Saturday, October 3, 2020

मीना, तुझे स्मरण कायम रहाणार...



जाऊन वर्ष झाले..

लहानपणापासून ते वयाच्या साठीपर्यंत केवळ कष्टमय जीवन जगणारी बहीण मिनाक्षी विश्र्वनाथ इनामदार.. जाऊन वर्ष झाले..आठवणीने मनात अनेक प्रसंग डोळयांसमोर येऊन जातात..ते आठवले की डोळ्यातून टचकन पाणी येते..खरेच कसे हे जगणे..याला काही आयुष्य म्हणावे.. अन्ननलिकेच्या कॅन्सरने तिचा शेवटही वेदनेला सामोरे होऊन झाला.. मागचे सारे आयुष्य चित्रासारखे समोर उभे रहाते..


लहानपणी घरची पिठाची गिरणी सुरू रहावी म्हणून तिच्या समोर इतरांची दळणे आणून ती परत त्यांच्याकडे देणे..हा ससेमिरा होता.. तिचे प्रयत्न तोकडे पडत होते..पण तिचे ते काम इमानदारीत सुरू होते..
डोक्यात आकडे, बाराखडी शिरायची नाही म्हणून शाळेला रामराम ठोकून ती घरातच काही बाही कामे करत राहिली..एखादे काम केले नाही म्हणून आईचा मारही तिने त्या काळी सहन केला.. बुद्धी कमी असल्याने शाळेचे द्वार बंद झाले. मग पाणी भरणे..दळणे आणणे.. पोचविणे.. जात्यावर दळण करणे..आदी शारीरिक कष्ट लादलेली कामे आई करून घेत..घरची थोडी आर्थिक कमाई वाढली.. पण यश नाही आले..घराला आणि तीच्या कामाला..गिरणी विकावी लागली शेवटी..
सतत तिला कमी लेखणे.. तिच्यावर डाफरणे .. खायला भार.. आणि भुईला भार..असे आयुष्याला झेलणे तिने सहन केले..तेही जमेल तेव्हढ्या आनंदाने..

खरे तर तिचे तिला मनाप्रमाणे वागणे कधीच जमले नाही .सतत अपरावलंबित्व तीच्या पाचवीला पुजले होते.. तीच सवय तिला आयुष्यभर जपावी लागली.. तिचे विश्व तेवढेच मर्यादित राहिले.. घराभोवती..आईच्या भोवती फिरत राहिले..शिक्षण नाही मग वाचनही नाही.. रेडिओ ऐकणे आणि कामे नेटाने करत राहणे तिच्या नशिबी होते.. मात्र ते तिने कमालीच्या प्रामाणिकपणाने केले..सर्वांच्या मर्जीनुसार..








मग ते चिंचा फोडणे असो की भावे सुपारिवाले यांचेकडे मदत करणे असो..आपल्या मर्यादित विश्वात ती रमत असे..यातून तिने तिचा असा प्रेमळ सहवास सर्वांना दिला..त्यात त्यांना आपलेसे केले..


शिक्षण नाहीच..

शिक्षण नाही..त्यामुळे तिला लिहिता वाचता येत नाही.. कसे होणार हिचे..हीच चिंता आई वडिलांना खात असायची..मी माझा स्वतंत्र मार्ग म्हणून सातारा सोडला आणि पुण्यात नोकरी स्वीकारली.. पण माझ्या पैशाची वडिलांना खूप जरूर होती.. ते त्यांचेपुरते मिळवत..गिरणी विकून तेही थोडे फार घरात काम करत राहिले..त्यात बहिणीच्या भविष्याची चिंता सारखी सतावत असायची..

माझे बऱ्यापैकी बस्तान बसल्यावर त्यांनी मीनाला घेऊन पुण्यात हिंगण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत कामासाठी ठेवण्याचे मनाशी पक्के केले.. तिला हिंगण्यातील संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी तिथल्या लोकांना गळ घातली..एका लाचार बापाची विनंती फळाला आली.. मीनाला संस्थेत दाखल करून घेतले.. दोघांनाही हायसे झाले..खरोखरच त्यानंतर पितृछत्र काही दिवसांनी हरपले..

बहीण हिंगण्यात स्वयंपाक घरातील मदतनीस म्हणून कामाला लागली.पडेल ते काम केले..वृद्धाश्रमात डबे पोचविणे..दळण दळणे..मोठ्या रगड्यावर इडली पीठ तयार करणे..




बहिणीविषयी संस्थेत प्रेम

बहीण कशालाच मागे हटली नाही..जेवण, रहाणे सोडून कपडेही मिळत.. तिथल्या प्रमुख पदाधिकार महिलांना ती आपल्या कामाने पसंत पडली..आयुष्याला नवी दिशा मिळाली..पण शारीरिक कष्ट सुरूच राहिले..पहिले ५० रुपये पगार मिळाला..पुढे ती सासत्याने आणि आपल्या वर्तणुकीने ३१ वर्षे ती संस्थेच्या विविध वसतीगृहात कामे करून लोकप्रियता आणि ममता मिळविली..पण यातही समाधानाने आणि आनंद मानून बहीण टिकून राहिली..

मुली, बाई आणि संस्थाचालक मीनाचे कौतुक करीत राहिले.. मात्र कधीतरी डोक्यात वेगळेच विचार येत..कधी भरकटत असे.. पण आपल्याला इथेच रहायला हवे हे तिने जाणले..माझ्या घरी दिवाळी आणि मे च्या सुट्टीत येत राहिली..घरच्या माझ्या मुलांची लाडकी आत्या बनली..सौच्या मनात मिनाताईंविषयी प्रेम कायम राहिले..आपला भाऊ आणि वहिनी ..भाचे आपल्याला नेहमी जपतील असा विश्वास तिला कायमस्वरूपी होता.. हे ती बोलूनही दाखवी.

तीन वर्षे मोठ्या असलेल्या बहिणीला जपणे आणि काळजी घेणे हे आई वडिलांनी आपल्यावर सोपविलेले काम तेवढ्याच मनोमनी करण्याचे माझे ध्येय होते..

सुमारे ३१ वर्षांच्या सेवेनंतर ती निवृत्त झाली..काही महिने माझेकडे होती..पण आपल्यानंतर तिची देखभाल उत्तम व्हावी म्हणून आम्ही साऱ्यानी तिला संस्थेच्या वृद्धाश्रमात ठेवले..

अखेरीस कर्करोगाने ग्रासले

तिथेही वयाच्या ६७ वर्षांपर्यंत तिची जगण्याची इच्छा शक्ती बळकट होती.
आता मात्र कष्ट नाही केवळ आराम.. ते दिवसही तिने समाधानात घालविले.. मात्र जेवण व्यवस्थित न केल्याने.. आणि स्वतःची आबाळ केल्याने तिची अन्ननलिका आकुंचन पावली..शेवटी निदान कर्करोगाचे झाले..त्यातही तिने बहुत सोसले.. पण ते जगणे शेवटी पहावत नव्हते..परमेश्वराने तिला आर्थिक समर्थ बनविले होते.. दिनानाथला डॉ. धनंजय केळकर यांनी शस्त्रक्रिया केली..त्यांनंतरही बहिणीने काही महिने सोसले..पण अखेरीस तिला सिल्पा सेन्टर मध्ये वेदनाशामक औषधे आणि शेवटही वेदनावीरहीत व्हावा म्हणून दाखल करावे लागले.. त्यातच ४ ऑक्टोबर २०१९ ला ती आम्हाला सोडून गेली.. शांतपणे..






हे सारे लिहिताना डोळे भरून येताहेत..शरीर थरथरतेय..पण अखेरीस बहिणीचे कर्म करावे लागले..



साऱ्या वेदना शांत झाल्या..त्या देहाने आयुष्यभर सोसले ते इथे संपले..









आजही तिची आनंदी मूर्ती डोळ्यासमोर येते..आणि सांगावेसे वाटते..

मीनाताई..खूप सहन केलेस..एकटीने..संयमाने आणि प्रामाणिकतेने..पण तू धीराची.. शिक्षण नसताना तुझ्या संयमाने ..वागण्याने आम्हाला खूप शिकवून गेलीस..तुझ्या आठवणी मनात कायम स्मरणात राहतील..आयुष्य तू समृद्ध केलेस..आम्हावर असाच कायम लोभ ठेव..
आदरांजली !



- तुझाच भाऊ

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Thursday, September 17, 2020

मागे वळून पाहताना..




समाधानाचा पेला पुरता भरलाय !


सामान्य कुटुंबातील या मुलाला कितीतरी हातांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा टेकू दिला..

नादारीतून शिक्षण .. इतरांचे घरात आपलेपणाचा ओलावा लाभला..

आईची कडक शिस्त आणि तेवढीच प्रेमाची छाया.. वडिलांचे सौम्य पण बोलके पाठबळ..

साताऱ्यात बरीच कमी जास्त धडपड करून आपल्यापुरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला..

तरुणपणात धाडस केले..तडक पुणे गाठले..तरुण भारत आयुष्यात पहिले पाऊल कसून टाकण्यास उपयोगी पडला..

जिद्द आणि साधना.. दोन्ही होती..



भरत नाट्य मंदिरात नाटकाची नांदी सुरू झाली..भूमिका मिळत गेल्या..नाटकाची भाषा पचनी पडली..रंगभूमीचे आकर्षण वाढले..रात्री बाबूराव विजापुरे.. आणि तिकडे पुलाच्या पलिकडे पीडीएचे भालबा केळकर..यांच्या सोबत रात्री रुंगू लागल्या..





नाटकावर आपल्या भाषेत समीक्षण सुरू झाले..

कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली..वि ना देवधर यांच्यामुळे पुण्याचा फेरफटका आणि अशा उद्याची..दोन सदरे तरुण भारत मधून लिहली.

साहित्यविशारद झालो..


प्रा.एन डी आपटे सरांमुळे पदवीधर मग एक्सप्रेसने दुसरी नोकरी मग विवाहबंधन!





आयुष्याला स्थिरता आली..विद्याधर गोखले यांचा आशीर्वाद मिळाला..पुणेरी रंगमंच, पुणे तिथे काय उणे..  लोकसत्ता, चतुरंग, सांज लोकसत्ता इथे सदरे, लेखन सुरू झाले..जेष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांच्या प्रोत्साहनामुळे बातमीदारी आणि लेखन सुधारले..







मात्र कारकुनी वृत्ती सोडून संपादन क्षेत्रात फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्या दूरदर्शीपणाने  pune flash. com साप्ताहिक  आणि फ्लॅश  म्युझिक.. मध्ये कारकीर्द बनविली..


एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातली मुशाफिरी केली..कलावंत जवळ आले..अंतरंग समजू आले..


वयाच्या ४५ व्या वर्षी सकाळ सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राची इ आवृत्ती सुरू करण्याची संधी आली.. त्याचा वृत्त संपादक झालो..बातमी, सदर लेखन आणि चलत चित्रणाचा अनुभव गाठीशी पडला..अखेरीस त्यांना नकोसा झालो.. राजीनामा देवून बाहेर पडलो..

मंदार जोगळेकर, अरुण खोरे, सुनील मेहता..यांच्याकडे काही लुडबुड केली. 

www.subhashinamdar.blogspot.com यातून लेखन सुरू ठेवले.. 

http://culturalpune.blogspot.com/

यातून सातत्याने घटनांची नोंद सुरू ठेवली..

सोशल मीडिया मधून face book  सतत नोंद करीत गेलो.. 






संगीत, साहित्य आणि नाटकाने भरभरून समाधान दिले..माणसे पहायला ओळखायला शिकविले..



जमेल तशी मदत करावी..मित्र जोडावेत.त्यांचा सहवास घ्यावा.. फिरण्याचा छंद जपून ठेवलाय.. मनात बेचैनीचा विचार आला तर मागचे सारे आठवून त्यातून हुरूप आणतो..





आपल्या क्षमतेपेक्षाही खूप काही मिळाले.. आता हेच समाधान टिकवायला हवं!

रक्ताची आणि जोडलेली नाती टिकवून ठेवायला हवीत..समाजाने भरभरून दिले..ते समाजाला परत करायला हवे..तेवढी शक्ती आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे एवढीच प्रार्थना!

तुमचा आशीर्वाद आणि सहवास लाभावा हीच मनोकामना!




आपलाच,

सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Saturday, September 12, 2020

पिंपळपान...

जाळी झालेले एक पान सहज वहीत गवसले 
जणू जुन्या स्मृतींना देत त्या आठवणी साठवित पहुडले 

 किती दिवस झाले आता निटसे आठवत नाही 
किती स्वप्ने गळून गेली आता ती उगाळायची नाही 

 वाट पाहुन थकलेले पाय कधीचेच थांबलेले 
नव्या स्वप्नांच्या धुंदीत तेही विसावलेले 

उरी चेतल्या , जागल्या त्या आठवांच्या नोंदी 
किती आणा, शपथा ती होती एक धुंदी 

नाही साहवेना आता जुनी झाली गाठोडी
चेतावली त्यात आता अंधुकशी चिंधोटी 

सारी कधी स्वप्ने पुरी होत असतात का ? 
तरीही कुणी ती पाहायची सोडतात का ? 

