Saturday, May 24, 2025

नाते संबंध अनुभवताना अस्वस्थ करणारे

नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तीन सशक्त अभिनेत्री असलेल्या तीन शक्तींनी असेन मी..नाटक अतिशय परिणामकारक सिद्ध करून हा अनुभव दिला.. 


आई..मावशी आणि मुलगी..या तीन महिलांच्या आयुष्यातील नाते संबंध अनुभवताना अस्वस्थ करणारी


मराठी रंगभूमीवरील एक कलाकृती अनुभवली..आणि  आम्ही बरेच दिवसानंतर आयुष्याकडे अधिक गंभीर बनून गेलो.. नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तीन सशक्त अभिनेत्री असलेल्या तीन शक्तींनी नाटक अतिशय परिणामकारक सिद्ध करून हा अनुभव दिला.. आणि त्या नाटकाविषयी विचार करतच नाट्यगृहाबाहेर आलो..

संदेश कुलकर्णी यांनी लिहलेले नाटक .. असेन मी..नसेन मी.. व्यावसायिक रंगभूमीवर झालेल्या स्पर्धेत नाटकाने आठ पुरस्कार मिळवले आहे.. उत्तम दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य..आणि तिन्ही कलाकारांना गौरविण्यात आले आहे..हे नाटक आम्ही पाहिले याचा पुण्यात अभिमान वाटतो.


स्त्रियांच्या तीन पिढ्या..त्यांच्या आयुष्यात तुम्हाला घेऊन जातात.. त्यांचे आयुष्य..त्यातल्या घटना सांगून.. स्त्रीत्वाचे..आणि माणसांचे अनेक नमुने एकाच जागी बसून तुम्हाला जगभर फिरवून आणतात..

सुखवस्तू कुटुंबातील तीन पिढ्यांचे आयुष्य उलगडून सांगताना आधुनिक जीवनातील विविध नात्यांना उलगडून सांगत.. दुःखे पेलण्याची ताकदही या नाटकाने.. आहेरे..आणि नाहीरे यांच्या दृष्टीने मांडली आहेत.

केवळ शब्दातून स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या गंभीर पण अनेक विषयांना मनात घर करून देणाऱ्या इथे घडवून तुम्ही त्यांच्या आयुष्यात डोकावता आणि गंभीर होत जाता..

आई...आणि ताई.. नीना कुलकर्णी..मावशी वर्षा..आणि    शुभांगी गोखले आणि गौरी.. ही मुलगी.. अमृता सुभाष..

आईला आता विस्मरण होत असते..

तिला सोडियमची टेस्ट करण्याची मावशी म्हणजे वर्षा गौरीला सांगते..

तिघांच्या आयुष्यात ..एकीचा नवरा.. दारूच्या आहारी जाऊन गेला..तर दुसरी वर्षा आजाराने सतत व्हील चेअरवर..त्यांचा नवरा भोळसट..पण वर्षा बडबडी..मनमोकळी.. गौरी. कर्तृत्ववान ..करारी.. प्रेम विवाह झालाय पण दोघांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतलाय..


आई.. सतत पोट साफ होत नसल्याची तक्रार असणारी.. त्यामुळे आपल्याला हवी ती औषधे घेऊन .. सतत अपसेट असणारी..पतीला जगायचे होते..पण सर्वांच्या सांगण्यानुसार त्यांना जगाचा निरोप घेण्यासाठी कृत्रिम श्वास बंद करून जगाचा निरोप घेण्यासाठी उद्युक्त केले..म्हणून ते सतत भासमय दिसत असतात..म्हणून घाबरणारी

आई..

त्यातून विस्मरणाचा आजार बळावत चाललेला..

मुलीच्या.. जावयाच्या..संसारात होत असणारे बदल..आणि मुलगा रोहन यांच्याविषयी असलेले ममत्व.. त्यातून मुलगी मोठी..ताई म्हणून. तिला मिळालेले मोठेपण.. त्यातून खान भाऊ आणि मोठी बहीण यांच्यातील तणाव..

आई आणि मावशी यांचे केवळ फोनवरील संभाषणातून  तयार झालेले  नाते..त्यांचे एकमेकींशी असलेले भावबंध..

मावशीचा अचानक झालेला मृत्यू..

गौरीचे आईविषयी प्रेम.. त्याचे आईला वाटणारे आपल्यावर पाळत ठेवल्यासारखे वाटणे.. आणि त्यातच मदतनीस होऊन घरात आलेली सुनंदा ताई..आईसाठी कायम लक्ष देणारी कामाची आवश्यकता असणारी ही घरच्या परिस्थितीवर मात करून हसत खेळत असलेली..ही सुनंदा..


बालपणीचा काळ सुखाचा ..म्हणून ते दिवस आठवत होणारे बहिणींचे फोनवरचे संभाषण..आणि तू गेल्यावर तिच्या इच्छेनुसार तपासण्या करणारी आई..

मुलीने कितीही केले तरी मुलाच्या सगळ्या गोष्टी मानणारी आई..

आजकाल एकाकी होत जाणारी नवी पिढी..आणि मुले परदेशात..स्त्रियांचे एकटे रहाणे.. सतत काहीतरी होत असल्याचा दावा असणारी माणसे..

सगळे असले तरी विसरभोळे पणाचा आजार वाढणारी घरे..वाढत असलेला नात्यांतील दुरावा.. आता सगळे आपल्याला एकट्याला भोगावे लागणार असल्याची खंत..किती किती गोष्टी..असेन मी..मधून उलगडत जातात..


प्रेक्षकांना गंभीर बनवितात.. नवीन काळाच्या दिसणाऱ्या गोष्टी संदेश कुलकर्णी यांच्या नाटकातून मनावर गोंदवल्या जातात..

भावनाविश्व दाखविणारे प्रसंग..त्यासाठी आजची भाषा.. आयुष्यातली कृतिमता..सारेच यात आहे..

आणि गोष्ट सांगताना नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांनी रंगमंचावर साकारलेल्या भूमिका.. सारेच जागरूकतेने ..लक्षपूर्वक ऐकले जाते..पाहिले जाते..

अतिशय सुंदर अश्या भूमिका पहाण्याची संधी ही नाटक देते.. गंभीर असणारे नाटक सुनंदाच्या प्रवेशामुळे थोडीतरी निवांत करते..शुभांगी गोखले यांच्या दोन भिन्न प्रकृतीच्या भूमिका अधिक ठळकपणे लक्षात राहतात..

काळाचा बदल..आणि त्याला सामोरे जाताना होणारे बहिणींचे फोनवरचे संभाषण..सारेच मनात लक्षात राहते..

तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या भूमिका मनस्वीपणे 

साकारल्या आहेत.. वास्तव राहून..त्यांची सहज होत असलेला वावर..हेच तर नाटकाचे देखणेपण आहे.. अभिनय नव्हेच तो आहे उत्तम भास..

वाचिक..शारीरिक आणि अंगीक अभिनयाचा आदर्श वाटावा अशा भूमिका...सारेच ..!


दिग्दर्शनात असणारे बारकावे..नेमके दाखविता येत नाहीत..त्यासाठी नाटकच अनुभवावे लागेल.. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य , प्रकाश..साकेत कानिटकर यांचे संगीत.. श्वेता बापट यांची वेशभूषा.. साऱ्यांमुळे नाटक ठसठशीत समोर येते.


आजच्या स्त्रियांचे मानसिक आरोग्य ..त्यांची आतून होणारी कुचंबणा संदेश कुलकर्णी यांच्या नाटकातून अधिक गडद होत मनात घर करून राहते..

अमृता सुभाष यांचे मनापासून अभिनंदन..

असा गंभीर विषय धाडसाने मांडण्याचे साहस त्यांनी केले..मंचावर आणले आणि एक संदेश दिला आहे..अमृता आणि संदेश तुमचे कौतुक..


#असेनमी #amrutasubhash #sandeshkulkarni #नवेनाटक


_ सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

No comments: