Saturday, May 24, 2025

नाते संबंध अनुभवताना अस्वस्थ करणारे

नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तीन सशक्त अभिनेत्री असलेल्या तीन शक्तींनी असेन मी..नाटक अतिशय परिणामकारक सिद्ध करून हा अनुभव दिला.. 


आई..मावशी आणि मुलगी..या तीन महिलांच्या आयुष्यातील नाते संबंध अनुभवताना अस्वस्थ करणारी


मराठी रंगभूमीवरील एक कलाकृती अनुभवली..आणि  आम्ही बरेच दिवसानंतर आयुष्याकडे अधिक गंभीर बनून गेलो.. नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तीन सशक्त अभिनेत्री असलेल्या तीन शक्तींनी नाटक अतिशय परिणामकारक सिद्ध करून हा अनुभव दिला.. आणि त्या नाटकाविषयी विचार करतच नाट्यगृहाबाहेर आलो..

संदेश कुलकर्णी यांनी लिहलेले नाटक .. असेन मी..नसेन मी.. व्यावसायिक रंगभूमीवर झालेल्या स्पर्धेत नाटकाने आठ पुरस्कार मिळवले आहे.. उत्तम दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य..आणि तिन्ही कलाकारांना गौरविण्यात आले आहे..हे नाटक आम्ही पाहिले याचा पुण्यात अभिमान वाटतो.


स्त्रियांच्या तीन पिढ्या..त्यांच्या आयुष्यात तुम्हाला घेऊन जातात.. त्यांचे आयुष्य..त्यातल्या घटना सांगून.. स्त्रीत्वाचे..आणि माणसांचे अनेक नमुने एकाच जागी बसून तुम्हाला जगभर फिरवून आणतात..

सुखवस्तू कुटुंबातील तीन पिढ्यांचे आयुष्य उलगडून सांगताना आधुनिक जीवनातील विविध नात्यांना उलगडून सांगत.. दुःखे पेलण्याची ताकदही या नाटकाने.. आहेरे..आणि नाहीरे यांच्या दृष्टीने मांडली आहेत.

केवळ शब्दातून स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या गंभीर पण अनेक विषयांना मनात घर करून देणाऱ्या इथे घडवून तुम्ही त्यांच्या आयुष्यात डोकावता आणि गंभीर होत जाता..

आई...आणि ताई.. नीना कुलकर्णी..मावशी वर्षा..आणि    शुभांगी गोखले आणि गौरी.. ही मुलगी.. अमृता सुभाष..

आईला आता विस्मरण होत असते..

तिला सोडियमची टेस्ट करण्याची मावशी म्हणजे वर्षा गौरीला सांगते..

तिघांच्या आयुष्यात ..एकीचा नवरा.. दारूच्या आहारी जाऊन गेला..तर दुसरी वर्षा आजाराने सतत व्हील चेअरवर..त्यांचा नवरा भोळसट..पण वर्षा बडबडी..मनमोकळी.. गौरी. कर्तृत्ववान ..करारी.. प्रेम विवाह झालाय पण दोघांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतलाय..


आई.. सतत पोट साफ होत नसल्याची तक्रार असणारी.. त्यामुळे आपल्याला हवी ती औषधे घेऊन .. सतत अपसेट असणारी..पतीला जगायचे होते..पण सर्वांच्या सांगण्यानुसार त्यांना जगाचा निरोप घेण्यासाठी कृत्रिम श्वास बंद करून जगाचा निरोप घेण्यासाठी उद्युक्त केले..म्हणून ते सतत भासमय दिसत असतात..म्हणून घाबरणारी

आई..

त्यातून विस्मरणाचा आजार बळावत चाललेला..

मुलीच्या.. जावयाच्या..संसारात होत असणारे बदल..आणि मुलगा रोहन यांच्याविषयी असलेले ममत्व.. त्यातून मुलगी मोठी..ताई म्हणून. तिला मिळालेले मोठेपण.. त्यातून खान भाऊ आणि मोठी बहीण यांच्यातील तणाव..

आई आणि मावशी यांचे केवळ फोनवरील संभाषणातून  तयार झालेले  नाते..त्यांचे एकमेकींशी असलेले भावबंध..

