अगदी बालपणापासून पहातो आहे..तिचे आयुष्य.. लक्षात रहात नाही..म्हणून मार खाणे.. शाळेत जाणे ..एक केवळ उपचार..
कारण मेंदूची वाढ पुरती झाली नाही..असा आई वडिलांचा समज..
मग ही काहीच उपयोगी ठरण्यासाठी योग्य नसल्याची सतत जाणीव..मग त्याचा परिणाम म्हणून तिच्यावर होत असलेले मानसिक छळ ..शारीरिक अत्याचार.. पण त्या जीवाची वेदना कुणीच लक्षात घेतली नाही..
वडिलांनी आपल्या मुलीला ओळखले ..तिच्यात मुळातच हुशारी नाही.. तिला कळत नाही..म्हणून समजून सांगण्यासारखे प्रयत्न करत होते..पण आईचा हट्ट..तिने किमान लिहायला वाचायला शिकावे.. किमान तिला आकडे..समजावे..यासाठी अगदी टोकाचे केलेले प्रयत्न..सारे डोळ्यासमोर येते.. पण तिच्यात काही सुधारणा होत नाही..हे दिसत होते..
आईची अपेक्षा किमान तिला अक्षर ओळख मिळावी..स्वतःचे नाव लिहिता यावे..आपली स्वाक्षरी करता यावी.. जगात साक्षर होऊन..आपले आयुष्य स्वाभिमानाने जगता यावे..
मेंदूवर जास्त ताण आला तर फिट येते..म्हणून पुढे पुढे..सारे केलेले प्रयत्न परतून माघारी घेतले गेले..
शाळेतून नावच काढून टाकले..अखेरीस ती निरक्षर राहिली...पण आयुष्याच्या एकाकी लढतीत तीच खरी साक्षर असल्यासारखे वाटे..
माझ्यापेक्षा मोठी असलेल्या या बहिणीला घर कामात मदत करण्यासाठी आई अनेक कामात मदतीला घेऊ लागे..पण त्यातही ती कमी पडे..
वडिलांची पिठाची गिरणी होती..हळूहळू तीही उत्पन्न देत नव्हती.. धान्य दळण्यास कमी ग्राहक येऊ लागले..मग आईनेच ..ती जिथे पोळी करण्याचे काम घेतले ..त्या परांजपे वाड्यात तिने अनेकांना सांगून बहिणीवर त्यांच्या घरचे
दळण गिरणीतून नेणे आणि त्यांच्या घरी पोचविण्याचे काम बहिणीवर सोपवले..
त्यात वेळ जाई आणि चार पैसे वडिलांना मिळतील.
कधीतरी वडील आमच्या मूळ गावी जाऊन येथील चिंचेच्या झाडाच्या चिंचा उतरवून त्याची पोती घरी आणत.. मग चिंचा फोडून त्यातले चिंचुके काढण्याचे कामी बहिणीला मदतीला घेत.. अर्थात हे काम आम्ही सर्वच जण करत असू..
वय वाढले तशी तिची चिंता वाढत गेली..त्यातूनच तिचा विवाह करावा हा विचार केला गेला..निदान त्यामुळे तिच्या वागण्यात फरक होईल ही आशा होती..
एकदाचे कराड येथील स्थळ पाहिले..लग्न नक्की झाले.. कराड जवळ पाली गावी लग्नाचा घाट घातला गेला..
पण पाली मध्ये लग्नाच्या आदल्या रात्रीचं वास्तव समोर आलं..वडिलांना अचानक भीती वाटू लागली..आम्ही घाबरलो..पण वेळ हेच औषध..
दुसऱ्या दिवशी लग्न विधी पार पडला..
पण पंधरा दिवसातच तिचे तिथे नांदणे कठीण झाले.. तिला मारहाण होऊ लागली..अखेर वडील तिला सातारला घरी घेऊन आले..
तेंव्हा ती एक आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याची जाणीव आई वडिलांना झाली..
मोठी बहीण..आईही तिला धसमुसळे करून सारखे डिवचत राहिले..
बहीण काहीच व्यक्त होत नसे.. ढिम्म
बसत असे.. तिच्या नजरेत थोडा तिरळेपणा दिसत होता..
आता हिचे कसे होणार..हा प्रश्न सतावत होता..तीही .. मोले घातले रडाया..सारखे बोलणी खाऊन तीही कोडग्यासारखे वागत होती.
सारे होऊनही तिच्यात फार फरक पडत नसे..
खरेच त्यावेळी तिला काय वाटत असेल..आपण फक्त कामासाठी आहोत.. आपल्या आयुष्यात पुढे काय असेल..अंधार..किती दुःख सहन करत असेल ती जीव..आता त्या घटनांची आठवण झाली की मनात चीर पडते..
सतत सगळ्या घराला वाटे हिचे पुढे कसे होणार..!
पण खरे सांगू .. प्रत्येकाचा मार्ग त्याने आखून दिलेला असतो..आपण फक्त पुढे सरकत रहायचे..हेच खरे..!
