Saturday, August 24, 2013

'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरुपात



 
बकिंमचंद्र चटर्जी लिखित 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा नव्या स्वरुपात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय देश बांधवांच्या भेटीला आले आहे.. गायक - संगीतकार ऋग्वेद देशपांडे व  'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'ची प्रस्तूती असलेल्या या राष्ट्रभक्ती जागविणाऱ्या गीताचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पश्चिम येथील  युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आले.
 
या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे  यांनी केले असून संगीत संयोजन वरद खरे यांनी केले आहे. आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे आणि  ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर 
मिसळला असून सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींडे यांनी सातसंगत केली आहे. 
 
या गाण्याचे रेकॉर्डींग ठाण्यात ऋग्वेद देशपांडे यांच्याच 'आरडी म्युझिक' या स्टुडिओत झाले असून   व्हिडिओ स्वरुपातील  गीत 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' ने तयार केले आहे. या  व्हिडिओ  गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे. `वंदे मातरम` हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत मातेला वंदन करता यावे असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे असे संगीतकार  ऋग्वेद देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशाविषयी खूपच सजग आहे आणि म्हणूनच हे देशाभिमान उंचावणारे  
राष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासाठी 
विनामूल्य बहाल करीत आहोत असे 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'च्या वतीने मंदार गुप्ते यांनी सांगितले.

Friday, August 23, 2013

श्रावणात असायचे कहाणीचे पठण.

आजही आठवते ते जुने दिवस...
 श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
सोमवारी उपवास असायचा संध्याकाळी लवकर भोजन
दुपारी शालेला सुट्टी यवतेश्वरला जाण्यासाठी
सातारच्या बोगद्याजवळ असलेल्या शंकरांच्या मंदिरात ही तोबा गर्दी चालत निघालो की तासाभरात यवतेश्वरी.
 किती भावीकता होती मनात स्वच्छ विचार होते. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिली की मनालाही शांती मिळायची ...
गरजा कमी होत्या ..पैसाही हाती कुठे होता ...साध्याभोळ्या स्वभावाची माणसे प्रत्येकाच्या घरी असत आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, सुखाने नांदत
एकमेकांत असूनही खासगीपणाची गरजच नव्हती भाकरी-आमटीची चव पुरणपोळीच्या वरताण होती.
कारण होते एक मनी होते समाधान..माणसात होती तेवढी जाण..
आजही मनात ते दिवस अधिक रुंजी घालतात.
श्रावणातल्या मंगळागोरीने घरे बहरुन जायची..
खेळ खेळणा-या मुलींचा ग्रुप पैसे देऊन बोलवावा लागायचा नाही..सारे कांही मनापासून उस्फूर्तपणे होत असायचे..
वाड्यातले वातावरणही तेवढेच खेळीमेळीचे असायचे.
एकाच्या घरचे कार्य म्हणजे सर्वांच्या घरातला तो आनंद असायचा...

काळाप्रमाणे आनंदही संकुचित झाला..ती घरे नाहीशी झाली..याबरोबरच ती मनेही..
मग विरंगुळा शोधला जाऊ लागला..
सारे कांही वेळेत...फार गाजावाजा न करता...