Thursday, July 11, 2013

नाटकावरुन चित्रपट...`श्रीमंत दामोदरपंत`

पुन्हा एकदा नाटकावरुन चित्रपट तयार करुन केदार शिंदे चित्ररसिकांना वेगळ्याच अनुभूतीची करामत पडद्यावर दाखविणार आहे.

१९९८ साली `श्रीमंत दामोदरपंत` हे नाटक गाजले ते वेगळ्याच पध्दतीने..त्याच्या सीडीची प्रचंड विक्री झाली. केदारच्या यानाटकाच्या सीडी भराभर घरोघरी दिसायला लागल्या ..नाटकानेही लेकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. ...आता मात्र केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश दत्त यांच्याकड़ून आपल्या या नाटकाचे विस्तारलेले रुप आकारात आणत पुन्हा एकदा नाटक विसरुन याचा चित्रपट तयार केला आहे.

अतिशय गंभीरपणे हा चित्रपट तयार केला आहे..मला खात्री आहे..ज्यांनी नाटक पाहिले आहे आणि ज्यांनी पाहिले नाही अशा सा-यांना श्रीमंत दामोदरपंत नक्की आनंद देईल...यात कोणताही उपदेश वा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही..केवळ अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मध्यमवर्गींयांन दोन तास करमणूक देणे एवढाच उद्देश ठेऊन चित्रपट बनविल्याचे  केदार शिंदे सांगतात.


माहेरची साडी...सारख्या हमखास स्त्रीयांच्या डोळ्यातून अश्रू काढणा-या भावनाशिल चित्रपटांची नायिका म्हणून ...अलका कुबल ....यांची प्रतिमा बदलण्याचे काम या चित्रपटाने केले आहे..त्या सुध्दा या चित्रपटातून आपल्या नव्या भूमिकेचा रसिक कसा आस्वाद घेत आहात हे पाहण्यासाठी  उत्सुक आहेत.
याचे सारे श्रेय त्या केदार शिंदे यांना देतात..त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतूकही करतात..आणि सांगातात.....`केदार शिंदे यांना टायमिंग सेन्स आणि बिटवीन द लाईन्स वाचायची खूप चांगला समज आहे. त्यांच्यातला मास्तर ते नेमके अचूक हेरतो..`

रंगमंचावर जे शक्य होत नाही ते अशा सिनेमातून दाखविता येतं...आणि काळानुरुप बदल करून ती कलाकृती सादर करता येते..केदार याबाबतीत चांगली संकल्पना राबवित आहे. नाटाकाला सिनेमाच रुप देऊन ती कलाकृती अजरामर करण्याची केदारची संकल्पना भरताला खूप आवडली..यामुळे भावीपीढीला इतिहास समजेल.

श्रीमंत दामोदरपंत २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पुण्यात कलाकारांच्या उपस्थितीत केदार शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटाबाबत माहिती दिली..


`कॉट्सटाऊन पिक्चर्स`..च्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात विजय चव्हाण , भरत जाधव, अलका कुबस, पियुष रानडे, चेत्राली गुप्ते, मृणास दुसानील, अभिनय सावंत आणि खास खलनायक शोभावा असा सुनिल बर्वे यांच्या भुमिका आहे.

वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी संगीत देलेल्या चित्रपटाचे छायालेखन संजय मेमाणे अनिल कचके यांनी केले असून खरोखरी श्रीमंतीपट वाटावा असा देखावा दिसून हिंदीच्या तोडीचे सेट वापरून चित्रपट नटविला आहे.

सध्या प्रमोशनचा धुमधडाका सुरु असून काही दिवसातच त्याचा परिणाम चित्रपटगृहात दिसून येईल. केदार शिंदे हे यापुढेही जुन्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त रहाणार हे आता नक्की झाले आहे.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, July 9, 2013

साधनाताई ,असंख्य मनाच्या श्रद्धास्थान

 साधनाताई ह्या असंख्य मनाच्या श्रद्धास्थान आहेत … आज  ९ जुलै हा साधनाताईंचा स्मृतिदिन … त्या निमित्ताने….

साधनाताई आमटे


श्रद्धेय साधनाताई,

सादर प्रणाम,

तुम्हाला आमच्यातून जाऊन आज ९ जुलै रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात तुमचे स्मरण झाले नाही असा दिवस माझा निघत नाही. तुमच्या बद्दल असलेली आंतरिक ओढ ही कायम होती आणि आहे. मला माहित नाही पण, बाबांपेक्ष्या मला तुमच्या बदल जास्तीचा आदर, आणि प्रेम होते. तुम्ही आयुष्यभर घेतलेले अपार कष्ठ. दु:खी, कष्ठी, अनाथ, अबाल, वृद्ध, मुके, बहिरे, कुष्ठरोगी, पिडीत, वंचित, यांच्या बद्दलची प्रचंड आपुलकी, सहानुभूती, ममत्व, करुणा, आणि वात्सल्य तुमच्या रोमारोमात होते. म्हणून तुम्ही आणि बाबा मोठ विश्व उभा करू शकलात.

“समिधा” वाचताना तुमचे अवघे जीवन किती कष्ठातून गेले आहे हे लक्षात येते, बाबांसोबत चा संसार, आनंदवन उभे करण्या पासून ते तुमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत महारोगी सेवा समितीचा झालेला भव्य दिव्य विकास, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, अशोकवन, मुळगव्हाण पासून सारे प्रकल्प केवळ तुम्ही बाबा, डॉ.विकास,  डॉ.प्रकाश आणि बाबांच्या सर्व सहकाऱ्यांनी समाजाच्या गरजे पोटी आत्मीयतेने उभे केले. लोकांनी प्रामाणिक साथ दिली.  अनेक मराठीच्या साहित्यिकानी, कलावंतांनी तुम्हाला व बाबांना मदत केली. त्यात पु.ल.देशपांडे, सुनिता देशपांडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले. त्यांचा आणि तुम्हा उभयतांचा ऋणानुबंध कायम राहिला. 


‘समिधा’ वाचताना तुम्ही घेतलेल्या सर्वव्यापी कामाचे, कष्टाचा आलेख तुम्ही मांडला आहे. बाबांबद्दल चे तुमचे प्रेम आणि तुमची त्यांना मिळालेली साथ प्रकर्षाने जाणवते.

ताई, तसा माझा आणि आनंदवन चा संपर्क आला तो मुळात तो १९८६ साली. १९८५ साली बाबांनी तरुणांना घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी राष्ट्रीय एकात्मते साठी सायकल यात्रा काढायची ठरवले आणि अंबाजोगाईच्या शैला लोहिया यांच्या मुळे मला या यात्रेत जायला मिळाले. आणि तिथून मग आपला व आनंदवनचा संपर्क आला. पुढे अधून मधून आनंदवनला जाणे-येणे होतेच. पण सोमनाथ च्या श्रम संस्कार छावणी साठी मात्र मे महिन्याच्या त्या अति प्रचंड कडक उन्हात शिबिराला येत असे. 


पुढे बाबा आणि तुम्ही नर्मदेच्या बचाव साठी मध्य प्रदेशच्या बडवानी, कसरावद ला गेलात आणि ८-९ वर्ष फारसा संपर्क झाला नाही. `मासळ’च्या प्रकल्प शुभारंभ प्रसंगी आणि तत्पूर्वी बाबांच्या वयाला ७५ वर्ष झाली म्हणून हेमलकसा येथे मोठा कार्यक्रम झाला. त्यात डॉ. प्रकाश चा ५० व वाढदिवस, डॉ.दिगंत म्हणजे `पिल्लू` चे वैद्यकीय शिक्षणपूर्ण झाल्या नंतर त्यानेही हेमलकसा येथेच काम करण्याचा निर्णय घेतला ...तो त्याचा लोकार्पण सोहळा असा त्रिवेणी संगम घडून आला होता. त्याचा साक्षीदार म्हणून मी तिथे हजर होतो. त्या नंतर आपली भेट झाली ती तुम्ही नर्मदे वरून परतल्यावरच. पण तुमच्या पश्च्यात डॉ. विकास व डॉ.भारती यांनी `आनंदवन `आणि डॉ.प्रकाश व डॉ.मंदा यांनी `हेमलकसा` येथील काम वेगवान केले होते.

२००५ नंतर माझे परत आनंदवनात जाने येणे वाढले, त्याचे कारण होते आपण परत आलात आणि `स्वरांनदवन` चे महाराष्ट्र तील प्रयोग. मी या ओर्केट्रा सोबत दौरा असलो कि जायचो. त्यातील अंध, अपंग, निरोगी कुष्ठरोगी, मुकबधीर मुलेमुली असा १२५ जणांचा चम्मू आणि त्याना या दौ-यात मदत करणे. पण आपल्या व आनंदवन च्या संस्काराने जे प्रेम, माया, आदर, ममत्व तुम्ही जागे केले होते, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची आपली उर्मी आम्हालाही बसू देत नव्हती. 


आम्हीच नव्हे तर `आनंदवनात` जे कोणी येत असे त्यांची आपण किती काळजी घेत असा ते तेंव्हा येणा-या व भेट येणा-या प्रत्येक पाहुण्यांना माहित आहे. कोण आले आहे, त्यांची निवास, भोजन, आणि इतर सोयी झाल्या की नाही हे आपण जातीने पहायच्या आणि कांही सूचना असतील तर त्या तुम्ही देत असा..

किती बारकाईने तुम्ही हे काम करता हे मी पहिले आहे. त्यावरून तुमचे जगण्याची शैली समजून जाई..तुम्हाला आणि बाबांना पहाटे आणि सायंकाळी फिरण्याचे आणि गप्पांचे खूप वेड होते. नवे विचार आणि समाजासाठी आणखी काय करायला हवे हे चिंतन त्यात चाले. तुमच्या या कामाची दखल जगाने, देशाने आणि उभ्या महाराष्ट्राने घेतली. अनेक पुरस्कार बाबांना, तुम्हालाही मिळाले. पण तसूभरही गर्व तुम्हाला आला नाही. हे महत्वाचे. तुम्ही कामाला आधीक महत्व दिले.

२००७ नंतर २-३ महिन्यातुन एकदा असे माझे आनंदवनला जाने येणे वाढले होते. बाबा २००८ साली गेले त्यानंतर जेंव्हा जेंव्हा मी तुम्हाला भेटायला आलो तेंव्हा आग्रहाने तुमच्या सोबत सायंकाळी फिरायला यायचो. माझ्या सोबत फिरायला येतोका? असा तुम्ही प्रश्न विचारला  कि, आनंदाने मी तुमच्या सोबत यायचो. अनेक वेळा तुम्ही माझ्या साठी ३-४ मिनिटे वाट पाहत थांबलेल्या आहात. मला खूप अस्वस्थ व्हायचे, कि साधनाताई या कर्तृत्वाने किती मोठ्या आणि किती साधे पणाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी साठी वाट पाहत थांबत असत. 


असेच एकदा मी आनंदवनला आलो होतो. अमेरिकेतून चंदा आठल्ये आल्या होत्या त्या दर वर्षी अमेरिकेतून भारतात आल्या कि आनंदवनला यायच्या. आज फिरायला तुमच्या सोबत मी, चंदा आठल्ये, नेहमीचे नामदेव आणि कोणी तरी एक बाई सोबत होती. हल्ली तुम्ही गाडीने जायचा. पायी चालणे बंद झाले होते. मग संपूर्ण आनंदवन चा फेरफटका. फेरफटका मारताना तुम्ही सोबत चॉकलेट, किंवा मुलांसाठी खावू ठेवायचात, मग गाडी जवळ आली कि मुल ताई, आजी नमस्कार म्हणून अदबीने हात पुढे करायची आणि मग तुम्ही त्याला कांही तरी बोलून हसवायचात, आणि मग ते चोकलेट हातात पडल्यावर त्या मुलांना काय आनंद व्हायचा,ते त्यांचे हास्य आजही आठवते, 

फिरायचे वेळी रस्त्याचा दोन्ही बाजूला आनंदवनचे कार्यकर्ते, कुष्ठरोगी, मुकबधीर मुले,अंध मुले-मुली अदबीने तुम्हाला नमस्कार करायची, तुमची गाडी दिसली, किंवा आवाज आला कि लोक हात जोडून उभे असायची. हा केवढा आदरभाव, सन्मान होता, ताई. तुम्हीही गाडी थांबवून कधी, चालत्या गाडीतून ख्याली, खुशाली विचारायचात. असे करत करत, मग बाबांच्या समाधीचे दर्शन, समाधीला दिवा-वात करणे आणि निघणे. आज तुम्ही गाडी खाली उतरला नव्हता. तेवढेही त्राण राहिले नव्हते., मग मी चंदा आठल्ये आणि नामदेव ने बाबांच्या समाधीला फुले वाहिली, दिवा बत्ती केले आणि परतलो. मी माझ्या रूमवर लोटीरमणला गेलो. तेवढ्यात तुमचा सांगावा घेवून नामदेव आला. ताईनी बोलवले आहे जेवायला. तुमची मेस उत्तरायण. तुम्ही शेवट पर्यंत इथेच जेवण घेतले, सर्वांसोबत सामुहीक. तुमचा निरोप येताच मी धावत आलो तर खुद्द तुम्ही, आनंदवनचे विश्वस्त नरेंद्र मेस्त्री, चंदा आठल्ये आणि इतर सर्व तिथे होते. सर्वांची ताटे तयार होती आणि तुम्ही चक्क माझी वाट पाहत होता. मी किती भरून पावलो, ताई माझ्या साठी जेवायचे थांबल्या....! पण यात तुमचे किती मोठे पण होते तो लपून राहिला नाही. तुम्ही सहज घेतले पण मी आजही विसरलो नाही.

तुमची जगण्याची जिद्द आणि संकटावर मात करण्याची प्रबळ इच्छा याला तोड नव्हती. शेवटच्या टप्प्यात तुम्ही अन्न वर्ज्य केले नाही पण खाण्याचे प्रमाण कमी केले, “शरीर आपल्या हातून गेले कि जगण्यात काय अर्थ आहे” हे तत्वज्ञान तुम्हीच आम्हाला सांगितले. अश्या परस्थितीत तुमच्यावर कर्क रोगाने घाला घातला. नागपूरच्या दवाखान्यात तुमच्यावर शास्राक्रिया झाली. मी भेटायला आलो, तसे अनेक जण भेटले, त्या सगळ्यांना तुम्ही जातीने अश्याही अवस्थेत चहा द्या, पाणी द्या, जेवण झाले का? कुठे थांबला,कधी आलात? कधी जाणार? असले प्रश्न विचारत होता. तुमचा वाढदिवस इथेच नागपूरला दवाखान्यात साजरा केला तो शेवटचा होता. सारे आमटे कुटुंबीय यावेळी एकत्र होते.....


तुम्हाला मी दवाखान्यात न्याहाळत होतो, आणि मला एकदम एक छायाचित्र आठवले, तुम्ही  एका अनाथ मुलीची वेणी करतानाचा. त्यात तिचा आणि तुमचा चेहरा किती फुललेला आहे आनंदाने. किती भाग्य या मुलीच्या वाट्याला आले होते, हे असे प्रेम, ममत्व मिळण्यासाठी मी का अनाथ, अंध, मुकबधीर, कुष्ठरोगी झालो नाही? असा प्रश्न पडला....मी जरा गंभीर झालो. पण तुमचे प्रेम हे असेच सर्वत्र पसरलेले होते, सगळे तुमच्या प्रेमात नाव्हून गेले होते. पण मी हे ही अनुभवले कि तुमचा, तुमच्या हातातल्या काठीचा दरारा आणि आदर केवढा मोठा होता.

तुम्ही अंबाजोगाईला यावे या साठी कांही तरी कार्यक्रम आयोजित करण्याचे मी ठरवीत होतो. बाबांना न्यावे असे वाटत होते, पण त्यांनी जे काम हातात घेतले होते, ते सोडून त्यांना इथे बोलावणे शक्य नव्हते. नंतर तर त्यांची तबेत बरीच खराब झाली. नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. मग २५ व्या रौप्य महोत्सवी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपात तुम्ही पाहुणे म्हणून यावे व तुमच्या हस्ते त्यातले पुरस्कार देण्याचा घाट तुम्हाला मी घातला. तुमचे वय, तुम्हाला असलेले पथ्य – पाणी, हे सगळे मला मान्य होते, पण तुमचा देवावर असलेला विश्वास,आणि श्रद्धा यावर माझा विश्वास होता, आणि तुम्हाला अंबाजोगाई च्या योगेश्वरी देवी चे दर्शन घडवावे, तिथून अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला जावू, असे म्हटल्यावर तुम्ही किती चटकन तयार व्हाल अशी अपेक्षा होती ....पण तुम्ही चक्क नकार दिला. मी माझे गांधीयन अस्त्र काढले, मी तुम्ही हो म्हणे पर्यंत, जेवणार नाही आणि आनंदवनातून वापस जाणार नाही असा हट्ट घरला. सुधाकर कडू, डॉ. पोळ, प्रभू,सदाशिव ताजने आणि अन्य लोकांनी तुम्हाला विनंती केली, माझ्या बद्दल तुम्हाला आपुलकी होती आणि जेंव्हा डॉ.विकास, कौस्तुभ, आमटे कुटुंबीयांनी अंबाजोगाई ला जाण्याची परवानगी दिली आणि तुम्ही अंबाजोगाई ला आलात हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले तेंव्हा तुमच्या साठी वर्षानु वर्ष आमच्याकडे या असा आग्रह करण्यार्यानी आश्चर्य व्यक्त केले.आणि तोंडात बोटं घातली. अंबाजोगाईतही लोक तिसरे आश्चर्य म्हणू लागले. तुम्ही आलात, देवीचे दर्शन झाले. 


यशवंतराव चव्हाण कधी काळी आनंदवनला येवून गेले होते तो धागा पकडून तम्ही छोटेसे भाषण केले. आणि भाषणात “मला अंबाजोगाई ला आणले या बद्दल दगडू ला नोबेल दिले पाहिजे” असे जाहीर सांगितले. तुमच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. ज्या हाताने पुरस्कार घेण्याचेच काम केले त्या हातानी पुरस्कार प्रदान केले. केवढे आमचे भाग्य होते, जाताना तुम्ही न थांबता अंबाजोगाई ते आनंदवन असा ५०० किलोमीटरचा टप्पा पार करून तुम्ही सगळ्यांना चकित केले. ८५ व्या वर्षी ही तुमची व्हीलपावर आजच्या पिढीला काय संदेश देवून जाते? अनंत उपकार तुमचे माझ्या वर आणि अंबाजोगाईकर यांच्या वर झाले.....!

आता तुमची तबेत बरीच खालावली होती, तुम्ही अन्न पाणी फारच कमी केले होते, असे निरोप अधून मधून येत. मी महिन्याला तुम्हाला भेटायला येत होतोच, आणि ७ जुलै ला तुम्हाला आनंदवनला भेटून परत अंबाजोगाईला आलो आणि ९ जुलै रोजी तुम्ही गेलात असे समजले. तत्काळ आनंदवन निघालो, अनेक पट डोळ्यातून पुढे सरकत होते, तुमचे निरागस, दु:खी, कष्ठी, अंध, अपंग, मूक, अनाथ लोकांसाठी साठी जे कष्ठ घेतले, त्यांना ममतेने वागविले, माणूस म्हणून उभा केले. त्यांच्या डोळ्यात तुमच्या आठवणीचे पाणी तरळणारच ना....

आणि हो, तुम्ही अनेक दगडांचे मैल मागे ठेवून गेलात. कित्येक अनाथ मुले तुम्ही आनंदवनात प्रत्येक कुटुंबात दिलेत सांभाळायला. आम्ही केत्येक वर्ष तिकडे आलो पण असे कधी कुठे जाणवले नाही कि हि मुले कधी काळी आईवडिलांची छ्याया गमावून बसले होते. इतके सहज त्यांना आनंदवनातील या पाल्यांनी नुसते सांभाळे नाही तर त्यांना शिकविले, चांगले शिकविले कि, आज ते वेगवेगळ्या पदांवर नौकरी ला आहेत, अनेकांची लग्न झाली, सुखी संसार चालू आहे, बाळ गोपाळ त्यांचा घरात खेळत आहेत, पण तुमचा हात या बाळांच्या डोक्यावरून फिरावा हे स्वप्न आता स्वप्नच राहिले... तुम्ही गेलात....आणि पोरके पणा काय असतो? हे आम्ही आणि आनंदवन मधली मंडळी अनुभवले,अनुभवत आहोत.

तुमची आठवण, आता आठवणच आहे.... असे वाटते कि तुम्ही कुठून तरी मागून येणार, आणि मिश्कीलपणे काठी उगारणार आणि मग हसून पाठीवर हात फिरवून विचारणार, कधी आलास? कधी जाशील?, कुठे थांबलास? जेवलास का?

आम्ही आता तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाण्याने डबडबलेल्या डोळ्यातून, अंधुकश्या नजरेने पाहत बसतो......या लवकर परत अशीच हाक देतो.





तुमचा
दगडू लोमटे.

Monday, July 8, 2013

त्यांना बालगंधर्व असे दिसले...

उतारवयातल्या गलीतगात्र झालेल्या बालगंधर्वांची एक खाजगी मैफल. नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात नारायणराव बालगंधर्व! मराठी संगीत रंगभूमीचा बादशहा, सम्राट!
पुण्यास किर्लोस्कर मंडळींच्या `गुप्तमंजुष` नाटकाचा प्रयोग पाहण्याचा मला योग आला आणि बालगंधर्वांचे काम मी प्रथमच पाहिले. त्या वेळी त्यांचा चेहरा भरलेला नव्हता,  त्यामुळे त्यांचे नाक पारशिणीच्या नाकाप्रमाणे चेह-याच्या मानाने मोठे वाटे. तरीपण सांग आकर्षक दिसे. नवीनपणामुळे नेसण्यासवण्याची टापटीपही दिसून येत नव्हती.

त्या दिवशीतर आवाज चिप्प बसला होता. मी आणि गु. भास्करबुवा शेजारी बसलो होतो.
आकाशाच्या गाली गुलाबी लाली निघाली..हे नंदिनीचे पद चालले असता आपला आवाज तार षडजाला जाणार नाही, म्हणून तानेला मध्येच मुरडून घेऊन आवाजातला दोष त्यांनी इतक्या मोहकपणे झाकून घेतला की, त्यांच्या भावी उज्ज्वल यशाचा त्याचवेळी कयास बांधता आला.

हा मुलगा पुढे नशीब काढणार असे आम्हा उभयतांनाही वाटले. संगीताबद्दल बालगंधर्वांमध्ये अनेक गुण आहेत. जवारीदार सुरेल आवाज, अत्यंत लवचिक गळा, दाणेदार तान, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा...याशिवाय त्यांच्या  गळ्यात अशी कांही लडीवाळ  लटक होती की जणू काय मुलीच्या कानातले डूलच जणू!  निर्व्याज लिलेने ते केव्हा व कोठे हलतील आणि वेड लावतील याचा काही नियम नाही...एकंदर गाण्यातील संथपणा व संयम (Restraint ) त्यांच्याइतका क्वचितच पहायला मिळेल. गायनाच्या शास्त्रीय प्रमादाचे गालबोट त्यांना दृष्टीच्या तिटीसारखे शोभादायक ठरते.  

अगदी सर्वसामान्य रागातील पदात ते एखादा विसंवादी अशास्त्रीय स्वर लावतील, किंवा तो अभावितपणे लागून जाईल , पण तो इतक्या सहजपणे व असा झोकाने की, त्यायोगे रागाला नाही, तरी चालीला नवीनच शोभा यावी.. त्यांच्या गळ्याला तान म्हणजे तर तळहाताचा मळ.. `नको नको` म्हणता गळ्याला लागून जायची, आणि तीत पुसटपणा नाही की तालासुराला धक्का नाही. 

अशा गायनाची जाणत्या-नेणत्या आबालवृध्दांवर मोहिनी पडावी व ती चाळीस वर्षे अबाधति रहावी, या पलीक़डे परमेश्वरी प्रसाद तो काय असू शकेल...शिवाय, घणघणीत आवाज, जुन्या प्रकारची गायकी, व जुन्या घाटाच्या किंना जुन्या थाटामाटाच्या नायिका ही साग्रगी मानवण्यासारखी त्या वेळच्या तरुण पिढीची मनोवृतीही नव्हती.

बालगंधर्वांच्या आवाजाची जात जवारीदार, गोड, पण बसकट..परंतु ती नाजूक असल्यामुळे व बोलण्यातही जुन्या बायकांचा कोरीव कमानदारपणा व ठेच नसल्यामुळे , त्यांचे संभाषण त्या वेळच्या तरुण- तरुणींना अनुकरणीय व अनुकरणसुलभ झाले. किर्लोस्कर मंडळीला त्या वेळी कॉलेज-विद्यार्थ्यांचाच  तीन तचुर्थांश समाज मिळत असे, हे याचेच द्योतक होते.



 (बालगंधर्वांविषचीचा हा उतारा घेतला आहे.`मर्मबंधातली ठेव ` या बाळ सामंत यांच्या पुस्तकातून. 
किर्लास्कर संगीत मंडळी याविषयी गोविंदराव टेंबे यांनी लिहलेल्या  जीनववीहार या त्यांच्या आत्मचरित्रातून...     श्रीविद्या प्रकाशनाच्या सोजन्याने..)


जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सर्व रसिकांना द्यायचं या हट्टापायी नाटकांचे पडदे, गालिचे, झुंबरं इत्यादींवर त्या काळातदेखील अक्षरश: लाख्खो रुपये खर्च केलेला, ज्याची शोफर्ड ड्रिव्हन गाडी होती, ज्याच्या कोटाला सहा सहा सोन्याची बटणं असत, ज्याच्या नाटक कंपनीत कलाकार आणि नोकरचाकर यांच्याव्यतिरिक्त रोजचं पन्नास-साठ पान सहज उठत असे बालगंधर्व!
त्यांचे वार्धक्य विपन्नावस्थेत जावे या परीस दुसरी शोकांतिका ती कोणती?
त्यांना पेन्शन मिळावं आणि दोन वेळचा भात तरी सुखाने खाता यावा म्हणून पुलंनी सरकार दरबारी खेटे घातले होते, पत्रव्यवहार केला होता!
पण 'दादा ते आले ना?' असा संवाद म्हणत स्वयंवरात 'नाथ हा माझा'च्या स्वरांची मनमुराद उधळण करणारा तो बादशहा सरकारी पेन्शनवर फार काळ जगलाच नाही! आणि नाही जगला तेच एका अर्थी बरं!
अहो सगळ्यांनाच सुनिताबाईंसारखी कणखर आणि तेजस्वी पत्नी नाही लाभत! नाहीतर बालगंधर्वांसारखेच पूर्णत: व्यवहारशून्य असलेल्या भाईकाकांचीही तीच गत झाली असती हे नि:संशय! आमच्या सुनिताबाई मात्र अनेकांकरता कटू ठरल्या, कजाग ठरल्या! परंतु त्यांची पुण्याई म्हणूनच तुम्हाआम्हाला भाईकाका लाभले नायतर या संधीसाधू जगाने त्यांचीही केव्हाच माती केली असती!
असो,
शेवट जरा कटू होतो आहे, भरकटतोही आहे पण त्याला माझा इलाज नाही. क्षमा करा..
नारायणरावांच्या 'नाथ हा माझा' करता मात्र आजही जीव तुटतो!
-- तात्या अभ्यंकर.


Sunday, July 7, 2013

चुका सुधारायच्या होत्या पण उशीर झाला...



पुण्यात आपल्या वडीलांकडून म्हणजे जयंत तारे यांच्याकडे बालरंगभूमीपासून रंगमंच गाजवत असलेला खरचं हरहुन्नरी कलावंत... निमित्त होते..गॅंगरीनचे..
पण जसा तो मुंबईत रुजू लागला त्याला व्यसनाने गाठले..त्याच्यामुळे त्याच्या कारकीर्दीवरही परिणाम झाला..तरीही अखेरपर्यत ...त्याच्यातला नट कायम जिवंत होता..त्याच्या स्मृती कायम जीवंत रहातील ..चित्रपटातून,,सिरियलमधून..काही नाटकातून...


पण पूर्वी एक प्रसंग त्यांच्यावर आला होता..तेव्हा त्याच्यावर मी कांही टिपण केले होते...पण तरीही त्याचे सारे चालूच राहिले..अखेरीस सतीश तारे...अनंतात विलिन झाले...तेव्हाच काही धडा घेतला असता तर...


नाटक हे व्यसन असले तरी ते परवडले. पण नाटकातल्या नटाला व्यसन लागले तर त्याचा तर तोल जातोच पण व्यवसायाचा तालही बिघडतो. असे व्यसनाच्या आहारी गेलेल्या नटांचे असंख्य किस्से रंगवून सांगितले जातात. ऐकताना आपण हसतो . कारण त्यातून रंजन घडते. क्वचित पाहिले तर त्यावेळेला त्याची कीव येते. मात्र हा प्रकार मारक इतका ठरतो की एखाद्या नटाची करीयर उध्वस्त होते.



त्याच्या विषयी अनेक प्रकाराने बोलले जाते..होते...पण कांही गोष्टी घडून गेलेल्या असतात..आपण फक्त बघत रहायचे...दुसरे काय...त्याची तळमळ अखेरपर्यंत होती... तो तारा चमकला..पण कांहीसा अंधुकसा..त्याच्या पुण्यातल्या शेवटच्या प्रयोगाच्यावेळी नेमके काय घडले..त्यांने तो कसा केला..याविषयी त्याचे मित्र संदिप पारखे यांनी मला पत्र पाठविले ते देत आहे..




सुभाष सर सप्रेम नमस्कार,

सर ,सतीश खरचं हरहुन्नरी कलावंत होता पण सर तो जाण्यामागे खरोखरच निमित्त होते..गॅंगरीनचेच. त्याला व्यसनाने गाठले..त्याच्यामुळे त्याच्या कारकीर्दीवरही परिणाम झाला हे अगदी खरे आहे. परंतु त्याला त्याच्यातील चुकांची जाणिव झाली होतीतो जवळ जवळ वर्षापासून सर्व व्यसंनांपासून दूर होता  त्याच्यामुळे त्याच्या कारकीर्दीत परत फरक पडला होता त्याच्यातील कलाकार प्रगल्भ होत होता ,त्याची कला खुलत होती अखेरपर्यत ...त्याच्यातला नट कायम जिवंत होता..त्याच्या स्मृती कायम जीवंत रहातीलच.

२० तारखेला बालगंधर्वाच्या प्रयोगाला मी गेलो होतो.त्याला त्याच्या जखमेच्या प्रचंड वेदना सतावत होत्या ,त्याला खरेतर तोच प्रयोग करायला नको होता. त्याला त्या प्रयोगात त्यातला सतीश व्यक्त करताच येत नव्हता. त्याला प्रयोगापूर्वी गाडीतून उचलून स्टेजवर आणले होतेपायावर प्रचंड सूज होती . प्रचंड वेदना त्याला होत होत्या .त्याही अवस्थेत त्याने तो प्रयोग केला .

 `गोड गोजिरी` नाटकात सतीश तारे काय चीज आहे आणि सतीशकडे काय काय आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होता .पण तो त्या प्रयोगात त्याला जमलाच नाही मी त्याला खूप वर्षे जवळून बघितल्यामुळे त्याला काय दाखवायचे होते ती तळमळ मला समजत होती. त्याचे पंचेस पाहिजे तसे बसत नव्हते. प्रयोग संपल्यानंतर त्याला भेटावयास गेलोतेव्हा विंगेतच बसला होता. पाय प्रयोगापूर्वी होता त्यापेक्षा दुपटीने सुजला होता. मला तर काय बोलावे सुचत नव्हते .त्याने मला नेहमीप्रमाणे विचारले..  

तो मला प्रत्येक नाटकानंतर कायम रिपोर्ट विचारायचा .त्यादिवशीही विचारला .मला तर काहीच सुचत नव्हते. मी त्याला एकाच शब्दात उत्तर दिले ...निशब्द !
सतीशची आई आणि बहिण आसावरी बरोबरच बसले होते. आम्ही सर्वच जण त्याला म्हणालो कि तू या अवस्थेत प्रयोग करायला नको होता .त्याची आई तर म्हणाली देखील .`तू आत्ता मुंबईला जाऊ नकोस तुला उपचारांची गरज आहे .महिन्याभराचे पूर्ण शेडूल रद्द कर .घरी चल .पूर्ण विश्रांती घे ..`
पण ऐकेल तो सतीश कसला त्याने ऎकले नाही परत मुंबईला जाऊन दोन प्रयोग केले .कारण त्याला परत एकदा भरारी घ्यायची होती. मलाही म्हणाला .`आपल्याला परत एकदा सुरवात करायची आहे..दोन नाटके डोक्यात आहेत ...`
पण हे त्याचे आमच्याशी बोलणे शेवटचेच. सर ,आम्हाला वाटले पण नाही कि हि आमची सतीशशी शेवटची भेट......  

सर तुम्ही सतीश गेला त्यादिवशी तुम्ही केलेल्या पोस्टला उत्तर त्यादिवशीच द्यायचे होते पण डोके चालतच नव्हते .माझ्याशी तो गेल्या तीन महिन्यात सारखे फोन वर फेसबुक ऑनलाईन बोलायचा. सर सतीश खरच बदलला होता. त्याने केलेल्या चुकांची जाणीव त्याला झाली होती .त्याच्या चुका सुधारायच्या होत्या ......पण उशीर झाला.....  

आम्ही मित्र रसिक एका सुंदर कलाकाराला मुकले हेच खरे. सतीश सर्वांना पोरके करून गेला हो. गेले चार दिवस त्याचे व्हिडीओ बघत बसलो आहे. काहीच सुचत नाहीये. सुभाष सर ,तुमच्यापाशी मन मोकळे करावे असे वाटले म्हणून हा पत्र प्रपंच.


                                                                                                                                            आपलाच,
                                                              संदीप पारखे





' सतीश तारे नावाच एक गारुड होत जे सहकलाकार आणि प्रेक्षक यांची मनोभूमी आणि रंगभूमी व्यापून टाकणार होत. तो आता परत दिसणार नाही ,त्याने लिहिलेले नाटक पुन्हा त्यानेच दिग्दर्शन केलेले पहायला मिळणार नाही ,तो आता आपल्याला सतत न थांबता भरभरून हसवणार नाही ,त्याच्या मधेच एखाद्या काळीज सुन्न करणा~या वाक्याने आपल्या डोळ्याच्या कडा पाणावणार नाहीत , त्यानेच लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी ऐकताच येणार नाहीत आणि त्यावर तालबद्ध रित्या थिरकणारी त्याची लयबद्ध आकृती आता दिसणारच नाही इतकेच काय वेतानेही थक्क व्हावे अशी लवचिकता आता पुन्हा रंगभूमीवर दिसणारच नाही, त्याच्या बरोबर रात्र, रात्र जागवणारे किस्से कथन आता होणारच नाही , हसून, हसून जीव गुदमरणारच नाही तर त्याच्या नसण्याने जीव गुदमरणार …. हे सारे ,सारे विचार मेंदू अगदी सुन्न करून टाकणारे आहेत … 
आमचा मित्र मिलिंद शिंत्रे याला तो म्हणाला होता कि "शिंत्रे गुरुजी आम्हाला स्टार होणे कधी जमले नाही बघा "!!… 'पण खर सतीश तू नावाप्रमाणे ताराच होतास … स्वयंभू ,स्वयंप्रकाशित … अरे तुझ्या आजूबाजूला तुझाच प्रकाश घेऊन आपण नट असल्याचा ग्रह करून फिरणारे किती पाषाण होते आणि आहेत …. आज केवळ तुझी नक्कल करून वरच्या पदाला पोहोचून पोट भरणारे दिसतात तेव्हा मनात एकच विचार येतो … 'ह्या कुठे सतीश आणि कुठे हे ' …. 
पण सतीश अरे काही गोष्टी कंट्रोल केल्या असत्यास तर याच सर्व लोकांना तुला पहाण्यासाठी आकाश दर्शनाची दुर्बीण सुद्धा कमी पडली असती अरे …. स्वत:च्या शरीरावर ,वाणीवर इतकेच काय चेह~यावरच्या प्रत्तेक पेशीवर ,तुझ्या चक्षुवर [तुझा एक डोळा स्थिर ठेऊन दुसरा गरागरा फिरवणे कसे विसरू अरे ??] पूर्णत; नियंत्रण असणारा तू …. काही,काही बाबतीत मनावर नियंत्रण ठेवले असतेस तर …. आजून कितीतरी वर्ष आम्ही दीपवणा~या अभिनयाचे सुख घेतले असते,असे नाही वाटले तुला ??? 
…. सतीश माझ्या सारख्या लेखकाच्या एखाद्या वाक्यात ,दिग्दर्शनात आणि अभिनयात कुठेतरी तू डोकावतोस … का नाही डोकावणार ??? अरे तू म्हणजे प्रपात होतास तुझ्या सानिध्यात असणा~या आमच्या सारख्यांवर काही तुषार उडणारच ना रे ???? खरच देव आता तरी तुझ्या अतृप्त आत्म्यास शांती देवो !! 
-सौरभ पारखे, पुणे