मावशीचा अचानक झालेला मृत्यू..

गौरीचे आईविषयी प्रेम.. त्याचे आईला वाटणारे आपल्यावर पाळत ठेवल्यासारखे वाटणे.. आणि त्यातच मदतनीस होऊन घरात आलेली सुनंदा ताई..आईसाठी कायम लक्ष देणारी कामाची आवश्यकता असणारी ही घरच्या परिस्थितीवर मात करून हसत खेळत असलेली..ही सुनंदा..


बालपणीचा काळ सुखाचा ..म्हणून ते दिवस आठवत होणारे बहिणींचे फोनवरचे संभाषण..आणि तू गेल्यावर तिच्या इच्छेनुसार तपासण्या करणारी आई..

मुलीने कितीही केले तरी मुलाच्या सगळ्या गोष्टी मानणारी आई..

आजकाल एकाकी होत जाणारी नवी पिढी..आणि मुले परदेशात..स्त्रियांचे एकटे रहाणे.. सतत काहीतरी होत असल्याचा दावा असणारी माणसे..

सगळे असले तरी विसरभोळे पणाचा आजार वाढणारी घरे..वाढत असलेला नात्यांतील दुरावा.. आता सगळे आपल्याला एकट्याला भोगावे लागणार असल्याची खंत..किती किती गोष्टी..असेन मी..मधून उलगडत जातात..


प्रेक्षकांना गंभीर बनवितात.. नवीन काळाच्या दिसणाऱ्या गोष्टी संदेश कुलकर्णी यांच्या नाटकातून मनावर गोंदवल्या जातात..

भावनाविश्व दाखविणारे प्रसंग..त्यासाठी आजची भाषा.. आयुष्यातली कृतिमता..सारेच यात आहे..

आणि गोष्ट सांगताना नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांनी रंगमंचावर साकारलेल्या भूमिका.. सारेच जागरूकतेने ..लक्षपूर्वक ऐकले जाते..पाहिले जाते..

अतिशय सुंदर अश्या भूमिका पहाण्याची संधी ही नाटक देते.. गंभीर असणारे नाटक सुनंदाच्या प्रवेशामुळे थोडीतरी निवांत करते..शुभांगी गोखले यांच्या दोन भिन्न प्रकृतीच्या भूमिका अधिक ठळकपणे लक्षात राहतात..

काळाचा बदल..आणि त्याला सामोरे जाताना होणारे बहिणींचे फोनवरचे संभाषण..सारेच मनात लक्षात राहते..

तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या भूमिका मनस्वीपणे 

साकारल्या आहेत.. वास्तव राहून..त्यांची सहज होत असलेला वावर..हेच तर नाटकाचे देखणेपण आहे.. अभिनय नव्हेच तो आहे उत्तम भास..

वाचिक..शारीरिक आणि अंगीक अभिनयाचा आदर्श वाटावा अशा भूमिका...सारेच ..!


दिग्दर्शनात असणारे बारकावे..नेमके दाखविता येत नाहीत..त्यासाठी नाटकच अनुभवावे लागेल.. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य , प्रकाश..साकेत कानिटकर यांचे संगीत.. श्वेता बापट यांची वेशभूषा.. साऱ्यांमुळे नाटक ठसठशीत समोर येते.


आजच्या स्त्रियांचे मानसिक आरोग्य ..त्यांची आतून होणारी कुचंबणा संदेश कुलकर्णी यांच्या नाटकातून अधिक गडद होत मनात घर करून राहते..

अमृता सुभाष यांचे मनापासून अभिनंदन..

असा गंभीर विषय धाडसाने मांडण्याचे साहस त्यांनी केले..मंचावर आणले आणि एक संदेश दिला आहे..अमृता आणि संदेश तुमचे कौतुक..


#असेनमी #amrutasubhash #sandeshkulkarni #नवेनाटक


_ सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Wednesday, May 21, 2025

संपूर्ण दीपरामायण हा कलियुगातील एक चमत्कारच .. डॉ. सदानंद मोरे



संपूर्ण दीपरामायण लिहिणे हा कलियुगातील एक चमत्कारच म्हणावा इतकी महत्वाची घटना मानावी लागेल..इतका निरागस व्यक्तीमत्व लाभलेला माणूस पुराणकाळातील वाटावे असे महाकाव्य लिहिल असे वाटत नव्हते...या इति कर्तव्याची पूर्ती होण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे वाटते. असे ग्रंथ आजकाल कुणी प्रकाशित करणारा नाही..ते सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले हाही एक चमत्कार असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त करून या ओवीबद्ध ग्रंथाची महती स्पष्ट केली.
संगणकाच्या १ लाख ६३ हजार ५०३ शब्दांचा उपयोग करून आणि १०, २२६ ओव्या रचून ४२६ पृष्ठांचे स्वालिखित संपूर्ण दीप रामायण १० मार्च २०२३ रोजी दीपक करंदीकर यांनी पूर्ण केलेला हा ग्रंथ सकाळ
प्रकाशनाच्या वतीने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढाकाराने २० एप्रिल २५ रोजी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि आनंद माडगूळकर आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रकाशित झाला.. यावेळी डॉ. मोरे बोलत होते.



महिपती सारख्या काळात जाऊन त्यांनी ते ओवीबद्ध स्वरूपात लिहिले हे आणखी एक या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. लुप्तप्राय होत असलेल्या प्राचीन छंदामध्ये दीपक करंदीकर यांनी हा ग्रंथ लिहिला ही आजच्या साहित्य इतिहासातील मोठी अभिमानाची गोष्ट आहे..असेही मत डॉ. मोरे यांनी यावेळी अधोरेखित केली.
दीपक करंदीकर यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास केल्याचे या पुस्तकातील ओव्या वाचताना जाणवते..रामायणातील उपकथानके त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे ओव्यांमधून कथन केली आहेत..प्राथमिक शिक्षण घेतलेल्या माणसाला अतिशय सोपी वाटावी अशी भाषा वापरून त्यांनी अतिशय व्यासंगी असा ग्रंथ लिहिला असल्याचे गदिमा पुत्र आनंद माडगूळकर सांगतात. हे त्यांच्या हातून घडले हे गेल्या जन्मीचे
पुण्यच म्हणावे लागेल.



अनेक घरात या ग्रंथांची नियमित पारायणे होऊन हा ग्रंथ सिद्ध होईल याची माडगूळकर यांना खात्री वाटते.



दीपक करंदीकर यांच्या उत्तम गझल रचनांना उल्लेख करून प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांचा हा प्रतिभावंत म्हणून झालेला प्रवास म्हणजे गझले कडून महाकाव्याकडे झालेला प्रतिभेचा प्रवास महत्वाचा असल्याचे ते आवर्जून सांगतात.
श्रीरामाचे आपल्या समाजात किती महत्व आहे यांचे वर्णन करून जोशी यांनी आपल्या सांस्कृतिक संचिताचे नवसर्जन करन करून अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण करणे यासाठी सुद्धा एका प्रकारची प्रतिभा लागते..ती दीपक करंदीकर यांच्याकडे होती. जशी गदिमा यांनी चित्रपट गीते.. सांगीतिका यापद्धतीने ते गीतरामायणा पर्यंत येऊन पोचले तसा दीपक करंदीकर यांचा प्रवास देखील कविता, गझल, गद्यलेखन ते दीप रामायण असा प्रवास झाल्याचे मिलिंद जोशी सांगतात. भाषेचे सौंदर्य, कल्पनेचे वैभव आणि उदात्त विचार या तीन गोष्टी एकत्र आल्या तर त्याच्या रसायनातून किती उत्तम कलाकृती निर्माण होते याचे दीप रामायण हे उदाहरण असल्याचे मत जोशी मांडतात.



