Tuesday, April 14, 2026

नवीन पिढीबरोबर विरघळणारे व्यक्तिमत्व.. आशा भोसले..!




फक्त गाणंच नव्हे तर खाणं, फिरणं, उत्तम निटनेटक रहाण,खरेदी करणं, लोकांना भेटणं, प्रेमानं खिलवणं या सगळ्यात रस घेत, आयुष्य कसं जगावं, कधीही जुन्या आठवणींमध्ये न रमता, नवीन पिढीबरोबर जात विरघळणं असलेल्या आशाताई आम्हाला आणि आपल्याला सतत भेटत राहील्या.


- केतन गाडगीळ 



सुहास्य तुझे मनासी मोही’ म्हणत वयाच्या नव्वदीतही तितक्याच उत्साहात, हजारो प्रेक्षकांच्या समोर कार्यक्रम करत आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या, स्वतःच्या आयुष्यात अनेक चढउतार झाले तरी रसिकांच्या समोर मात्र कायमच प्रसन्न मुद्रेने उभ्या राहणाऱ्या,

‘आमच्या आशाताई’

आशाताईंचं गाणं कायमच मला खूप जवळच वाटत गेलं आणि त्यांच्याविषयीची ‘भक्तीच’ म्हणता येईल, ती वाढत गेली. खरंतर कळत नकळत मी आशाताईंशी जोडला गेलो ते अर्थातच त्यांच्या सुरातून.

‘झुक झुक झुक अगिन गाडी’, ‘गोरी गोरी पान’, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण’ किंवा ‘मामाच्या गावाला जाऊया’ पासूनच्या बालगीतांनी आपला पिसारा फुलवत अनेकांचं बालपण आनंददायी केलं, त्या ‘नाच रे मोरा नाच’ या आशाताईंच्या बालगीतांतून त्या आवाजाची ओळख झाली.

ही गाणी ऐकत असताना ‘आशा भोसले’ कोण आहेत हे कळण्याचं माझं वयच नव्हतं पण तो आवाज मात्र पक्का जवळचा झाला होता.

माझे वडील श्री. सुधीर गाडगीळ यांचा आशाताईंशी चांगला स्नेह होता. त्यामुळे आशा भोसले हे नाव घरात सतत कानावर पडत असे. त्यामुळे ही व्यक्ती कोणीतरी आपल्या घरातील, अगदी आत्या, काकू, मावशी असावी असं वाटत असे.

आशाताईंना मी प्रत्यक्ष पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतं ते आमच्या सदाशिव पेठेतल्या वाड्यात आल्याचं. आशाताई आणि आर. डी. बर्मन यांचा तेव्हा नेहरू स्टेडियमला कार्यक्रम होता. तेव्हा आशाताई आमच्या घरी येणार म्हणून घरातच खूप उत्साह होता. आमच्या घरातल्या झोपाळयाच्या खोलीच्या खिडकीतून मी माझ्या आजोबांबरोबर त्यांची वाट पाहत बराच वेळ उभा होतो. इतक्यात एक पांढरी अँबेसिडर गाडी वाड्याच्या दरवाज्यात थांबली आणि गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या, प्रसन्नपणे हसत गाडीतून उतरलेल्या आशाताईंची छबी आजही पक्की लक्षात आहे.

माझ्या आईनं त्यांच्यासाठी स्वतः हातांनी एक फुलांची परडी तयार केली होती. आजी सांगायची की, वाड्यातल्या सगळ्या बायकांनी त्यांचं औक्षण केलं होतं आणि माझ्या आईनं रितीनं ओटी भरून त्यांचं स्वागत केलं होतं.




आमच्या घरी दुचाकी वाहन येण्याच्या आधी टीव्ही आणि फोन आला होता. कारण बाबांचे त्यावेळी दूरदर्शनवर कार्यक्रम असायचे. त्यावेळी बाबांनी आशाताईंची घेतलेली मुलाखत खूप गाजली. त्यांच्या Recording च्या आधी आशाताईंनी बाबांना फोन आला होता. त्यांनी विचारलं की, “मी गुलाबी रंगाची साडी नेसणार आहे. तुझ्या शर्टचा रंग कुठला?” यावर बाबा म्हणाले, “मी गुरूशर्ट घालणार आहे.” त्यावर आशाताईंनी म्हटलं की “यावेळी शर्ट घाल आणि तोही मी सांगते त्या रंगाचा.” आशाताईंनी बाबांना Amarson’s  मध्ये घेऊन गेल्या आणि Dark brown रंगाचा शर्ट त्यांना घेऊन दिला. तो शर्ट पुढे कितीतरी वर्ष आम्ही देवाचा प्रसाद मिळावा असा जपून ठेवला होता.


त्यावेळी मी शाळेत होतो, पण त्या Recording ला जाण्याचा काही योग आला नाही. पण ती मुलाखत इतकी गाजली की आशाताईंच्या गाण्याबरोबर प्रत्येक गाण्यात बदललेली साडी, त्यावरील लखलखणारे हिऱ्यांचे दागिनेही अनेकांच्या स्मरणात राहिले. आशाताईंनी Recording साठी गायलेलं ‘जीवलगा कधी रे येशील तू’ हे गाणं पुन्हा Record करताना प्रत्यक्ष बाबूजी हजर होते आणि ते गाणं ऐकताना बाबूजींच्या डोळ्यांत आलेल्या पाण्याची आठवण कार्यक्रमाचे निर्माते अरुण काकतकर काकांनी घरी सांगितल्याचं आठवतं.

बाबांच्या ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या बाबूजी गदिमांच्या कार्यक्रमाच्या शतकमहोत्सवासाठी आशाताई आणि बाबूजी उपस्थित होते. मला कळायला लागल्यावर आशाताईंना प्रत्यक्ष बघण्याचा आणि ऐकण्याचा माझा पहिलाच प्रसंग.

टिळक स्मारक मंदिराच्या विंगेतून मी आशाताईंना जवळून पाहिलं. बाबूजींनी पेटी वाजवायची बाबांनी फर्माईश केली. त्यावेळी “आशाताई साथ देणार असतील तर दोन ओळी ऐकवतो” म्हणताच, “नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे

नंदलाला.’ म्हणत खट्याळपणे बाबुजींची केलेली नक्कल आणि सादर केलेलं गाणं माझ्या पक्कं स्मरणात राहिलेलं आहे.

पुण्यात कुठेही आशाताईंचा कार्यक्रम असेल तर बाबांबरोबर जायचंच असा माझा हट्ट असायचा आणि बाबा ही मला घेऊन जायचे.

