Tuesday, July 31, 2018

हे घडले बाबूजींमुळेच...




'बाबूजी' अशा हिंदी नावाने ओळखले जाणारे मराठी भावसंगीत क्षेत्रातील, अत्यंत लाडके आणि आदरणीय एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे 'सुधीर फडके'!

या नावाची आणि कर्तृत्वाची व्याप्ती तशी फार मोठी, हे जाणूनही त्यातले, बाबूजींसमवेतचे माझ्या आयुष्यातील काही सुंदर क्षण, अनुभव, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

 

 

वयाच्या ४थ्या- ५व्या वर्षी, ‘का रे दुरावा, का रे अबोला...’ म्हणत माझ्या गाण्याची सुरुवात झाली. बालपणापासून जे दर्जेदार सुगम संगीत ऐकत, आमची पिढी आणि अशा अनेक पिढ्या वाढलो, त्याचे गायक आणि संगीतकार म्हणून मुख्य दोन प्रवाह मला वाटतात....
ते म्हणजे मंगेशकर आणि फडके!

माझे गुरु, बाळासाहेब मंगेशकरांचे संगीत ऐकायला आणि गायला कधी क्लिष्ट, अवघड, आव्हानात्मक तरीही मनाला झपाटून, वेढून टाकणारे, भेदून जाणारे! तर बाबूजींचे संगीत ऐकायला सोपे, सहज आणि सर्वसामान्यांच्या ओठी रुळणारे ! मोहवून टाकणारे! दोन्ही मुख्य प्रवाहांनी मराठी मनावर मात्र आजतागायत गारूड केले; राज्य केले!

देहाची तिजोरी, देव देव्हाऱ्यात नाही, विठ्ठला तू वेडा कुंभार, संथ वाहते कृष्णामाई, अशी असंख्य गाणी, ज्यांना अजिबात गाता येत नाही, अशांनीही गुणगुणावी अशीच सहज, सोपी! संगीत देताना, शब्दाला कवेत घेऊन आंजारत गोंजारतच बाबूजींचे समर्पक स्वर येतात. शास्त्रीय संगीतावर आधारीत, ‘आज कुणीतरी यावेकिंवाजिवलगा कधी रे येशील तू?’ सारख्या गाण्यांमधील आलापी, ताना घेताना, शब्दांचे उच्चारण, हे स्पष्ट नि कुठेही अवास्तव, वेडेवाकडे तोडता! जसे बोलतो तसे संगीत आणि गायनही!


बाबूजी गदिमा  एकत्र येणे हा सुवर्णकांचन योग

बाबूजी आणि गदिमा यांचे एकत्र येणे हा सुवर्णकांचन योग.  त्यात गीतरामायण आणि इतर शेकडो गाणी म्हणजे मराठी साहित्य संगीतातले अद्भुत रसायन! गदिमांचे शब्द जणू त्या सुरालाच चिकटलेत, असे बाबूजींचे समर्पक संगीत होते. गदिमांच्या 'ओजस्वी' वाणीला, बाबूजींच्या 'लालित्यपूर्ण' आणि भावपूर्ण स्वरांनी दिलेली झळाळी मिळून हे संगीत अजरामर झाले! दोघांनाही शारदेचा वरदहस्त लाभला होता. अशा या बाबूजींचा मला बालपणापासून प्रत्यक्ष सहवास आणि आशीर्वाद लाभला हे मी माझे भाग्यच समजते!
एक प्रसंग आठवतो. साधारण ८२ साल असावे. नाशिकच्या 'देशदूत'च्या देवकिसनजी (भाऊ) सारडांनी, त्यांच्या वडिलांच्या, बस्तीरामजींच्या पुण्यतिथी निमित्तच्या कार्यक्रमात, एखाद्या चांगल्या कलाकाराचे नाव सुचवा, असे बाबूजींना विनवले. बाबूजींनी त्यांना त्वरित माझ्यासमोर फोनवर कळवले, " एक छोटी मुलगी आहे, जिचा आवाज लताबाईंच्या तोडीचा आहे. तिला पाहून तुम्हाला वाटणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा! " असे सांगून एके दिवशी बाबूजींनी मला, तबला वाजवणाऱ्या माझ्या धाकट्या भावाला (विनायकला), आईला आणि काही वादकांना एका मिनी टेम्पोवजा बसमध्ये घेतले आणि थेट नाशिक गाठले.

कार्यक्रमात सुरुवातीला - गाणी बाबूजी स्वतः गायले. छोट्या विनायकने त्यांना अप्रतिम साथ केली. त्याचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर बाबूजींनीच माझी ओळख करून दिली. इतक्या मोठ्या कलावंताने माझ्यासारख्या नवीन कलाकारासाठी इतक्या सहजपणे हे करावे, हे नवलच होते.... मोठी गोष्ट होती. माझ्यासारख्या चिमुकल्या पाखराच्या पंखात, पुढची झेप घेण्यास, गरूडभरारीचे बळच त्यांनी भरले होते! हे सारे रेकॉर्डिंग आजही मी जपून ठेवलंय.

कधी मी, बाबूजींचे चिरंजीव श्रीधरदादा सोबतहोऊनी मी जवळ येते राजसा तू दूर का रे’, ‘गो मजे बाय..’ सारखी कवयित्री शांताबाई शेळकेंची गाणी रेकॉर्ड करत असताना किंवा कार्यक्रमाची रिहर्सल करताना, बाबूजींच्या 'शंकर निवास' या शिवाजी पार्कच्या घरी जात असे. बाबूजींसमोर गाताना थोडेसे टेन्शन येत असे. पण तरीही बाबूजी "व्वा छान!" म्हणून येता जाता प्रोत्साहन देत.

एकदा बाबूजींनी श्रीधरदादाबरोबरच्या रिहर्सलवेळी माझ्या आईवडिलांनाही घरी यायचे निमंत्रण दिले. आईबाबांचे स्वागत झाल्यावर बाबूजींनी स्वत: त्यांच्यासाठी चहा नाश्त्याचा ट्रे आणला. हे पाहून तर आम्ही चकितच झालो. एवढा मोठा (पुरूष) कलावंत, पण घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वतः स्वागत करताना पाहून, माझे बाबाही थक्क झाले....आणि बाबूजींना म्हणाले, "बापरे, बाबूजी तुम्ही स्वतः ....?" त्यावर ते उत्तरले... "आपल्याच घरचे काम करायला काय हरकत आहे? "... छोट्या छोट्या घरगुती गोष्टीसुद्धा मला थोरामोठ्यांकडून पहायला अन् शिकायला मिळाल्या.

श्रीधरदादाची आई ललितामावशी हिचेही माझ्यावर प्रेम होते. त्या स्वतः हिंदी आणि मराठीत गाणा-या उत्तम गायिका होत्या. ही माऊली सदानकदा सर्वांवर आनंदाने आणि प्रेमभरे मायेची पखरण करीत असे. बाबूजींची स्नुषा चित्रा हिचेही प्रेम मी वर्षानुवर्षे अनुभवले. कलावंतांना या घरचा दरवाजा सदैव खुला असे. आपुलकी, माया, आणि आतिथ्य ही ह्या घरची संपत्ती होती!

एकदा बाबूजी आमच्या घरी आल्यावेळी म्हणाले, "पद्मजा, आज तू माझी नक्कल करून दाखव बरं का! तू ती फार छान करतेस, असं मी ऐकलंय!" मी पार घाबरले. पण बाबूजी हट्ट सोडेनात.... म्हणाले, "तू जोपर्यंत माझी नक्कल करत नाहीस, तोपर्यंत मी इथून हलणार नाही!" बापरे,....आता आली का पंचाईत! शेवटी मीनाचनाचूनी अति मी दमले,’ गाऊन, पायावर बाबूजींसारखी पेटी घेऊन हातवारे, मान करून, लकबीने ते कसे गातात याचे प्रात्यक्षिक केले. ही नक्कल पाहून हसत हसत खिलाडू वृत्तीने, खूश होऊन त्यांनी आनंदाने माझी पाठ थोपटली!

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या निर्मितीवेळी बाबूजींनी निधीउभारणीसाठी अनेक कार्यक्रम केले. त्यात गायला सांगून, मुद्दाम 'ज्योति कलश छलके' हे त्यांचे हिंदीतील खुद्द स्वरसम्राज्ञी लतादीदींनी गाऊन अजरामर केलेले गाणे त्यांनी मला शिकवले. 'बालमोहन विद्यामंदिर' या माझ्या शाळेतल्या सभागृहात झालेली ती रिहर्सल मला आजतागायत......आत्ताच घडल्यासारखी आठवते. त्यातील बारीक सारीक हरकती त्यांनी जशाच्या तशा, शिवाय वेगवेगळ्या नव्या सुंदर जागांसह माझ्याकडून बसवून घेतल्या होत्या. देशभक्त बाबूजींच्या स्वा. सावरकर चित्रपटाच्या या निधीउभारणीच्या कार्यक्रमात माझा चिमुकल्या खारीच्या नखाएवढा हातभार लागला, याचे श्रेय बाबूजींनाच आहे!

आज मला आठवतोय तो गोरेगांवच्या एका शाळेच्या पटांगणावरचा सावरकर चित्रपटासाठी निधी उभारणीचा कार्यक्रम! त्यावेळी बाबूजी स्वतः स्टेजवर असत. मी 'जयोस्तुते' आणि 'ज्योति कलश छलके' जस्से शिकवले तस्से गायले, याचे बाबूजींना खूप कौतुक वाटले! याच कार्यक्रमात थोर गायक मन्ना डे (मन्नादा) ही गायले; आणि नंतर मला भेटून म्हणाले, "तुम्ही फार छान गाता आणि आजच्या पिढीची सर्वोत्तम गायिका म्हणून मी तुम्हाला ओळखतो. अशाच गात रहा!" हा मला या दिग्गज गायकाने दिलेला फार मोठा आशीर्वादच वाटतो. हे ही घडले बाबूजींमुळेच!

माणसे जोडणे, लोकसंग्रह करणे, हा बाबूजींचा सहज स्वभाव होता. त्यांच्या संगीतामुळे आणि लाघवी स्वभावामुळे माणसे त्यांच्याकडे प्रेमाने ओढली जात. भारावून जात. अशी अनेक मंडळी देशापरदेशात त्यांचे भक्त आहेत. बाबूजी आणि श्रीधरदादाच्या या पुंजीमुळे मीही, बाबूजींच्या या भक्तांच्या संपर्कात आले, आणि बाबूजींबद्दलचे त्यांचे अतूट नाते अनुभवायला मिळाले.

१९८४ सालचा कॅनडामधील टोरांटो येथील माझा नि श्रीधरदादांचा कार्यक्रम मला आज आठवतोय. सुरुवातीला मी थोडे शास्त्रीय गायन सादर केले. त्यानंतर दादांनीही त्यांची गाणी म्हटली. मग आम्ही 'धुंदी कळ्यांना, गो मजे बाय..' अशी द्वंद्वगीते गायलो. कार्यक्रम रंगत चालला होता. उत्तरार्धात बाबूजींच्या गाण्यांच्या जोरदार फर्माइशी सुरू झाल्या. 'काल मी रघुनंदन पाहिले', यास खूप कडाडून टाळ्या मिळाल्या. आणि शेवटी 'भैरवी गा' अशी फर्माईश आल्यावर, मी 'सांग तू माझा होशील का?' हे गाणे गायला सुरुवात केली. तेंव्हा माझे वय कोवळे उन्हाचे होते. मी डोळे मिटून गात होते.... अन् गमतीची गोष्ट अशी की,...गाणे संपून डोळे उघडल्यावर प्रेक्षकांमधले अनेकजण गाण्यातल्या 'सांग तू माझा होशील का?' या प्रश्नाला... 'हो' 'हो' असे मान हलवून दाद देत होते! बाबूजी आणि गदिमांचे आशयघन शब्दसूर रसिकांच्या हृदयापर्यंत कसे थेट पोहोचत, याचे हे सुंदर आणि गमतीदार उदाहरण होते.

 बाबूजींना लता मंगेशकर अॅवॉर्ड २००१ साली जाहीर झाले, त्या आनंदाप्रित्यर्थ मी बाबूजींच्या घरी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वंदन केले. ( जुलै २००१) बाबूजी म्हणाले, "पद्मजा तू आलीस, मला फार आनंद वाटतोय. योगायोगाने आज गुरुपौर्णिमा आहे. या निमित्ताने, मी तुला आशीर्वाद देतो की, 'संगीत इतिहासाच्या' पानापानावर सुवर्णाक्षरात तुझे नाव नोंदवले जाईल. तुझी लायकी आहेच. तू फार मोठी कलाकार आहेस आणि तेवढीच विनम्र आहेस, हा तुझ्यातला फार मोठा गुण आहे. "

बाबूजींचा हा आशीर्वाद आणि अपेक्षा, मी कायमच्या काळजात कोरून प्रामाणिकपणे, त्या परमेश्वरापाशी "आकाशी झेप घे रे पाखरा".... असा प्रयत्न करीत आहे..









-‘पद्मश्रीपद्मजा फेणाणी जोगळेकर









(त्यांच्याच संमतीनुसार हा लेख इथे देत आहे. )



No comments: