Thursday, November 19, 2009

सुनिताबाईंच्या प्रतिभेचे देणे

पुलोत्सवाच्या सातव्या महोत्सवात रसिकांनी अनुभवली सुनीताबाई देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
पुलं ऊर्फ भाईंनी लिहिते राहावे. त्यांच्या अंगच्या गुणांनी विविधरंगी बनावे यासाठी सुनिताबाईंनी कित्येकांचा रोष ओढवून घेतला. पुलंजवळ जायचे असेल तर सुनिताबाईंच्या मर्जीत आधी उतरा मग पुलदर्शन घडेल असा संकेतच जणू बनला होता.मात्र स्वतःमधील कला, लेखनाची ताकद, अभिनयाचे पैलू दडवून ठेवून त्यांनी पुलंसाठी एका अर्थाने आपल्या गुणांचा होम करून भाईंचा लेखन कुंड सतत प्रज्वलित ठेवला.
त्या स्वतः कवी नाहीत. पण कवींबद्दल विलक्षण आदर. त्यातूनच मर्ढेकर, बोरकर आणि आरती प्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम ज्या ताकदीने त्यांनी सादर केला त्याला तोड नाही. पुलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आशय संस्थेच्या संयोजकांनी सुनिताबाईंच्या प्रतिभेला रसिकांजवळ उलगडण्याचा प्रयत्न केला.ज्यांनी तो अनुभवला त्यांना धन्य वाटले. आणि सुनिताबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा मान मिळाला.
त्यांच्या ध्वनिचित्रफितीतून जे विलक्षण उलगडले ते थोडक्‍यात दाखविण्याचा प्रयत्न इथे केला आहे, इतकेच.त्यांच्या कवीतेतल्या सादरीकरणातपण त्यांच्या अंगचे विविधअंगी पैलू स्पष्टपणे दिसून येत होते. पण स्वतःला जाळत पुलंना उजळविण्याचा यज्ञ केवढा महान होता याची दखल घेण्यासाठी हा शब्दप्रपंच.

सुभाष इनामदार,पुणे

सुनिताबाईंच्या आठवणीला समर्पित सातवा पुलोत्सव

आताशा मी नसतेच इथं.... सुनिताबाईंच्या आवाजातल्या या कवितेने सातव्या पुलोत्सवाची सांगता झाली खरी पण ती दुखाःचे सावट घेऊनच.
पुलोत्सव रविवारी आणि सुनीताबाई शनिवारी रात्री निर्वतल्या. शो मस्ट गो ऑन ह्या सुनिताबाईंच्या शिस्तीनुसार ८ ते १८ नोव्हेंबरचा पुलोत्सव रद्द न करता ठरल्यावेळी पार पडला. सर्वच कार्यक्रम पार पडले. पण तरुणाईला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो शेवटच्या दिवशी होतो तो पुढे-मागे करावा लागला इतकेच.समारोप समारंभ सुनितार्बांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अर्पण केला गेला.
मंगला गोडबोले यांनी या खास त्यासाठी लेखन आणि निवेदन करून स्मिता तळवलकर, डॉ. गिरीश ओक यांनी सुनिताबाईंच्या पुस्तकातील उतारे वाचून गृहिणी-सखी आणि सचिव म्हणून पु लंच्या आयुष्याला कसे वळण दिले याचे भान रसिकांना आले. डॉ. जयंत नारळीकरांनी लंडन ते आयुकातल्या प्रवासात पु ल आणि सुनिताबाईंनी कशी आस्थेवाईक चौकशी करून आयुकाला देणगी दिली याच्या आठवणी सांगितल्या. प्राध्यापिका रेखा इनामदार-साने यांनी सुनिताबाईंच्या शिस्तीच्या कल्पनांची महती सांगून आहे मनोहर तरी..या पुस्तकाने संसार काटेकोरपणाने सांभाळून पु लं सारख्या लेखकाला कशा पद्धतीने सांभाळल्याचे चित्र तर आहेच पण ते करतानाच स्वतःच्या कवितांची आवड, आणि वाचनाची सवय कायम ठेवली हेच दिसून येते.
सातव्या पुलोत्सवाने सुनिताबाईंचे मोठेपण अधिक व्यापक प्रमाणात रसिकता पोचविले. त्यांच्या कविता सादर करण्याची पद्धती इतकी विलक्षण होती की समीक्षकांनी जे चारशे पानी पुस्तक लिहून सांगता येत नाही ते त्यांच्या स्वाभाविक आणि उत्कट वाचन सामर्थ्याने सहजी कळून येते.त्यांच्या कविता वाचनाची महती आणखी एक की त्याची कुणी नक्कल म्हणूनही सादर करू शकत नाही.
"फलाटदादा" ऐकताना आपण भान हरपून जातो. एवढी शक्ती त्यांच्या कवीता वाचनात असते हे इथे सिध्द झाले.
सुनिताबाईंच्या आयुष्याचा पटच जणू पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात साकार होत होता.कधी शब्दातून तर कधी चित्रफीतीतून सुनिताबाईचे आयुष्य इथे उलगडले होते. ते पाहताना एकच जाणवले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र प्रतिभा तर आहेच. पण पुलंमुळे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले हे नक्की.
आहे "मनोहर" तरी....
या पुस्तकाला नाव काय द्यायचे याची चर्चा सुरू होती. वेगळी नावे समोर येत होती. गाडी चालवत दोघे चालवत असताना इतका बेकरीसमोर थांबली होती. बेकरीचे नाव होते मनोहर बेकरी. पुलंनी सुनतीबाईंना विचारले आहे मनोहर तरी... हे नाव कसे वाटेल. आणि पुस्तकाचे नाव नक्की झाले. आहे मनांहर तरी.कधीतरी आम्हालाही गृहीत धरा... असा टोलाही त्यांनी मारला.

सुभाष इनामदार, पुणे.

Tuesday, November 17, 2009

ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त


धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्‍यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.


त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत वाढलेला ध्येय्यवादी कलासक्त व्यक्तिमत्त्व . राजदत्त.राजा परांजपेंच्या पठडीत वाढलेल्या राजदत्तांचे चित्रपटही समाजातल्या संस्कारांना आकार देणारे, भावभावनांचे प्रकटीकरण करणारे आणि व्यवसायापेक्षाही कलेला अधिक उठाव देणारे.


त्यांचा आठवणीतला पहिला चित्रपट म्हणजे संत गाडगे महाजांवरचा " देवकीनंदन गोपाला "हा चित्रपट. नंतर शापित आणि अलीकडला लक्षात राहणारा म्हणजे पुढचं पाऊल. त्यांच्या अजिंक्‍य देवने नायकाची भूमिका केलेला म्हणजे सर्जाही आठवतो.कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दिग्दर्शकाने दूरदर्शनवर केलेली मालिका गोट्या आजही आठवते ती त्यांच्या दिग्दर्शमामुळे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी मालिकेच्या दिलेल्या शीर्षक गीताने.संस्करभारतीचे अध्यक्षपद भूषविणारे राजदत्त यांचे विचारही प्रभावीपणे सतत रसिकांच्या कानी पडत असतात. चित्रभूषण पारितोषिकाचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.


मनोरंजन हा कलेचा प्रमुख हेतू न राहता, समाजप्रबोधन हाही कलेचा विषय असावा. आणि कलेशी संबंधित प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी त्यांचा आग्रही मागणी असते. ते स्वतःही ते कटाक्षाने पाळतात. म्हणूनच आजच्या मनोरंजन जमान्यात राजदत्तांसारखे अनेकजण मागे पडल्याचे चित्र दिसते.