माझे शालेय शिक्षण होत राहिले..मोठ्या बहिणीचे
शिक्षण..नोकरी..मग लग्न..सारे झाले..मग या माझ्या पाठी ..आणि माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीचे आयुष्य केवळ आणि केवळ कष्ट ..यातून तिची कशी सुटका होणार...
पण वेळ यावी लागते..तशी ती आली..
मी पुण्यात नोकरीसाठी सातारा सोडून ..खरे म्हणजे आई वडील..आणि ती बहीण ..यांना त्यांच्या त्याच त्याच आयुष्यात सोडून माझे करियर घडविण्यासाठी पुण्यात तरुण भारत... या दैनिकात रुजू झालो..आणि..
मला पुण्यातील महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची माहिती झाली..निराधार स्त्रीयांना तिथे आश्रय मिळतो..असे कळले..मी प्रयत्न केला..
आई वडील बहिणीला घेऊन स्वारगेट जवळील एका नातेवाईकाकडे उतरले..
आम्ही तिघेही हिंगण्यात गेलो..तिथे असणाऱ्या त्यावेळच्या वस्तीगृहाच्या प्रमुख देशमुख बाईंशी बोललो..त्यांना अर्ज दिला..
बहिणाबाबत सारे काही सांगितले..आई .. विशेषतः वडील अगदीच डोळ्यात पाणी आणून आमच्या मुलीला तुमच्या संस्थेत दाखल करून घ्या ..! अशी वारंवार विनवणी करत होते..
तो प्रसंग मला आजही आठवतो..आणि मन गलबलते..!
जिथे आम्ही उतरलो होतो..तिथला फोन नंबर दिला होता..संस्थेतून फोनची आतुरतेने वाट पहात होतो..तीन दिवसांच्या नंतर बहिणीला संस्थेने प्रवेश दिल्याचे सांगितले.. साऱ्यांचे.. विशेषतः वडिलांचे चित्त शांत झाले..आता त्यांना हिचे आयुष्य काहीना काही रांगेला लागेल असे वाटले..
ती दिवस आठवतो..आम्ही सारे तिला घेऊन संस्थेत गेलो..आमची ही मुलगी.. तिला बुद्धी कमी आहे. पण ती प्रामाणिक आहे..जे सांगाल ते काम करेल..कष्टाला मागे पुढे पाहणार नाही..तुम्ही कुठलेही काम द्या..ती करेल..अशी विनवणी करत होतो..संस्थेत ती दाखल झाली..तिला संस्थेच्या भल्या मोठ्या स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून रुजू करून घेतले..आणि चक्क महिना ५० रुपये पगारही सुरू झाला.. तिचे आयुष्य मार्गी लागल्याचे समाधान आई वडिलांना लाभले..त्यांचे मन आतून सुखावले..शांत झाले.. त्यातही मी पुण्यात होतो..मधून मधून जात होतो..आई वडीलही सातारवरून येऊन तिला भेटत होते..
जे पडेल ते काम करत बहीण संस्थेत रुळत होती..
राहणे..भोजन..शिवाय..कपडे..चादर..सारे काही मिळत होते..बरेच दिवस तिला संस्थेच्या स्वयंपाक घरातील महिला वर्ग आवडू लागला..तिने नाव कमावले..मी काय करतो पेक्षा मीनाचा भाऊ म्हणून मलाही तिथे आदर मिळत गेला..तिने मेहनत केली..कधी...कधी तिला वाईट वाटत असे..पण काय करणार..हेच आपले आयुष्य आहे..हेच आपले जग हे तिनेही मान्य केले..
तिच्या प्रेमळ स्वभावाने तिने तिथले सहकारी आपलेसे केले..स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ती आता अधिक प्रगल्भ झाली..
व्यवस्थापकापासून ते खोलीतील सहकारी मैत्रीणी पर्यंत तिने आपली माया पसरून ठेवली होती.. मिनाचा भाऊ म्हणून मला भाऊबीज..राखी पौर्णिमेला..तिथे मान मिळत होता..तिथल्या महिला..मुली..मलाही भाऊबीजेचे ओवाळत होत्या..मीही भाऊबीज देत होतो..संस्थेच्या भाऊबीज फंडात भर घालत होतो..
दिवाळी..आणि मे महिन्यात तिला सुट्टी मिळे.. घरी कधी कधी तिला त्या वातावरणाचे किती वाईट वाटते याची जाणीव करून देत असेल..नको जायला तिथे..मी तुझ्या घरी राहते..असे म्हणत असे..पण तिच्या पुढील वाटचालीसाठी तिथे रहाणे किती योग्य आहे ते मी तिला सर्वापरी समजावून सांगत होतो.. आणि सुट्टी संपली की तिला परत संस्थेत त्याच त्या वातावरणात सोडत असे..
अखेरपर्यंत तिचा तिथला वावर फारच उत्तम होता..तिचे आयुष्य तिने मेहनत करून घडविले..आईची..आणि वडिलांची माया आणि तिचे तिथले कष्ट सारे आजही डोळ्यासमोर दिसते..
मन भरून येते.. कालवाकालव होते..
