Saturday, September 3, 2011

यांना शांततेचे महत्व कधी कळणार..


गायक आपले गाणे खुलवित होता. उपस्थित वर्ग त्याच्या त्या शास्त्रीय गाण्यात तल्लीन होऊन माना डोलावित होता. अस्वादकाचे विविध अनुभव घेत मीही मधुनच त्यांच्या चिजेच्या समेवर तालात सम पकडण्याचा प्रयत्न माझ्या देहबोलीतून करीत होतो. एकूणच एक गायक स्वरांची विविध आंदोलने विविध अंगाने नटवित होता. स्वरांचे आविष्कार किती पध्दतीने होऊ शकतात.. दाद देणारा जाणकार तारीफ करून वाहवाची पसंती अगदी खुल्या मनाने देत तल्लीन होऊन स्वरांचा आस्वाद घेत होता.
किती विलोभनिय गोष्ट. इथे शांतता भंग करणारा एक आणि त्याला तालाची आणि स्वरांची संगत करणारा पेटीवादक बस्स..एवढेच..बाकी सारा वर्ग ते सारे निशःब्दपणे साठवून ठेवीत....
भारतीय परंपरेचा हा थाट..भारतीय संस्कृतीतही आहे. मग गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक ठिकाणी....केवळ प्रकाशात शांतपणे विराजमान झालेली गणेशमूर्ती तुम्हालाही आकर्षित करते ना...
गोंगाटाच्या आणि स्पीकरच्या भिंतीतून ह्दय भेदून टाकणारा आवाज तुमच्या कानी ठसत जातो.. तेव्हा कुठेतरी असा मनोहारी आणि नयनमनोहर मंडळाच्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे तुम्ही कौतूक कराल ना...मला खात्री आहे..तुम्हालाही ते आवडते....
पण.... हा पण भारी खट्याळ...कधी मध्ये येईल काही सांगता येत नाही...
आज आपण सारेजण या गोंगाटाच्या अधिन झाले आहोत. नव्हे...तो सहन केल्याशिवाय पर्याय नाही... तोंड बाधून बुक्क्यांचा मारच जणू.

म्हणून अशा शांत..निवांत आणि तरीही प्रसन्न अशा गणपती मंडळांची माहिती करून द्यायला मला आवडेल.
आजच पुण्याच्या टिळक रस्त्य़ावरच्या सदाशिवपेठेचा भाग असलेल्या चिमणबाग गणेशोत्सव मंडळात डोकावले. इथली मूर्ती..शोभिवंत. प्रकाश..मूर्तीला उठाव आणेल एवढा.. मंडपात मूर्ती..एक कार्यकर्ता आणि तिचे सुंदर रूप..
कुठे स्पीकरवर गाणी नाहीत की, कुठलाही संदेश देणारी सजावट नाही. इथे आवाज येतो..आणि स्पीकर तोंड उघडतो तो फक्त आरतीच्यावेळी..
बाकी सारी प्रसन्न तरीही भारून राहिलेली शांतता. वर्गणी मागतानाही कुणी कितीही देवो..ती स्विकारली जाते. हुज्जत घातली जात नाही. सारा खर्च तेवढ्याच वर्गणीतून होतो...
तुम्हालाही असे मंडळ दिसले..तर मला मेल करा.. जमेल तर माहिती कळवा..शांततेतही सुख आणि मन रमते..फुलते आणि क्वचित नादावतेही...


सुभाष इनामदार,पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com



Thursday, September 1, 2011

मंगल दिन आयो



श्री गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मनातले नाना संकल्प पूर्ण होतील याची खात्री वाटते. मंगलमय वातावरणात नव्या विषयांची गुंजी घालणे सुरू आहे.
आपले ते धन
विचाराने फळा यावे
धरूनिया सिध्द व्हावे
विचारांती....
प्रेरणेला कर्तव्याची जोड मिळाली आणि त्याची सिध्दी झाली तरच या गोष्टी पूर्णाशांने अंतिम टप्पा गाठणार आहेत.
गणपती..बुध्दीची देवता..
आपली शक्ति तीही नवे विचार कागदावर उमटवून ते शक्य तेवढ्या त्वरीत कार्यवाहित आणणे...
ठेविले अनंते..न राहता... काहीतरी नवे करण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारे चिंतन करायला..आजचा दिवस..नव्हे तसा प्रत्येक दिवस चांगला आहे.

दूरवरचा उगवतीचा प्रकाश अंधुकसा का होईना.. तुम्ही उघड्या डोळ्यानी पाहू शकत असलात तरच उद्याचा हा नवा प्रकाश तुम्हाला नवी द्ष्टी नक्की प्राप्त करून देईल. यावर माझी श्रध्दा आहे.
क्षितीजाच्या पलिकडे ...
पाहतो तिथे ..
क्षितीजाकडे
अंधुकसा प्रकाश
भास होई..
नकळे केव्हा
भासतूनी आस
राहून विश्वास
आस मनीची
पूरी होई...
करू किती चिंता
भजतो आता
तुही अंती
तुझे रूप अनंत
तुझे चित्त शुध्द
राखोनी अनेकांची
दारी येई..
असा भास नव्हे आभासाचे..सत्त्यात रूपांतर व्हावे..आसक्तीसाठीचा उल्हसितपणा देही फुलावा.. आसंमतात भारून राहिलेला..विविधतेते नटलेला...एकवटूनी यावा..अशी प्रार्थना करून ..नवी प्रेरणादायी चिंतन करतानाचा हाच ते क्षण...
चित्तवृत्ती भारून टाकते
विचारचक्राला दिशा येते
भासमयतेचा पडदा दूर होतो
अवकाशातल्या आसमंतात.. विरून गेलेली शांतता.. बाजूने कितीही ढोल-ताशांचा गजर होत असला तरी माझी विचार दालने कुठल्याही बाधेला न जुमानता आपली दिशा ठरविण्यासाठी आता सिध्द होत आहेत...
पाहूया यातून काय साध्य होते आणि काय सिध्द होते ते........



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com


Monday, August 29, 2011

थोडी धास्ती थोडी खंत

काळाबरोबर धावताना पावले अजून डगमगतात. जरी आता नसली चणचण तरी कमावत्या त्या आपल्या माणसांकडून आर्थक लाभ करून घेताना खंत वाटते. गेली ३२ वर्ष नोकरी करूनही आता मी पूर्ण समाधानी नाही. खरं तर माझी कुवत कोणती. मला नेमके काय येते. याची ओळख करून घेताच मला चाकरीत घेतले गेले. मात्र एक नक्की झाले. माझी आवड मला जोपासता आली. चांगली व्यसने वाढविण्यास त्यामुळे मदत मिळाली.
आज मी छंद जपतो आहे. घरातल्यांविरूध्द जावून माझी म्हणून जी आवडीची ठिकाणे आहेत..तिथे रमत जात आहे. कधी यातून थोडी कमाई हाती येत आहे. पण खरचं आता मला दिशा ठरविण्याची गरज दिसते आहे.
भरकटत जातानाही भान जागेवर राहिल. घरापेक्षा मी मला सतत कार्यरत ठेवण्यासाठी काही ठोस काम रोज करायची गरज जाणवते आहे.
विचार सुरू आहे. भानावर आहे. मला दिशा निवडणा-या मंडळी-मित्रांकडून पुन्हा चाचपणी करावी लागणार आहे. अनेक आश्वासने मिळत आहेत. ती त्या त्या वेळी पार केली जाताहेत. पण त्यातले सापडणे हे तात्पुरते आहे. दिशा नक्की करायला हवी. विचार पक्का करायला हवा.


subhash inamdar
9552596276