यावेळी साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्ष
सुनीताराजे पवार आणि आमदार हेमंत रासने यांनीही करंदीकर यांच्या विषयी आपले विचार बोलून दाखविले..
कविवर्य सुरेश भट यांचे शिष्य दीपक करंदीकर यांनी रामायणातील कथानकावरून ओवीबद्ध रचलेले दीपरामायण या महाकाव्याचे प्रकाशन ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंगळवारी मसापच्या सभागृहात करण्यात आले.
दीपक करंदीकर यांच्या निधनानंतर सुमारे वर्षभराने ह्या महाकाव्याचे प्रकाशन सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द केले गेले. कार्यक्रमात मसापचा मोठा वाटा होता. प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष होते मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून आनंद माडगुळकर उपस्थित होते. कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने कार्यक्रमासाठी खास हजर होते. तसेच मसापच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अमृता देसरडा.. यांनी सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रास्ताविक केले.
सकाळ प्रकाशनाचे..आशुतोष रामगिर,
दीपक करंदीकर यांचे कुटुंबीय आणि करंदीकर प्रेमी..आणि साहित्यिक प्रेमी हजर होते..



मृणालिनी कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले तर कुमार करंदीकर आणि विनिता दात्ये यांनी आरंभी दीप रामायणातील काही ओव्यांचे सादरीकरण केले.








- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Monday, May 19, 2025

आयुष्य उसवताना...!



अगदी बालपणापासून पहातो आहे..तिचे आयुष्य.. लक्षात रहात नाही..म्हणून मार खाणे.. शाळेत जाणे ..एक केवळ उपचार..
कारण मेंदूची वाढ पुरती झाली नाही..असा आई वडिलांचा समज..
मग ही काहीच उपयोगी ठरण्यासाठी योग्य नसल्याची सतत जाणीव..मग त्याचा परिणाम म्हणून तिच्यावर होत असलेले मानसिक छळ ..शारीरिक अत्याचार.. पण त्या जीवाची वेदना कुणीच लक्षात घेतली नाही..
वडिलांनी आपल्या मुलीला ओळखले ..तिच्यात मुळातच हुशारी नाही.. तिला कळत नाही..म्हणून समजून सांगण्यासारखे प्रयत्न करत होते..पण आईचा हट्ट..तिने किमान लिहायला वाचायला शिकावे.. किमान तिला आकडे..समजावे..यासाठी अगदी टोकाचे केलेले प्रयत्न..सारे डोळ्यासमोर येते.. पण तिच्यात काही सुधारणा होत नाही..हे दिसत होते..
आईची अपेक्षा किमान तिला अक्षर ओळख मिळावी..स्वतःचे नाव लिहिता यावे..आपली स्वाक्षरी करता यावी.. जगात साक्षर होऊन..आपले आयुष्य स्वाभिमानाने जगता यावे..
मेंदूवर जास्त ताण आला तर फिट येते..म्हणून पुढे पुढे..सारे केलेले प्रयत्न परतून माघारी घेतले गेले..
शाळेतून नावच काढून टाकले..अखेरीस ती निरक्षर राहिली...पण आयुष्याच्या एकाकी लढतीत तीच खरी साक्षर असल्यासारखे वाटे..
माझ्यापेक्षा मोठी असलेल्या या बहिणीला घर कामात मदत करण्यासाठी आई अनेक कामात मदतीला घेऊ लागे..पण त्यातही ती कमी पडे..
वडिलांची पिठाची गिरणी होती..हळूहळू तीही उत्पन्न देत नव्हती.. धान्य दळण्यास कमी ग्राहक येऊ लागले..मग आईनेच ..ती जिथे पोळी करण्याचे काम घेतले ..त्या परांजपे वाड्यात तिने अनेकांना सांगून बहिणीवर त्यांच्या घरचे
दळण गिरणीतून नेणे आणि त्यांच्या घरी पोचविण्याचे काम बहिणीवर सोपवले..
त्यात वेळ जाई आणि चार पैसे वडिलांना मिळतील.
कधीतरी वडील आमच्या मूळ गावी जाऊन येथील चिंचेच्या झाडाच्या चिंचा उतरवून त्याची पोती घरी आणत.. मग चिंचा फोडून त्यातले चिंचुके काढण्याचे कामी बहिणीला मदतीला घेत.. अर्थात हे काम आम्ही सर्वच जण करत असू..
वय वाढले तशी तिची चिंता वाढत गेली..त्यातूनच तिचा विवाह करावा हा विचार केला गेला..निदान त्यामुळे तिच्या वागण्यात फरक होईल ही आशा होती..
एकदाचे कराड येथील स्थळ पाहिले..लग्न नक्की झाले.. कराड जवळ पाली गावी लग्नाचा घाट घातला गेला..
पण पाली मध्ये लग्नाच्या आदल्या रात्रीचं वास्तव समोर आलं..वडिलांना अचानक भीती वाटू लागली..आम्ही घाबरलो..पण वेळ हेच औषध..
दुसऱ्या दिवशी लग्न विधी पार पडला..
पण पंधरा दिवसातच तिचे तिथे नांदणे कठीण झाले.. तिला मारहाण होऊ लागली..अखेर वडील तिला सातारला घरी घेऊन आले..
तेंव्हा ती एक आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याची जाणीव आई वडिलांना झाली..
मोठी बहीण..आईही तिला धसमुसळे करून सारखे डिवचत राहिले..
बहीण काहीच व्यक्त होत नसे.. ढिम्म
बसत असे.. तिच्या नजरेत थोडा तिरळेपणा दिसत होता..
आता हिचे कसे होणार..हा प्रश्न सतावत होता..तीही .. मोले घातले रडाया..सारखे बोलणी खाऊन तीही कोडग्यासारखे वागत होती.
सारे होऊनही तिच्यात फार फरक पडत नसे..
खरेच त्यावेळी तिला काय वाटत असेल..आपण फक्त कामासाठी आहोत.. आपल्या आयुष्यात पुढे काय असेल..अंधार..किती दुःख सहन करत असेल ती जीव..आता त्या घटनांची आठवण झाली की मनात चीर पडते..
सतत सगळ्या घराला वाटे हिचे पुढे कसे होणार..!
पण खरे सांगू .. प्रत्येकाचा मार्ग त्याने आखून दिलेला असतो..आपण फक्त पुढे सरकत रहायचे..हेच खरे..!
माझे शालेय शिक्षण होत राहिले..मोठ्या बहिणीचे
शिक्षण..नोकरी..मग लग्न..सारे झाले..मग या माझ्या पाठी ..आणि माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीचे आयुष्य केवळ आणि केवळ कष्ट ..यातून तिची कशी सुटका होणार...
पण वेळ यावी लागते..तशी ती आली..
मी पुण्यात नोकरीसाठी सातारा सोडून ..खरे म्हणजे आई वडील..आणि ती बहीण ..यांना त्यांच्या त्याच त्याच आयुष्यात सोडून माझे करियर घडविण्यासाठी पुण्यात तरुण भारत... या दैनिकात रुजू झालो..आणि..
मला पुण्यातील महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची माहिती झाली..निराधार स्त्रीयांना तिथे आश्रय मिळतो..असे कळले..मी प्रयत्न केला..






आई वडील बहिणीला घेऊन स्वारगेट जवळील एका नातेवाईकाकडे उतरले..
आम्ही तिघेही हिंगण्यात गेलो..तिथे असणाऱ्या त्यावेळच्या वस्तीगृहाच्या प्रमुख देशमुख बाईंशी बोललो..त्यांना अर्ज दिला..
बहिणाबाबत सारे काही सांगितले..आई .. विशेषतः वडील अगदीच डोळ्यात पाणी आणून आमच्या मुलीला तुमच्या संस्थेत दाखल करून घ्या ..! अशी वारंवार विनवणी करत होते..
तो प्रसंग मला आजही आठवतो..आणि मन गलबलते..!
जिथे आम्ही उतरलो होतो..तिथला फोन नंबर दिला होता..संस्थेतून फोनची आतुरतेने वाट पहात होतो..तीन दिवसांच्या नंतर बहिणीला संस्थेने प्रवेश दिल्याचे सांगितले.. साऱ्यांचे.. विशेषतः वडिलांचे चित्त शांत झाले..आता त्यांना हिचे आयुष्य काहीना काही रांगेला लागेल असे वाटले..
ती दिवस आठवतो..आम्ही सारे तिला घेऊन संस्थेत गेलो..आमची ही मुलगी.. तिला बुद्धी कमी आहे. पण ती प्रामाणिक आहे..जे सांगाल ते काम करेल..कष्टाला मागे पुढे पाहणार नाही..तुम्ही कुठलेही काम द्या..ती करेल..अशी विनवणी करत होतो..संस्थेत ती दाखल झाली..तिला संस्थेच्या भल्या मोठ्या स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून रुजू करून घेतले..आणि चक्क महिना ५० रुपये पगारही सुरू झाला.. तिचे आयुष्य मार्गी लागल्याचे समाधान आई वडिलांना लाभले..त्यांचे मन आतून सुखावले..शांत झाले.. त्यातही मी पुण्यात होतो..मधून मधून जात होतो..आई वडीलही सातारवरून येऊन तिला भेटत होते..




जे पडेल ते काम करत बहीण संस्थेत रुळत होती..
राहणे..भोजन..शिवाय..कपडे..चादर..सारे काही मिळत होते..बरेच दिवस तिला संस्थेच्या स्वयंपाक घरातील महिला वर्ग आवडू लागला..तिने नाव कमावले..मी काय करतो पेक्षा मीनाचा भाऊ म्हणून मलाही तिथे आदर मिळत गेला..तिने मेहनत केली..कधी...कधी तिला वाईट वाटत असे..पण काय करणार..हेच आपले आयुष्य आहे..हेच आपले जग हे तिनेही मान्य केले..
तिच्या प्रेमळ स्वभावाने तिने तिथले सहकारी आपलेसे केले..स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ती आता अधिक प्रगल्भ झाली..
व्यवस्थापकापासून ते खोलीतील सहकारी मैत्रीणी पर्यंत तिने आपली माया पसरून ठेवली होती.. मिनाचा भाऊ म्हणून मला भाऊबीज..राखी पौर्णिमेला..तिथे मान मिळत होता..तिथल्या महिला..मुली..मलाही भाऊबीजेचे ओवाळत होत्या..मीही भाऊबीज देत होतो..संस्थेच्या भाऊबीज फंडात भर घालत होतो..



दिवाळी..आणि मे महिन्यात तिला सुट्टी मिळे.. घरी कधी कधी तिला त्या वातावरणाचे किती वाईट वाटते याची जाणीव करून देत असेल..नको जायला तिथे..मी तुझ्या घरी राहते..असे म्हणत असे..पण तिच्या पुढील वाटचालीसाठी तिथे रहाणे किती योग्य आहे ते मी तिला सर्वापरी समजावून सांगत होतो.. आणि सुट्टी संपली की तिला परत संस्थेत त्याच त्या वातावरणात सोडत असे..
अखेरपर्यंत तिचा तिथला वावर फारच उत्तम होता..तिचे आयुष्य तिने मेहनत करून घडविले..आईची..आणि वडिलांची माया आणि तिचे तिथले कष्ट सारे आजही डोळ्यासमोर दिसते..
मन भरून येते.. कालवाकालव होते..
बहीण ..संस्थेच्या सुरक्षित भिंतीच्या एका खोलीत आयुष्य काढत होती..पण तिच्यासारख्या अनेक मुली..महिला मला संस्थेत दिसत होत्या.. ज्यांचे कुणी नाही. त्यांचा इथे देव आहे.. आण्णा कर्वे यांनी किती मोलाचे काम करून ठेवले आहे याची प्रचिती तिथे गेल्यानंतर वारंवार दिसत होती..
या माझ्या बहिणीचे अण्णांवर जिवापाड प्रेम होते..रोज सकाळी तू त्यांच्या समाधीपाशी जाऊन त्यांना नमस्कार करीत असे..हा तिचा जणू रोजचा नित्यक्रमच झाला होता..



संस्थेत तिने ३१ वर्ष इमान इतबारे नोकरी केली.. स्वतः चे मन तिथेच घातले..फारशी तक्रार न करता..एकटीने आयुष्य घालविले..स्वतः ला सिद्ध केले..
काम करायची ती पण त्या मानाने खाण्याकडे दुर्लक्ष केले.. चांगले चुंगले खाण्याचा सल्ला दिला..आणूनही दिले..पण त्यांची आवड नाही..आमटी पोळी..आणि तोंडी लावायला भाजी.. केळ सोडून दुसरी फळे खाल्ली नाहीत.. पोटाला चिमटा घेऊन..राहून स्वतःची आबाळ करून घेतली.. मग खाणे कमी केले..
पुढे दाताच्या समस्या वाढल्या..
निवृत्त झाल्यावर तिथेच वृद्धाश्रमात राहण्याचे मान्य केले.. रेडिओ वरील गाणी ऐकणे जास्त आवडायचे तिला..
संगीताचे कान होते.. जुनी मराठी गाणी तिला प्रिय होती.. कधी कधी गुणगुणत असे..तिथे वृद्धाश्रमात झालेल्या समारंभात ती गाणी म्हणती असे.




अगदी हट्टाने दूध घ्यायला लावले..चहा आवडायचा..पण खाण्याची सवय कमी असल्याने आणि चावायला न येता असल्याने तिने स्वतः ला शिक्षा केल्याप्रमाणे खाणे कमी केले.
आई वडिलांचे छत्र हरवले..माझ्यावर फार प्रेम आणि विश्वास.. माझ्या घरात तिला समाधान मिळत असे.. मुलांवर.. नातीवर जीव होता.. तेही तिला जपत.. आपली आत्या त्यांनाही आवडे..
तिचे निरागस हसणे घर प्राण करून जाई..



खरे तर तिने मेहनत केली.. तिला मिळणारा पगार आणि बोनस..वेगळा ठेऊन ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होती.. भाऊबीज आणि राखी पौर्णिमा तिचे आवडीचे सण.. आत दुःख असूनही वरून चेहऱ्यावर समाधानी दिसणारी ही बहीण..माझ्या मनात कायम राहिली..
तिला कधी भौतिक सुख कधीच मिळाले नाही..माझ्या संसारात ती आनंद शोधत होती..तिच्या वहिनीवर म्हणजे माझ्या बायकोवर तिचे प्रेम होते..
अखेरच्या दिवसात घसा साथ देत नव्हता.. अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला.पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला..कॅन्सर झाला. त्याची शस्त्रक्रिया झाली..पण त्यानंतर सहा महिन्यात तिने जगाचा निरोप घेतला..
आयुष्य असेच वाढत राहिले..साठी ओलांडली..पण दुसऱ्यांचे करत ..त्यातच त्यांना सुख देत तिने आपल्या जीवनात अनेक जाणीवेतून भोगणे प्राप्त केले..
अर्थहीन आयुष्यात माणसांना समाधानी ठेवण्यासाठी प्रार्थना केली.. महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा जपली..त्यांचेवर श्रध्दा ठेवली..
कुठल्या समारंभात एका कोपऱ्यात बसून इतरांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघत
माझ्या संसारातील सारे कार्य पाहिले..मला ..हिला.. मुलांना आशीर्वाद दिला..
तृप्त मनाने माझ्यावर विश्वास ठेऊन..प्रसंगी माझ्याशी भांडून तिने आपल्या आयुष्याचा इतिश्री केला..



आज तिच्या आयुष्याची ही कर्मकहाणी ..मलाच सांगावी लागली..कारण मोठ्या दोन बहिणी असूनही या छोट्या भावावर तिने घातलेले मायेचे छत्र मला तिच्या आठवणीत सुरक्षित वाटते..
तिचे आयुष्य शब्दातून उसवताना जाणीवपूर्वक मीही माझ्यातल्या त्या क्षणांचा साक्षी बनतो..मागचे ते दुःखाचे..गरिबीचे डोंगर..पार करून आज मी उभा आहे..त्याचे सारे श्रेय माझे आई वडील..यांच्यानंतर या बहिणीला देतो..










आयुष्य असे उसवून
मी रिकामा होतो..
प्रवास किती तो पुढचा
नव्या क्षितिजी पाहतो..

- subhash vishwanath inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com