सावरकर हे त्यांचे दैवत. हिंदुत्व हा धर्म. आणि कला हे जीवनाचे धेय्य. अशा कलासेवेत अविरत कार्य करणाऱ्या धेय्यवादी दिग्दर्शकाला गदिमांच्या नावाने दिला जाणार गदिमा पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेमकरणाऱ्या अनेकविध रसिकांना आनंद झाला आहे.

राजदत्तांना तमाम मराठी जनांचा प्रणाम.

आम्हाला तुमचा अभिमान आहे.


सुभाष इनामदार, पुणे

Thursday, November 12, 2009

प्रगतीची वाट


शिकण्याची इच्छा हाच मुळात प्रगतीचा पहिला टप्पा. यासाठी वयाची अट नाही. सध्याच्या युगात घर बसल्याही शिक्षण मिळू शकते. यासाठी तुम्ही संगणक साक्षर व्हायला हवे.पूर्वी असे म्हणत बापाची चप्पल मुलाच्या पायात येऊ लागली की समजावे तो आता मोठा झालाय. त्याला बरोबरीच्या नात्याने वागवा. लहानपणी थोडा राग आला तर मुलावर हात उगारला जायचा.

आता तोच मुलगा तुमचा मार्गदर्शक होऊ शकतो. मीही काही संगणकावर काम करीत असलो तरी त्याच्या इतके संगणक ज्ञान मला नाही. आजच मी त्याचेकडून पहिला धडा गिरवला. आणि काय सांगू असा गुरू माझ्या घरी असावा आणि मला त्याची ओळख नसावी. हे थोडे विचित्र वाटले.


आजची पिढी काळाला ओळखून आहे. त्यांच्यात धाडस. जिज्ञासू वृत्ती आणि मेहनत करायची तयारी आहे. लाथ मारू तिथे पाणी काढू अशी त्यांची जिद्द आहे. फक्त ती वाया जात नाही ना ? याची काळजी घ्या. बस्स.हा अनुभव सांगावा म्हणूनच हे चार शब्द नोंदविले. इतकेच.


सुभाष इनामदार, पुणे

Sunday, November 1, 2009

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशिला गोसावी


कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा व्यक्‍त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर" आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे

Sunday, September 13, 2009

संगीत नाटकाचा प्राणवायू-विनायक थोरात


शिलेदारांच्या नाटक कंपनीत आजही जे नाव कायम आहे त्यात ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांचे नाव येते.

संगीत नाटकाचा ठेका आणि ताल सांभाळतच त्यांना संसाराचा तोल सांभाळला आहे. गायकाच्या गायनाला मदत करत गायकाचे गायन फुलवत नेणारे त्यांचे वादन आजही त्याच पद्धतीने सुरू आहे.

जयराम शिलेदारांबरोबर संगीत नाटकाला तबला वादनाची साथ करण्याची प्रतिज्ञाच जणू त्यांनी घेतली आहे. सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ अशा पारंपरिक नाटकात संगीत पदांचा भरणा आहे. यात साकी, दिंडीसारखी थिरकत नेणारी नजाकतही बेफाट आहे. त्याला त्याच पद्धतीचे खास वादन थोरातांच्या बोटातून निघत असते.

नाही म्हणायला "स्वरसम्राज्ञी' या विद्याधर गोखले यांच्या नाटकातल्या एका प्रसंगात रंगमंचावर येऊन वादन करायचा प्रसंग असल्यामुळे विनायकराव प्रकाशात झळकले. अन्यथा त्यांची जागा प्रेक्षकांना पाठकरून गायकांच्या पदांना बोटांच्या नजाकतीने साथ करणे.शिलेदार मंडळीचा कुठेही कार्यक्रम करणार असली तरी तबला वादक म्हणून विनायकराव ठरलेले.

त्यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांना तालमधुरता देण्याचे काम अविरत पार पाडले. मात्र ते करताना स्वतःचा बडेजाव त्यांनी कधीही मिरविला नाही. शांत आणि सहनशील स्वभावामुळेच जणू त्यांच्या साथातली संयम जाणवतो. उगाचच तबल्यावर थिरकत करून मला किती तबला येतो याचे दर्शन त्यांच्या वादनात कधीही आढळणार नाही.

गायकाला फॉलो करणे अवढेच कां ते नेटाने करीत असताना दिसतात.संगीत नाटकांची आज चलती नाही. प्रपंच मात्र पुढे न्यावाच लागतो. तशाही स्थितीत जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदारांच्या नाटकाशिवायच्या मैफली करीत आहेत. याशिवाय शिष्यांना मार्गदर्शन करून उदरनिर्वाह सुरू आहे.गेली सुमारे चाळीस वर्षे एकनिष्ठ सेवा करणारा हा ज्येष्ठ साधक पाहिला, अनुभवला की आपोआपच नतमस्तक व्हावेसे वाटते. प्रसार माध्यमांची चलती असलेल्या युगात संगीत कार्यक्रमांचे दालन खुले झाले आहे. तरी स्वतःचे स्वत्व जपून तबला वादनाचे कसब रंगदेवतेच्या चरणी अर्पण करणाऱ्या या साथीच्या कलावंतांची दखल घेण्याची गरज वाटली .म्हणूनच आज विनायकराव थोरांतावर लिहिले.

अशी शेकडो साधक मंडळी असतील. त्यांचेही मोल तेवढेच आहे. त्यांसाऱ्यांना वंदन !

सुभाष इनामदार, पुणे

बालकवितेत ठसा उमटविणाऱ्या डॉ. संगीता बर्वे


व्यवसायाने डॉक्‍टर; पण लहानपणापासूनच साहित्याकडे ओढा असणाऱ्या संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या कवितांची तीन पुस्तके बाजारात आली आहेत.

"गंमत झाली भारी,' "खारूताई आणि सावलीबाई'; तसेच "झाड आजोबा' ही ती तीन पुस्तके आणि "हुर्रे हुप्प' हे चौथे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मुलांच्या मनाला सुखावणाऱ्या कल्पनांना आपल्या कवितेतून साकारणाऱ्या त्यांच्या प्रतिभेला आता कुठे धार चढू लागली आहे. मुलांच्या विश्वात रममाण होता होता त्यांच्या कलाकलाने त्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातल्या शब्दांना कवितेत आणण्याची कामगिरी संगीता बर्वे यांनी केली. नुकत्याच "गंमत झाली भारी' आणि "सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडीही फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.

त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्‍टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे

कुठेतरी खोलवर

आत आत काही

उसळत फेकाळत

वर येऊ पाही

त्यांची प्रतिभा सतत काही तरी सांगत असते.

समाजाशी, त्यातल्या प्रश्‍नांची नोंद आणि कधी जीवनाचा अर्थही सांगून जाते. "पॉप्युलर'ने काढलेल्या "दिवसांच्या वाटेवरून' या पुस्तकात त्यांचे सामाजिक भान प्रत्येक कवितेत दिसेल.

बालपणीच्या आठवणींचा उजाळा घेताना लक्षात येते, की संगीता प्रभाकर गोंगे, मु. पो. बेलापूर, ता. श्रीरामपूरच्या. वडील शाळेत चित्रकला शिक्षक. संगीताला चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद. पहिल्या केलेल्या कवितेच्या चार ओळी जेव्हा वर्गात सर्वांसमोर म्हणून दाखवल्या तेव्हाच बाईंनी ही मुलगी पुढे कवयित्री होईल, असे भाकीत वर्तविले होते.

शाळेच्या सुट्टीत खेळापेक्षा नव्या नव्या कल्पनांना शब्दांत बांधून स्वतःच्या हाताने कथेचे हस्तलिखित करायचा छंद लागला. वडील मुखपृष्ठ तयार करायचे. अशा तशी बाडे तयार व्हायची. त्यात कधी कविताही उमटते.शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर बीएमएस केले. आता डायटेशियनचा अभ्यासक्रमही पुरी केलाय. मराठी घेऊन एमए केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा साहित्यभूषणचा अभ्यासक्रमही पुरा केलाय. ललितलेखनाची आवड आणि संवेदनशील मन यामुळे कवितेचा छंद जोपासला गेलाय. तसे त्यांना पुरस्कारही मिळालेत.

खरे म्हणाल, तर त्यांचे सांगणे आता कवितेतून व्यक्त होते. त्यांचे मनच कविमन आहे.

आता जे सुचते ते कवितेमधून.आठवी ते दहावीतल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा रसास्वाद घेणाऱ्या पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.

दहा वर्षांत लिहिलेल्या कवितांचा संग्रह "मृगतुष्णा'द्वारे रसिकांच्या भेटीला आला. त्याला प्रस्तावना शांता शेळके यांची आहे.

लग्नानंतर मालती पांडे-बर्वेच्या गाणाऱ्या घरात त्या सून म्हणून आल्या. दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या विश्वात रमल्या आणि त्यातूनच बालकवितांचा जन्म झाला. आज त्यांच्या कवितांचा स्वप्नांचे पंख लाभलेत. छोट्यांच्या दुनियेत शब्दाने त्या वावरताहेत. त्यांना कवयित्री म्हणून मिरवायला आवडेल.

तशी त्यांची प्रतिभा सर्वत्र संचार करणारी आहे. सुजाण रसिकांच्या मनात रेंगाळणाऱ्या कविता कागदावर उमटविणाऱ्या या कवीच्या आगामी प्रवासासाठी शुभंभवतू!

सुभाष इनामदार,

पुणे


(संगीता बर्वे यांच्याशी साधलेला संवाद पाहण्यासाठी "ई-सकाळ'च्या फीचर्स लिंकवर क्‍लिक करा)

Sunday, September 6, 2009

व्यथा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराची ...



  • (मराठी रंगभूमीवर स्वतःची प्रतिमा कोरलेल्या, स्वर्गीय आवाजाची जादू असलेल्या बालगंधर्वांच्या नावाने पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली. मात्र आज तिथे होत असलेले मनोरंजन कार्यक्रम पाहून स्वतः बालगंधर्व काय म्हणत असावेत, याचे काल्पनिक शब्दचित्र...)

अरेरे, काय अवस्था केलीय या नाट्यमंदिराची. मायबापहो, तुम्ही तरी कसे सहन करता हे सारे. संगीत नाटकांसह मराठीतील चांगली नाटके मी आजपर्यंत इथे पाहत आलोय! आज संगीत नाटके इथे होतायत तरी कुठे. जी काही होताहेत तीही दोन-अडीच तासात संपताहेत. काटछाट केलेली नाटके मायबाप प्रेक्षक सहन करताहेत. ना नाटकाचा मजा, ना संगीताची लयलूट. वन्समोअरला तर संधीच नाही. पण कधीतरी ती मी अनुभवतो आहे. अजून तरी संगीत नाटक पुरते मृतप्राय झालेले नाही. "घाशीराम..'सारख्या नाटकांना संगीत नाटक म्हणण्याची रीत काही नाटकवाल्यांनी सुरू केली होती. पण आज ते तरी कुठे होतेय.मायबापहो, तर सांगत काय होतो, नाटकांसाठी माझ्या नावाचे थिएटर उभारले गेले. पण आज त्या रंगमंदिरात नाटकांपेक्षा लावण्यांची अधिक वर्णी लागलीय. त्यांचीही कला आहे. त्यातही संगीत आहे. पण त्यात संगीत कमी आणि सौंदर्य अधिक दिसतेय. आणि येणारा प्रेक्षक तरी कुठला? पान खाऊन बचाबचा थुंकणारा. शिट्ट्या मारून दाद देणारा. मलाही लोककलेबाबत आदर आहे. नव्हे, आमच्याही पदांच्या काही चाली तिथूनच संगीत नाटकात आल्यात. पण म्हणून माझ्या नावाच्या थिएटरमध्ये असे लावण्यांचे पेव मी पाहतो आहे. 'दादा ते आले ना' प्रमाणे मला म्हणावेसे वाटते, "दादा ते नको ना!' नाटकांचे प्रयोग कमी होताहेत. प्रेक्षक तुमच्या त्या चौकोनी खोक्‍यातले कार्यक्रम पाहत घरीच सुखावत चाललाय.

मायबाप कमी झालेत. मग नाटकांची संख्याही रोडावलेली दिसते. त्या मातब्बर नाटकसंस्थांचे प्रयोगही फारसे माझ्या रंगमंदिरात होत नाहीत. एकूणच नाटकांची अवस्थाही बिकट होत चाललेली दिसतेय. हाउसफुल्लची पाटी आणि त्याला घातलेला हार पाहण्याचे नशीब तर माझ्या वाटेला आता यापुढे दिसेल की नाही याबद्दल मलाच शंका आहे.म्हणून मग आर्यभूषणची जागा या माझ्या रंगमंचानं घ्यावी ना?. हाय रे दैवा. काय काळ आलाय!नाटके कमी आणि लावण्या अधिक मी अनुभवतोय. वैतागलोय आता.


माझे "नाव' तेही आता बदलून टाका एकदाचे!


सुभाष इनामदार, पुणे

Sunday, August 30, 2009

यंदा किती छान वाटतय!


संकट आले स्वाइन

फ्लूचेरस्ते दिसू लागले

ओसजाईल त्याच्या तोंडी एकच

आषययंदा किती छान वाटतय!

स्वाइन फ्लूच्या संसर्गजन्य रोगाने पुण्याने पछाडले ते नेमके पुणेकरांच्या उत्साही सणात. ज्या सणासाठी काही मंडळी वर्षभर आखणी करतात. कांहीची उदरनिर्वाह या गणपती उत्सवाच्या काळातून बाहेत पडतो. आणि ज्या उत्सवाची मुहूर्तमेढ याच पुण्यात रोवली लोकमान्य टिळकांनी.तो गणेशोत्सव यंदा गर्दीविना. देखाव्यांशिवाय पहायला लागतोय याची खंत मलाही जाणवते आहे. पण काळानेच तुम्हाला रोखले आहे.


'गर्दीवर आवर घाला ,उत्साहाला काबूत ठेवा' हे सांगून.

पुणेकरांनी हे पाळल्याचे चित्र गेले काही दिवस दिसते आहे. अर्थात यालाही शनिवार-रविवारचा आहेच.मात्र एकंदरीत साथीच्या या रोगाचे संकट मनावर घेउन त्याबरहुकूम कारवाईही केली. देखावे रद्द केले. ते पैसे सामाजिक संस्थांकडे वर्ग केले. स्वाईन फ्लूशी मात करणाऱ्या नायडूतल्या कर्मचाऱ्यांची धान्यतूला केली. काहींनी न बोलता मनाप्रमाणे या सामाजिक सेवेत स्वतःचे दान समर्पण करून एक आदर्श समाजसमाजसेवेचा पायंडा घालून दिला.खरा पुणेकर उत्सवप्रिय. पण गेल्याकाही वर्षात बदलत्या गणेशोत्सवाबद्दल तो नाराज आहे. उत्साहालाहा आणि त्या ध्वनीलाही मर्यादा हवी.

