Saturday, November 4, 2023

संगीतभूषण राम मराठे एक स्मरण

पंडित राम मराठे जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी पुण्यात गानवर्धन पुणे, यांनी आयोजित केलेली ही अनोखी संगीत मैफल.. राम मराठे यांच्या गायनातील सादरीकरणात असलेल्या भरजरी स्वरांच्या लडा इथे हळुवारणे रसिकांच्या साक्षीने उलगडत गेल्या.. ही अनोखी मैफल राम मराठे यांच्यातल्या कलाकाराचे सर्व बाजूंनी असलेले महानपण ..त्यांची स्वरावरची हुकूमत..त्यातले तेज..अनेक गुरूंकडून घेतलेली विद्या आणि चतुरस्र बुध्दी साऱ्यांचे दर्शन शुक्रवारी एस एम जोशी सभागृहात घडले. जबरदस्त अशी तीक्ष्ण प्रतिभा लाभलेले राम मराठे नादब्रह्म स्वरुपात आजही किती रसिकांच्या मना मनात आहेत याची साक्ष कार्यक्रमातून येणारी दाद यातून बाहेर आली. बैठकीत गाणे आणि नाटकातील गाणे कसे आणि का वेगळे होते याचे मर्म त्यांच्या मुद्रित माध्यमातून उलगडले. त्यांच्या बाबतीतला आठवणींचा खजाना इथे अनेक मान्यवरांच्या प्रतीक्रियेतून कळत गेला. राम मराठे यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितलेल्या गोष्टी आणि गायकांच्या हुबेहूब केलेल्या नकला.. यातून ते गायक कसे होते याचे नेमके मर्म त्यांच्या स्मृतीला अधिक झळाळी देणारे होते. यात राम मराठे यांच्या चार पिढ्या रसिकांसमोर आल्या.. यात प्रामुख्याने मुकुंद मराठे , भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे - काळे , आदिश्री पोटे, मृणाल नाटेकर ,राजेंद्र मणेरिकर या त्यांच्या कुटुंबातील आणि परिवारातील कलावंतांचा सहभाग होता. माधव मोडक..तबला आणि लीलाधर चक्रदेव यांची हार्मोनियम संगत कार्यक्रमाला अधिक समर्पक अशीच होती. संजय गोगटे हे बाहेरून ऑर्गन साथ करीत होते. या खरोखरीच संस्मरणीय कार्यक्रमाचे निवेदन स्वाती मराठे.. थिटे यांनी केले होते. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Monday, October 23, 2023

एकदा अनुभवल्याच पाहिजेत..

अनवट शांताबाई..
व्हायोलीनचे ते हळवे सूर सायंकाळचे हुरहूर लावणारे स्वर मंचावर वाजत रहातात..आणि त्यातच सुरू होते ..ही वाट दूर जाते.. ह्या सुरावटिकडे आणि शांता जनार्दन शेळके यांच्या जन्म गावपासूनचा प्रवास अभिवाचनातून उलगडला जातो..बालपण..तिथले वातावरण..मनावरचे आईचे ...आज्जीचे संस्कार ..आणि एका ज्येष्ठ कवियत्रीच्या जीवनाचा तो काहीसा उदास वाटणारा अनवट प्रवास वंदना बोकील.. कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्याच पुस्तकातून शांताबाई ज्या व्यक्त झाल्या आहेत..त्या हळूहळू आपली कहाणी सांगु लागतात.. अनुराधा जोशी..दिपाली दातार..आणि वंदना बोकील या त्या शब्दातून तर कधी कवितेच्या बोलितून व्यक्त होऊ लागतात.. आणि या साऱ्या प्रवासाला व्हायोलीनच्या पार्श्वसंगीतात आणि साजेशा गाण्याच्या स्वरात अनुप कुलथे त्या वातावरणात घेऊन जातात.. एकूणच रसिक शांताबाई शेळके यांच्या आयुष्यातील एकेक घटना एकाग्रतेने ऐकतात आणि त्या गोष्टीचा मागोवा घेत..त्यांच्या जीवनात एकरूप होऊन जातात..
शांता शेळके यांची गीते मना मनात..घराघरात पोचली पण त्यांच्या कविता तेव्हढ्या पोचल्या नाहीत.. ही खंत त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दूर करून त्यांच्याच पुस्तकातून त्यांनीच लिहलेल्या शब्दांना एकत्र करून वंदना बोकील यांनी आपली अनवट शांताबाई सादर केली..आपल्या आम्ही सुदर्शन रंगमच इथे हा अनुभव घेतला..या कार्यक्रमात सहभागी होऊन रसिकांना त्यात सामील करून वंदना बोकील. कुलकर्णी आम्हाला त्या दिवसात घेऊन गेल्या. शांता शेळके यांच्या मनातील व्यथा आणि त्यांचे ते एकाकी जगणे आणि त्यांच्या मनोव्यथा दर्शविणाऱ्या कविता निवडून लहानपण..घरगुती वातावरण..त्यांची जात.. त्यांचे शिक्षण .. त्यांनी मुंबईत जपलेले नाते आणि कवितेशी त्यांची जमलेली गट्टी सारेच इथे व्यक्त होते.. परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडली आहे त्याची ही कहाणी.. ओठांवरती थोडे हासू डोळा थोडे पाणी ठेऊन शब्दांच्या जोडीला इथे कविताही बोलक्या होतात..या अभिवाचानात बोलून न बोललेल्या भावनाही मनाला भिडतात त्याचे कारण प्रभावी व्यक्त होणे या सादर करणाऱ्या कलाकारांच्या भूमिकेतून..
त्याची परिणाकारकता इथे ऐकताना तुम्हालाही जाणवेल आणि तुम्ही सहजी त्या वातावरणात सामील होता. शब्दातून व्यक्त झालेल्या ओळीतून त्यांचे जगणे अंगावर येते..आणि आपण ज्या आनंदी आणि मनमोकळ्या भासलेल्या शांताबाई खरोखरीच कोणत्या उदासवाण्या आयुष्यात जगल्या त्याची ओळख होते.. कारुण्याचा स्पर्श या अनवट शांताबाई कार्यक्रमात सतत तुमची पाठ सोडत नाही.. आणि मग शेवटी जेंव्हा असेन मी नसेन मी..ची ओळ येते तेंव्हा पर्यंत हाच आशावाद कायम राहतो..
खरे तर अशा कार्यक्रमावर थोडक्यात व्यक्त होणे ही परीक्षा असते..यासाठी त्यांच्या काही कविता यांचा संदर्भ घ्यायचा मोह टाळून सुदर्शनच्या मंचावर..उत्तम रसजी, वाचकांच्या साक्षीने अनुभवलेल्या शांताबाई..यावर व्यक्त होणे खूप कठीण आहे..तो अनुभव प्रत्यक्ष घेणे हेच उचित होईल. अश्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि ती अनुभूती मनात कायम ठेऊन त्यांचे स्मरण सतत ठेवावे असाच हा कार्यक्रम आहे.. चंद्र.. चांदण्या..फुले वेचून..त्यामागची कळ्यांची वेदना तुम्हाला जगायला अधिक शिकवेल हे नक्की..
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Friday, April 28, 2023

पर्यटकांचे सुख जपणारे अजित करंदीकर

रत्नागिरीचे अमृता ट्रॅव्हल्सची निवड करणारे आम्ही पुणेरी ..पण ती निवड किती उत्तम होती याची पारख आम्ही काश्मीर आणि आसाम, मेघालय अरुणाचल येथे जाऊन आल्यावर कळाले की ती किती उत्तम होती...याचे एकमेव कारण म्हणजे या कंपनीचे संचालक अजित करंदीकर.. पैश्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येकाशी नाते जोडताना त्यांच्या सुखात समाधान मानणारे हे व्यक्तिमत्व. सहा फुटाची उंची असलेला..सैन्यदलात पंधरा वर्षे काम केल्याने तगडेपणा..भारदस्त देह..आनंदी आणि रुबाबदार चेहरा..सगळ्यांना समजून घेऊन शेवटी ठिक आहे..असे आवर्जून सांगणारा माणूस..सहजपणे इतरांवर प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व..अजित करंदीकर.. अमृता ट्रॅव्हल्स यांचे नाव आमच्या मैफल ग्रुपच्या एकांनी सुचविले आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो..गेली २२ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता यांनी रत्नागिरीत त्या भागातील पर्यटकांसाठी आपलेपण जपणारी कंपनी काढून कोकणातून बाहेर पडण्यासाठीची नजर त्यांनी प्राप्त करून दिली..आणि आलेल्या लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले ते त्यांच्या उत्तम नियोजनबध्द आणि नेटक्या शिस्तशीर सहलीच्या माध्यमाने.. काश्मीर हा तसा वेगळा सुरक्षा असणारा अनोखा भाग आणि तर थ्री सिस्टर हा चायना सीमेवरच्या अतिथंडीतला १५ हजार उंचीवरचा भूप्रदेश..पण दोन्ही ठिकाणी अजित करंदीकर यांनी आम्हा साऱ्या पर्यटकांना जे जे नमूद केले त्या त्या ठिकाणी नेण्याची कसरत पूर्ण समाधानाने पार पाडली..आमच्या प्रत्येकाच्या आरोग्यास प्राधान्य देऊन..काय हवे नको ते साध्य करून दिले.. प्रसंगी आपल्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन घडविले..ठरलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त एकाही पैशाची अधिक मागणी न करता जे जे तुमच्या मनात असेल ते सांगा मी ते पुरवितो.. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे..मी तिथे मिळाले तर नक्कीच देईन..असे सांगत प्रवाशांना आपलेसे करत आपुलकीचे नाते जपले.. व्यवसाय पेक्षा नाती आणि माणुसकी सांभाळणारी ही अमृता ट्रॅव्हल्सची पताका का इतक्या सहजपणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली याचे दर्शन आम्हाला अजित करंदीकर यांच्या सहवासात घडले.. यापूर्वी अनुभव ट्रॅव्हल्स यांच्या कडून केलेल्या अरुण भट यांच्या सहलीत आला होता..त्यानंतर आम्ही नवीन सहल कंपनी शोधत होतो. जिथे उत्तम लक्ष दिले जाईल आणि आपल्याला समाधानाने फिरता येईल..ते उदाहरण आता नक्की झाले...अमृता ट्रॅव्हल्स..रत्नागिरी.. काश्मिरच्या सहलीत सिंधुदुर्ग, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी,मालगुंड येथील कोकणवासीय ओळखीचे झाले..थ्री सिस्टर सहलीत..पुणे, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरातील पर्यटक सहभागी झाले होते. थोडक्यात तुम्ही कुठलेही असलात तरी अजित आणि सौ. अमृता करंदीकर यांच्या बरोबर सामील होऊन तुमच्या फिरण्याचा आनंद सुरक्षित आणि समधानेने घेऊ शकता असे हे विश्वासपूर्ण नाव आहे.. उदाहरण द्यायचे तर शिलाँगयेथून बांगलादेश सीमेवरील उमेद नदीवर जायचे होते..पण शिलाँग सोडले आणि रस्त्यावर मध्येच कळाले की मध्ये रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद आहे..मग सर्वांना बोलावून अजित सरांनी विचारले आपण पर्यायी रस्ता शोधून जाऊ. पण सुमारे १५० कि.मी. प्रवास वाढेल..आणि रात्री मुक्कामास उशीर होईल..असे सांगून त्यांनी दुसऱ्या मार्गाने निघालो देखील..पण यामुळे खर्च वाढेल..ह्याची जाणीव होती...आम्ही शेवटच्या दिवशी त्या खर्चात आमची मदत देण्यास सारे तयार होते..पण करंदीकर यांनी ठामपणे सांगितले..तुमचे समाधान हे महत्वाचे आहे..माझा खर्च झाला..खरा..तरीही मी फायद्यात आहे.. तुम्ही कुणीही काहीही द्यायची गरज नाही.. आणि त्यांनी तो विषय संपविला.. कुणाही सहभागी मंडळींनी खिशातून एकही पैसा काढायचा नाही..आणि तसा खर्च केला तर मला सांगा आणि ते माझ्याकडुन मागून घ्या.. केवळ हा भाग नाही.. तर काश्मीर येथे शक्य नव्हते पण थ्री सिस्टर येथे बरोबर स्वयंपाकी होते.. प्रत्येक ठिकाणी रोज वेगळा मेनू.. चवदार..आणि उत्तम. रोज वेगळे गोड.. ताक शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा..भरपूर..आणि अगत्याचे दर्शन.. इतरांबरोबर स्वतःही या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यतील एक बनून वावरणे हे अजित सरांचे वैशिष्ठ्य होते. मालक असल्याचा आविर्भाव न बाळगता..सर्वांना आपलेसे करून उत्तम ते ते दाखविण्यास सतत उस्तुक असलेले अजित सर मनात कायम कोरले गेले..त्यांच्या बरोबर आम्ही सुमारे २० दिवस घालविले . त्या आठवणी आम्ही नेहमीच जवळ ठेऊ आणि त्यांच्याबरोबर सहली करण्यास इतरांना सांगू अजित करंदीकर.. तुम्ही आम्हाला आनंद आणि समाधान दिलेत..असेच प्रेम कायम राहो हीच मनोमनी प्रार्थना.. अमृता ट्रॅव्हल्स जेंव्हा २५ वर्षाची होईल तेंचा जरूर रत्नागिरीत येऊ.. तुमचाच, सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे ९५५२५९६२७६

Monday, January 9, 2023

मला भेटलेले विश्वास मेहेंदळे...!

नक्की साल नाही आठवत..पण सांस्कृतिक खात्याच्या मुंबईतल्या कार्यालयात साठे म्हणून एक उमदे व्यक्तिमत्व होते.. आमचे नाटक राज्य स्पर्धेत बक्षिसपात्र असल्याने नाट्य शिक्षण अभ्यासक्रमात सहभाग मिळावा म्हणून तिथे गेलो असताना.. त्यांनी मला तेंव्हा नवे संचालक म्हणून आलेले विश्वास मेहेंदळे यांची ओळख करून दिली.. बोलके आणि मनमोकळे असलेले मेहेंदळे मग एकदम आपलेसेच वाटायला लागले.. गप्पा आणि प्रचंड ओळखी असलेले हे बहुआयामी व्यकित्मत्व मनात रुजून बसले.. साधेपणा.. कुठलाही खोटा डौल नाही.. आणि तिथल्या तिथे निर्णय घेऊन तो अमलात आणण्याची हातोटी यामुळे ते कलाक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या लोकात सहज जाऊन बसले.. त्यांना खोटेपणाचा तेंव्हापासून तिटकारा बोलण्यातून जाणवत होता. मीही नाटककार विद्याधर गोखले यांच्या संपर्कात होतो.. त्यांनाही त्यांच्यांबद्दल आदर होता. मी तरुण भारत या दैनिकातून राजीनामा देऊन बसलो होतो..पण कुठे काम नव्हते.. मला त्यांनी १९८१ ते १९८३ संस्कृतिक खात्यातर्फे होणाऱ्या नाट्य महोत्सवात प्रतिनिधी म्हणून नियुक्ती पत्र दिले.. त्यामुळे माझेवर त्याकाळीचे उपकारच त्यांनी केले होते. अशी व्यक्ती सरकारी कामात फार दिवस टिकणार नाही ..कारण त्यांचा स्पष्टवक्तेपणा .. तसेच झाले.. दामू केंकरे यांच्यानंतर ती संचालक पदाची खुर्ची विश्वासराव यांनी घेतली.. पण ते फार काळ राहिले नाहीत.. अशी चांगली माणसे सरकारी चाकोरीत टिकणे कठीण असते..तेच झाले सरकारी नोकरीतून मेहेंदळे बाहेर पुन्हा माध्यमांच्या दुनियेत गुरफटले.. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले.. सिंबायोसिस मध्ये वृत्तपत्र विद्या शिकविण्याचे नवे दालन त्यांनी उघडले.. पुढे.. काही काळ लालन सारंग यांच्यासोबत काही नाटकात कामे केली.. पण तिथे रमले नाहीत.. त्यांनी लेखनाचा ध्यास घेतला.. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा अभ्यास करून पुणे विद्यापीठ मध्ये डॉक्टरेट मिळविली. नवी दिल्ली पासून दूरदर्शनवर बातम्या देण्याचे काम केल्याने त्यांना विविध मोठे लोक, राजकारणी यांना जवळून बघता आले..त्यातूनच त्यांना संवाद साधण्याची उत्तम कला अवगत होती.. मग त्यांनी मला भेटलेली माणसे.. सारखी व्याख्याने दिली..त्यातूनच त्यांच्या बोलण्याची ताकद उमगली.. त्याचेच पुस्तक केले.. पत्रकारिता.. समाज माध्यम आणि नाटक यातून त्यांचा पिंड उत्तम तयार झाला.. माणसे जोडली तशी तोंडावर गोड बोलण्याचा स्वभाव नसल्याने.. त्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.. यातूनच ते फारसे दिसेनासे झाले.. अलिप्त होत गेले.. थोडे एकाकी बनले.. पण सतत मला हवे तसेच मी बोलणार..हा स्वभाव कायम ठेवला.. काहींनी जवळ केले..काहींनी झिडकारले.. पण ते ठाम राहिले.. सरकारी नोकरीत असल्याने.. आर्थिक बाबतीत ते कुणावर अवलंबून नव्हते.. ते स्वतंत्र होते.. अखेरपर्यंत स्वतंत्र राहिले.. वडील कीर्तनकार होते..त्यामुळे आख्यान रंगविण्याची त्यांची हातोटी व्याख्यानातून बाहेर डोकावत होती.. उत्तम वक्ते.. उत्तम निरीक्षणशक्ती आणि परखड विचार यातून विश्वास मेहेंदळे हे व्यक्तिमत्व मनात आणि समाजात कायम लक्षात राहील असेच होते.. एक इतिहास त्यांनी तयार केला.. घडविला.. त्यांच्या जाण्याने उत्तम व्यक्ती समाजमनातून हरपल्याची जाणीव होत आहे.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Thursday, January 5, 2023

व्हायोलिनचा समृध्द वारसा गुरुवारी रसिकांनी अनुभवला!

ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित भालचंद्र देव यांच्या प्रथम स्मृतदिनानिमित्त त्यांच्या कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी यांनी गुरुवारची संध्याकाळ आपल्या उत्तम वादनाने रसिकांच्या मनात उमटविली. व्हायोलिन गाते तेंव्हा.. या कार्यक्रमातून. स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमाची सुरवात भालचंद्र देव यांच्या छोट्या ध्वनिचित्रफीतीने झाली. आरंभी चारुकेशी रागातली बंदिश सादर करून..त्यांनी व्हायोलीनवरची आपली हुकूमत सिद्ध करून..रसिकांना आपलेसे केले. देवाचीये द्वारी पासून अभंग जिवलागा कधी रे येशील तू , वादळ वारं सुटलं ग, का हो धरिला सारखी वेगळ्या बाजाची गीते.बाई माझी करंगळी मोडली.. सारखी खणखणीत लावणी. त्यात वाजलेली ढोलकी... आणि मग बाजे मुरलीया, ओ सजना, मधुबन सारखी हिंदी गीते अशी काही रंगतदार सादर झाली की रसिकांना वन्समोअरचा आवाज द्यावा लागला. नीगाहे मिलानेको जी चाहता है आणि लागा चूनरी मे दाग..या गाण्याच्या भैरवीला आवश्यक असा स्वर ,ताल आणि टाळ्यांचा कडकडाट करून व्हायोलीनची आनंदमयी सफर चारुशीला गोसावी यांनी घडवून आणली.. व्हायोलीनच्या सुरावटितून शब्द आणि त्यातला अर्थ रसिकांच्या मनात अलगदपणे आकार घेईल असे तयारीचे वादन इथे चारुशीला गोसावी यांच्याकडून होत होते.. गाण्यातील हरकती आणि सुरावटी सफाईदार आणि सहजपणे वाद्यातून उमटत होत्या. त्याही आपल्या वडीलांप्रमानेच व्हायोलिन वाद्यातील शिष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत.. एक आदर्श कलावंत आणि व्हायोलिन गुरू म्हणून त्यांच्याकडे पहाता येईल. मोहन पारसनीस (तबला), विनीत तिकोनकर (तबला आणि ढोलकी) , अमृता दिवेकर ( सिंथसायझर) राजेंद्र साळुंके( तालवाद्य), प्रसन्न बाम( हार्मोनियम).. यांच्या उत्तम साथीच्या संगतीत व्हायोलिन गीतांचा नजराणा रसिकांनी आनंदाने झेलला.. यावर कडी म्हणजे.. नीरजा आपटे यांचे सूचक आणि गाण्यांच्या निवडीला साजेसे अनोखे निवेदन.. भैरवी धून वाजवून गोसावी यांनी ही मैफल संपविली. कलेचा उत्तम वारसा जपत त्यांनी तो रसिकांच्या मनात व्हायोलीनची गोडी निर्माण केली आहे. असेच कार्यक्रम व्हायोलिन या वाद्यांचे सादर करून वडिलांची समृध्द कला परंपरा कायम पुढे नेतील असा विश्वास यामुळे रसिकांना पुन्हा एकदा आला. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com