बाबांनी दीनानाथ पुण्यतिथीचा कार्यक्रम रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर केला होता. लतादीदींबरोबर सर्व मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित होते. समोर प्रेक्षकांत आशाताईही होत्या. कार्यक्रमातलं शेवटचं ‘उषःकाल होता होता...’ हे गाणं उषाताई आणि हृदयनाथ मंगेशकरांनी सुरू केलं आणि समोर बसलेल्या आशाताईंना न राहवता त्यांनी मी स्टेजवर येतेच म्हणून करत, स्टेजवर येऊन सादर केलेलं गाणं आजही आठवतं, आणि लक्षात राहिली ती त्यांच्यातील उत्स्फूर्त कलावंत.

घरात बाबांमुळे कलाकारांचं येणं-जाणं असायचं. पाचही मंगेशकरांच्या मुलाखती घेण्याचा आणि त्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याचा बाबांना योग आला. त्यामुळे अर्थातच ‘मंगेशकर’ या नावाशी एक वेगळं नातं होतं. बाबांच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘लता मंगेशकर’ नावाविषयी एक आदर होता आणि ‘आशा भोसले’ यांच्याविषयी जिव्हाळा.

त्यामुळे आशा भोसले रजनी असो किंवा नक्षत्रांचे देणे असो. प्रत्येक कार्यक्रमाला माझी हजेरी असलेली. पण आजच्यासारखं फोटो काढणं सोपं नव्हतं, किंवा तो फोटो काढून लगेच Social Media वर टाकायचं फॅड पण नव्हतं. फक्त होतं ते त्यांना प्रत्यक्ष गाताना ऐकतानांचं समाधान.

Architecture College ला असताना रात्रभर Submission करताना आशाताईंचे सूर मला रात्रभर सोबत करायचे. कॅसेटची एक बाजू झाली की पुन्हा दुसरी, परत पहिली, असं करत दहा-दहा तास आशाताईंच्या गाण्यांची मी पारायण केली आहेत.

मला त्यावेळी अनेक वेळा Design करताना असं जाणवायचं की, ‘तरुण आहे रात अजुनी’ या गाण्यातील, ‘बघ तुला पुसतो आहे पश्चिमेचा गार वारा’ म्हणत वर जाणारी आशाताईंची लकेर ऐकताना एखादी नवीन संकल्पना सुचवून जायची.

मराठी गाण्यांबरोबर अनेक हिंदी गाणीही ऐकताना आशाताईंच्या सुरातली जादू आहे की, ती तुम्हाला सगळं मरगळ झटकून, नवीन उमेदीनं काम करायला लावणारी आहे. 

ठाण्याच्या इंद्रधनू संस्थेत बाबांनी आशाताईंची प्रगट मुलाखत घेतली होती. अर्थात मीही गेलो होतो. त्यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना भेटायला आत गेलो होतो. मला थोडं दडपणही आलं होतं. पण याचा आनंद होता की त्यांना प्रत्यक्ष भेटत आहे. मी त्यांना नमस्कार करून बाहेर निघणार इतक्यात त्यांनीच म्हणाल्या की, “बस इथे.” मी जरा संकोचून त्यांच्या शेजारी बसलो. इतक्यात ठाण्यातल्या एका पत्रकार फोटोग्राफरनी आशाताईंबरोबर माझा फोटो काढला. पण तो काढताना “मागची पाण्याची बाटली फोटोत येत तर नाही ना.” असं आशाताईंनी विचारलं आणि जरा थोडं जवळ सरकून बसायला सांगितलं. फोटो झाला म्हणून मी खूष होतो. खुशीत पुण्याला आलो. पण मी त्या फोटोग्राफरचं नाव नंबर घ्यायचं विसरलो होतो. त्यामुळे इतका छान योग आला होता पण आता काही फोटो मिळणार नाही असं समजून मी निराश झालो होतो.

पण काही दिवसांनी ठाण्याच्या वर्दे काकांनी पाठवलेलं एक पार्सल घरी आलं. उघडून बघतो तर काय, माझा आणि आशाताईंचा त्या फोटोची फ्रेम त्यांनी पाठवली होती. तो माझा आशाताईंबरोबरचा पहिला फोटो.

आशाताईंच्या प्रत्येक गोष्टींचं कायमच मला अप्रूप वाटत आलं आहे. मागे आशाताईंनी माझ्या आईला एक मोत्याची माळ भेट म्हणून दिली होती. आणि त्यांनी दिली म्हणून आमच्यासाठी खासच. पण त्याचं खरं मोल कळलं ते लेखिका मीना प्रभू यांच्या मुळे. मीनाताईंना मोती हिर्‍यांची विशेष पारख. एकदा त्या आमच्या घरी आल्या असताना विषय झाला म्हणून आईने ती सहज त्यांना दाखवली, त्यावेळी ती बाजारातली किती ‘मोल्यवान’ आहे याची जाणीव आम्हाला मीनाताईंनी करून दिली.

आशाताईंना खरेदीची आणि प्रेमानं अनेकांना भेट देण्याची विशेष आवड आणि खासियत अशी की, त्या आठवणीने त्या व्यक्तीच्या आवडीनुसार आवर्जून आठवण ठेवून भेट आणणार. त्यांना स्वतःला फिकट रंगाच्या निळ्या गुलाबी, अबोली रंगाची साडीही विशेष आवडायची. त्यामुळे आम्ही कधी तशी आणली तर त्या आवर्जून नेसायच्याही आणि कधीतरी कधी रंग नाही आवडला तर “कुठून आणली साडी, आपण रंग बदलून आणूया का, म्हणजे मी नक्की नेसेन” असं सांगण्याचा मोकळेपणाही त्यांच्यात होता.

पुढे ‘मंतरलेल्या चैत्रबनाची नवी पालवी’ या कार्यक्रमाचं निवेदन करताना, आशाताईंच्या गाण्यांचं वैविध्य बघून मी भारावून जायचो.

माझ्या लग्नाला आशाताईंना काही कारणाने येता आले नव्हते. अचानक एक दिवस सकाळी फोन आला की “मी पुण्याला आले आहे. मला केतनच्या ऑफिसचा पत्ता पाठवा. मला यायचं आहे.” आशाताई ऑफिसला येणार म्हटल्यावर मला थोडं दडपण आलं. मी ऑफिसला पोहोचलो. त्यावेळी माझं ऑफिस सदाशिव पेठेत होतं. थोड्याच वेळात एक ‘इटालियन flower pot’ घेऊन आशाताई हजर. तो हातात घेऊन पूर्ण ऑफिसमध्ये कुठे ठेवता येईल हे बघत त्या फिरत होत्या. शेवटी, “तू ठरव कुठे ठेवायचं, तुझ्यासाठी आणलाय” म्हणून माझ्या हातात दिला. तो flower pot मी ‘विश्वकरंडक’ जिंकल्याप्रमाणे अजूनही माझ्याकडे जपून ठेवला आहे.




त्यावेळी आशाताई अचानक आल्यामुळे खायला काय आणायचं मला सुचलं नाही. मी आपलं विचारलं की “आशाताई, ‘इडली’ आणू का?”, त्यावर त्या पटकन म्हणाल्या, “इडली, काय खायचा पदार्थ आहे का? आजारी असल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा थालीपीठ आणि चहा मागव.” उत्तम सुगरण असलेल्या, खाण्याची आणि खिलवायची आवड असणाऱ्या आशाताईंनी एका क्षणात सुचवलं.

खाणं, स्वयंपाक, त्याची भांडी, मंडईतून ताजी भाजी घेण्याची आशाताईंना विशेष आवड.

माझ्या मुलावर ‘नील’ वर त्यांचं विशेष प्रेम. कायमच त्याच्या निळ्या डोळ्यांची आठवण काढणार आणि न चुकता विचारणार की “कसा आहे आपला निळ्या?”

आम्ही राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये आम्ही सोडलं तर कुणाला गाण्याची आवड नव्हतीच. त्यामुळे आमच्या बिल्डिंगमधून गाण्याचे सूर ऐकू यायची वेळ क्वचितच.

एका दुपारी आमच्या मजल्यावर Lift चं दार वाजलं. कुणीतरी अप्रतिम आवाजात काहीतरी गुणगुणतय असं ऐकू आलं. घरातल्या वक्तींसारख

सवयीचं असल्याप्रमाणे बेल न वाजवता, ग्रीलच्या फटीतून बोट आत घालून आतली कडी काढावी आणि दर उघडावं तसं करत साक्षात ‘आशाताई’ आमच्या नीलला भेटायला घरी आल्या होत्या.

यशवंतराव चव्हाण सभागृहात बाबांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी आलेल्या आशाताईंनी स्टेजवरून “आमचा ‘निळूभाऊ’आला आहे का?” असं आवर्जून विचारल्याची आठवण आजही अनेकांच्या लक्षात आहे.

मी आणि मुक्ता..... माझी बायको, कधीच विसरणार नाही अशी आशाताईंची भेट म्हणजे माझी मुलगी ‘सारा’ लहान असताना घरी आल्याची.

आमचा घराचं नुकतच नूतनीकरण झालेलं. ओपन किचनमध्ये, आपण केलेली फोडणी बाहेर जाते अशी आशाताईंची तक्रार , तर टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्यांचा आकार आवडल्याची दाद…

त्या दिवशी ते दीड-दोन तास मंत्रमुग्ध करणारे होते. मी, बाबा, मुक्ता आणि आशाताई, चौघं जणं टेबलावर निवांत गप्पा मारत,आशाताईंचे शब्द मनात साठवत होतो.कधी मधेच नीलशी बोलत, साराला  नाच रे मोरा ची ओळ गुणगुणत आशाताईं जुन्या आठवणी सांगत होत्या.

जुन्या गायिकांच्या आवाजाचं वैशिष्ठ, त्यांना काय आवडल, ती एखादी जागा गुणगुणत होत्या.आम्हाला आमचा हेवा वाटावा इतके अप्रतिम क्षण होते ते.

मुक्ताला स्वयंपाकाविषयी सांगत, ब्राह्मणी गोड वरण भात वर साजूक तूप त्यांना विशेष आवडत असे सांगत होत्या.गोड वरण सगळयांचं चांगल जमत नाही , मला मात्र उत्तम जमतं, अस आवर्जून सांगत होत्या .

गप्पांच्या मध्येच घरातल्या आजीनी नातवाला सांगाव तसं नीलला “आता माझ्या आवडत्या Serial ची वेळ झाली आहे टीव्ही लाव”असं हक्काने सांगत. त्या हिंदी Channel वरची शंकराची मालिका तितक्याच तन्मयतेने बघत होत्या. त्यातली शंकराची भूमिका करणारा अभिनेता मला आवडतो. हे सांगायलाही विसरल्या नाहीत.

फक्त गाणंच नव्हे तर खाणं, फिरणं, उत्तम निटनेटक रहाण,खरेदी करणं, लोकांना भेटणं, प्रेमानं खिलवणं या सगळ्यात रस घेत, आयुष्य कसं जगावं, कधीही जुन्या आठवणींमध्ये न रमता, नवीन पिढीबरोबर जात विरघळणं असलेल्या आशाताई आम्हाला आणि आपल्याला सतत भेटत राहील्या.




माझ्या बाबांच्या शब्दांत सांगायचं तर, “आशाताईंच्या गाण्यांनी आपल्या सगळ्यांची दैनंदिनी आनंददायक केली आहे.”

पाळण्यातले चिमुकले डोळे त्यांचंच गाणं ऐकून झोपी जातात, तर प्रेयसीत्यांच्याच गीतातून प्रेमाची साद घालते,त्यांच्या नाट्य संगीताने मन प्रसन्न होते तर त्यांच्याच लावण्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढते. त्यांच्या भक्तिगीतांनी देवळाच्या ओसऱ्यां दुमदुमतात तर तरुणाई त्यांच्या गाण्यावर  “ ले गई ले गई म्हणत बेभान होऊन नाचते. त्यांच्या आर्त स्वरांनी डोळे पाणावतात. तर त्यांच्याच स्वरांनी नवीन उत्साह, आशा, उमेद जागवतात. असा हा चिरंतन स्वर आपल्याला सतत भेटत राहिला आणि आपलं आयुष्य समृद्ध करत गेला. 

हा चिरतरुण आवाज आता आपल्याला दिसणार नाही पण त्यांचे ते सुर कायमच पुढे वर्षानुवर्ष आपल्याबरोबर राहतील. 



- केतन गाडगीळ, पुणे 

( हा लेख मी केतन गाडगीळ यांच्या सौजन्याने..त्यांना विचारून इथे घेतला आहे)

Saturday, April 4, 2026

गुरू-देव स्वरोत्सव-पुणेकरांच्या मनात रुजला..!

 



‘गुरू-देव स्वरोत्सवात चारुशीला गोसावी यांचे व्हायोलीन प्रभुत्व तर आग्रा घराण्याची श्रेष्ठ गायन परंपरा विकास कशाळकर यांनी रसिकांच्या मनात रुजविली..!

पंडित गजानन बुवा जोशी व पंडित भालचंद्र देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रसिद्ध व्हायोलिन वादक चारुशीला गोसावी यांच्या संकल्पनेतून ‘गुरू-देव स्वरोत्सवा’चे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
यात गुरूंच्या प्रतीचा आदर , ओलावा आणि कलेतून मिळालेले स्वरांचे आंदण दोन्ही कलाकारांनी आपल्या गायन वादनाच्या उत्तम सादरीकरणातून उपस्थित श्रोत्यांच्या मनामनात साठविले.





आपले वडील आणि गुरु पं. भालचंद्र देव यांच्याकडून घेतलेल्या व्हायोलीन वादनाच्या तालमीतून त्यात झालेल्या चारुशीला गोसावी यांनी व्हायोलिन वादनाची सुरुवात राग मियाँ मल्हारने केली. शांत, संयमी परंतु बहारदार वादनातून रसिकांना मोहित करत त्यांनी तीन तालातील एक चीज ऐकविली. व्हायोलीनमधून उमटणाऱ्या आर्त स्वरातून ‘याद पिया की आये’ ही ठुमरी इतकी उत्तम पेश केली की ती अधिक ऐकण्याचा मोह होत होता..



चारुशीला गोसावी यांची अनेक कार्यक्रमातील साथ ऐकली आहे. व्हायोलीनवर वाजवलेली गाणी देखील ऐकली आहेत..पण केवळ शास्त्रीय संगीताची इतकी जोरकस आणि परिपूर्ण मैफल ऐकण्याचा हा अनुभव काही आगळाच होता.. व्हायोलीन वादनाची परंपरा त्या अतिशय समर्थपणे पुढे नेत आहेत . संगीत क्षेत्रातील त्यांचे स्थान असेच वाढत राहो .
त्यांना मोहन पारसनीस यांनी तबल्यावर समर्पक साथ केली. पारसनीस यांचा हात अतिशय सुंदर पद्धतीने तबल्यावर पडत होता.. हळुवार आणि तेव्हढाच खणखणीत.



मध्यंतरात आनंद देशमुख यांच्या निवेदनाचा जागतिक स्तरावर सन्मान केला गेला..म्हणून त्यांचा खास सन्मान चारुशीला आणि राजय गोसावी यांच्या हस्ते झाला. आणि ज्येष्ठ शहनाई वादक शैलेश भागवत यांच्या हस्ते डॉ. विकास कशाळकर.. आणि सर्वच साथीदारांचा सन्मान केला गेला.



आग्रा घराण्याची परंपरा सांगणारे ओम तोम..
कशाळकर यांच्या गावातून ऐकण्यासारखे..!
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पं . गजानन बुवा जोशी यांच्याकडून तालीम घेतलेले आजचे अभ्यासू गुरू डॉ. विकास कशाळकर यांची गायन मैफल रंगली..ती ओम तोमच्या सादरीकरणाने..
यांनी आपल्या मैफलीची सुरुवात पंडित गजानन बुवांच्या आवडत्या छायानट या रागाने केली.




‘गरवा कैसे’, ‘मलानिया गुंद लाओ री’, ‘पिया बन जा’ या आग्रा घराण्यातील रचना ऐकवून ‘बिगीबेगी आओ सैया’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली.
त्यांचे तानांमधील वैविध्य, दमदार गायकी आणि रागातील बारकावे दर्शविणाऱ्या सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. कशाळकर यांनी दुर्मिळ रागातील बंदिश तसेच ‘करन मोरी लागी कलाई’ ही रचना ऐकवून मैफलीची सांगता खास लोकप्रिय तराण्याने केली.




७५ वर्षाचे बुजुर्ग कलाकार आजही आपली मैफल आवाज तापवत कशी रंगवतात याचे हे उदाहरण होते.
त्यांना परिमल कोल्हटकर (स्वरसाथ), दिपीन दास (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी) यांनी तयारीची साथ केली.






गुरुदेव या नावाविषयी आनंद देशमुख यांनी केलेले विवेचन ऐकण्यासारखे होते.





गुरुंप्रतीची श्रद्धा, भक्ती, प्रेमस्वराने भारावलेली सुरेल सांज पुणेकर रसिकांनी अनुभवली असेच म्हटले पाहिजे.

या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सनई वादक शैलेश भागवत, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, वृद्धी रिॲलिटीचे अमोल शहा, माधव मोडक, रत्नाकर गोखले उपस्थित होते.


- Subhash Inamdar, Pune
9552596276
subhashinamdar@gmail.com

Monday, March 23, 2026

मोबाईल कलाकारांना अडथळा बनत आहे..!

 अनेक दिवस एक गोष्ट बोलेन म्हणते. आज बोलते.. 

संवेदनशील मनाने समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर बरं वाटेल. 

कलाकारांचा आणि श्रोत्यांचा ध्यानभंग करणारी एक गोष्ट आज सर्वांच्या हातात आहे, ती म्हणजे मोबाईल. फोटो काढणे, क्लिप्स बनवणे, रेकॉर्डिंग करणे… या सगळ्यामुळे कलाकाराला रागाच्या भावावस्थेत शिरताना मोठा अडथळा निर्माण होतो. इतकं सोपं असतं का रागगायन करणं? एखादा राग खुलवण्यासाठी जे पोषक, एकाग्र वातावरण आवश्यक असतं, ते आम्हाला अनेकदा समोरून मिळत नाही हो. 

 

अनेकदा प्रसिद्धी पेक्षा महत्वाचं असतं समाधान. राग उत्तम रंगला, शांत चित्ताने मांडता आला की होतं- ते समाधान. 

आमच्या गाण्याचे तीस सेकंदांचे, एक मिनिटाचे रील्स बनवून इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करणे, ही आमची अपेक्षा नाही. त्यापेक्षा तुम्ही शांत बसून, पूर्ण लक्ष देऊन गाणं ऐकलंत, तर ते आमच्यासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण अशा कृतीतून ना कलाकाराला खरी समाधानाची अनुभूती मिळते, ना श्रोत्याला. मान्य आहे तुमच्या व्हिडिओ शूट करण्यामागे प्रेम आहे. त्याची नोंद आणि कृतज्ञ भाव आम्हा कलाकारांच्या मनात असतो. पण ती कृती आमच्या बांधणीत बाधा आणते हो. 


म्हणूनच एक प्रश्न पडतो, ..प्रेक्षागृहात मोबाईल निषिद्ध का नसावा? असा नियम का नसावा? आपण पाहिलं आहे की काही देवस्थानांमध्ये मोबाईल वापरण्यावर पूर्ण निर्बंध असतात. मग इथे का नको. 

परवा आस्ताद चा व्हिडिओ पाहिला. त्या पाठीमागची कलाकाराची तळमळ समजून घ्या. परफॉर्मिंग आर्ट.. म्हणजे मंचावरचा प्रत्येक क्षण पूर्ण अनुभूतीने जगणं. तिथे पूर्वनियोजित काहीही नसतं. त्या क्षणाला जी उपज येते तीच कलाकृती..  रागाचं भावविश्व गवसणं इतकं सोपं असतं का? राग मूर्त स्वरूपात उभा करत असताना जे पोषक वातावरण हवं आहे ते अनेकदा आम्हाला मिळत नाही.. 


आणि हे मान्य आहे की आजच्या काळात प्रसिद्धी महत्त्वाची आहे. गाण्याचं सोशल मीडियावर असलेलं अस्तित्व……रील्स, व्हिडिओज, यूट्यूबवरचे फुल-लेंथ व्हिडिओज, हे सगळं आवश्यकच आहे. पण त्यासाठी प्रत्येकाने हातात मोबाईल घेऊन शूट करणं अजिबात गरजेचं नाही. त्या कामाकरता नेमलेल्या दोन- तीन व्यक्ती उत्तम दर्जाचे फुल-लेंग्थ व्हिडिओ किंवा शॉर्ट रील्स तयार करू शकतात. फोटोज काढू शकतात. ते पुरेसं आहे. पण जर संपूर्ण प्रेक्षागृहात सतत स्क्रीनचं चकाकणं सुरू असेल, तर तो इतका मोठा ध्यानभंग होतो की कलाकाराने मग नेमकं गायचं कसं. राग नीट रंगला नाही तर त्या बिचाऱ्या कलाकारावर टीका ही होतेच. एक शांत स्वच्छ कॅनव्हास हवा आहे, तर चित्र देखणं सुबक चितारता येईल. इतकी माफक अपेक्षा गैर आहे का?


प्रेक्षागृहात मोबाईल वापरण्यावर बंदी हवी असे माझे मत आहे. यामुळे किमान तीन तास मोबाईलशिवाय राहण्याची एक साधना तरी घडेल. गाणं नेमकं कसं ऐकायचं, त्यातलं सूक्ष्म काय आहे, हे जाणून घेण्याची सवय लागेल. सतत स्क्रीनकडे पाहत राहून आपण खरंच राग ऐकतो आहोत का? की फक्त काहीतरी पार्श्वभूमीला चालू आहे? चित्तवृत्ती एका ठिकाणी पूर्णपणे स्थिर होणं, हेच खरं श्रवणाचं तत्त्व आहे. श्रोत्याचं आणि कलाकाराचं मन एकरूप होणं आवश्यक आहे. आणि त्या अवकाशात मोबाईल हा फार मोठा अडथळा ठरतो आहे.


हा अडथळा आपण कधी दूर करणार?”


आणि हा अडथळा ज्या क्षणी दूर होईल, त्या क्षणी मी पैज लावून सांगते.. असे श्रोते घडतील की एक तास काय, दीड तास काय, पूर्ण तीन तासांची मैफल अत्यंत एकाग्रतेने आणि सुरेखपणे ऐकतील. तसेच, त्या उंचीचे कलाकारही अधिक खुलून येतील, आणि तितक्याच जाणिवेने ऐकणारे श्रोते तयार होतील, याबद्दल मी अत्यंत ठाम आहे.


आजही आपण आपल्या ज्येष्ठांकडून ऐकतो ‘काय रंगली होती ती मैफल!’ आणि ते सांगताना त्यांच्या अंगावर शहारे येतात. स्वरागणिक आठवणी त्यांच्या मनात जिवंत असतात. जुन्या पिढीचं कशाला.. मी स्वतः सांगू शकते की लहानपणी अनुभवलेल्या बहुतेक मैफिली आजही जशाच्या तशा माझ्या स्मरणात आहेत. केवळ नोंदी म्हणून नाही, तर त्या वेळी अनुभवलेल्या आनंदासकट, त्या भावावस्थेसकट


मला आठवतं मी लहान असताना उस्ताद विलायत खाँ साहेब 

यांची सतार ऐकण्याचा योग आला होता, सवाई गंधर्व चा मंच. हजारो श्रोते, एकच कलाकार….पण संपूर्ण मंडपात एकच मन. जणू कलाकाराने आपल्या मनात सर्वांना सामावून घेतलंय. जणू तो अवलिया सर्वाना एका प्रवासाला घेऊन निघालाय. सगळे एकाच नावेत, एकाच भावविश्वात, सगळे सहप्रवासी!! तो अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे, पण वातावरणात एक अद्भुत जादू होती.


काहींच्या डोळ्यात अश्रू होते, काही कृतज्ञतेने भरून गेले होते… प्रत्येकजण त्या रागरसात पूर्णपणे बुडून गेला होता. ती काय अवस्था होती, हे सांगणं कठीण आहे, पण ते अनुभवणं मात्र अमोल होतं.


आणि मग प्रश्न पडतो, आज असं का घडत नाही?


कलाकारांचा दर्जा खालावला आहे, असं अजिबात नाही. उलट, आजही अत्यंत समर्थ आणि प्रतिभावान कलाकार आहेत. पण त्यांना जो‘अवकाश’ आवश्यक आहे, जी शांतता आवश्यक आहे ती मिळत नाही. आणि हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे.


-


श्रुती विश्वकर्मा..मराठे..

ठाणे.. 

Saturday, October 18, 2025

ज्याचा त्याचा विठ्ठल..भारावणारी कलाकृती..!

 



आज १८ ऑक्टोबर २५ ..

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह..

रूपक निर्मित..

मधुराणी गोखले.. अमित वझे आणि  गजानन परांजपे यांनी डॉ. समीर वसंत  कुलकर्णी यांनी  वारी विठुराराच्या वारीतून नेमका विठ्ठल कसा अनुभवायला मिळतो ते अतिशय आध्यात्मिक पातळीवर लिहिलेल्या प्रयोगाचा साक्षात्कार घेतला..

दिग्दर्शक..अमित वझे यांनी त्यातली तरलता..

संगीत.. प्रकाश.. आणि मोजकेच पण परिणामकारक नेपथ्य मंचावर उभे करून अतिशय गांभीर्याने तो प्रयोग रसिकांना मोहित करणारा सादर केला..

यातल्या अभंग रचना.. ज्या उत्कटतेने पार्थ उमराणी आणि अंजली मराठे गातात..त्यातून त्याची परिणामकारकता अधिक वाढत जाते..

परदेशात झालेल्या रक्तरंजित घटनेचा परिणाम झालेल्या महिलेच्या आयुष्यात वारीत सहभागी होऊन जो आत्मिक आनंद मिळाला..त्यातून जगण्याचे बळ कसे मिळत गेले.. याची कथा डॉक्टर  कुलकर्णी यांनी वारीच्या दिंडीत नेहमी सहभागी होणारे बुवा..यांच्या नेमक्या ..आणि सहज विचारून मनातला गोंधळ कमी होऊन आपल्याच आयुष्यात असा अनुभव का येतो..याची मनातली शंका..वारीतील  घटना आणि त्यात येणारे प्रसंग ..यातून तिला अनेक गोष्टी कळत गेल्या...!

इथे अभिवाचन असले..तरीही त्यात अभिनयाचा आविष्कार तेव्हढ्याच तयारीने मधुराणी, गजानन परांजपे आणि समीर बनलेले अमित वझे आपल्या कसदार सादरकरणाने प्रेक्षकांना बांधून ठेवतात..

पार्थ उमराणी..आणि अंजली मराठे..या दोन्ही गायकांनी त्यातली गंभीरता.. भाव..आणि अर्थ याला उत्तम समजून सादर केलेले संगीत गायन प्रयोगाला अधिक समृद्ध करत जाते..





मधुराणी त्यात हळूहळू  गुंतत जाऊन..पुढे त्यातीलच एक कशी होते..हे प्रत्यक्ष अनुभवल्या  शिवाय कळणार नाही..

बाबा..आणि बुवा..यांच्या साध्या पण सोप्या भाषेत गजानन परांजपे ज्या सहजतेने विठ्ठलाचे  स्वरूप विस्तारून वर्णन करतात..त्याचीही अनुभूती घ्यायला हवी..

समीर ..एक जिवाभावाचा मित्र..  आणि आयुष्यात पुन्हा उभा  करण्याचा प्रयत्न करणारा.. अमित वझे उभा करतात..

आणि ती सौदामिनी.. जिने आपल्या अमेरिकेतील त्या रक्तरंजित घटनेमुळे आत्मघात करण्याचा प्रयत्न करणारी..पण नंतर त्यातून सावरण्यासाठी 

भारतात  येऊन वारीचा प्रवास नाईलाजाने  सुरू करणारी ही सौदामिनी..समीर आणि बाबांच्या सल्ल्यानुसार वारीत प्रवास करते..एकेक अनुभव घेते आणि त्या विठ्ठलाच्या छायेत  गुंतून जाते..

मधुराणी गोखले यांचा सौदामिनीचा सारा प्रवास अतिशय सुंदर ..आणि सहज ..अभिनयाचे आगळे भूमिकेचे पदर पाहण्यात खरा आनंद मिळतो..



पडद्या मागे काम करणारे ..प्रतीक गुरव ( ध्वनी),  सुजय भडकमकर, आदित्य देशपांडे ( प्रकाश),

नेपथ्य श्याम भुतकर , वेशभूषा..मानसी वझे, 

संगीत.. निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य.. साऱ्यांनी उत्तम साथ दिली होती.


शिवाय मिलिंद मुळीक यांनी आपल्या चित्रातून उभी केलेली विलक्षण वारीची परंपरा..आणि त्यातला अनुभव मंचावर साकारून वातावरण भारून टाकतो..

डॉ. समीर कुलकर्णी..यांची लेखनात असलेली संवेदनशील शक्ती रसिकांना मोहित करते..


मध्यंतर नसलेला सलग दोन तासांचा हा अनुभव ज्याने त्याने  एकदा तरी घ्यावा हे आवर्जून आग्रहाने सांगावेसे वाटते..

- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com 

Saturday, August 16, 2025

मी कोण.. चा शोध घेणारा परिणामकारक मंचीय अनुभव कोSहम ..!

 


आजच्या आधुनिक सोशल माध्यमातून प्रत्येकजण सांगतोय..होय मी आहे..
हा मी नेमका कोण आहे.. तुम्ही जिथे कार्य करत
आहात तिथे मी चा शोध घ्या.. आपोआपच निंदनीय विचार सोडून वंदनीय होण्याकडे कल वाढेल ..
आपले अस्तित्व काय आहे..
याचा शोध घेताना काळाच्या उदरात ..इतिहासाच्या .. संत साहित्याछ्या पुस्तकाच्या दुनियेत दडलेल्या गोष्टी आणि आजचा काळ यांची सांगड घालत विराजस कुलकर्णी यांनी याची संहिता लिहिली आहे.
मी.. कोण आहे..याचा डोळसपणे विचार पुढे नेणारा हा एक नाट्यमयरित्या मंचीय दर्शन देणारा अनुभव..म्हणजेच कोSहम..
पुण्यात १५ ऑगस्टला या दोन अंकी नाट्यानुभवचा शुभारंभाचा प्रयोग पाहण्यात आला.. त्यानिमित्ताने हे टिपण करावेसे वाटले.



आजच्या इंटरनेटच्या काळात याच मी...चे महत्व असलेल्या तरुणाईला सहज वाचता वाचता त्याला तुकाराम महाराजांची ओवी वाचायला मिळाली..
रडोनियां मान ।
कोण मागतां भूषण
रडता रडता कौतुक मागून काय उपयोग
लावितां लावणी ।
विके भीके केज्या दानी ॥
अर्थ एव्हढाच स्वतः शेतात खपून पिकविलेले धान्य..आणि रस्त्यात भीक मागून गोळा केलेले गहू.. यात फरक आहे..
गो.नी दांडेकर .. आपले पणजोबा यांच्या मोगरा फुलला..संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर.. तुला आकाशा एवढा..ही तुकारामांच्या जीवनावर..आणि कादंबरीमय शिवकाल..ही शिवाजी महाराज यांच्यावरील जीवनावरील लिहिलेल्या संचातील घटना.. यातील निवडकभाग घेऊन त्याला काळाशी सुसंगत अशी जोडणी करून विराजस यांनी ..आयुष्याच्या अस्तित्वाचा विचार.. कोSहम यातून उतरविला.. सुमारे ३७५ वर्षापूर्वी संतानी आणि मोठ्या लोकोत्तर पुरुषांनी आपल्या आयुष्यात केलेल्या विचारांचा ..आणि आपण का आलो..आपले ध्येय काय..याचा घेतलेला हा शोध यानिमित्ताने पुन्हा तरुण रंगकर्मींना घ्यावासा वाटला..तो पट ..आजच्या आधुनिक काळातही किती महत्वाचा आहे..हेच यातून मांडण्याची ही दोन अंकात मंचीय दर्शन देणारी कलाकृती निर्माण केली..हे याचे महत्व अधिक आहे..



हे मऱ्हाठी भाषेचे त्या काळाचे संस्कार इथे एकत्र होऊन त्यातून ते अनुभव वाचले जातात.. गोष्टीत तो बाज..आणि साज चढवत अभिवाचन करणारे कसदार अभिनेते प्रसंग रसिकांच्या मनावर संस्कार करत..तो विचार व्यक्त करतात..हे याचे वैशिष्ट्य आहे.
याचे संकलन करताना मधुरा देव यांचा विचार असा होता.. कोs हम - संकल्पना म्हणून संत चरित्रात असंख्य ठिकाणी सापडते- जी आजच्या काळातही सर्वार्थाने लागू आहे आणि भविष्यात ही हे ‘शहाणपण’ उपयुक्त असणार आहे.
महाराष्ट्रात आणि मराठीत इतकं मोठं भांडार अनेक शतकांपासून उपलब्ध आहे त्याचा शहाणा वापर, जाणीवपूर्वक करता येईल; जेणेकरून जनमानस सुसह्य आणि आनंददायी जीवन मिळवू शकतील. संतवाड्मय आणि आप्पांच्या लेखनाचे आपल्याकडे उपलब्ध असलेले हे भांडार पुन्हा एकदा लोकाभिमुख आणावे हा विचार प्रामुख्याने होता.
आणि अर्थातच आप्पांच्या लेखनातले कोणते प्रसंग निवडावे इथे माझी मदत झाली.
आणि त्याची बांधाबांध विराजसने यथार्थ केली.. असे त्या सांगतात.




तोच नाट्यानुभव म्हणजे कोहम ही कलाकृती..
यात अभिवाचन आहेच..पण ते करताना ते कलावंत अभिनय साकारतात..वेशभूषा..संगीत.. यातून ..
त्याला जोडली गेली आहे ती नृत्यभाषा..
असा हा एक परिपूर्ण अनुभव देणारा प्रयोग नुकताच मुंबईत झाला..आणि आता पुण्यात होतो आहे.. ते प्रयोग आहे..आणि इथे कलाकार हातात वाचनाची पोथी घेत ते अनुभव परिपूर्ण रित्या. उमटविण्याचा यशस्वी प्रयत्न करतात..हे नक्कीच.
एके काळी ही तो श्रींची इच्छा..ही आप्पांची कादंबरी..वाचनासाठी घेऊन त्यातून अभिवाचन कसे असावे हे सांगणारे डॉ. वीणा देव.. डॉ. विजय देव..सोबत..मृणाल देव..कुलकर्णी आणि रुचिर कुलकर्णी यांचे हे रूप अनुभवले..
आणि आता इतक्या वर्षानंतर आपल्या पणजोबा यांची साहित्य कृती घेऊन त्याला अशा नव्या स्वरूपातील अभिवाचना द्वारे..नव्या स्वरूपात कार्यक्रम करण्याचे सुचणे..हीच तर एका पिढीची परंपरा पुढे नेण्याचे काम होत आहे. याचे
स्वागत करायलाच हवे.. इतके ते परिपूर्ण आहे.



आजच्या आधुनिक काळात मी पणाचा बडेजाव मिरविणाऱ्या युगात..अंतर्मुख करणारा ..विचार करायला लावणारा अनुभव देणारा हा नाट्यानुभव थिएटरॉन एंटरटेनमेंट ..यांनी दिला आहे..
या तरुण रंगमंच करणाऱ्या कलावंतांना हा विषय .. तोही संत ज्ञानेश्वर..तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ..यांच्या जीवनचरित्रातून घ्यावासा वाटावा हेच खूप मोलाचे आहे..



शिवानी रांगोळे.. शिवराज वायचळ आणि मृणाल कुलकर्णी..या तिन्ही कलावंतांनी. ती भाषा..त्यातील भावना.. ते प्रसंग रसिकांच्या मनावर आपल्या वाचिक आणि शारीरिक अभिनयातून बोलते केले असे म्हटले तर योग्य ठरेल..
आवश्यक तेव्हढीच..पण परिणामकारकता वाढविणारी मदत घेत फुलवा खामकर यांच्या नृत्य दिग्दर्शनातून हा मंचिय अनुभव अधिक उठावदार होत रहातो.



साजेसे अभंग..तो भक्तीचा भाव..निषाद गोलांबरे यांनी संगीतातून दिला आहे. याचे संकलन मधुरा देव यांचे आहे.
सुरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी आपल्या दिग्दर्शनातून कोSहम रसिकांना अनुभवण्यास अधिक परिणामकारक सादर केले आहे. प्रयोग मोहित करणारा होतो.



संकेत पारखे, विक्रांत पवार, साज जोशी, शताक्षी पंडित यांनी हा मंचीय अनुभव देण्यासाठी याथसार मदतच केली आहे.

- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Friday, August 8, 2025

Deepti Kulkarni..Master Keys

 Deepti Kulkarni..

On her dialogue.. presented..

Master Keys

Many songs.. presented

Also discussed about the harmonium.


After studying the harmonium very carefully and showering its tones on the minds of the audience, Deepti Kulkarni easily entertains the audience with her magical fingers for two hours with her playing..

Master Keys.. was her experimental number of independent harmonium playing. 26..

It was presented on the cultural stage of Bharat Natya Mandir on Thursday evening, August 7.25..

In this..

Ganpati Naman.. Sur Niragas Ho..

Vikat Kiya Shyam

Man Shuddh Tuje Prithvi Molachi

Shravanat Ghanneela

Asa Bepham Ha Vara

Songs from the period of 1950 to 70..

A collection of symphony

Bhavgeet made the drama song popular first.. Harmonium presented two drama songs while showing the heritage of drama songs

In the temple..as well as the beauty of Lavani..Lavani presenting..

Rajasa Jaali Zara Basa

Pianika..

Hindi songs..

Ghazal

Qawwali

.Tabla..Dholak..Rhythm instruments and synths

With the accompaniment of Vikram Bhat, Ajay Atre and Kedar Paranjape, the instrumentalists of the preparation made it more exciting..There is no doubt about it.

Pune's narrator Vignesh Joshi made it more effective through his flowery words.

Abhay Jabde, the working president of Bharat Natya Shodhon Mandir, honored these artists and made the program so effective that he promised to do it again.


_ Subhash Inamdar, Pune

subhashinamdar@gmail.com

Friday, August 1, 2025

स्वरयात्री बाबूजी.. तपपूर्ती सोहळा..




गोल्डन मेमरीज प्रस्तुत.. गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या युगल गीतांचा नजराणा..
चैत्राली अभ्यंकर, शशांक दिवेकर, मिनल पोंक्षे आणि हेमंत वाळुंजकर यांनी अशी काही गायली की रसिक खुष होऊन ती पुन्हा ऐकण्यासाठी उत्सुक होता..
स्नेहल दामले यांचे गाण्याची गोष्ट..आणि बाबूजींच्या जीवनातील प्रसंग. अभ्यासपूर्ण रसाळ भाषेची किमया साधून गाण्यापाठीमागचे सारे पुढे मनात साठत गेले.
राजेंद्र हसबनिस, ऋतुराज कोरे, प्रसन्न बाम आणि केदार परांजपे यांची बंदिस्त साथ.. यामुळे रंगमंच स्वर संगीताच्या तालावर डोलत होता..



बारा वर्षांपूर्वी प्रथमच बाबूजींची ही गाणी तयार झाली..
निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांनी कार्यक्रमात मांडली..
तपपूर्ती होताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख आणि विनया देसाई, तसेच जयंत भावे..आणि चैत्राली यांच्या मातोश्री यांच्या हस्ते दीप पूजन करून सुरवात झाली.
मोहित नामजोशी यांच्या उत्तम ध्वनिव्यवस्थेने कार्यक्रमास चार चांद लागले..
अमित अभ्यंकर यांची साथ मिळाल्याने कार्यक्रम सुनियोजित साजरा झाला.



फिटे अंधाराचे जाळे..
धुंद एकांत हा...
रूपास भाळले मी..
नवीन आज चंद्रमा..
स्वप्नात रंगले मी..
बालगीत.. तुझ्या गळा..
हवास मज तू..
धुंदी कळ्यांना ..
शब्दरूप आले मुक्या भावनांना...
आज चांदणे हासले ..तुझ्यामुळे..
मराठी मनाला समृद्ध करणारे दोन भिन्न स्वभावाचे मित्र
जाशील कोठे मुला तू..
विठू माऊली..



तुझी माझी प्रीत जगावेगळी..
तुला न कळले..मला न कळले..
शापित.. दिस जातील.. दिस येतील..
माझ्या रे प्रीती फुला..
डोळ्यात गीत माझे तू गीत भावनांचे..
चंद्र आहे साक्षीला..
वंशाचा दिवा.. ललिता.. फडके..
वसंतराव..देशपांडे..
रंगू बाजाराला जाते ..जाऊद्या..
कानडा राजा पंढरीचा..



सुधीर फडके यांच्या १११ चित्रपटातून काही मोजकीच गाणी ..पण युगल..किंवा..दोन गायकांनी गायलेली रचना निवडण्यात आली..
स्वरांचा.... तालांचा..टाळ्यांचा..नाद करत तो बहरात आला..आणि संपला देखील..
३० जुलै..२०२५..पुण्यात

- Subhash Inmadar, Pune
subhashinamdar@gmail.com

Friday, July 18, 2025

अतिशय मेहनतीने लीना राजवाडे यांनी माणिकबाईंची गाणी फुलविली..



क्षणभरी उघड नयन देवा..
ह्या सावळ्या तनुचे..
चांदण्या रात्रीतले स्वप्न तू विसरून जा..
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा..
या राधेला अडवू नको..
हसले मनी चांदणे..
जाळीमंदी पिकली करवंद..
कौसल्येचा राम..
तुझ्या मनात कुणीतरी लपले ग..
मज आणुनी द्या तो.. हरिण अयोध्या नाथा..
घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा..




ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्म शताब्दी वर्षात..अनेक ठिकाणी त्यांच्या गाण्यांची मेजवानी मिळत आहे..
पुण्यातील माणिक वर्मा यांच्या कडून चार वर्ष गाणं शिकलेल्या ज्येष्ठ गायिका शैला दातार यांचेकडून त्या गाण्यांची शिस्तशीर तालीम घेतलेल्या डॉ. सौ. लीना राजवाडे यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरू शैला दातार यांच्या समोर हसले मनी चांदणे..हा खास माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा उत्तम स्वर नजराणा पेश केला.
ऐकताना अगदी सहज..सोपी.. गोड ही गाणी सादर करण्यासाठी अतिशय अवघड.. पण म्हणूनच त्या माणिक स्पर्श झालेल्या गाण्यांना आपल्या अभ्यासपूर्ण गायनाच्या तयारीने राजवाडे यांनी ती उत्तम सादर करून गुरूंना आणि रसिकांना मोहित करणारी एक माणिक वर्मा यांच्या गाण्याची स्वतंत्र मैफल शुक्रवारी १८ जुलै ला ऐकवून त्या सोज्वळ.आणि सात्विक स्वरांना पुन्हा उजाळा दिला..



यावेळी शैला दातार यांच्या सोबत निर्मलाताई गोगटे आणि माधुरीताई डोंगरे रसिक म्हणून समोर उपस्थित होत्या. यावेळी शैला दातार यांचा गुरू म्हणून सन्मानही झाला..


सभागृहातील सारे रसिक गाण्यांना आपल्या मनात साठवत ती गाणी मनात गात गात ऐकत होता.
उत्तम साथ संगत लाभल्याने गाण्यांना ताल.. स्वराचा भरणा तसाच श्रीमंत करीत होता..



त्यासाठी जयंत साने, नचिकेत मेहेंदळे, पखवाज आणि ढोलकी..निवेदिता मेहेंदळे , चारुशीला गोसावी आणि राजेंद्र साळुंके यांच्या साथीचे कौतुक करायला हवे..



प्राची घोटकर यांनी यानिमित्ताने माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा,, त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेऊन त्यातून प्रत्येक गीताला शब्दाने त्या पुढे नेत होत्या..
अतिशय मेहनतीने लीना राजवाडे यांनी माणिकबाईंची गाणी फुलविली.. त्या स्वरात भावना निर्माण करून..स्वरातील परिणामकारकता ओळखून गाणी सादर करण्यासाठी परिश्रम घेतले..त्याचे सार्थक ऐकताना जाणवत होते..



अगदी सहज या कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि या माणिक स्वरांचा अतिशय परिणामकारक अनुभव घेता आला..
आणि भास्कर बुवा बखले ह्यांच्या नातसून शैला दातार या तयार करत असलेल्या शिष्याचे गाणे ऐकता आले..आणि त्यातून ही मराठी गाणी आजही काळाच्या ओघात पुढच्या पिढीपर्यंत पोचत असल्याचे समाधान मिळत आहे.




हसले मनी चांदणे..हा एक माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा उत्तम कार्यक्रम यानिमित्ताने स्वर मंचावर प्रकाशमान झाला..तो अगदी सहज कुठेही करता येण्यासारखा आहे..

- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com


Sunday, July 13, 2025

गुरुपौर्णिमेनिमित गुरुभावयुक्त नवे गीत..साधना धर्म..साधना मर्म

साधना धर्म..साधना मर्म

सांगे तो कर्म गुरू माझा...!


करोनी ध्यान .. जाणतसे मर्म

तेची आहे साधन.. सदा ..!


घेई मुखी नाम..तोची माझा नेम

नित्य आहे काम ..सदा वाचे..!


करोनी एकाग्र.. साधना ती हवी

तेंव्हाच कधीतरी..साध्य होई..!


परिपूर्ण नाही..जगी असे कोणी

साधना अवीट.. जाणोनिया..!


गरू सांगे मज..नको पळवाट

साधना अनमोल.. जाण असे..!


आता करू निश्चय..निर्णय थोर

तपस्या माझी..कायमची..!


हाच माझा निर्धारु..दृढ असे भाव

गुरूच्या प्रती.. आदर असे..!


नमती मस्तके ..गुरूच्या पायी

आनंद होतसे..मजठायी..!


_ subhash inamdar, Pune


- सुभाष इनामदार, पुणे

Wednesday, July 9, 2025

साधना धर्म..साधना मर्म

 


साधना धर्म..साधना मर्म

सांगे तो कर्म गुरू माझा...!


करोनी ध्यान .. जाणतसे मर्म

तेची आहे साधन.. सदा ..!


घेई मुखी नाम..तोची माझा नेम

नित्य आहे काम ..सदा वाचे..!


करोनी एकाग्र.. साधना ती हवी

तेंव्हाच कधीतरी..साध्य होई..!


परिपूर्ण नाही..जगी असे कोणी

साधना अवीट.. जाणोनिया..!


गरू सांगे मज..नको पळवाट

साधना अनमोल.. जाण असे..!


आता करू निश्चय..निर्णय थोर

तपस्या माझी..कायमची..!


हाच माझा निर्धारु..दृढ असे भाव

गुरूच्या प्रती.. आदर असे..!


नमती मस्तके ..गुरूच्या पायी

आनंद होतसे..मजठायी..!


- सुभाष इनामदार, पुणे

https://youtu.be/8qTpvGNfjAw?si=TNuan1DFwhmMuA1S