Sunday, October 20, 2019

स्वरसाधनेत मग्न असलेला श्रेष्ठ गायक हरपला

पं. विजय सरदेशमुख





उत्तम जुळलेले तानपुरे. त्यातून उमटणारे असंख्य सहनाद, कंठातून झरणारे स्वर आणि त्यातून व्यक्त होणारे बंदिशीवरचे अतोनात प्रेम हे पं. विजय सरदेशमुख यांच्या गायकीचे जाणवणारे ठळक विशेष!

गुरुजी गेल्यावर त्यांच्यावर लिहावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं! पण जे कधीच वाटत नसतं ते घडतं हे आयुष्यात अनेक वेळा आपल्या अनुभवास येतं.  ‘अपनी मढी में आप मैं डोलू’ ही कुमारजी आणि स्वत: विजय सरदेशमुखही गायचे त्या ‘युग न युग न हम योगी’ या निर्गुणी भजनातली ओळ त्यांच्या व्यक्तीमत्वाला तंतोतंत लागू पडते. आपल्या गुहेत बसून स्वरसाधना करणारा हा हरफनमौला कलाकार फार लवकर काळानं ओढून नेला!
खूप आठवणी दाटून येताहेत. गेल्या 25 वर्षांच्या सहवासातून, त्यांच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या आठवणी. सुरांवरचं अलौकिक आणि अखंड प्रेम, बंदिशींवरचं प्रेम ही त्यांची खासियत! तानपुरे उत्तम जुळल्याशिवाय मैफलच काय, कधी शिकवणं देखिल सुरू करायचे नाहीत ते. तानपुरा सर्व काही बोलतो, ते ऐका हेच त्यांचं सांगणं असायचं. अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता, ज्ञान, पांडित्य हे सर्व बाजूला टाकून आपली पेशकश करणारा हा कलाकार! ही गोष्ट सोपी नाही. त्यांच्या याच गुणामुळे या गायकीतली अभिव्यक्ती फार उच्च दर्जाची आहे. कुमारांचे विचार आत्मसात करून स्वबुद्धीनं गाणं ही सोपी गोष्ट नाही. गुरूचं अनुकरण स्वाभाविक असतं, परंतु ते विजय सरदेशमुखांनी टाळलं. अर्थात गायकीवर कुमारजींचा ठसा निश्चित होता, परंतु अनुकरण नव्हतं आणि ते तसं शक्यही नाही हे कुमारांची गायकी जाणणारे जाणतातच.
 1992-93 पासून श्रोता म्हणून आणि 1996 पासून शिष्या म्हणून मी पं. विजय सरदेशमुख यांची गायकी  ऐकते आहे. त्यांची गायकी म्हणजे अत्यंत प्रेमपूर्वक (कठोर नव्हे) केलेली स्वरसाधना आहे.
त्यांचे वडील पं. विठ्ठलराव सरदेशमुख हे गायक आणि पेटीवादक आणि संगीत व संस्कृतचे उत्तम जाणकार आणि शिक्षक.  घरातूनच विजय सरदेशमुखांना संगीताचा  वारसा लाभला.




भारतरत्न पं. भीमसेनजींना वडील साथ करीत असत, त्यामुळे घरी पं. भीमसेनजी, सुरेशबाबू माने, विदुषी माणिक वर्मा, पं. कुमार गंधर्व , पं. वसंतराव देशपांडे, विदुषी सिद्धेश्‍वरी देवी अशा अनेक सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाच्या गायक मंडळींची उठबस आणि चर्चा, गायन ही नित्याची गोष्ट होती. वडील गायनाचे वर्गही घरातच घेत असत. त्यामुळे गायन, गायनाविषयी बोलणे हे विजयजी मन लावून ऐकत असत, ग्रहण करीत असत. या सगळ्याला त्यांच्या आईची, कै. माईंची आणि पत्नी विंदाची मौलिक साथ होती.
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचं वडिलांकडे गायनाचं शिक्षण सुरू झालं. त्या वेळच्या अकरावीमध्ये संगीत विषय घेऊन त्यात ते पहिले आले. बाराव्या वर्षी कुमारांना प्रथम तानपुऱ्यावर साथ केली. त्यांच्या भगिनी वासंतीताई सांगतात की विजय त्या तानपुऱ्याच्या मोठ्या भोपळमागे जेमतेम दिसत होता. तेव्हापासून त्या झंकारणार तानपुऱ्यांची आणि गायकीची ओढ त्यांना लागली. वडील किराणा घराण्याचे विचार, गायकी अनुसरत असूनही कुमारांकडे शिकायला त्यांनी काहीच हरकत घेतली नाही हा त्यांचा विशेष! विठ्ठलराव सरदेशमुख अत्यंत मोकळ्या विचारांचे होते हे गुरुजी नेहमीच सांगत. कुमारजींचे विचार, गायन, गायकी याचं मनन- चिंतन सुरू झालं. दहा- बाराव्या वर्षांपासूनच विजयजींनी रेडिओवर गायन सुरू केलं. 1964 सालापासून कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर साथ करत राहिले. तानपुऱ्यातून राग-संगीत कसं उमलत- फुलत जातं याचं जणू शिक्षणच या साथीतून मिळत गेलं.
विजय सरदेशमुखांची पहिली जाहीर मैफल झाली तीच मुळी विदुषी हिराबाई बडोदेकरांच घरी.
1970 सालापासून विजय सरदेशमुखांनी कुमारजींकडे गायन शिकायला सुरुवात केली. वर्षातून एखादेवेळेस राहून आणि बाकी वेळा जमेल तसं देवासला जाऊन उणीपुरी बावीस वर्षं ते कुमारजींकडून विद्या ग्रहण करीत राहिले. याच वेळेस कौटुंबिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यानं  बी.कॉम झाल्यावर लगेचच बँक ऑफ इंडियात नोकरी सुरू केली तीही जवळजवळ सत्तावीस वर्षं. एकीकडे नोकरी, प्रपंच सांभाळून अतिशय निष्ठेनं विद्याव्यासंग वाढवून त्यात खोलवर बुडी मारून स्वर- लयीचं  ध्यान केलंअसं म्हटलं तर विजयजींच्या बाबतीत ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मैफली, प्रसिद्धी, पुरस्कार, याची अजिबात फिकीर न करता एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणं  स्वर-साधना करत रहाणं ही आजच्या काळात सोपी गोष्ट नाही. परंतु हा कलाकार स्वर-लयीत ध्यानस्थ राहिला, त्यामुळे अर्थातच सर्वदूर प्रसिद्धी, खूप सारे पुरस्कार (वत्सलाबाई जोशी आणि वसंतराव देशपांडे हे पुरस्कार त्यांना मिळाले होते) असे यांच्या वाट्याला आले नाहीत, त्याची फिकीर त्यांना कधीच नव्हती, परंतु एखाद्या रागातील स्वरस्थान मनासारखं लागलं नाही तर मात्र हा कलाकार अस्वस्थ होत असे. एरवी मृदुभाषी, नम्र स्वभावाचे विजय सरदेशमुख मैफलीत मात्र आवश्यक तिथं अतिशय नाजूक नक्षीकाम आणि जरूर असेल तिथं अत्यंत आक्रमक आणि जोरकस, दाणेदार, गमकेच्या ताना घेऊ शकत. असंख्य पारंपारिक बंदिशी आणि कुमारांच्या बंदिशी, ख्याल, टप्पा, तराणा हे सगळेच  सारख्याच समर्थतेनं गायचे ते. कुमारांच्या आक्रमक, चपळ गायकीत स्वविचारांची वेगळी भर घालून, आपली हळुवार गायकी ते उपज अंगानं खुलवीत नेत.
सवाई गंधर्व महोत्सव- पुणे, तानसेन समारोह- ग्वाल्हेर, घराना सम्मेलन- कोल्हापूर, तोडी महोत्सव- मुंबई, प्रयाग संगीत समिती- अलाहाबाद, विष्णु दिगंबर समारोह- दिल्ली, संगीत रिसर्च अकादमी- कोलकता आणि पुणे, मुंबईपासून सर्व प्रमुख शहरांत त्यांच्या मैफली झाल्या आहेत.
विशेष म्हणजे हा विद्यासंपन्न, सत्वशील कलावंत घरी मैफलीला बोलाविलं तर बिदागीची फिकीर न करता प्रेमानं  आपलं निखळ संगीत ऐकवायचा. त्यांचं गाणं ऐकताना तुमचीही गानसमाधी लागून जायची. सुसूत्रता आणि उस्फूर्त पेशकश यांचा अनोखा संगम या गायकीत  होता. आवर्तन भरणं  म्हणजे काय हे त्यांच्याकडूनच शिकावं.
ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा हे प्रकार तर ते तयारीनं आणि ताकदीनं ऐकवायचेच. पण त्यांचं निर्गुणी भजन एक अत्यंत वेगळी अशी पारलौकिक अनुभूती देतं.
रागसंगीताचं त्यांचं ज्ञान तर अतिशय संपन्न आहेच, पण भावसंगीत, चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे देखिल ते  उत्तम रीतीनं उलगडून सांगत असत.
एक दिवशी सकाळीच माझ्या घरी आले. वाटेत ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ हे झिंजोटी रागातलं गाणं कानावर पडलं असावं. त्यातला लावलेला शुद्ध निषाद किती सुंदर लागतो  हे मला गाऊन दाखवून, या संगीतकारांची सौंदर्य दृष्टी किती मार्मिक होती हेही नमूद केलं. ‘निठुर पिया’ हे लताबाईंचं गाणं ऐकल्यावर संगीतकार जयदेवनं अहीर भैरव कसा वापरला आणि लताबाईंनीही ते किती सहजतेनं केलं हे त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं विषद केलं. एस. डी. बर्मनच्या आवाजातले स्वरलगाव गावेत तर आमच गुरुजींनीच. मी हॉस्पिटल मध्ये असताना वारंवार भेटायला यायचे. ‘सुन मेरे बंधू रे’ या गाण्यातल्या साथी मधला स्वरलगाव किती वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहे, तो कसा ऐकावा आणि शिकावा हे त्यांनी मला एकदा शिकवताना सांगितलं होतं.  मी ते गाऊन दाखवता का असं विचारल्यावर त्या हॉस्पिटलमधल्या छोट्या खोलीत या हरफनमौला कलाकारानं कोणतेही आढेवेढे न घेता इतकं सुंदर गायलं. ही आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. शिष्येकडे जाऊन इतक्या साधेपणानं गायचं, सहजतेनं बोलायचं, शिकवायचं . अशा अनेक प्रसंगांतून त्यांचं माणूसपणही मला उमगत गेलं.
संगीतातील सुंदर तत्त्वांची ओळख करून देणं, आवाज, गळा आपल्या स्वाधीन करून घेणं याची शिकवण देणं म्हणजे संगीत शिकविणं असं ते मानायचे आणि त्यानुसार विद्यादानाचं काम करत. शिकताना स्वरलयीशी थोडीही तडजोड करून चालायची नाही. यावर गुरुजी (विजय सरदेशमुख) फार बोलत नसत, पण त्यांची अस्वस्थ मुद्रा आपला स्वर तंतोतंत लागत नाही हे जाणवून देत असे. आणि शिष्याला सूचकतेचा मार अधिक लागतो. तबला हा फक्त तालवाद्य नसून तो तिसरा तानपुराच असतो त्याचं प्रात्यक्षिक मैफलीत त्यांच्या मागे साथ करताना आणि शिकताना मिळत गेलं. तानपुरा समजल्याशिवाय संगीत समजणार नाही असं ते मानत. याचं प्रत्यंतर त्यांच्या मैफलीत आणि शिकताना अर्थातच यायचं. कित्येक वेळा पाऊण एक तास तानपुरा लावण्यात जायचा आणि त्यानंतरच शिकवणं सुरू व्हायचं. परंतु हा वेचक वेळ सार्थकी लागलेला असतो यात शंकाच नाही.
मारवा, तोडी, ललत, देसी.... अशा अनेक रागांमधले सूक्ष्म स्वरभेद जाणून घ्यायचे म्हटलं तरी हा जन्म पुरणार नाही!
मला सहजी घराबाहेर पडता येत नाही हे जाणून एकदा मझाकडे माझ्या गुरुबंधूची, प्रीतम नाकीलची शिकवणी घेतली त्यांनी. ती संध्याकाळ माझ्या घरात अविस्मरणीय श्याम-कल्याण घेऊन आली.
संगीताइतकीच त्यांची तीव्र बुद्धिमत्ता सर्व प्रांतांत सारखीच चालायची. त्यांचं भाषाप्रभुत्व फार कमी लोकांना माहीतीय! संस्कृतमधली सुभाषितं, श्लोक त्यांना मुखोद्गत होते.  संस्कृतमधली कोणतीही शंका विचारली तरी तत्काळ निरसन होत असे. हस्ताक्षर अत्यंत स्पष्ट आणि सुंदर होतं. एकदा डेझर्टेशन या शब्दाचा माझ्याकडून चुकीचा उच्चार झाल्यावर म्हणाले  ‘पुन्हा सांगा, काय म्हणालात?....’ अशा कितीतरी आठवणी आहेत.
माझ्याकडे ते शेवटी गायले ते अखेरचं भजन ‘मैं जागूं, म्हारा सतगुरू जागे
आलम सारी सोवै.....’ हेच खरं!!




- डॉ. शुभदा कुलकर्णी
shubh.sangeet@gmail.com

No comments: