Monday, May 27, 2024

अलौकिक शांताबाई...

अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..! शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या.. कवितेच्या शब्दात दडलेला आशय आणि संगीतकाराने शब्दातून तो अर्थ कसा बाहेर आणला याचे प्रात्यक्षिक आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून ठळकपणे समोर आणला. प्रतिभा मग ती कवीची वा गीतकाराची असो..कशी फुलत जाते आणि संगीत देताना संगीतकाराने त्याला कसे फुलवून बाहेर आणले आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.
खरे तर अपर्णा संत या उत्तम गायिका म्हणून आपल्याला दिसल्या..पण इथे त्या दिसतात कविता..आणि गाणी यांच्यातील दडलेले नाते सांधणारी आशयाला आपल्या विश्लेषणातून बाहेर आणणारी विचारवंत म्हणून.. अनेक कवितेतील अर्थ..आणि संगीतकाराने त्याला स्वरातुन दिलेला योग्य न्याय याची अपर्णा संत यांनी अनेक उदाहरणातून रसिकांना दाखले देत समजावून सांगितले आहे.. शांता शेळके यांच्या अनेक कवितांना त्यानी आपल्या निवेदनातून प्रगट केले..पण पैठणी या कवितेला ज्या तन्मयतेने सादर केले ..ते एक उत्तम उदाहरण सांगता येईल. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आपल्या लहानपणी शांताबाई ..आणि अरुणा ढेरे कशा भेटल्या आणि त्यानी कसे गाणे ऐकले आणि पुण्यात हृदयनाथ मंगेशकर यांची कशी भेट घडवून आणली..आणि आयुष्याला कशी योग्य दिशा दिली ते अपर्णा संत आपल्या शब्दातून व्यक्त करतात.
अलौकिक शांताबाई... मध्ये अपर्णा संत स्वतः न गाता आपल्या किरण भिडे नायर ( मागे उभा मंगेश, ही वाट दूर जाते, हे श्यामसुंदर राजसा ), श्रुती देवस्थळी (माझी न मी राहिले, निळ्या आभाळी कातरवेळी, पहा टाकले पुसूनी डोळे , आणि अखेरचे जिवलगा राहिले दूर घर माझे ), पूर्वा जठार ( विकल मन आज..हे नाट्यगीत, ऋतू हिरवा) , चिन्मयी तांबे (हे एक झाड आहे, कळले तुला काही) या शिष्यांना गाणी सादर करायला लावून .. ती उत्तम तयारीने करायला लावून त्यांना नवा आत्मविश्वास दिला..
तर शुर आम्ही सरदार, तोच चंद्रमा नभात, रुपास भाळलो मी..श्रुती देवस्थळी सह, आणि अजब सोहळा..ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर यांना आमंत्रित करून ती गाणी तयारीने सादर केली.
याशिवाय शांताबाईंच्या बालगीतांसाठी.. इरा वेदपाठक आणि स्वरा बंकापुरे या छोट्या मुलींना तयार करून त्यांचेकडून दोन गाणी रसिकांना ऐकवली. त्यातले किलबिल किलबिल रसिकांनी डोक्यावर घेतले. अपर्णा संत आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी राजा सारंगा..ह्या कोळी गीतातल्या सुंदर हार्मनी मधून रसिकांना मंत्रमुग्ध केले.. गाण्याला स्वराने आणि शब्दाने ती धून पुन्हा पुन्हा आळविणाऱ्या गीताने वातावरण भारावून गेले होते. या पाठीमागे असलेल्या उत्तम संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनाही दाद द्यायला पाहिजे..हे गाणे जून मध्ये शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला भावपूर्ण वंदन म्हणून सादर करण्यासाठी तयार केले होते.
संपूर्ण कार्यक्रमाची साथ केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अजय अत्रे आणि प्रसन्न बाम यांनी उत्तम संगत करून तो रंगतदार केला. त्यांचीही यांच्या यशामागे मेहनत दिसली.
अलौकिक शांताबाई... याची संकल्पना, संहिता आणि निवेदन करून अपर्णा संत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले..खरोखर असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत आणि तयारी करून तो सादर करावा लागतो..त्याचे सारे श्रेय गायक..गुरू..आणि संगीत अभ्यासक अपर्णा संत यांना मनापासून द्यायला हवे.. यासाठी डॉ. अरुणा ढेरे मुद्दाम उपस्थित होत्या..आणि सुजाण रसिक सभागृहात दाद देत होता. अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना रसिक तिकीट काढून गर्दी करतात ही आगळी गोष्ट आहे..
- सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, May 7, 2024

तू अन् मी..शब्द सुरांचा हा हिंदोळा...

शब्द शब्द जणू साद मनीची सूर चेतवीती याद मनीची गाणी अशी ती लळा जिव्हाळा शब्द सुरांचा हा हिंदोळा... असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला..
काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला.. कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कुमार आणि श्रुती यांच्या संसाराला पंचवीस वर्षे.. कुमारजी यांची पन्नाशी आणि संगीत क्षेत्रातील तीस वर्षे असा हा एकूण प्रवास सुरू आहे..तेही उभयतांच्या जोडीने..एकमेकांच्या साक्षीने..
कुमार करंदीकर यांनी संवादिनी संगतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.. अनेक नामवंत गायकांच्या मैफलीला साथ केली.. त्यांना गजानन वाटवे यांचे मार्गदर्शन लाभले नंतर.. काही रचना संगीतबद्ध केल्या.. आणि ते शशिकला शिरगोपिकर यांचेकडे गजल शिकण्यासाठी वळले..आणि त्यात गजल समजून त्या पेटीवर साथ करीत गायला सुरुवात केली..त्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले..आणि गायक..साथीदार.. संगीतकार म्हणून नाव कमावले..
तसेच श्रुती करंदीकर..यांनी रीतसर गायनाचे शिक्षण घेतले..गजानन वाटवे यांचेकडे सुगम गायनाचे धडे घेतले.. आणि मराठी - हिदी.. गाण्यांची मैफल सुरू केली..कुमार प्रमाणे गजल कडे त्याही वळल्या ..स्वतः गाण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली..आणि दोघे मिळून असा नवा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.. उत्तम शब्दांची जाण..कवितेची निवड..आणि संगीत देण्याची तयारी..यातून हिंदोळा प्रस्तुत.. तू अन् मी.. असा नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी घेऊन रसिकांना आपल्या अभ्यासपूर्ण गाण्यातून बांधून ठेवण्याची हातोटी साधली.
कार्यक्रमात नेहमीची गाणी न घेता नव्या रचना ..घेऊन त्यातील शब्दांना कानात साठविण्याची संधी त्यानी यानिमित्त घेतली.. नवीन चाली आणि नव्या रचना इथे ऐकायला मिळणार याची खात्री असूनही रसिकांनी या गाण्यांना .. चालींना तशीच दाद दिली..हे कौतुकास्पद आहे. तू सप्त सूर माझे.. कुमार..मग तुझ्याचसाठी कितीदा..हे श्रुती यांचे गाणे ऐकत आनंद घेत दाद देत..स्नेहल दामले यांच्या सहज आणि उत्स्फूर्त निवेदनाने गाणी ऐकत रसिक तृप्त होत होते.. धुंद तू धुंद मी, तू येता या फुलांना अशी दोघानी स्वरांनी नटविलेली गाणी त्यातले भाव अधिक उठावदार करत होती..
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.. इलाही जमादार यांची गजल मधूनच वास्तवाची भान देणारी ठळकपणे अधोरेखित होते..ती कुमार करंदीकर यांच्या उत्तम सादरीकरणातून. मधूनच. आपल्या चुका कबूल करत जाहल्या काही चुकाचे दर्शन श्रुती देत होत्या.. कधी कुठे भेटणार..मग फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे. श्रुती..आणि मोहूनिया तुजसंगे..असे कुमार म्हणत गजाजन वाटवे यांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला. सांजवेळी सोबतीला घेऊन श्रुती करंदीकर.. कुमार यांच्या अधिक जवळी गेल्या.. तर संजीवनी बोकील यांच्या ढळे वाऱ्याचा पदर..सारखे मालकंस रागात बांधलेले गाणे मनात खोलवर परिणाम करून जाते.. मराठी गजलकडे वळताना गडे सोडून दे रुसवा..ही दीपक करंदीकर यांची नवी रचना कुमार तेव्हढ्याच आत्मीयतेने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवितात.. मग सुरू होतो..शशिकला शिरगोपीकर यांची तयार करून घेतलेल्या उर्दू गजलांची .. बात निकलेगी तो.. तुमको देखा तो.. तुमको हम दिलमे.. दीलमे एक लहरसी.. तुम अपना रंजो गम.. सारख्या गजल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात..त्या कुमार आणि श्रुती दोघानी ताकदीने सादर केल्या. त्याला शशिकला शिगोपिकर यांनी उपस्थित राहून दादही दिली. ये दिल तुम बिन..हे दोघानी ताकदीने सादर केलेली रचना.. आणि गो जरासी बातपर..ही गजल अर्थासह पेश करून कुमार करंदीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गाण्याचा आनंद दिला. अखेर रंजिश ही सही..ही रचना कुमार..श्रुती यांनी रसिकांच्या मनात साठवून ठेवताना ..ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है..हेच दाखवून दिले.. नवीन रचना आणि त्यात जुन्यांची आठवण करत..हा शब्द सुरांचा प्रवास पुढेही नवीन मालिकेत सुरू ठवण्याचे आश्वासन देऊन.. तू अन् मी.. चा पहिला एपिसोड इथेच संपवितात..
यासाठी अरुण गवई..केदार तळणीकर..आणि मिहिर भडकमकर यांची स्वर तालाची संगत शब्दांना अधिकाधिक परीपूर्ण करत होती.. आणि स्नेहल दामले यांचे ओघवते शब्द मनाला अधिक भिडत होते..कधी कधी कमीत कमी शब्दातून गहरा असर व्यक्त करत होता.. असे प्रयोग रसिकांना नक्कीच भावतात..पण त्यासाठी त्यांची अधिकाधिक उपस्थितीची गरज आहे.. तरच हे नव्या रचना सादर करायला कलावंताना प्रोत्साहन मिळेल. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Sunday, March 31, 2024

व्हायोलीन वादनाचे अप्रतिम सादरीकरण..

गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलीन परंपरेचा उत्तम आविष्कार चारुशीला गोसावी यांच्या वादनातून साकारला... डॉ. विकास कशाळकर
गजाननबुवा जोशी यांच्याकडे चाळीस वर्षांपूर्वी ज्या श्री रागाने सुरवात केली त्या रागाचे अप्रतिम सादरीकरण करून चारुशीला गोसावी यांनी आपल्याला पुनः प्रत्ययचा आनंद दिल्याची भावना ज्येष्ठ गायन गुरू आणि अभ्यासक डॉ. विकास कशाळकर यांनी एस एम जोशी सभागृहात व्यक्त केली. संगीत साधनेची चाळीस वर्षे या निमित्ताने पुण्याच्या व्हायोलीन वादक चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय आणि सुगम व्हायोलीन वादनाची मैफल व्हायोलीन गाते तेंव्हा..या नावाने रविवारी ३१ मार्च २४ ला रसिकांसमोर सादर केली.
यावेळी चारुशीला गोसावी यांनी श्री रागाने शास्त्रीय व्हायोलीन वादन करून त्यामुळे भारावून जाऊन डॉ. विकास कशाळकर यांनी त्यांच्या वादनात दाखविलेले स्वरांचे दर्जे आणि लयीचे प्रभुत्व त्यांच्या वादनात होते याबद्दल आपल्या बोलण्यात कशाळकर यांनी चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची दाद देऊन..आजकाल कलाकार गॅलरी साठी वाजवितात .पण गोसावी यांनी केलेले वादन स्वतः साठी होते म्हणून ते अधिक दर्जेदार होते याची कबुली दिली. आणि गजाननबुवांची परंपरा तुम्ही नक्की पुढे न्या ..असे सुचविले. तबला वादक मोहन पारसनीस यांनी कलाकार काय वाजवितो याचे भान ठेऊन चारुशीला गोसावी यांना केलेली साथ मोलाची होती..याबद्दल ज्येष्ठ तबला गुरू पांडुरंग मुखडे यांनी कौतुक केले आणि चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय व्हायोलीन वादनात उत्तम तारेवरची कसरत उत्तम स्वर तालात साधली याबद्दल खास शब्दात त्यांनी मनोगतात त्यांची स्तुती केली. स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी चारुशीला यांच्या वक्तशीर आणि अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करून प्रामाणिक, मेहनत घेऊन कार्यक्रम सादर करते याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. पुण्यात अनेक कार्यक्रम सादर होत असताना या व्हायोलीन कार्यक्रमासाठी सभागृह पुरेपूर आनंद घेत रसिकांच्या उपस्थितीने भरलेले होते..
आरंभी शास्त्रीय व्हायोलीन वादनात श्री आणि त्यानंतर किरवाणी रागातली धून सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली.. त्यांना तबला साथ तेव्हढ्याच आत्मीयतेने आणि तयारीने मोहन पारसनीस यांनी केली होती. सुगम संगीतात स्वतःची ओळख व्हायोलीन वाद्यावर करून चारुशीला गोसावी प्रभात समयो पातला, जगी आंधळी मी तुला पाहते, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर लळा जिव्हाळा सारखे भावपूर्ण अवघड गीत, कारे धरिला सारखी बैठकीची लावणी, नकोस नौके परत फिरू हे गीतरामायणातले आगळे गाणे, पराधीन आहे जगती सारखे अर्थपूर्ण गीत. तर तुझे गीत गाण्यासारखे भावगीत....आणि चारुशीला गोसावी यांची शिष्या वैष्णवी काळे यांनी आईये मेहेरबान..सादर करून रसिकांची पसंती मिळविली.
मग मधुबन मे राधिका सारखे नृत्य..ताल.. लय याला महत्व असणारे लोकप्रिय हिंदी गाणे, पाकिझा मधील ईन्ही लोगोने.. आणि शेवटी हे सुरांनो चंद्र व्हा...ह्या भावपूर्ण गाण्याने आजच्या व्हायोलीन गाते तेंव्हा..या कार्यक्रमाची सांगता झाली.. संपूर्ण कार्यक्रम म्हणजे उत्तम व्हायोलीन वादनाची अवीट मैफल अशी काही रंगत गेली त्याला यथोचित अशा निवेदिका विनया देसाई यांच्या उत्तम शब्दाने.. साथ संगत विनीत तिकोनकर, उद्धव कुंभार आणि आदिती गराडे त्यांच्या कमालीच्या हुशारीने वाजविलेल्या वाद्यातून लाभली.. पंडित भालचंद्र देव यांच्या पत्नी निलाक्षी देव यांच्या हस्ते कलावंताना स्नेह प्रतिक देण्यात आले.. तर रसिकांच्या वतीने आनंद आणि कल्याणी सराफ यांनी गोसावी यांना गुलाबाची परडी देऊन सन्मान केला. रवी मेघावत यांच्या उत्तम ध्वनीव्यवस्थापनामुळे गाणी ऐकण्याचे उत्तम समाधान रसिकांना घेता आले. तीन तास व्हायोलीनची संगत लाभलेल्या रसिकांना चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची शास्त्रीय आणि सुगम मैफल अनुभवता आली.
- सुभाष इनामदार, पुणे

Sunday, January 28, 2024

ाजदत्त तथा दत्तात्रय अंबादास मायाळू याना पद्मभूषण जाहीर..!

राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या कारकिर्दीला नवे वलय लाभले आहे.. त्यांना उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य यापुढेही लाभावे आणि त्यानी आपले उत्तम शिष्य निर्माण करावेत..हीच आम्हा रसिकांची इच्छा..! राजदत याना आम मानाचा मुजरा..! जय हिंद..जय महाराष्ट्र...! - subhash inamdar, Pune subhashinamdar@gmail.com
राजदत्त जीवन परिचय मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले . अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले . सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास इथल्या चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत.
चित्रपट कारकीर्द मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले. पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले [२]त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला.
राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .

Thursday, January 25, 2024

राजदत्त तथा दत्ता मायाळू याना पद्मभूषण

राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या कारकिर्दीला नवे वलय लाभले आहे.. त्यांना उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य यापुढेही लाभावे आणि त्यानी आपले उत्तम शिष्य निर्माण करावेत..हीच आम्हा रसिकांची इच्छा..! राजदत याना आम मानाचा मुजरा..! जय हिंद..जय महाराष्ट्र...! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com राजदत्त जीवन परिचय मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले . अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले . सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास इथल्या चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत. चित्रपट कारकीर्द मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले. पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले [२]त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला. राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .

Wednesday, January 17, 2024

ओ.पी.नय्यर..आठवणी आणि गाणी

ओंकार प्रसाद नय्यर..अर्थात ओ.पी. नय्यर.. यांच्या गाण्यांनी आणि आठवणीने भारलेली मंगळवार संध्याकाळ..! आपल्या मेलोडियस आणि उडत्या चाली..यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील या महान संगीतकाराची अनेक गाणी आजही मनावर. आणि ओठावर आहेत.. त्यातलीच काही निवडक गाणी पुण्यात व्हायोलीन मधून अभय आगाशे यांनी तन्मयतेने सादर केली आणि त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाना अधिक हळुवार बनवून शब्दातून तसेच चित्रातून रसिकांच्या मनात ओ.पी. नय्यर यांचा स्वभाव, त्यांची शिस्त त्यांची शैली आणि त्यांच्या आठवणी प्रकाशचित्रकार आणि उत्तम लेखक सतीश पाकणीकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ओ.पी. प्रेमी रसिकांच्या मनात रुजविण्याचे उत्तम कार्य करून नवीन पिढीला या संगीतकाराची ओळख करून दिली. चित्रपट संगीताच्या अभ्यासिका सुलभा तेरणीकर सतीश पाकणीकर यांच्याविषयी माहिती देत त्यांचे नय्यरप्रेम किती आहे याविषयी बोलून त्यांना शुभेच्छा दिल्या.
ओपिंचे संगीत म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा हॅपिनेस इंडेक्स..असा उल्लेख करून सतीश पाकणीकर सांगतात.. बसल्या जागी तुम्हाला उड्या मारायला लावेल असे ते संगीत आहे..मेलोडीयस आणि रिदमकिंग असलेले ओ.पी. हे त्यांना त्यांच्या बरोबर काम केलेले संतूरवादक शिवकुमार शर्मा त्यांचे वर्णन करीत. ओ.पी. नय्यर यांच्या कॉफी टेबल पुस्तकाच्या निमित्ताने सतीश पाकणीकर यांना त्यांचा सहवास लाभला त्यातून ते व्यक्ती म्हणून आणि संगीतकार म्हणून कसे आहेत हे जवळून अनुभवण्याची संधी मिळाली..नय्यर यांच्या जन्मदिवसाच्या निमीत्त विवेक पाध्ये यांच्या सहकार्यातून कार्यक्रम करताना त्या साऱ्या आठवणी त्यानी रसिकांच्या हृदयात कोरल्या. इथे आठवणी आणि गाणी असा अनुभव टिपण्या सारखा होता..म्हणूनच याची दखल घेणे अत्यावश्यक होते .
संगीतकार..एक व्यक्ती म्हणून आणि कलकार म्हणून इतर वादकांना आणि गायकांना कसा मान देतो त्याची उदाहरणे इथे अधिक बोलकी झाली.. पाकणीकर बोलत होते..आठवणी विस्तृत सांगत होते.. गाणी अभय आगाशे आपल्या व्हायोलीनमधून सादर करून शब्द शब्द ..मनात .. स्वरातून बोलते करत होते.. अतुलकुमार उपाध्ये यांचेकडे व्हायोलीनची तालीम घेतलेल्या अभय आगाशे यांनी आपल्या वादनाने गाण्याना अधिक नेटकेपणाने शब्द नसताना बोलके केले.. त्यांना अनुजा आगाशे, प्रसाद जोशी, दिलीप व्यास आणि रोहित साने या सहवादकांच्या उत्तम साथीने गाणे एकाग्रतेने खुलवत होते.. प्रत्येक गाण्याचे सादरीकरण पुनःप्रत्ययाचा आनंद देत होता..
गाणी सादर होताना पडद्यावर ओ.पी. ..चित्रपट, त्यातील कलाकार, आणि गाण्यात वादन केलेले कलावंत खास करून सतीश पाकणीकर यांनी दाखवून त्याचे महत्व अधिक ठळक केले. आइये मेहरबाँ, बाबूजी धीरे चलना, आखों ही आखोमें इशारा हो गया... आवो हुजुर तुमको,छोटासा बालमा, सून सून सून जालिमा, इशोरो इशारोमे.. तुमसा नहीं देखा. पासून दिवाना हुआ बादल पर्यंत सोळा गाण्यांचा नजराणा इथे पेश झाला..
व्हायोलीन या वाद्याची उत्तम पकड ..गाण्यातील नेमकेपणा आणि त्यातले बारकावे अभय आगाशे यांच्या सादरीकरणात स्पष्ट दिसले.. रेकॉर्डिंग साठी आलेल्या वादकांना लगेच पेमेंट करणारे..वेळ पाळणारे..त्यातही देलेला शब्द पाळणारे..पण आयुष्याच्या उत्तरार्धात अधिक खडतर आयुष्य भोगणारे..तरीही आपला आब आणि रुबाब सांभाळत , हिंदी न येताही उर्दू भाषेतून का करणारे उत्तम काव्याची जाण असणारे तसेच कधीही कुणापुढे न झुकणारे ..आपल्या मस्तीत हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करणारे महान संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे उदाहरण आदर्श म्हणून कसे होते..ते या आठवणीतून आणि व्हायोलीन मधून सादर झालेल्या अनुभवातून सिध्द झाले.
कार्यक्रमासाठी हेमंत पाकणीकर आणि रवी केळकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. केवळ ओ.पी. प्रेमींना नव्हे तर हिंदी संगीताचे जाणकार असणाऱ्या रसिकांना असे कार्यक्रम हे आनंद आणि समाधान देतात.. अतिशय अभ्यासपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाचे पुन्हा विविध गावात सादरीकरण व्हायला हवे आहे.
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Saturday, November 4, 2023

संगीतभूषण राम मराठे एक स्मरण

पंडित राम मराठे जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी पुण्यात गानवर्धन पुणे, यांनी आयोजित केलेली ही अनोखी संगीत मैफल.. राम मराठे यांच्या गायनातील सादरीकरणात असलेल्या भरजरी स्वरांच्या लडा इथे हळुवारणे रसिकांच्या साक्षीने उलगडत गेल्या.. ही अनोखी मैफल राम मराठे यांच्यातल्या कलाकाराचे सर्व बाजूंनी असलेले महानपण ..त्यांची स्वरावरची हुकूमत..त्यातले तेज..अनेक गुरूंकडून घेतलेली विद्या आणि चतुरस्र बुध्दी साऱ्यांचे दर्शन शुक्रवारी एस एम जोशी सभागृहात घडले. जबरदस्त अशी तीक्ष्ण प्रतिभा लाभलेले राम मराठे नादब्रह्म स्वरुपात आजही किती रसिकांच्या मना मनात आहेत याची साक्ष कार्यक्रमातून येणारी दाद यातून बाहेर आली. बैठकीत गाणे आणि नाटकातील गाणे कसे आणि का वेगळे होते याचे मर्म त्यांच्या मुद्रित माध्यमातून उलगडले. त्यांच्या बाबतीतला आठवणींचा खजाना इथे अनेक मान्यवरांच्या प्रतीक्रियेतून कळत गेला. राम मराठे यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितलेल्या गोष्टी आणि गायकांच्या हुबेहूब केलेल्या नकला.. यातून ते गायक कसे होते याचे नेमके मर्म त्यांच्या स्मृतीला अधिक झळाळी देणारे होते. यात राम मराठे यांच्या चार पिढ्या रसिकांसमोर आल्या.. यात प्रामुख्याने मुकुंद मराठे , भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे - काळे , आदिश्री पोटे, मृणाल नाटेकर ,राजेंद्र मणेरिकर या त्यांच्या कुटुंबातील आणि परिवारातील कलावंतांचा सहभाग होता. माधव मोडक..तबला आणि लीलाधर चक्रदेव यांची हार्मोनियम संगत कार्यक्रमाला अधिक समर्पक अशीच होती. संजय गोगटे हे बाहेरून ऑर्गन साथ करीत होते. या खरोखरीच संस्मरणीय कार्यक्रमाचे निवेदन स्वाती मराठे.. थिटे यांनी केले होते. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Monday, October 23, 2023

एकदा अनुभवल्याच पाहिजेत..

अनवट शांताबाई..
व्हायोलीनचे ते हळवे सूर सायंकाळचे हुरहूर लावणारे स्वर मंचावर वाजत रहातात..आणि त्यातच सुरू होते ..ही वाट दूर जाते.. ह्या सुरावटिकडे आणि शांता जनार्दन शेळके यांच्या जन्म गावपासूनचा प्रवास अभिवाचनातून उलगडला जातो..बालपण..तिथले वातावरण..मनावरचे आईचे ...आज्जीचे संस्कार ..आणि एका ज्येष्ठ कवियत्रीच्या जीवनाचा तो काहीसा उदास वाटणारा अनवट प्रवास वंदना बोकील.. कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्याच पुस्तकातून शांताबाई ज्या व्यक्त झाल्या आहेत..त्या हळूहळू आपली कहाणी सांगु लागतात.. अनुराधा जोशी..दिपाली दातार..आणि वंदना बोकील या त्या शब्दातून तर कधी कवितेच्या बोलितून व्यक्त होऊ लागतात.. आणि या साऱ्या प्रवासाला व्हायोलीनच्या पार्श्वसंगीतात आणि साजेशा गाण्याच्या स्वरात अनुप कुलथे त्या वातावरणात घेऊन जातात.. एकूणच रसिक शांताबाई शेळके यांच्या आयुष्यातील एकेक घटना एकाग्रतेने ऐकतात आणि त्या गोष्टीचा मागोवा घेत..त्यांच्या जीवनात एकरूप होऊन जातात..
शांता शेळके यांची गीते मना मनात..घराघरात पोचली पण त्यांच्या कविता तेव्हढ्या पोचल्या नाहीत.. ही खंत त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दूर करून त्यांच्याच पुस्तकातून त्यांनीच लिहलेल्या शब्दांना एकत्र करून वंदना बोकील यांनी आपली अनवट शांताबाई सादर केली..आपल्या आम्ही सुदर्शन रंगमच इथे हा अनुभव घेतला..या कार्यक्रमात सहभागी होऊन रसिकांना त्यात सामील करून वंदना बोकील. कुलकर्णी आम्हाला त्या दिवसात घेऊन गेल्या. शांता शेळके यांच्या मनातील व्यथा आणि त्यांचे ते एकाकी जगणे आणि त्यांच्या मनोव्यथा दर्शविणाऱ्या कविता निवडून लहानपण..घरगुती वातावरण..त्यांची जात.. त्यांचे शिक्षण .. त्यांनी मुंबईत जपलेले नाते आणि कवितेशी त्यांची जमलेली गट्टी सारेच इथे व्यक्त होते.. परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडली आहे त्याची ही कहाणी.. ओठांवरती थोडे हासू डोळा थोडे पाणी ठेऊन शब्दांच्या जोडीला इथे कविताही बोलक्या होतात..या अभिवाचानात बोलून न बोललेल्या भावनाही मनाला भिडतात त्याचे कारण प्रभावी व्यक्त होणे या सादर करणाऱ्या कलाकारांच्या भूमिकेतून..
त्याची परिणाकारकता इथे ऐकताना तुम्हालाही जाणवेल आणि तुम्ही सहजी त्या वातावरणात सामील होता. शब्दातून व्यक्त झालेल्या ओळीतून त्यांचे जगणे अंगावर येते..आणि आपण ज्या आनंदी आणि मनमोकळ्या भासलेल्या शांताबाई खरोखरीच कोणत्या उदासवाण्या आयुष्यात जगल्या त्याची ओळख होते.. कारुण्याचा स्पर्श या अनवट शांताबाई कार्यक्रमात सतत तुमची पाठ सोडत नाही.. आणि मग शेवटी जेंव्हा असेन मी नसेन मी..ची ओळ येते तेंव्हा पर्यंत हाच आशावाद कायम राहतो..
खरे तर अशा कार्यक्रमावर थोडक्यात व्यक्त होणे ही परीक्षा असते..यासाठी त्यांच्या काही कविता यांचा संदर्भ घ्यायचा मोह टाळून सुदर्शनच्या मंचावर..उत्तम रसजी, वाचकांच्या साक्षीने अनुभवलेल्या शांताबाई..यावर व्यक्त होणे खूप कठीण आहे..तो अनुभव प्रत्यक्ष घेणे हेच उचित होईल. अश्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि ती अनुभूती मनात कायम ठेऊन त्यांचे स्मरण सतत ठेवावे असाच हा कार्यक्रम आहे.. चंद्र.. चांदण्या..फुले वेचून..त्यामागची कळ्यांची वेदना तुम्हाला जगायला अधिक शिकवेल हे नक्की..
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Friday, April 28, 2023

पर्यटकांचे सुख जपणारे अजित करंदीकर

रत्नागिरीचे अमृता ट्रॅव्हल्सची निवड करणारे आम्ही पुणेरी ..पण ती निवड किती उत्तम होती याची पारख आम्ही काश्मीर आणि आसाम, मेघालय अरुणाचल येथे जाऊन आल्यावर कळाले की ती किती उत्तम होती...याचे एकमेव कारण म्हणजे या कंपनीचे संचालक अजित करंदीकर.. पैश्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येकाशी नाते जोडताना त्यांच्या सुखात समाधान मानणारे हे व्यक्तिमत्व. सहा फुटाची उंची असलेला..सैन्यदलात पंधरा वर्षे काम केल्याने तगडेपणा..भारदस्त देह..आनंदी आणि रुबाबदार चेहरा..सगळ्यांना समजून घेऊन शेवटी ठिक आहे..असे आवर्जून सांगणारा माणूस..सहजपणे इतरांवर प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व..अजित करंदीकर.. अमृता ट्रॅव्हल्स यांचे नाव आमच्या मैफल ग्रुपच्या एकांनी सुचविले आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो..गेली २२ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता यांनी रत्नागिरीत त्या भागातील पर्यटकांसाठी आपलेपण जपणारी कंपनी काढून कोकणातून बाहेर पडण्यासाठीची नजर त्यांनी प्राप्त करून दिली..आणि आलेल्या लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले ते त्यांच्या उत्तम नियोजनबध्द आणि नेटक्या शिस्तशीर सहलीच्या माध्यमाने.. काश्मीर हा तसा वेगळा सुरक्षा असणारा अनोखा भाग आणि तर थ्री सिस्टर हा चायना सीमेवरच्या अतिथंडीतला १५ हजार उंचीवरचा भूप्रदेश..पण दोन्ही ठिकाणी अजित करंदीकर यांनी आम्हा साऱ्या पर्यटकांना जे जे नमूद केले त्या त्या ठिकाणी नेण्याची कसरत पूर्ण समाधानाने पार पाडली..आमच्या प्रत्येकाच्या आरोग्यास प्राधान्य देऊन..काय हवे नको ते साध्य करून दिले.. प्रसंगी आपल्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन घडविले..ठरलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त एकाही पैशाची अधिक मागणी न करता जे जे तुमच्या मनात असेल ते सांगा मी ते पुरवितो.. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे..मी तिथे मिळाले तर नक्कीच देईन..असे सांगत प्रवाशांना आपलेसे करत आपुलकीचे नाते जपले.. व्यवसाय पेक्षा नाती आणि माणुसकी सांभाळणारी ही अमृता ट्रॅव्हल्सची पताका का इतक्या सहजपणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली याचे दर्शन आम्हाला अजित करंदीकर यांच्या सहवासात घडले.. यापूर्वी अनुभव ट्रॅव्हल्स यांच्या कडून केलेल्या अरुण भट यांच्या सहलीत आला होता..त्यानंतर आम्ही नवीन सहल कंपनी शोधत होतो. जिथे उत्तम लक्ष दिले जाईल आणि आपल्याला समाधानाने फिरता येईल..ते उदाहरण आता नक्की झाले...अमृता ट्रॅव्हल्स..रत्नागिरी.. काश्मिरच्या सहलीत सिंधुदुर्ग, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी,मालगुंड येथील कोकणवासीय ओळखीचे झाले..थ्री सिस्टर सहलीत..पुणे, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरातील पर्यटक सहभागी झाले होते. थोडक्यात तुम्ही कुठलेही असलात तरी अजित आणि सौ. अमृता करंदीकर यांच्या बरोबर सामील होऊन तुमच्या फिरण्याचा आनंद सुरक्षित आणि समधानेने घेऊ शकता असे हे विश्वासपूर्ण नाव आहे.. उदाहरण द्यायचे तर शिलाँगयेथून बांगलादेश सीमेवरील उमेद नदीवर जायचे होते..पण शिलाँग सोडले आणि रस्त्यावर मध्येच कळाले की मध्ये रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद आहे..मग सर्वांना बोलावून अजित सरांनी विचारले आपण पर्यायी रस्ता शोधून जाऊ. पण सुमारे १५० कि.मी. प्रवास वाढेल..आणि रात्री मुक्कामास उशीर होईल..असे सांगून त्यांनी दुसऱ्या मार्गाने निघालो देखील..पण यामुळे खर्च वाढेल..ह्याची जाणीव होती...आम्ही शेवटच्या दिवशी त्या खर्चात आमची मदत देण्यास सारे तयार होते..पण करंदीकर यांनी ठामपणे सांगितले..तुमचे समाधान हे महत्वाचे आहे..माझा खर्च झाला..खरा..तरीही मी फायद्यात आहे.. तुम्ही कुणीही काहीही द्यायची गरज नाही.. आणि त्यांनी तो विषय संपविला.. कुणाही सहभागी मंडळींनी खिशातून एकही पैसा काढायचा नाही..आणि तसा खर्च केला तर मला सांगा आणि ते माझ्याकडुन मागून घ्या.. केवळ हा भाग नाही.. तर काश्मीर येथे शक्य नव्हते पण थ्री सिस्टर येथे बरोबर स्वयंपाकी होते.. प्रत्येक ठिकाणी रोज वेगळा मेनू.. चवदार..आणि उत्तम. रोज वेगळे गोड.. ताक शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा..भरपूर..आणि अगत्याचे दर्शन.. इतरांबरोबर स्वतःही या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यतील एक बनून वावरणे हे अजित सरांचे वैशिष्ठ्य होते. मालक असल्याचा आविर्भाव न बाळगता..सर्वांना आपलेसे करून उत्तम ते ते दाखविण्यास सतत उस्तुक असलेले अजित सर मनात कायम कोरले गेले..त्यांच्या बरोबर आम्ही सुमारे २० दिवस घालविले . त्या आठवणी आम्ही नेहमीच जवळ ठेऊ आणि त्यांच्याबरोबर सहली करण्यास इतरांना सांगू अजित करंदीकर.. तुम्ही आम्हाला आनंद आणि समाधान दिलेत..असेच प्रेम कायम राहो हीच मनोमनी प्रार्थना.. अमृता ट्रॅव्हल्स जेंव्हा २५ वर्षाची होईल तेंचा जरूर रत्नागिरीत येऊ.. तुमचाच, सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे ९५५२५९६२७६

Monday, January 9, 2023

मला भेटलेले विश्वास मेहेंदळे...!

नक्की साल नाही आठवत..पण सांस्कृतिक खात्याच्या मुंबईतल्या कार्यालयात साठे म्हणून एक उमदे व्यक्तिमत्व होते.. आमचे नाटक राज्य स्पर्धेत बक्षिसपात्र असल्याने नाट्य शिक्षण अभ्यासक्रमात सहभाग मिळावा म्हणून तिथे गेलो असताना.. त्यांनी मला तेंव्हा नवे संचालक म्हणून आलेले विश्वास मेहेंदळे यांची ओळख करून दिली.. बोलके आणि मनमोकळे असलेले मेहेंदळे मग एकदम आपलेसेच वाटायला लागले.. गप्पा आणि प्रचंड ओळखी असलेले हे बहुआयामी व्यकित्मत्व मनात रुजून बसले.. साधेपणा.. कुठलाही खोटा डौल नाही.. आणि तिथल्या तिथे निर्णय घेऊन तो अमलात आणण्याची हातोटी यामुळे ते कलाक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या लोकात सहज जाऊन बसले.. त्यांना खोटेपणाचा तेंव्हापासून तिटकारा बोलण्यातून जाणवत होता. मीही नाटककार विद्याधर गोखले यांच्या संपर्कात होतो.. त्यांनाही त्यांच्यांबद्दल आदर होता. मी तरुण भारत या दैनिकातून राजीनामा देऊन बसलो होतो..पण कुठे काम नव्हते.. मला त्यांनी १९८१ ते १९८३ संस्कृतिक खात्यातर्फे होणाऱ्या नाट्य महोत्सवात प्रतिनिधी म्हणून नियुक्ती पत्र दिले.. त्यामुळे माझेवर त्याकाळीचे उपकारच त्यांनी केले होते. अशी व्यक्ती सरकारी कामात फार दिवस टिकणार नाही ..कारण त्यांचा स्पष्टवक्तेपणा .. तसेच झाले.. दामू केंकरे यांच्यानंतर ती संचालक पदाची खुर्ची विश्वासराव यांनी घेतली.. पण ते फार काळ राहिले नाहीत.. अशी चांगली माणसे सरकारी चाकोरीत टिकणे कठीण असते..तेच झाले सरकारी नोकरीतून मेहेंदळे बाहेर पुन्हा माध्यमांच्या दुनियेत गुरफटले.. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले.. सिंबायोसिस मध्ये वृत्तपत्र विद्या शिकविण्याचे नवे दालन त्यांनी उघडले.. पुढे.. काही काळ लालन सारंग यांच्यासोबत काही नाटकात कामे केली.. पण तिथे रमले नाहीत.. त्यांनी लेखनाचा ध्यास घेतला.. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा अभ्यास करून पुणे विद्यापीठ मध्ये डॉक्टरेट मिळविली. नवी दिल्ली पासून दूरदर्शनवर बातम्या देण्याचे काम केल्याने त्यांना विविध मोठे लोक, राजकारणी यांना जवळून बघता आले..त्यातूनच त्यांना संवाद साधण्याची उत्तम कला अवगत होती.. मग त्यांनी मला भेटलेली माणसे.. सारखी व्याख्याने दिली..त्यातूनच त्यांच्या बोलण्याची ताकद उमगली.. त्याचेच पुस्तक केले.. पत्रकारिता.. समाज माध्यम आणि नाटक यातून त्यांचा पिंड उत्तम तयार झाला.. माणसे जोडली तशी तोंडावर गोड बोलण्याचा स्वभाव नसल्याने.. त्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.. यातूनच ते फारसे दिसेनासे झाले.. अलिप्त होत गेले.. थोडे एकाकी बनले.. पण सतत मला हवे तसेच मी बोलणार..हा स्वभाव कायम ठेवला.. काहींनी जवळ केले..काहींनी झिडकारले.. पण ते ठाम राहिले.. सरकारी नोकरीत असल्याने.. आर्थिक बाबतीत ते कुणावर अवलंबून नव्हते.. ते स्वतंत्र होते.. अखेरपर्यंत स्वतंत्र राहिले.. वडील कीर्तनकार होते..त्यामुळे आख्यान रंगविण्याची त्यांची हातोटी व्याख्यानातून बाहेर डोकावत होती.. उत्तम वक्ते.. उत्तम निरीक्षणशक्ती आणि परखड विचार यातून विश्वास मेहेंदळे हे व्यक्तिमत्व मनात आणि समाजात कायम लक्षात राहील असेच होते.. एक इतिहास त्यांनी तयार केला.. घडविला.. त्यांच्या जाण्याने उत्तम व्यक्ती समाजमनातून हरपल्याची जाणीव होत आहे.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com