बहीण ..संस्थेच्या सुरक्षित भिंतीच्या एका खोलीत आयुष्य काढत होती..पण तिच्यासारख्या अनेक मुली..महिला मला संस्थेत दिसत होत्या.. ज्यांचे कुणी नाही. त्यांचा इथे देव आहे.. आण्णा कर्वे यांनी किती मोलाचे काम करून ठेवले आहे याची प्रचिती तिथे गेल्यानंतर वारंवार दिसत होती..
या माझ्या बहिणीचे अण्णांवर जिवापाड प्रेम होते..रोज सकाळी तू त्यांच्या समाधीपाशी जाऊन त्यांना नमस्कार करीत असे..हा तिचा जणू रोजचा नित्यक्रमच झाला होता..
संस्थेत तिने ३१ वर्ष इमान इतबारे नोकरी केली.. स्वतः चे मन तिथेच घातले..फारशी तक्रार न करता..एकटीने आयुष्य घालविले..स्वतः ला सिद्ध केले..
काम करायची ती पण त्या मानाने खाण्याकडे दुर्लक्ष केले.. चांगले चुंगले खाण्याचा सल्ला दिला..आणूनही दिले..पण त्यांची आवड नाही..आमटी पोळी..आणि तोंडी लावायला भाजी.. केळ सोडून दुसरी फळे खाल्ली नाहीत.. पोटाला चिमटा घेऊन..राहून स्वतःची आबाळ करून घेतली.. मग खाणे कमी केले..
पुढे दाताच्या समस्या वाढल्या..
निवृत्त झाल्यावर तिथेच वृद्धाश्रमात राहण्याचे मान्य केले.. रेडिओ वरील गाणी ऐकणे जास्त आवडायचे तिला..
संगीताचे कान होते.. जुनी मराठी गाणी तिला प्रिय होती.. कधी कधी गुणगुणत असे..तिथे वृद्धाश्रमात झालेल्या समारंभात ती गाणी म्हणती असे.
अगदी हट्टाने दूध घ्यायला लावले..चहा आवडायचा..पण खाण्याची सवय कमी असल्याने आणि चावायला न येता असल्याने तिने स्वतः ला शिक्षा केल्याप्रमाणे खाणे कमी केले.
आई वडिलांचे छत्र हरवले..माझ्यावर फार प्रेम आणि विश्वास.. माझ्या घरात तिला समाधान मिळत असे.. मुलांवर.. नातीवर जीव होता.. तेही तिला जपत.. आपली आत्या त्यांनाही आवडे..
तिचे निरागस हसणे घर प्राण करून जाई..
खरे तर तिने मेहनत केली.. तिला मिळणारा पगार आणि बोनस..वेगळा ठेऊन ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होती.. भाऊबीज आणि राखी पौर्णिमा तिचे आवडीचे सण.. आत दुःख असूनही वरून चेहऱ्यावर समाधानी दिसणारी ही बहीण..माझ्या मनात कायम राहिली..
तिला कधी भौतिक सुख कधीच मिळाले नाही..माझ्या संसारात ती आनंद शोधत होती..तिच्या वहिनीवर म्हणजे माझ्या बायकोवर तिचे प्रेम होते..
अखेरच्या दिवसात घसा साथ देत नव्हता.. अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला.पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला..कॅन्सर झाला. त्याची शस्त्रक्रिया झाली..पण त्यानंतर सहा महिन्यात तिने जगाचा निरोप घेतला..
आयुष्य असेच वाढत राहिले..साठी ओलांडली..पण दुसऱ्यांचे करत ..त्यातच त्यांना सुख देत तिने आपल्या जीवनात अनेक जाणीवेतून भोगणे प्राप्त केले..
अर्थहीन आयुष्यात माणसांना समाधानी ठेवण्यासाठी प्रार्थना केली.. महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा जपली..त्यांचेवर श्रध्दा ठेवली..
कुठल्या समारंभात एका कोपऱ्यात बसून इतरांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघत
माझ्या संसारातील सारे कार्य पाहिले..मला ..हिला.. मुलांना आशीर्वाद दिला..
तृप्त मनाने माझ्यावर विश्वास ठेऊन..प्रसंगी माझ्याशी भांडून तिने आपल्या आयुष्याचा इतिश्री केला..
आज तिच्या आयुष्याची ही कर्मकहाणी ..मलाच सांगावी लागली..कारण मोठ्या दोन बहिणी असूनही या छोट्या भावावर तिने घातलेले मायेचे छत्र मला तिच्या आठवणीत सुरक्षित वाटते..
तिचे आयुष्य शब्दातून उसवताना जाणीवपूर्वक मीही माझ्यातल्या त्या क्षणांचा साक्षी बनतो..मागचे ते दुःखाचे..गरिबीचे डोंगर..पार करून आज मी उभा आहे..त्याचे सारे श्रेय माझे आई वडील..यांच्यानंतर या बहिणीला देतो..
आयुष्य असे उसवून
मी रिकामा होतो..
प्रवास किती तो पुढचा
नव्या क्षितिजी पाहतो..
- subhash vishwanath inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment