Saturday, November 5, 2011

राजनभैय्या ६०




`गुरुकी कृपासे शब्द आ रहे है, तो वो उन्हीको अर्पित करना चाहिए`- या भावनेनं, स्वतः तरुणवयात रचलेल्या बंदिशींमध्ये आपले गुरू गायनाचार्य पं. बडे रामदासजी यांचे नाव गुंफणारे...पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांनी २८ आक्टोबरला एकसष्ट वर्षात पदार्पण केले.. या निमित्त रविवारी पुण्यात त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने जाहिर सत्कार समारंभ झाला...त्यानिमित्ताने लेख..


अमानतअलि-फतेअलि, सलामत-नजाकतअलि, लताफत-शराफत हुसेन अशा सहगायकांच्या नामांकित व्दयी शास्त्रीय संगीतात होऊन गेल्या. एकेकाळी बनारस घराण्यातही अमरनाथ-पशुपतीनाथ ही व्दयी सहगायनासाठी प्रसिध्द होती. नंतरच्या काळात बनारस घराण्यानं ठुमरी- कजरीचं गाणं इतकं समृध्द केलं की त्या घराण्याची ख्याल गायनाची महान परंपरा कमी होते आहे की काय असं वाटू लागलं. त्याचवेळी पं. राजन व पं. साजन मिश्रा या बंधुव्दयानं ती महान गायकी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली आणि सर्वार्थानं ती पुढं नेली. मातृ-पितृ दोन्हीही घराण्याच्या रक्तातून आलेला संगीताचा वारसा त्यांना दुसरं काही करुन देणारच नव्हता.

पं. सामताप्रसाद, पं. किशनमहाराजजी, आजोबा बडे रामदासजी, काका सारंगीस्रमाट पं, गोपाल मिश्रा, वडिल पं. हुनुमानप्रसाद मिश्रा अशा थोर गुरूंकडून राजन-साजन या बंधुंकडे संगीत विद्या आली आणि कठोर लगन आणि मेहनतीनं त्यांनी ती आत्मसात केली.

भारतरत्न पं. भीमसेनजींना पं. गोपाल मिश्रा सारंगीची साथ करीत. भीमसेनजींचा मुक्कामही बनारसला त्यांचेच घरी असायचा. त्याचवेळी गुरुंच्या सेवेप्रमाणे राजनभैय्या भीमसेनजींची सेवा करीत..अगदी पाय चेपून देण्यापर्यंत... साधारण १९७५ साली भीमसेनजींनी रेडिओवर मिश्राबंधुंचं गाणं ऐकलं आणि पं. गिरिजादेवींकडे ही कोण मुलं गाताहेत याची चौकशी केली. ते दोघे पं. गोपाल मिश्रांचे पुतणेच आहेत हे कळल्यावर त्याच वर्षी पुण्याच्या `सवाई-गंधर्व महोत्सवात` राजन-साजन मिश्रांचे सहगायन ठेवलं. त्यावेळी स्वतः भीमसेनजींनी मागे बसून तानपुरे जुळवून दिले....ही घटना सांगताना दोन्ही भावांचे डोळे पाणावले नवाहीत तरच नवल. पुढे या व्दयींचं गाणे पुण्यात असल्यावर काळी दोनची तानपु-याची जोडी भीमसेनजींकडून जात असे.

राजन-साजन मित्र परिवारात अफाट आणि समाजाच्या सगळ्या थरातील व्यक्ति आहेत....आमचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांच्या उमद्या स्वभावामुळे...त्याचं मैत्रीत कधी रुपांतर झालं व त्यांच्यामधल्या पद्मभूषण. पंडित अशा अनेक बिरुदावल्यांचा दबदबा कधी गळून पडला हे कळलचं नाही. आमच्यासाठी ते फक्त राजनभैय्या- साजनभैय्या होऊन गेले.
गेल्या सवाई-गंधर्व महोत्सवात,,रिहर्सलमध्ये पं. राजन-साजन बिभासचे स्वर आळवीत असताना, एक बाई बरीच मिनतवारी करून आत आल्या व त्यांनी पंडितजींना ..` मी इंदौरहून मुद्दाम आले आहे. २५ वर्षापूर्वी इंदौरला ऐकलेला तोडी परत ऐकण्याची इच्छा आहे`, अशी विनंती केली. त्यांच्या रसिकतेचा मान ठेबून दोघांनी ऐनवेळी अप्रतिम असा गुजरी तोडी सादर केला.

गेल्याच वर्षी कोल्हापूरला देवल क्लबच्या `अल्लादियॉ` संगीत महोत्सवात` राजन-साजनजींचं गाणं होतं. धुक्यामुळे पुण्यात सकाळी ११ ला पोचणारी फ्लाईट संध्याकाळी साडेपाचला आली. माझ्या गाडीतून आम्ही तडक कोल्हापूरला निघालो. तरी पोचायला ९ वाजले. तोपर्यंत सोलो तबलावादन करुन अरविंदकुमार आझादजी यांनी खिंड लढविली होती. पण १० वाजता कार्यक्रम बंद करण्याचा निर्बंध असल्यामुळे रसिकांची निराशा होणार होती. राजन-साजन भैय्यांनी स्वरमंचावर जावून उशीर झाल्याबद्दल संयोजक व रसिकांची माफी मागितली आणि दुस-या दिवशी संपूर्ण वेळ कार्यक्रम करण्याचं कबूल केलं. दुस-या दिवशी त्यांनी सादर केलेल्या `जोगकंस`ने तुडूंब भरलेल्या श्रोतृवर्गाचे डोळे वारंवार पाणावत होते. आजही रसिक त्या मैफलीची आठवण काढतात.

राजन-साजन हे पराकोटीचे अव्दैत आहे हे त्यांचं गाणं ऐकताना तर जाणवतंच पण त्यांच्याबरोबरच्या प्रवासात, गप्पांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. कोणतीही गहन चर्चा असो की विनोद ही बंधुव्दयी त्यात रंगून जाते आणि तीही मैफल रंगवून टाकते. `सूरसंगम`या चित्रपटासाठी `धन्य भाग्य सेवा का अवसर पाया` हे गाणं फक्त राजनभैय्यांना गायलं आहे..श्रेयनामावलीत आग्रहानं राजन-साजन मिश्रा असं नमूद करण्यास भागं पाडलं आहे..हेच ते अव्दैत.

गेली ५० वर्ष हे बंधू सहगायनच करत आहेत. अनेकदा मनात योजलेला राग बाजूला ठेऊन रसिकांनी फर्माईश केलेला राग ते गातात आणि..” आम्ही गात नाही तर आमचे गुरुजन व ईश्वर आमचा माध्यम म्हणून वापर करुन तो राग प्रगट करतात”..असं विनण्रतेनं सांगतात. गुरुकृपेमुळं राजनभैय्यांचे सुपूत्र रितेश व रजनीश हेही सहगायन करत आहेत.
अजूनही एकत्र कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवून, मुलांबाळांसह सर्व कुटुंब बनारसला एकत्र नांदते आहे. यात त्यांच्या पत्नींचीही त्यांना मोलाची साथ आहे. अजूनही आमची चूल एकत्रच आहे हे दोघेही अभिमानाने सांगतात.
संगीताप्रमाणे इतर बाबतीतही राजनभैय्या अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल या खेळांच्या आवडीप्रमाणे ( कॉलेजमध्ये ते क्रिकेटचे कप्तान होते ) जंगलात-निसर्गात मनमुराद भटकण्याची त्यांना आवड आहे. त्याविषयाचेही ज्ञान आहे. ओशांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन मकरंद ब्रम्हे यांनी या बंधूंच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारित `अव्दैत- संगीत` ह्या ९० मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली आहे. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या डॉक्युमेंटरी भागाचे उद्घाटन याच लघुपटाने होणार आहे.

एकमेकांच्या घराण्याविषटी अत्यंत आदर बाळगणारे असे महान कलाकार पाहिले की, जाणवतं की विविध घराणी- विविध गायवप्रकार असोत पण त्यांना बांधून ठेवणारं भारतीय संगीत हेच मूळात एक `अव्दैत` आहे.
राजनभैय्या!( आणि साजनभैय्याही) तुमच्याकडून ही संगीतसेवा अशीच वर्षानुवर्षे घडत राहो...अनेक उत्तमोत्तम शिष्यही त्यातून तयार होवोत..आणि तुमच्यातले हे संगीत अव्दैत अखेरपर्यत अखंड राहो..हिच इच्छा.....



-विजय मागिकर, पुणे
मोबा- ०९४२३५७७७५३

दोन मने


कोणच्याही क्षणी मन मनाशी दोन संवाद करत असते. एक होकारार्थी आणि दुसरं अर्थाचत नकारार्थी.
तुम्ही कुठेही निघालात तरी ते याच विचाराने काहूर माजते. मात्र ते तुमच्या संवंदनाना जोपर्यंत पूर्ण जागे करत नाही तोपर्यंत त्याची जाणीव नेणतेपणी होत नाही. ती संभ्रमावस्था असते. पण एकदा का निर्णय घेतला मग ती निर्णयअवस्था सतत टोचत ठेवते.
म्हणूनच कांही माणसांचा निर्णय झटकनं होत नाही. मात्र निर्णय. हा एकदाच घ्यायचा असल्यामुळे तो घेतल्यावर त्यात नंतर मात्र ते बदल करत नाहीत.
प्रत्येक जणच आयुष्यात अवेक वेळा नव्हे क्षणोक्षणी निर्णयप्रक्रीयेत अडकत असतो. जसे आपण म्हणतो, बोलण्यापूर्वी विचार करा. अगदी दहा वेळा. पण एकदा शब्द तोंडातून निघाला की मग ‘ जिथून तो जातो तिथे त्याची खूण उरत नाही. पण जिथे जावून पोचतो तिथे मात्र जखम होते.”
साधे प्रवासाचे उदाहरण घेऊ. बराच वेळ तुमच्या शेजारी अनोळखी माणूस बसलाय. दोघेही अबोल. मनाने निर्णय घेतला की त्याला नाव तर विचार.
काय हो, तुमचे नाव काय?
का. तुम्हाला काय करायचयं?
पलिकडून उत्तर आलं.
तर तुम्हा केवळ `सॉरी` म्हणून शांत बसता. पण मन तुमच्या निर्णयाला आव्हान देत रहाते. ते डिवचत असते. कशाला गेलास त्याच्या वाटेला ? काही गरज होती. शात बसून राहिला असतास कर काय झाले असते. घेतलास ना हात दाखवून अवलक्षण करून. नाहीतरी खोडच आहे तुझी जुनी...नको तिथे डिवचायला जातोस आणि मला मात्र निराश करतोस.
एखाद्याचा चेहरा पाहूनच समजते की याच्याशी नको बोलायला.
हे ठरविणारे तुम्ही नसता. नकळत तुमचे मनच तुम्हाला अनाहूत सल्ला देत असते...अगदी क्षणोक्षणी!
मुळातच मोठ्या निर्णयाच्या वेळी तुम्ही मनाचे ऐकण्यापूर्वी किंवा त्याचा निर्णय होण्यापूर्वीच अनेकांशी संवाद साधता.
`त्या` घटनेमागचा पुढचा विचार समजून घेता मगच तुम्ही काय करायचे ते नक्की करता.

अशा एका अवचित क्षणी `ती` भेटते..
तुमची ओळख होते
थोडं पुढं जावून स्पर्श करुन बघण्याचा आदेश येतो..
स्पर्श वाढत जातात
जादुभरी बोटं फिरू लागतात
तुम्ही तुमचे रहात नाही
तुम्ही कुणाचे तरी मन
त्याचे विचार ऐकत असता...
सहाजिकच त्यातच हरवून जाता..
हुरहुर लागते. ओढ वाढते.. त्या वेदनाही मग गोड वाटू लागतात..
क्षणांचा सहवास... अधिकाधिक लाभावा अशी इच्छा होवून जाते.
तृप्ती होत नाही. अधुरेपणा सतत जाणवतो..
तिचे मन नव्हे.. तीच तुमच्यापाशी रिती होत असते..
भावना संवेदना बोलल्या जातात.
थोडं ओझं वाटतं. पण ते समजून घेणचं
पहिल्यांदाच वेगळं काही अनुभवून सोडतं.
तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय घागर
एकमेकांची नाती अस्पष्ट दिसू लागतात
समाज यालाच प्रेमाची उपमा देत असावे.
सहज भेटलेलं ते फुल हुंगावसं वाटतें....

आणि मग.....

Thursday, November 3, 2011

नाद-स्वर



स्वर निघतो ओंकाराच्या नादातून.
फक्त असतो नाद. नादाला आकार देतो तो माणूस.
आकाराला उच्चार बनून त्याचीच आवर्तने होतात.
अशी अनेक आवर्तने झाली की होते तान.
तान थांबते, थबकते तिथे येतो सम.
समेबरोबर साधली जाते नव निर्मितीची प्रेरणा.
पुन्हा तोच आकार दिर्घ वेळ घेतला की होणारा नाद अवकाशात गुंजत राहतो.
नादमधुरता तिथे जाणवते.
हे सारे बनते त्या आवाजाच्या जादुने. त्यानेच दिलेल्या प्रेरणेतून अनेकविध आवाजाने स्वरसमूह एकत्र होतात. प्रत्येकाच्या पट्टीत त्याची नादमयता बहुआयामी बनते. नानाविध आवरणांची ही किमया माणसाला साधता आली.
स्वराच्या आवर्तनाने ती मिळाली.

आधी येतो गोंगाट...मग एकू येतो नाद... नादातून उमटतो तो स्वर....

एक मनात आले ते टिपले कागदावर. तुम्हापर्यंत पोहचविले.
कांही तुम्हाला यात सांगावासे वाटले तर स्वागत आहे.




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, November 1, 2011

कलेवर मनापासून प्रेम करणारी तू



स्वतःवर आणि स्वतःच्या कलेवर मनापासून प्रेम करणारी तू
आत्मविश्वास आणि करुन दाखविण्याची जिद्द
तारांच्या कंपनातून स्वर निर्माण करण्याचं सामर्थ्य़
कलेत रमणारं तुझं मन
वडिलांची कडक शिस्त
करारी स्वभाव
यातूनच तुझ्यात करुन दाखविण्याची हिंमत आली
पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यामुळे व्हायोलिनवर पूर्ण लक्ष केंद्रित केलेस
स्वर शोधण्यासाठी अपार मेहनत घतलीस
अनेक कलावंतांना साथ करताना बिदागीचा विचार केला नाहीस
सतत या ना त्या कार्यक्रमात रसिकांसमोर दिसत राहिलीस
आधी आई-वडीलांच्या घरी, अभ्यासात नंबर कमावून वाद्याची साधना एकाग्रतेने केलीस
स्वतःला झोकून दिलेस
संगीत ऐकलेस
मनन केलेस
स्वतःची छाप वाद्यावर पाडलीस
वाद्यावर हुकमत गाजविलीस
स्वतःचे कलावंत म्हणून स्थान मिळविलेस
साथ करताना मनातून स्वरात
आपल्याच नादात
तन्मयतेने कुशलता मिळविलीस
आकाशवाणी, दूरदर्शनवर स्वतःला सिध्द केलेस
टेलिफोन खात्यात सेवा करतानाही कलेला प्राधान्य देताना संबंध जपलेस
खात्याअंतर्गत स्पर्धेत स्वतःच्या कलेला आणि व्हायेलिनलाही बोलते केलेस
कलावंताची स्वतंत्र ओळख न करुन देता
माणूसकीचे धागे निर्माण केलेस
संबंध दृढ केले, राखले, वाढविले, घडविलेस
सासरी संसारात स्वराला आणि घरातल्या कामांना अग्रक्रम दिलास
नात्यात चांगूलपणा जपलास
सासू-सास-यांवर आनंदाचा वर्षाव केलास
पतीच्या सुखात सुख
दुःखात, कष्टात बरोबरीच्या नात्याने उभी राहिलीस
प्रसंगी त्याच्याही गुणांना वाव दिलास
मुलांना वाढविताना
संस्काराबरोबरच सूरांचे लोण पसरविलेस
घर स्वरसंसारिक केलेस
तपाला फळ येईतो साधनेत रमलीस
कुणाचा दुस्वास केला नाहीस
कुणाला अति महत्व दिले नाहीस
नाती, मग ती संसारातली किंवा सूरांच्या साधकांची असो, कायम राखलीस
रसिकांतही केवळ साथीदार म्हणून लोकप्रियता न मिळविता
स्वतःच्या वाद्याने, क्वचित प्रसंगी आपल्या सूरांनी आपलेसे केलेस
गाणी गुणगुणत राहताना गाण्यांनाही आळविलेस
सुगम संगीताची तालिम मिळविलीस
साधकाची इतिपूर्ती न मानता आजही प्रामाणिकपणे तालीम करत राहिलीस
स्वतंत्र वादन व्हावे अशी रसिकता मिळविलीस
प्रसन्न चेहरा, वादनातील किमया, सौदर्य कायम ठेवलेस
चाळीस वर्षांचा हा कला प्रवास अनुभवलास
पारदर्शीपणा जपत
मनमोकळा संवाद करत राहिलीस
सूरांची संगत सतत मनात घर करुन ठेवलीस
श्रध्देने, रियाजाने आणि चिकाटीने वाद्यावर हुकूमत कमावलिस
असाच सूरांचा सुरेल संसार सुरु ठेवलास
वयाची पन्नाशी आली तरी तोच भाव मनात राखलास
निष्काम कर्मयोग अखंड करत राहिलीस
निकोप आणि सुद्ढ वातावरणात स्वतःला घडविलेस
अशीच सुरांची परंपरा राखत स्वतःचे नाव रेखाटत रहा
हातातल्या बो मधून जसा स्वर तयार करतेस
तसाच सच्चा सूर गळ्यातून..शब्दातून निघू देत
निगर्वीपणा जपत... साधेपणा कायम ठेव
पैशापेक्षाही वेळेला आणि कलेला महत्व दे...
सुखाचा क्षय कधीच होणार नाही....



सुभाष इनामदार..
२.११.२०११

शिवराज गोर्ले- जिवनात आनंद फुलवू



ज्ञानप्रबोधनीत यातून देशाला काय मिळेल..असा विचार करायला लावणारे शिक्षण नाकारून नाटक केल्याने देशाला यातून काय मिळेल? हा प्रश्न विचारला गेला... तेव्हाच मला नाटक करायचं आहे.. यातून देशाचा काय तोटा हेईल? हा विचार करतच..ती ज्ञानप्रबोधीनीची कास सोडली. मग ज्यातून स्वतःला आनंद मिळेल तेच करीत राहिलो.

पूर्वी नाटकात स्वगत जशी असायची तशा पध्दतीने त्यांनीच बोललेल्या शब्दांमधून हे लिहायचा विचार केलाय..म्हणून तसे वाचताना वेगळे वाटत
असेल...


पुढे एमबीए उत्तम गुणवत्तेत पास झाल्यावर त्यावेळी एके काळी नावलौकिक असलेल्या फिलिफ्स कंपनीत पर्सोनेल मॅनेजरची नोकरी स्विकारली...पण तिथेही कामगारांनी एका गुरुवारी पुन्हा वडाच कॅंटींनने दिल्याने ...आणि चहासाठी दूध पुण्यातून येईपर्यंत कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे मिळावेत ही कामगार युनियनने मागणी केल्यावर न पटल्याने राजीनामा दिलेल्या शिवराज गोर्ले यांनी नेकरी न करण्याचा संकल्प केला.

नाटके लिहली, चित्रपट संवाद लिहेले...मात्र इतरांना सांगताना त्यांचे जिवनात आनंद फुलवू शकतो हे सहका-याच्या अनुभवातून समजले...पुढे तेच लेखन करण्याचा निर्णय घेतला. मजेत कसं जगावं? हे स्वतः इतरांना सांगत गेलो...पुढे् तेच पुस्तकातून लिहित गेलो. वाचकांशी संवाद साधत लेखन केलं. वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला...आज इतरांची दुःखे कमी करण्यासाठी आपले लेखन उपयोगी पडल्याची उदाहरणे जेव्हा समोर आली..तेव्हा ठरविले इतरांच्या जीवनात आनंद देण्यासाठी लिहायचे... माझ्या पुस्तकाने आठ-दहा तरुणांच्या आत्महत्त्या रोखू शकलो....

आपल्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभात शिवराज गोर्ले बोलत होते. त्यांच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्त्यिक ह.मो.मराठे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्वात झालेल्या या कार्यक्रमात विकोचे अध्यक्ष पेंढरकर यांच्या हस्ते सत्कार केला गेला. राहूल सोलापूरकरांनी गोर्ले यांना बोलते केले. महेश कोठारी यांनी शिवराज यांच्या लेखनाचे कौतुक केले.

आज त्यांची साठी पूर्ण झाली...आयुष्याला कलाटणी देणा-या घटना आळवत ....आपल्याला जे सांगायचे आहे त्यासाठी लेखनाचा मार्ग स्विकारुन आज ते साठीतही मजेत तर आहेतच पण ते इतरांनाही आनंदी बनविण्यासाठी लेखन करताहेत....इंग्रजीतील पुस्तकांसारखी त्यांची जीवनात आनंद देणारी..जगताना येणा-या अडचणींना तोंड देण्यासाठी बळ देणारी अनेक पुस्तके विचकप्रिय झाली आहेत.

आज त्यांच्या लेखी लग्न न केल्याने अनेक मैत्रींणींना ते आपले वाटते वाटतात. तीन जणींनी नकार दिल्याचे सांगताना एकीने मित्र म्हणून मैत्री केली. मात्र स्त्रीयांच्या अनेक दुःखांना त्यांनी पुस्तकातून बोलते केले आहे.
बालगंधर्वात रंगलेल्या कार्यक्रमाला चित्रपट, नाटक, साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातल्या मंडळींबरोबरच शिवराज गोर्ले यांचे मित्रमंडळींचा भरणा अधिक होता.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552586276

Monday, October 31, 2011

काळाप्रमाणे घडणारी नवी पीढी


- निर्मला गोगटे

“आजच्यासारखी परिस्थिती असती तर माझ्यातली कलाकार स्त्री कुठच्याकुठे पोचली असती...ज्या काळात मी काम करायला लागले तो काळ स्त्रीयांना मानसिक दडपणात ठेवणारा आणि समाजाचा दबाव असेलला होता. तरीही मला जेवढे शक्य झाले तेवढ्या प्रामाणिक पणाने मी संगीत रंगभूमिवर अपार मेहनत घेऊन भूमिका केल्या. आज मी त्याबद्दल काही अंशी का होईना समाधानी आहे.. मात्र नवी पीढी शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटविणारी आहे. हुशारही आहे. काळाप्रमाणे स्वतःला घडविणारी मेहनती आहे.”...

आपल्या वयाला २ नोव्हेंबर २०११ ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठी संगीत रंगभूमिवर स्वतःची स्वतंत्र छाप पाडणा-या.. संस्कृत नाटकापासून वयाच्या १६ व्या वर्षी `मृच्छकटिक` नाटकात काम करुन सुमारे ३५ वर्षे अनेक संगीत नाटकात भूमिका केलेल्या सौ. निर्मला गोगटे आपल्या कारकीर्दीविषयी भरभरुन बोलत होत्या..

सी. आर. व्यास, व्ही. आर. आठवले, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, जगन्नाथबुवा पुरोहित, कृष्णराव चोणकर, राम मराठे अशा गुरुंकडून तालीम घेऊन स्वयंवर, सौभद्र, मानापमान, सत्याग्रही, संशयकल्लोळ, शारदा, विद्याहरण, एकच प्याला, मृच्छकटिक, सुंदरा मनामध्ये भरली आशा अनेक संगीत नाटकात नायिकेच्या रुबाबात दिसणा-या आणि तेवढ्याच जिद्दीने नाट्यसंगीताचा खजाना संगीत रसिकांसमोर सादर करणा-या या कलावंत... आजही तेवढ्यात डौलाने वावरताहेत. उत्तम कांती, तजेलदार आणि आनंदी चेहरा, स्वरांशी नाते कायम ठेवत रंगभूमिवरच्या नाटकांबाबतच्या साक्षीदार असलेल्या निर्मला ताई बोलत होत्या.

शास्त्रीय संगीताची बैठक पक्की करुन नाट्यसंगीतात स्वतःचे नाव कमावले. आणि आज स्वरांशी नाते घट्ट पकडून ठेवत सुमारे दहाएक शिष्यांना ही कला शिकविण्यासाठी तत्परतेने उभ्या असलेल्या सौ. निर्मलाताई गोगटे यांच्याशी बोलताना त्यांनी पाहिलेल्या संगीत रंगभूमीवरच्या अनुभवांचे नमुने ऐकत मीही त्यात रंगून गेलो.

वसंतराव देशपांडे, राम मराठे, सुरेश पळदणकर, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले, सरस्वतीबाई राणे, नानासाहेब फाटक, मा. द्त्ताराम, परशुराम सामंत अशी कित्येक दिग्गजांची नावे बोलण्याच्या ओघात ओठी येतात.

नानासाहेब फाटकांसारखा नट होणे नाही...सांगताना त्या म्हणतात `त्यांचे गद्य संवाद हे पद्यासारखे लयदार असत. काय त्यांचे वावरणे. संवादातली ताकद तर औरच`.


आजवर शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अगदी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या दर्दी श्रोत्यांची दाद मिळविली. नाट्यसंगीत गायले. मात्र नाव मिळाले ते संगीत रंगभूमिवरच्या कामामुळे.
माहेरी वडील डो. बापट यांच्या पाठिंब्यामुळे आणि इकडे म.ना. गोगटे यांच्या संमतीमुळे.

सुमारे ६३ वर्षे मुंबईत वावरल्यानंतर गोगटे पती-पत्नींनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. नबी पेठेतल्या भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांच्या घरामागच्या परिसरात ते आज दोघेही शांततामय सहजीवनाचा आनंद घेताहेत. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी मुंबईत संसारात रमली आहे. आता संगीत दान हेच धेय्य मनाशी ठरवून ठराविक निवडक साधकांना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे शिक्षण देत आहेत. त्यांच्याकडे शिकणा-यांना अट एकच स्वर तंबो-यावर लावायचा. सुगम जरी गायचे तरी सूर तंबो-यावर जुळला पाहिजे. आजही कुणी नाटकात काम करायला सांगितले तरी सगळी संगीत नाटके पाठ असल्यामुळे तयारी आहे... सहजच त्या उद्गारतात..

पती इंजीनियर. आता रिटायर्ड जीवन जगताहेत. मराठी विज्ञान परिषदेचे काम करत कार्यरत आहे.

निर्मला ताई...कधी कधी काही कविता, लेख लिहितात. त्यातल्या कांहींचा लाभही तुम्हाला कधी मी देणार आहे. आज मात्र त्यांच्या या ओळींनी या लेखाची सांगता करु या.... आणि त्यांच्या यापुढल्या जीवनात त्यांच्यातल्या जिद्दीला दाद आणि मनात ठरविलेल्या कार्याची महत्वाकांक्षा कायम रहावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना....

गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....





सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276


Vocalist Ms. Nirmala Gogate

1. Ms. Nirmala Gogate (born 1936) is a well known vocalist in Classical Hindustani Music. She was trained by doyens of Hindustani Music like C R Vyas, B R Deodhar, G D Agni, V R Athavale. She is well known for Natya Sangeet on Marathi and Sanskrit stage. She has authored a book in Marathi on inter-relation of music on Gujarati, Marathi and Kannada. stage. She has given number of public performances in India and United States.
2. She had appeared on TV and radio number of times. Her Marathi record < shrihari god' tujhi baasari (Lord Krishna ! Your flute sounds sweet.) > sung in Raag Bhairavi is well acclaimed by Marathi music lovers. She was honoured to present the Song of Maharashtra when Prime Minister Indira Gandhi inaugurated new Maharashtra Vidhan Bhavan (Legislature Building) at Mumbai in 1981. She was recipient of Balgandharva award of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad (2001). In yesteryears, she played musical heroine roles with Stalwarts like Ram Marathe, Chhota Gandharva and Daji Bhatawdekar.
3. Married to Mr. Madhukar Gogate, she lives in Pune. Her maiden name was Nirmala Bapat.
4. Sampling of a song by Nirmala Gogate - Click here to listen Vad Jaau Kunala Sharana in mp3 format(354KB). If you are on a slow dialup connection please download the file for offline hearing. English meanings are given in brackets below: Symbol-sound relations for Marathi are given in articles (e03.htm, m12.pdf) on this website.

vada (tell) j'aau (may I go) kun'aalaa (to whom) sharan'a ( for protection) ga (oh) ?
karil (will do) j'o (one who) haran'a (removal) sankat'aach'e (of crisis)
mi (I) dharina (shall touch) charan'a (feet) tyaach'e (of him) aga (oh)
sakhaye (dear friend).

This is at start of a song (with musical instruments) in Marathi play Saubhadra, in raag jogiyaa (tunes of pathos). Here princess Subhadra, distressed by lack of support from her family, repeatedly and repeatedly asks her close companion (sakhaye, ga, aga are ways to call a female friend). Tell me dear friend, please tell me, who will resolve this crisis? I shall touch feet of (= bow to ) that person.
Nirmala Gogate while playing a role on Marathi stage
Nirmala Gogate
Nirmala Gogate presenting a favorite song of Dinananth Mangeshkar
Nirmala Gogate presenting a favorite song of Deenanath Mangeshkar, legendary singer on Marathi stage. Veteran film actor Dilip Kumar and world-famous singer Lata Mangeshkar (daughter of Deenanath) were present at a function to rename a road as Deenanath Mangeshkar Road. ( Location -- A hill opposite to Bhatia Hospital in south Mumbai. Around year 1982)
Nirmala Gogate singing at 1978 Marathi Vidnyan Parishad
Nirmala Gogate giving voice culture demonstration, with Sita Tipnis (harmonium) and Prof R V Sovani to explain the related human anatomy. Year 1978 Marathi Vidnyan Sammelan. Nirmala took training in voice culture from renowned vocalist B.R. Deodhar.