणाली आणि त्यातले घटक यांचा उहापोह मी केला. काळाच्या बरोबरीने राहिलेली त्यांची गायकी आणि त्याचं संगीत आजही आपल्याला का आवडत आलं आहे हे श्रोत्यांना त्यातून कळलं.

बाबूजींनी एच एम व्ही साठी केलेलं आणि माणिक वर्मा यांनी गायिलेलं गीत “बहरला पारिजात दारी” उन्नती सबनीसने गायिलं..तिनेच “उमज पडेल तर” या चित्रपटातील “घननीळा लडीवाळा” हे गीतही सादर केलं. 



 इथे बाबूजींच्या भावसंगीताविषयी बोलताना संगीत नाटकाचा बहराचा काळ आणि त्यानंतर काव्यगायानातून उदयाला आलेली शब्दप्रधान गायकी आणि तिचे गजानन वाटवे, केशवराव भोळे, जे एल रानडे यांच्यासारखे शिलेदार यांची माहिती मी सांगितली. या भावगायकीची नवी सापडलेली अनवट वाट पकडून सुधीर फडके यांनी तिचा राजमार्ग कसा केला, त्यांनी थोडीच भावगीते निर्माण केली तरी आजही भावसंगीताचे क्षेत्र त्यांच्याच नावाने व्यापलं आहे हे सांगताना मनोहर कवीश्वर यांच्यापासून ते यशवंत देव, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, सुधीर मोघे यांच्या पर्यंत सर्वांच्या सहभागाचे दाखले देत “तोच चंद्रमा नभात” हे गाण सादर झालं ते निनाद खाडिलकरच्या आवाजात... कार्यक्रम रंगू लागला... निवेदनातून मिळणाऱ्या माहितीतून बाबूजींच्या आयुष्याचे, त्यांच्या संगीतविश्वाचे अनेक कंगोरे नव्याने कळू लागल्यामुळे हरेक श्रोता त्यात गुंगून गेला....








निनादने “आकाशी झेप घे रे” हे आणखी एक गाणं सादर केलं. शीला धर्माधिकारीने आवाजातल्या खराबीवर मात करत “का रे दुरावा” आणि “तोडितां फुले” ही गीते सादर केली.. 








यावरून मला बाबूजींचे आवाजाच्या लगावाचे तंत्र, रियाजाची पध्दत आणि त्यांची अभूतपूर्व कलाकृती “गीतरामायण” यावर बोलता आलं. कोल्हापूरला मेळ्यात गाताना लक्ष्मण बेरळेकर, पुरुषोत्तम सोळांकूरकर, सदलगेकर यांसारख्या मित्रांकडून काही गोष्टी शिकून सुधीर फडकेंनी आपला आवाज, सादरीकरणाची पध्दत कशी विकसित केली याची माहिती मी दिली... ”गीतरामायण” हे “शुध्द शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून” आलं आहे हे त्या रेकॉर्ड वर कसं लिहिलं आहे, ते शास्त्रीय आणि सुगम संगीतच विद्यापीठ असून त्यात नाट्यशास्त्राची तत्वं ही कशी दिसतात ते मी सोदाहरण सांगितलं...या जागतिक कलाकृतीच्या काव्यनिर्मितीच्या निमित्ताने ग दि मा – बाबूजींच साहचर्य, साहित्यविचार, मराठी भाषेचं जागतिक पातळीवर स्वागत, गीतरामायण ऐकून मान्यवरांनी काढलेले प्रशंसोद्गार, आद्य शंकराचार्यानी बाबूजींना दिलेली “स्वरश्री” सारखी पदवी इत्यादि गोष्टी ऐकून श्रोते अचंबित झाले. गीतरामायणातील लयतत्व, रसविचार याची उदाहरणे मी माझ्या आवाजात सादर केल्यामुळे श्रोत्यांना त्याची अनुभूती घेता आली. आणि माझा विचार सोदाहरण स्पष्ट केल्यामुळे श्रोत्यांच्या मनावर बिंबला....






  “तुला पाहते”, “थकले रे नंदलाला” ही गीते गोड गळ्याच्या शुभांगी जोशी ने सादर केली....”आज कुणीतरी यावे”, “पतंग उडवित होते” अशी वेगळेपणा असणार (एक शास्त्रीय तर दुसरे लोकसंगीताचा बाज असलेलं गीत ही) गीते रसिका देशपांडेने सादर केली.“सांग तू माझाच ना”, “हवास तू” ही गीते वृंदा कुलकर्णी हिने सादर केली. 



“सखी मंद झाल्या तारका” हे गीत सादर करताना सुश्रुत हर्डिकर या माझ्या बंधूतुल्य गायकाने सांगितलं ते सर्वांच्या मनाला भिडलं....... माझ्या नुसत्या अस्तित्वानेच एखाद्याला गाण्याची गोडी लागावी, त्याने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ते जाहीर करावं आणि माझं, मंजुषाचं ऋण मानावं.... ही त्याची हृद्य गुरुद्क्षिणा मी गुरुतत्वाच्या आणि राधाकृष्णाच्या चरणी अर्पण केली.







प्रेक्षकांमध्ये त्याची सहचारिणी मोहिनी आणि त्याच्या मातोश्री प्रसिध्द विचारवंत वक्त्या कमल हर्डिकरही उपस्थित होत्या.आम्हाला सर्वांनाच त्याच्या अनौपचारिक, अनपेक्षित मनोगताने सुखद धक्का दिला... त्याच्या मनाचा मोठेपणा जाणवून माझी त्याच्याबद्दलची आस्था
द्वीगुणीत झाली.








बाबूजींच्या संगीताचा, मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ, राजा परांजपे, गदिमा यांचं साहचर्य, बाबूजींचं उत्तर भारतातील उपजीविकेसाठी केलेलं भ्रमण, त्यात त्यांना मिळालेलं ज्ञान, त्यांचा प्रभातकाळ, त्यांचं देशप्रेम, त्याचं सुसंस्कृत कुटुंब, ललिता पत्नीचे हिंदी चित्रगीतातील मोहम्मद रफींच्या बरोबरीचं अव्वल स्थान, रफींनी त्यांच्या लग्नात, आणि बाबूजीनी गदिमांच्या लग्नात म्हटलेली मंगलाष्टकं, ग्राहक चळवळ, मराठी चित्रपट उद्योगाच्या सुवर्णमहोत्सवाचे अमेरिकेत झालेले सोहळे, कोल्हापुरात चित्रनगरी साकारल्याची कृतार्थता,जगदीश खेबुडकर या आणखी एका करवीरपुत्राचा सुधीर फडकेंच्या संगीतातील सहभाग, गायक बाबूजी......त्यांचे चिरंजीव श्रीधर, त्याचं संगीत, “फिटे अंधाराचे जाळे” हे श्रीधरच्या संगीत दिग्दर्शनाखाली बाबूजीनी गायलेलं गीत, त्यांचा क्लेशकारक भूतकाळ, पुढच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ, त्यांची गायकी, त्यांची देहबोली, अशा विस्तीर्ण भावप्रदेशातून बाबूजींच्या जीवनाची सफर श्रोत्यांना घडवून आणताना माझा अभ्यास पणाला लागत होता. 





 

 “रामचंद्र” या मूळ नावाऐवजी“सुधीर” हे मेळयात न. ना. देशपांडे या मित्राने बदललेलं नाव आणि आज ही रसिकांच्या हृदयात धृवासारखं अढळपद मिळवून आमच्या आयुष्याशी एकरूप झालेलं नाव “बाबूजी”... व्यक्ती एकच, पण रूपं किती? गोवा मुक्ती संग्रामातले सशस्त्र लढ्याचे प्रमुख बाबूजी, ग्राहकपेठेचे संस्थापक सदस्य बाबूजी, “इंडिया हेरीटेज फौन्डेशन”, “सुलश्री” प्रतिष्ठानचे अध्वर्यू बाबूजी, गीतरामायणकार बाबूजी, मुक्या प्राणी पक्षांवर प्रेम करणारे, आपल्या देशवासियांवर माया करणारे बाबूजी...”वीर सावरकर”चे निर्माते, या फिल्म साठी मरणालाही थोपवणारे बाबूजी.... काय सांगू आणि काय नको असं मला झालं.






सांगायला अजून हे जन्मशताब्दी वर्षही पुरे पडणार नाही, ते माझ्या पुस्तकातून समोर येईलच...

यादरम्यान एक नवल घडलं.. माझ्या कथनादरम्यान कुठूनसं एक फुलपाखरू समोरून उडत उडत येऊन माझ्या उजव्या खांद्यावर बसलं.....माईक धरलेला माझा तो हात हलत होता, पण ते फुलपाखरू उडून गेलं नाही. त्या प्रसंगाने मी स्तिमित झाले. आश्चर्योद्गाराने सभागृह शहारलं.....यावरून आठवलं.....पु लं नी बाबूजींच्या संगीताबद्दल एका लेखात म्हटलं होत, “त्यांचे सूर गदिमांच्या शब्दावर येऊन अलगद बसतात जसे कि विहरत, गिरक्या घेत अलगद, अलवारपणे आलेलं एखादफुलपाखरु”.....हे मी श्रोत्यांना सांगताच सर्व श्रोत्यांना आत्ताच्या प्रसंगाची अद्भुत संगती उलगडली... 


या योध्या कलाकाराच्या आठवणी जागवण्यात दीड-दोन तास कसे गेले कुणालाच कळाल नाही. तपशिलाची आरास मांडून त्यातच गुंतून न पडता संगीतातील अनुभूतीची समाधी अवस्था अनुभवा असं सर्वाना आवाहन करून माझ्या विद्यार्थ्याचे, उपस्थितांचे मी आभार मानले.





 माझ्या प्रिय विद्यार्थ्यानी माझ्या योजनेला पाठिंबा देत थोडक्या वेळात प्रेक्टिस करून इतकी सुंदर गाणी अचूक, भावपूर्ण, मनोभावे सादर केली, त्याला श्रोत्यांनी एवढा उदंड प्रतिसाद दिला...मी काही प्रोफेशनल निवेदिका नाही. पण माझ्या दीर्घ अभ्यासातून मला जे बाबूजी उमगले ते इतरांना सांगण्याची सुवर्णसंधी मी घेतली.. 

आम्हा सर्वांची वेडीवाकडी सेवा श्रोत्यांनी गोड मानून घेतली, ही बाबूजींच्या नावाची किमया आहे, याची नम्र जाणीव मी प्रकट केली....त्यांच्यासाठी सर्व श्रोते जमले हे ही खरं.. याबद्दल मी ऋणी आहे असे सांगून कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांच्या आग्रहास्तव सर्वांच्या कानी गुंजत राहावे असे गीत “या सुखानो या” मी गायिले....त्या सुरांची अनुभूती मनात अजून साठून राहिली आहे. 




डॉ. भाग्यश्री ज्ञानेश मुळे,
गुरुपौर्णिमा सोहळा,
कोल्हापूर. २९ जुलै, २०१८.