भावीकता नष्ट होऊ लागल्याची जाणीव त्याला होत होती. म्हणूनच स्वाइन फ्लूच्या विषयामुळे तरी उत्सवात दिसू लागलेला साधेपणा त्याला आनंद देत आहे. गोंगाट कमी झालाय. रात्री दाटीवाटीने फिरणारा भाविक फारसा एका ठिकाणी थांबत नाहीये. तो गणपतींच्या मूर्तीचे दर्शन घेउन तृत्प होतोय.समाजातल्या विविध घटकांनी एकत्र येण्याच्या संकल्पनेतून सुरू झालेला गणेशोत्सव खरा असाच साजरा व्हावा हे पटलय. आणि आवडेलेही आहे.दर वर्षी पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक गौरी विसर्जनानंतर पुण्याकडे मार्गस्थ होतात.

यंदा मात्र, स्वाइन फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी पुण्यातील बहुतेक सार्वजनिक मंडळांनी देखावे न करता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविल्याने पुण्यात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे."उत्सव हवा, पण गर्दी नको,' ही "सकाळ'ने घेतलेली भूमिका मान्य करीत अनेक मंडळांनी यंदा देखावे सादर न करता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. अनेक मंडळांनी त्यांचे मंडप काढून टाकले, तर अनेकांनी देखावा उभारण्याचे कंत्राट रद्द केले. काही मंडळांना काही लाख रुपयांचा फटका बसला. कलावंतांवर गदा आली. मात्र तो सामोरे झालाय नवी आव्हाने पेलायला. भाविकतेत साजरा होणारा गणेशोत्सव पाहून असा उत्सव दरवर्षी व्हावा अशीच तो प्रार्थना करेल. (अर्थात स्वाइन फ्लूचे संकट पुन्हा यायला नकोय)

तुम्हाला या विचाराविषयी कांही मत व्यक्त करायचे असल्यास जरूर करा. स्वागतच आहे.

-सुभाष इनामदार,पुणे.

e-mail: subhashinamdar@gmaol.com

Thursday, August 27, 2009

गाण्यावर स्वतःचा ठसा


आजच्या पिढीतले विचारवंत गायक या यादीत सावनी शेंडे-साठ्ये हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांनी नेटाने केला. घरी आजी- कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या मार्गदर्शनाच्या मुशीतून सावनी यांचे गायन आकाराला येत गेले.

गानवर्धन, सुरेल सभा, सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या मैफलींना जायचा योग त्यामुळेच येत गेला. अनेकांचे ऐकल्यामुळे कानावर आपोआपच संगीताचे धडे नकळत गिरविले जाऊ लागले. डॉ. प्रभा अत्रे, माणिक वर्मा, शोभा गुर्टू यांच्यासारख्या थोर गायकांचे घरात येणे-जाणे होते. त्यांच्या संगीतविषयक चर्चा कानावरून गेल्या. रागांविषयक ज्ञान आणि सुरांचे पक्केपण म्हणजे काय, ते समजले. त्यात फायदाच झाला.

बालपणापासून कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, असा वडिलांनी दंडक घालून दिला होता. तो पाळल्यामुळेच आजीच्या एकसष्टीच्या निमित्ताने झालेल्या मैफलीत नाव पुकारले गेले सावनी शेंडे यांचे. आणि सावनी यांच्या नावामागे शास्त्रीय संगीताची जाण किती आहे, याचा प्रत्यय उपस्थितांना झाला. त्या वेळी त्यांचे वय अवघे दहा वर्ष होते.ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे रीतसर शास्त्रीय संगीताचे शिक्षण सावनी यांनी 12 वर्षे घेतले. संगीत परंपरेची जाणीव अधिक समृद्ध होत गेली.


"बंदिश कशी सजवायची याचे धडे मला आजही उपयोगी पडतात. माझ्यासारखे गाऊ नकोस. तुझे गाणे दिसायला हवे. हा उपदेश मनात साठवून माझी वाटचाल आजही सुरू आहे...' याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.""मैफली अनेक झाल्या; पण राष्ट्रपती भवनात माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्यासमोर मैफल करण्याचे आमंत्रण मिळाले, याचा आजही अभिमानपूर्वक उल्लेख करावासा वाटतो. आपल्या वाढदिवसाचा केक राष्ट्रपतींच्या हस्ते कापला जावा यापरते भाग्य ते कोणते,'' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

""आता अनेक राग विस्तृत अंगाने गाता गाता त्या रागातल्या रचना लिहिणे सुरू केले आहे. त्यातूनच नव्या बंदिशींचे पुस्तक प्रकाशित झाले. शास्त्रीय संगीताकडे तरुण वर्ग आकृष्ट व्हावा यासाठी रसिक आणि गायक यांचा संवाद घडावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,'' असे त्यांनी सांगितले.

सुभाष इनामदार,

पुणे

(सावनी शेंडे-साठ्ये यांची मुलाखत पाहण्यासाठी इ-सकाळच्या फिचर्स लिंकवर क्‍लिक करा)

Tuesday, August 25, 2009

उत्साहात दक्षतेकडे दुर्लक्ष नको!


स्वाईन फ्यूच्या साथीने गाजलेल्या पुण्यात आजपासून गणेशात्सवाला आरंभ झालाय.

आजच अडीच वर्षाच्या बालकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालायाची बातमी आलीय.

ऐकून मन विषण्ण झाले. भावताली नजर टाकली. सार्वजनिक मंडळांचे गणपती वाजत गाजत मंडपात विराजमान होण्यासाठी ढोल- ताशांच्या पथकांच्या आणि बॅंडच्या तालावर मिरवत आणले जात आहेत. स्वाईन फ्लू मुळे गेले काही दिवस पुणेकर तोंडावर मास्क वापरतना दिसत होते. आज मात्र या गर्दीत

या साऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यासारखे दिसते. उत्साहाला उधाण तर आता येतेय.

साथीच्या रोगापासून सावध होण्याची प्रतिज्ञा घेणारा पुणेकर या गर्दीत नाचायला, पहायला तेवढात उत्सुक दिसतोय. नाही म्हणायला काही निवडक मंडळानी स्वाईन फ्लूमुळे यंदा सजावटीला लगाम लावून या साथी पासून घ्यायची काळजी कोणती याचा बॅनर झळकवला आहे.

मात्र ज्या प्रमाणात मंडळानी आणि पर्यायाने मंडळींनी काळजी घ्यायला हवी आहे तेवढी ती घेतली जात नाही.श्री गजानन पहातोयस ना, तुझीच आराधना चालू आहे. आता तूच त्यांना संभाळ रे बाबा!.सोमवार पासून शाळा, महाविद्यालये आणि इतके दिवस बंद असलेली चित्रपट आणि नाट्यगृहेही पुन्हा चालू होताहेत. काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र त्या पाळताहेत किती? जणू काही घडलेच नाही असा वावर सार्वजनिक ठिकाणी सुरू झाला.

ज्याला स्वाईन फ्लूच्या संकटाची जाणीव झालीय तो नक्कीच काळजी घेईल. पण मग इतरांचे काय?एक मात्र नक्की गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची यंदा वानवा आहे. गणपती पहायला धावणारा उत्साही भक्त नेहमीसारखा सह कुटुंब सह परिवार गणपती पहायली बाहेर पडेल काय?सार्वजनिक उत्सवाच्या वेळी घ्यायची काळजी घ्यावी असे सांगणारे बोर्ड झळकताहेत. त्याची अंमलबजावणी करण्यातच साऱ्यांचेच भले आहे.तुम्हाला काय वाटते ?


सुभाष इनामदार ,पुणे

Friday, April 17, 2009

पहा पण प्रेमाणे !


तुम्हाला वाटेल लिहायला चुकलय. पण छे हो. मुद्दाम तसच काढलय.

मराठी माणूस अशा पाट्या लिहून प्रेमाची भाषा करतोय. पण प्रत्यक्षात तो स्वतःकडेही तेवढ्या प्रमाने पहाताना दिसत नाही.

कारण काय? तर वृत्ती.भाषा संस्कृती वाढली पाहिजे. ती टिकली पाहिजे असे सांगणारा हा मराठी बाणा.


मोडेन पण वाकणार नाही. असे ब्रीद घेऊनच वागतोय. मी मराठी हे स्वाभीमानाचे बीरुद मीरवतोय. पण प्रत्यक्ष वागण्यात त्याचा स्वाभीमान कुठे कच खातोय तेच कळत नाही.त्याला सतत सांगावे लागते की, बाबारे तू मराठी आहेस. भाषा जप. संस्कृती सांभाळ. अभिमानाने मिरव. सारे सांगून थकलेय. राज ठाकरेंनी तर मराठी माणसांचा स्वाभीमान जागृत करण्याचे व्रतच घेतले आहे. पण मला सांगा. त्याला ते झेपेल काय? सर्वममावेशक असा त्याचा स्वभाव. इतरांकडे वर मान करुनही न पहाण्याचा धर्म.

बोलण्यात ताठपणा पण वागण्याच बुजरा असा हा मराठी माणूस. छत्रपती शिवाजी महारांजांनी त्यांचा स्वाभीमान जागृत व्हावा म्हणून महेश मांजरेकरांच्या रुपात मराठी चित्रपट क्षेत्रातून मराठी बाणा जागवायचा प्रयत्न केला गेलाय. पण मला खरे सांगा, तो स्वभीमानी मराठी माणूस असा जागा होईल.

तो चाकरमानी बनलाय. धंद्यात आमची अन्यत्र शाखा नाही हे बीरुद अभीमानाने मिरवतोय.

काळ बदलला तरी तो काही बदल करुन घ्यायच्या मनस्थितीत नाही. भ्रष्ट समाजात वावरतोय. त्यांना जाब विचारायला कचरतोय.खाली मान घालून इतरांचे इमान राखण्यात स्वतःला धन्य समजतोय.

बुध्दी हे ज्याचे शस्त्र आहे. इमान हे त्याच्या रक्तात आहे. सर्वमावेशक अशी त्याची वृत्ती आहे. आज तो निद्रीस्त आहे. त्याला जागविण्यासाठी अनेक क्‍लुप्त्या केल्या जाताहेत.

तुम्हाला वाटते तो जागा होईल. आहे. राहिल?

मतदानाच्या दिवशी तो त्याची ताकद दाखवेल? तुमचा काय अंदाज आहे.......

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Sunday, April 12, 2009

कलावंताना निष्ठेपेक्षा पैशावर प्रेम अधिक


रसिकमोहिनी निर्मित चंद्रलेखा प्रकाशित चिरंजीव आईस. २०० वा प्रयोग,शुक्रवार बालगंधर्व रंगमंदीर पुणे. प्रमुख पाहुणे चंद्रलेखाचे मोहन वाघ आणि अ भा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार. वक्ते दिग्दर्शक दिलिप कोल्हटकर. निर्माती-भाग्यश्री देसाई. कलावंत- भाग्यश्री देसाई,कुणाल लिमये,उदय लागू, आशा तारे, उपेंद्र दाते आणि सुहासिनी देशपांडे.

---------------------------------------

"आजचे कलावंत प्रयोग अर्ध्यावर टाकून मध्येच निघून जातात. नाटकापेक्षाही सिरियल आणि सिनेमाकडे त्यांचा ओढा अधिक आहे. रंगभूमीच्या निष्ठेपेक्षा त्यांना ओढ आहे ती पैशाची.

भुमिकेच्या प्रेमापेक्षाही त्यांना पैशाचे प्रेम अधिक आहे.' अशी टिका जाहिरपणे केली

ती नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी.

स्थळ होते पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर. निमित्त होते रसिक मोहिनी निर्मित आणि चंद्रलेखा प्रकाशित "चिरंजीव आईस' या नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाचे. नाटकाच्या मध्यंतरातल्या छोटेखानी समारंभात मोहन वाघ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

गेले कांही दिवस नाट्यक्षेत्रात चिंतेची परिस्थिती आहे. ठराविक नाटके सोडली तर नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावलेली दिसते. भरत जाधव, प्रशांत दामले, मोहन जोशी तर काही प्रमाणात विक्रम गोखले यांची नाटके सोडली तर नाटकाला बुकींग नसते. एकेकाळी बालगंधर्वच्या तारखांसाठी निर्मार्त्यांमध्ये चढाओढ असायची. आज बुकींग नसल्याने रंगमंदिरात नाटकांपेक्षा लावण्या-तमांशांचे प्रमाण अधिक वाढलय. टाळ्यांपेक्षा शिट्ट्यांची दाद अधिक मिळताना दिसते.

अशा स्थितीत "चिरंजीव आईस' या नाटकाचा दोनशेवा प्रयोग साजरा व्हावा याचा आनंद. तर मला बरेच दिवसाने नजरेपुढे भरलेले प्रेक्षागृह पहायाचे भाग्य लाभल्याचा आनंद दिग्दर्शक दिलिप कोल्हटकरांना जाहिर पणे व्यक्त करावा लागावा याचे वाईट वाटते.अशाच महोत्सवी प्रयोगाला भरघोस उप्तन्नाचा प्रतिसाद मिळाल्याने निर्माते किशोर देसाई-भाग्यश्री देसाई यांना अधिक प्रयोग करण्याचा उत्साह निर्माण व्हावा हे या प्रयोगामुळे घडले.

भारतीय मुले अमेरिकेत स्थयिक झालीत. त्यांचेकडे पैसा आहे. पण स्वतः कडे आणि आपल्या माणसांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अमेरिकेत गेलेल्या आपल्या आईशी बोलायला. तीच्याशी गप्पा मारायला वेळ नाही. सतत काम आणि कामच. यानिमित्ताने भारतीय मातीत रूजलेल्या संस्काराचा आणि आईचा एकटेपणाचा अनुभव सांगणारे हे नाटक तेवढेच लक्ष वेधून घेते.

त्यातही नाट्यकलावंतांच्या निष्ठेचा प्रश्र मोहन वाघ यांनी काढून रंगभूमीवर कलावंतांची वानवा का आहे याचे एका परिने उत्तरच दिले.कलावंतही म्हणतात हेच तर पैसे मिळविण्याचे आमचे दिवस आहेत. मात्र एकदा स्विकारलेली भुमिका शेवटापर्यंत निभावणे हे ही महत्वाचे नाही काय ? हा प्रश्र अधिक मोलाचा आहे.

नाट्यक्षेत्र आज मंदिच्या गर्दीतून वाट काढते आहे. निर्माते आणि कलावंत या दोघांनीही रंगभूमिवरची नवी आव्हाने पेलण्याचे शिवधनुष्य निष्ठेने उचलण्याची वेळ आली आहे. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा नव्या विषयांची नवी नाटके समर्थपणे साकारण्याची गरज आहे. ती पेलण्याचे बळ दोघांनाही येवो हिच प्रामाणिक इच्छा !

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Thursday, April 2, 2009

गगनातला सायंतारा निस्तेज झाला!


भावगीताला स्वतःच्या स्वतंत्र प्रतीभेची ओळख करून देणारा शांत निर्मळ स्वर आज त्या दूर देशा निधून गेला. गजाननराव वाटवे या व्यक्तिमत्वाची आठवणच उरली.

सोपी आणि सुबोध चालीतून कवीतेतल्या शब्दांना रसिकांच्या ऱ्हदयी घालणाऱ्या या महान संगीतकाराला अखेरचा सलाम.भावगीतात स्वतःचे युग निर्माण करताना नविन कवींना आणि त्यांच्या कवीतांना निवडून त्यांना चाली देण्याचे मोठे काम वाटव्यांनी केले.

व्यक्तिमत्वातला साधेपणा त्यांच्या चालीतूनही बाहेर येत होता. निगर्वी आणि अतिशय साधा कलावंत म्हणून त्यांची ओळख कायम मनात ठसली.गाण्याच्या नवीन कार्यक्रमाला वाटवे नेहमीच हजर असत. तरूण कलावंताला सतत सल्ला देताना त्यांनी कधीही आळस केला नाही.

काळी पॅंट . खोचलेला पांढरा शर्ट आणि काळा कोट घातलेले वाटव्यांचे व्यक्तिमत्व सदा प्रसन्न असे. छाप पडावी असे व्यक्तिमत्व नसले तरी रसिकांच्या प्रेमाने त्यांना नेहमीच उत्साह वाटे.

एके काळी मेळ्यातून गाणी म्हणणारे वाटवे गाजले ते गणपती उत्सवातल्या भावगीतांच्या कार्यक्रमातून. "कसा ग बाई केला, कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबडा" म्हणताना ती लडीवाळता त्यांच्या सूरातून रसिकांना मोहवीत गेली. "गगनी उगवला सायंतारा" सारखी काव्ये वाटव्यांच्या स्वरांनी अजरामर झाली. त्यांच्या आवाजाचा पोत तरल, साधा आणि शांत स्वरांची बरसात करणारा होता.

त्यांच्या गायकीत तो आवेश नव्हता. मात्र गाताना तल्लीनता इतकी जे गातील त्यात वाटव्यांचा टच जाणवत होता.गेले कांही दिवस तब्येतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमाला ते येत नसत. पण जे भेटायला जात त्यांच्या कडे नवीन काय चालू आहे याची विचारणा नक्कीच व्हायची. मध्यंतरी एच एम व्ही ने वाटव्यांच्या दुर्मिळ भावगीतांची सीडी काढली तेव्हाचा तो शेवटचा जाहिर समारंभ असावा. त्यांच्या बोलण्यात गहिवर होता. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाने भारून गेल्याचे समाधान होते. आयुष्याचे सार्थक झाल्याची जाणीव होती. एकूणच ते तृप्त होते.

मध्यंतरी त्यांना बोलता येत नव्हते. मात्र कागदावरचा संवादातून ते प्रकट होत होते.समईतल्या मंद प्रकाशा सारखा त्यांचा स्वर भावगीतांना उजळून गेला. नवकवींना प्रसिध्द करवून गेला.

नवीन गायकांना आदराचे स्थान असणारे गजानन वाटवे आज अखेरच्या प्रवासाला निघालेत. त्यांच्या सोज्वळ स्वरांना. भारावलेल्या सूरांना आणि कायमच रसिकांच्या मनात घर केलेल्या थोर व्यक्तिमत्वाला ही शब्दरूप भावांजली!

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Wednesday, March 25, 2009

संस्कृती पाळा, जबाबदार बना


गुढी पाडवा. भारतीय संस्कृतीला बहर आणणाऱ्या तेजोमय दिवसाचे नाव.

आरोग्यदायी कडुलिंबाचा डहाळा आणि साखरेची गाठी या दोहोंनी गुढीचे तोरण उभे राहील.

मंदीच्या कडू वातारणाचा साज लेऊन यंदाची गुढी उभी राहणार आहे. नेत्यांच्या, पक्षांच्या आश्‍वासनांच्या साखरेनी त्यावर तात्पुरता लेप लावला जाईल.

खेडी ओस पडताहेत. शहरे विस्तारीकरण चाललेय. स्वतःकडे पाहताना दुसऱ्याचे भानही तो विसरायला लागलाय.शेतकरी कामगार मिळत नाहीत म्हणून ओरड करताहेत. तर शहरातला युवक बेकार फिरतोय. महागाईचा तारू ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनतर सामान्याला जगण्यातला थोडा आनंद देणारा हा गुढी पाडवा महत्वाचा.

संस्कृती म्हणजे तरी काय? भुकेलेल्या घास द्या. शेजाऱ्यावर प्रेम करा. मुलांना जगाचे भान द्या. जेष्ठांचा आदर करा. कुणी रस्त्यात पडले तर त्याला हात देऊन उठवा. दुसऱ्यांचा आदर करा हे सांगणे.आज तीच दुर्मीळ होताना दिसत आहे.

राग, लोभ, भय, मत्सर या चौघांचे राज्य वाढतेय. जनमानसात जात-धर्माचे वचर्स्व वाढलेय.बुध्दिच्या शक्तिपेक्षा बळाची शक्ति वापरणाऱ्याचे प्रमाण जास्त होते आहे. समाज संकुचित बनू पाहतोय. "स्व"च्या पलिकडे पाहण्याची दृष्टी अधू बनत चाललीय.जगण्यासाठी काम आणि कामासाठी धावणे वाढलेय. समाजाचे आपण देणे लागतो ह्याचा विसर पडतोय. घरातला संवाद कमी झालाय. टीव्ही भोवती कुटुंब फिरतय.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने यंदा लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहतेय. त्यांच्यापेक्षा मी चांगला. आश्‍वासनांची खैरात होती आहे.दुचाकीवाला नॅनो घ्यायला निघालाय. रस्ते, वीज, पाणी या मुलभुत गोष्टीकडे डोळेझाक होतीय. प्रश्‍न माहित आहेत पण ते सुटत नाहीत.यंदा नक्की मार्गी लावणार अशी आश्‍वासने मिळताहेत. सामान्याला जगणे मुश्‍कील करून सोडणारे हे दिवस.

सणाला सामोरे जाताना उद्याची काळची करण्याचे दिवस. म्हणूनच सावध व्हा. संस्कृती जपताना जबाबदारीचेही भान ठेवणे हेच या गुढी पाडव्याचे सांगणे.

सुभाष इनामदार,पुणे.

email- subhashinamdar@gmail.com

Sunday, March 15, 2009

रागरससिध्दांत साकारताना किशोरी आमेणकर..




गुरूने दिला ज्ञानरूपी

वसाआम्ही चालवू तो पुढे वारासाः

या प्रार्थना गीताचे
शब्द पुरेपुर सार्थ करणारा सोहळा नुकताच पुण्यात अनुभवला. पद्मविभूषण गानसरस्वती
श्रीमती किशोरी आमोणकरांनी सिध्द केलेल्या "स्वरार्थरमणी "या पुस्तक प्रकाशन
सोहळ्याचे वेळी. त्यांची गायिका म्हणून किर्ति आहेच .पण या सोहळ्याच्या निमित्ताने
त्या गायन शास्त्राचे स्वरूप किती सहजपणे शब्दातून कसे स्पष्ट करू शकतात याचा
जाहिरपणे प्रत्यय आला.

स्वरांची, रागांची मांडणी करताना त्यामागचा विचार ऐकणारा बालगधर्व
रंगमंदिरातला रसिक ते ऐकताना गाण्याइतकाच तल्लीनपणे ते मनात साठविताना अनुभवित
होतो. रागरससिध्दांत मांडताना किती विचार करून शास्त्रिय संगीताच्या रागांचे विवेचन
करणारा ग्रंथ साकारला त्याची तेव्हा कल्पना येते. रागाचा विस्तार करताना त्याच्या
स्वरांमधून तयार होणारा रस (म्हणजे आनंद ) अणि त्याची विविध रूपे साकारताना
होणाऱ्या स्वरांचे दर्शन त्यांच्या या अभ्यासपूर्ण विचारातून सार्थपणे बाहेर येते.
गायक गाताना रागांचा . त्यातल्या प्रत्येक सूराचा विचार कसा करत असतो याची जाणिव
त्यांची मुलाखत ऐकताना झाली.

एका अर्थाने "अभ्यासोनी प्रकटावे" म्हणजे काय याचे
दर्शन इथे झाले. जमलेले सर्वच चाहते शास्त्रिय संगीत जाणणारे नव्हते. पण तरीही
किशोरीताई जे विवेचन करीत होत्या ते एकाग्रतेने ऐकताना तोही त्यांच्या पुस्तकासाठी
केलेल्या विचाराने भारावून जात होता.हे पुस्तक साकारताना त्यांनी भरताच्या
नाट्यशास्त्राचाही अभ्यास करून राग मांडताना तोही एक नाट्यासारखा परिणाम करू शकतो
हेही त्यांनी पुस्तकातून उदाहरणातून दाखवून दिले.

गाताना त्यातले नाट्य कसे साकारले जात आहे ते
पाहण्याचा आपल्याला ध्यास लागल्याचे त्या सांगतात.राग साकारताना त्यातल्या भावालाही
किती महत्व आहे याचेही वर्णन त्या करतात.रंगमंचावर आपण स्वरातून राग साकारतो म्हणजे
स्वर बोलतो. तो गातो. तो जिवंत असतो. स्वरांची साधना केल्याशिवाय हे कळत नाही असे
किशोरीताई सांगतात. स्वरांचा समूह आळवताना रंगमंचावर स्वराभिनयच साकारत असतो
म्हणूनच गायन ही कला जशी आहे तसाच तो रंगमंचावरचा आविष्कारही आहे. जो श्रोत्यांच्या चेहऱ्यातूनही दिसतो. इथे श्रोताही तेवढाच महत्वाचा.

राग साकारताना किशोरीताई तल्लीन होतात तेवढ्याच
च्या स्वरांविषयी, रागांविषयी बोलतानाही होतात. म्हणूनच हा पुस्तक सोहळा अनुभवताना
त्यांच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या वाक्‍यांनाही वाहवाची दाद मिळते.
सुभाष इनामदार, पुणे

email-subhashinamdar@gmail.com

Tuesday, February 10, 2009

इंद्रायणी काठी जाहला आनंद


पुण्यात वाहणारे नद्यांचे पाणीही आज आनंदाने गाऊ लागले. पाण्याचा प्रवाह जरी आज खळाळत नसला तरी जेव्हा केव्हा तो बरसत होता तेव्हाची आठवण आज नक्की होणार आहे.

किराणा घराण्याची गायकी आपल्या मेहनतीने गळ्यावर चढविली. सवाई गंधर्वांच्या घरात पहाटे पाण्याच्या घागरी वाहिल्या आणि त्याच मनोभावे ते स्वरही कानात साठविले. त्या स्वरांचा सुगंध गदग पासूनच दरवळू लागला. पुढे तो गावोगावी पसरत गेला. शास्त्रीय संगीताच्या मैफलीतल्या गायनाने त्यांच्या स्वरांना पंख लाभले. पंखांत बळ निर्माण झाले आणि असे एकही शहर नसेल जीथे पंडीतजींच्या गायनाची मैफल झाली नाही.


आपल्या गुरूंच्या नावाने पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून हा स्वरोत्सव आजही अव्याहत सुरू आहे. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत आणि अभंगाना पंडीतजींनी सुस्वर बनविले. अजरामर केले.आज त्यांची तब्येत साथ देत नाही. तरीही ते मनात सुरांची सेवाच करताहेत. भीमसेन जोशी नावाचा सन्मान पुण्यात स्थिरावला आणि पुणेही धन्य झाले. आज पंडीतजींबरोबर पुणेही या महान गायकाच्या सहवासाने स्वतःला धन्य समजते. पुणेकरांना त्यांची नावलौकिक मिळवून दिला.

एक गोष्ट मात्र मोकळेपणाने सांगावीशी वाटते. त्यांची गायकी भारतातच नव्हे तर जगात आपली शैली प्रस्थपित करीत होते तेव्हाच जर हा सन्मान मिळाला असता तर त्याचे मोल अधिक वाढले असते. पंडीत जसराज म्हणतात त्याप्रमाणे हा सन्मान मिळायला उशीर झाला खरा. पण तो मिळाला हे विसरून चालणार नाही. आज सारेच संगीत प्रेमी आनंदाने अभंगवाणीचे सूर आळवतील.

कलाश्रीतला तो "स्वरदेव" तृप्तपणे भारतरत्न हा सन्मान घेताना धन्य पावला असेल. त्या स्वरदेवाच्या स्वरांना आणि त्याच्या प्रतीभेला तमाम भारतीयांचा मानाचा मुजरा!स्वर आज थंडावलाय पण तो एकेकाळी बरसत होता. महासागरासारखा खळाळत होता याची आठवण होते आहे.


सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com

Friday, January 30, 2009

पुण्यातल्या कलावंतांना हे कळणार तरी कधी?

दिवसभरात पुण्यात दोन-तीन सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात.कुठे अरंगेत्रम तर गाण्याची मैफल. आठवणीतली गाणी, ओठावरची गाणी नाही तर जुन्या संगीतकारांच्या गीतांचा बहारदार नजराणा.
खरे म्हणजे (आणि ते खरही आहे) इथ गल्ली-बोळात ( अणि आता तर पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातही) कलावंतांची खाण आहे. प्रत्येकालाच मोठे नाव मिळेल अशी शक्‍यताही नाही (ती त्याची अपेक्षाही नसते) तरीही त्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो.
आज सारे कलावंत कलेसाठी कला करत नाहीत. पोटासाठी नोकरी किंवा व्यवसाय असतोच. हौसेला ही आवड जोपासत असतो.
बहुधा संस्था कार्यक्रम करते. कधी कॅसेटच्या निमित्ताने तो होत असतो तर कधी स्वतःची कमाई टाकून तो स्वतःच सादर करीत असतो.
कार्यक्रम करण्यात गैर काहीच नाही. ते व्हायलाच हवे. नाहीतर त्याची तालीम आणि तीही रसिकांसमोर गायची- वाजवायची सवय कशी होणार?
होते इतकच त्यात जे सहजी शक्‍य आहे ते व्यावसायिक पध्दतीचे सादरीकरण मात्र होत नाही.
यासाठी पैसा जादा लागतो असे आजिबात नाही .इथे लागते ती सादरीकरणातील सफाई. निवेदक आरामात मांडी घालून आपले तेच ते विनोद वा किस्से लोकांवर आदळत असतो. वादकही रंगमंचावरच्या चौकोनी मंचावर बसून वाजवताहेत. त्यांच्या वादनात खोड काढत नाही पण त्यामुळे त्यातली जोश, उत्साह उणावतो आणि दिसतोही. गायक वही घेऊन गाण्यातले बोल आळवित असतो तेही बसून. (सगळेच जण असे करतात हा दावा मुळीच नाही)कार्यक्रम पाहताना स्वरांचा रवंथ केल्याचे फिलिंग येते.
ऐकणाऱ्याला आणि सादर करण्यालाही उभारी येईल अशी ती मैफल असावी. संख्या कमी असली तरी हरकत नाही. पण जे कराल ते पुन्हा-पुन्हा पहायला आवडेल असेच हवे.
रंगमंचावर कार्यक्रम करताना तो "सादर" होत असतो याची जाणिव ठेऊन जर केला तर तो अधिक मनपसंद होईल.
अशोक हांडेंचे कार्यक्रम त्यासाठी पहा. ती सफाई हवी. प्रकाशाची, ध्वनीची इवढी गरज नाही. पण प्रेक्षकांसमोर कार्यक्रम मांडावा कसा ते त्यातून समजेल.
एक नक्की. कलावंतात खोट काढण्यासाठी हे सांगत नाही. तर पुण्याचा तुरा मानाच्या पगडीतला शिरपेच म्हणून मिरवावा,हिच इच्छा!

सुभाष इनामदार, पुणे
subhshinamdar@gmil.com

Friday, January 23, 2009

मधूप मुदगल यांचे श्रवणीय गायन

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील तिसरा दिवस

मधूप मुदगल यांच्या गायनाने आरंभापासून रंगत गेला.

स्वरास्वराचा बारकाईने केलेला विचार. गमकयुक्त ताना.

आर्वतनातील शिस्त यामुळे त्यांचे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाले. हार्मोनियची साथ डॉ. अरविंद थत्ते यांची तर भरत कामत यांनी तबल्याची साथ केली.

- सुभाष इनामदार, पुणे

Thursday, January 22, 2009

रसिकांना रसिकांना भेटण्यासाठी "भारतरत्न" महोत्सवात "

शनिवारी संध्याकाळी मधुप मुद्‌गल यांचे गायन रंगत होते.
अचानक व्यासपीठाच्या उजव्या बाजूला धावपळ दिसली.
\एक पांढरी गाडी मंचाजवळ थांबली. कॅमेऱ्यांचे फ्लॅश उडायला लागले.
संगीत श्रोत्यांमधूनही चुळबुळ सुरू झाली.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी
"भारतरत्न' पं. भीमसेन जोशी रसिकांना भेटण्यासाठी दाखल झाले होते.
कांही काळ गाणे थांबविण्यात आले.
सर्वांचे लक्ष लागले होते गाडीत बसलेल्या पंडितजींकडे.
पंडितजी आल्याची घोषणा निवेदकाने केल्याबरोबर संपूर्ण सभागृह
त्यांना मानवंदना देण्यासाठी उठून उभे राहिले.पंडितजींना बोलवत नव्हते.
तरीही खास सुरक्षा व्यवस्था असलेल्या गाडीत बसलेल्या पंडितजींच्या हातात,
निवेदकाने माईक थोपविला.
अनेक वर्षांपासून आपल्या गायकीने रसिकांचे कान तृप्त करणारे पंडितजी म्हणाले,
""माझी पकृती बरी नसतानाही मी श्रोत्यांना भेटण्यासाठी येथे येण्याचा प्रयत्न केला'.
संपूर्ण श्रोतृवर्ग त्यांच्या या शब्दांनी धन्य झाला.
टाळ्यांच्या गगनभेदी गजरानेच त्याची जाणीव करून दिली.
कांही काळ पंडितजी गाडीतच बसले होते.
गायनाचा काही काळ आस्वाद घेतला.
कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मंचाजवळची ती पांढरी गाडी दिसेनाशी झाली.

Monday, January 19, 2009

पुण्यात दहशतवादी

सशस्त्र अतिरेकी पुण्यात आल्याची ही खबर आज तरी प्रत्यक्षात आलेली नाही.
पोलिसांचा शोध सुरू आहे.
बंदाबस्त चोख दिसतो आहे. खबरदारी चहुबाजुंनी घेतली आहे.
पुणेकर जागरूक पुण्यात दहशतवादी आल्याची खबर पोचली आणि पुणेकर जागृत झाले.
नागरीकांनी सतर्क रहावे यासाठी पोलिसांनी यंत्रणा मजबूत केल्याचे दिसले.
काल एक हवा निर्माण झाली होती. पोलिसांनी शहराची नाकाबंदी केली.
तातडीने शहरात वाहनांचे चेकिंग सुरू झाले.
मराठी चॅनेलवर काल सारखे तेच प्रामुख्याने दाखवत होते.
चौका चौकात बंदोवस्त वाढविला गेला होता.
काल रात्री तर तो अधिकच दिसत होता. पण रविवार तर शांतपणे गेला.
कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

आज सोमवार. कालची परिस्थीती आज नाही. तो आज बिनदिक्कत बाहेर पडलाय.
कुठलिही भितीची खूण न ठेवता.परिस्थतीला सामोरे जाण्यासाठी तो सतत तयार असतो.
आजही आहे. पुढेही राहिल.वरवर वाटणारा चिकित्सक पुणेकर देखील वेळी किती शूर
बनू शकतो याचा प्रत्यय लवकरच कृतीतून येईल.
काळजी नको .
संकट येणारच नाही.
आले तरी पुणेकर सामन्यासाठी तयार झालाय.
सशस्त्र अतिरेकी पुण्यात आल्याची ही खबर आज तरी प्रत्यक्षात आलेली नाही.
पोलिसांचा शोध सुरू आहे.बंदाबस्त चोख दिसतो आहे.
खबरदारी चहुबाजुंनी घेतली आहे. पुणेकर जागरूक आहे.
तो अधिक जागरूक होणाराय नक्की

Sunday, January 18, 2009

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...








छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत. एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत. घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत. घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी. मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.

असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण. घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.

अशी फुलवली
-बागेसाठीजागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्‍चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्‍या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत न घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली. नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्‍वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे न सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला. वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली.

आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली. यासंदर्भात माहितीसाठी "ऍग्रोवन'मधील लेख मार्गदर्शक ठरले.





सुभाष इनामदार, पुणे-५१
संपर्कः ९८८१८९९०५६

Tuesday, January 13, 2009

आयुष्य वाट पहाण्याचे


शाळे पासून वाट पहाणे सुरू असते.

लहानपणी रिक्षेची.

शाळेत बाईंची.

परिक्षेत पेपरची.

वार्षिक परिक्षेनंतर निकालाची.

शाळा सुरू होण्याची.

शाळा सुटल्याची घंटा होण्याची.

बाबा घरी येण्याची.

मित्र घरी येण्याची.

मैत्रीणीचा फोन येण्याची.

तिच्या भेटीसाठी वाट पहाण्याची.

लग्न पाहून केले तर तिचा होकार येण्याची.

पुढे संसारवेलीवर फुल उमलण्याची.

मुल रडायचे थांबून शांत झोपण्याची.

मुले माठी होण्याची.

डॉक्‍टरकडे नंबर लागण्याची.

प्रवासात असलो तर गाडी इच्छीत स्थळी पोचण्याची.

गाडीत जागा मिळण्याची.

आयुष्याचा प्रवास वाट पहाण्यात केव्हा निघुन जातो ते कळतही नाही.

हा प्रवास संपतो केव्हा याची वाट पहात जगणे एवढेच आपल्या हाती.


सुभाष इनामदार, pune

Tuesday, January 6, 2009

तरूणांच्या संवेदना कळत नाहीत

तरूण पिढीच्या संवेदना कळायला जरा अवघड जाते. त्यांच्या भावना सांगण्याची पध्दतही वेगळी आहे. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असते. ती मिळविल्याशिवाय ते शांत होत नाहीत.
मागणी करताना आजूबाजुच्या परिस्थितीचा विचार केला जात नसावा. यामुळे हाते काय?
ते मागत नाहीत तर आग्रह धरतात. ते विचारत नसतात. थेट सांगतात.

पालक म्हणून पाहिले तर, आपल्या काळात काय होते, कसे होते, ते सांगण्याची सोयच ऊरली नाही. पालकांचे उत्पन्न त्यांना माहित असते. त्यामुळे पालक मागेल ते देणार ही मुलांना खात्रीच असते.

यातुन निर्माण होतो. वाद. इथे संवादाला फार वाव उरत नाही.तो कदाचित एका बाजूनेही होऊ शकतो. कारण जे सांगू ते ऐकायची मनस्थिती त्यांची असेलच असे सांगता येत नाही.

एकूणच पूर्वी असलेला पिढीचा फरक काळ बदलला तरी तसाच पुढे सुरू आहे.
फरक इतकाच पात्रे बदलली. भुमिका बदलेले. संदर्भ बदलला.

काय हे तुम्हालाही पटतय ना?

सुभाष इनामदार, पुणे