 गेली वर्षे आणि महिने गेला तो काळ
 पिंपळाची जीर्ण पाने नको करू त्याचा पाचोळा

 नांदती सुखी आता दोन जीव दोही दिशी 
उरलेल्या आयुष्याच्या गाठी आली फक्त एकादशी....


 -     सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com 

Sunday, September 6, 2020

काळ बदलला..


आमच्या लहानपणी वडील सांगायचे ५ रुपये शेर गहू मिळायचा. आंबे तर असे ढिगाने खायचो. ब्रिटीशांच्या काळात ३५ रु. तोळा सोने होते..स्वस्ताईचा काळ होता..मुबलकता होती..
आज सारे ते काही स्वप्नासारखे भासते .
पण..मी जेव्हा पुण्यात आलो १९७४ मध्ये , तेव्हा अमृततुल्य चहा १५ पैसे होता. मी नारद मंदीरात रहात होतो..तेव्हा महीना २० रुपये भाडे होते..आणि जेवणाचे ५० रुपये महिना खानावळीचे देत होतो..पगार तरी काय होता..दरमहा १५० रुपये...पण तरीही माझा खर्च भागवून मी महिना ५० रूपये एम टी (मेल ट्रान्सफर) ने सातारला घरी पाठवू शकलो..
मी म्हणेन हा काही स्वस्ताई -महगाईचा झगडा नाही...ही आहे सारी वस्तुस्थिती.
तरूण भारतमध्ये नोकरीला लागल्यावर १८ मार्च १९७४  दोनच महिन्यात पुण्यात सायकल असावी या हेतूने विचारणा केली..तर तेव्हा हिरो कंपनीची सायकल २९० रूपायांना होती..व्यवस्थापकांना सायकलसाठी कर्ज मागितले..२५० रूपये..ते पुढे हप्त्याने फेडले..तेव्हा कुठे माझे स्वतःचे पहिले वाहन झाले..साय़कच्या हॅंडलवर आणि मधल्या बारमध्ये आपले नावही कोरून घेतले..तेव्हा त्या सायकलवर बसणा-या माझा रूबाबही वाढला. तेव्हा काही फारशी वाहने रस्त्यावर नसत.. साय़कलीच खूप असत..सातारला सायकल शिकल्याने त्याचा हा फायदा पुण्यात असा झाला..


आणि आज...सारे बदलले आपल्या देखत...किंमत पैशाला नाही..माणसाला नाही..भावनेला नाही..रस्त्याने जाताना एखादा अपघात झाला..तर बाजूचे फारसे कोणी थांबत नाहीत..ज्याला त्याला स्वतःचे पडले आहे...





-सुभाष इनामदार, पुणे.

Monday, August 31, 2020

खणखणीत आवाजाचे गायक श्रीपाद भावे गेले..

जानेवारी २० ..आणि तारीख होती १४ जयजयराम जयजयरामच्या गजराने श्रीपाद भावे यांनी पंचपदीची सुरवात केली..आणि उद्यान प्रसाद सभागृहातले वातावरण आपोआपच भक्तीरसात बुडून गेले..संतदर्शनचे संस्थापक श्रीराम साठे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्ताने संतवाणी..साजरी केली जात होती..टाऴ मृदुंगाच्या साथीने कार्यक्रम बहरत जात होता.. 

आज आठ महिन्यांनी त्याची आठवण पुन्हा आली..कारण आज सकाळीच यातले दमदार आणि खणखणतीत आवाजात अभंगातून रसिकांना तृप्त करणारे गायक श्रीपाद भावे यांच्या निधनाची बातमी आली..त्यांचा तो जाहिरपणे झालेला कार्यक्रम पुन्हा मनात ताजा होऊन मनात ते स्वर आळवू लागला.. 

जयश्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही संतवाणी सादर झाली होती.. निष्ठापूर्वक गाणारा आणि सहजपणे आपल्या गायनात तन्मय होणारा श्रीपाद भावे..अभंग, नाट्यसंगीत..आणि भकतीगीते आपल्या जात्याच तयार असलेल्या
आवाजात सादर करीत असे.  







आपली महाराष्ट्र बॅंकेतली नोकरी निवृत्तीपर्यत प्रामाणिकपणे करून श्रीपाद भावे आपले गायनातील सौंदर्य रसिकांच्या पदरात आपल्यापरीने टाकत होते. 

भक्तीभावाने आणि तल्लीनतेने गाणे सादर करण्याचे कसब संतदर्शन मंडळाचे संस्थापक श्रीराम साठे यांनी तेव्हांच ओळखून त्यांना दरवर्षी होणा-या संतवाणीच्या संचात हमखास स्थान देत असत. छोटे माठे कार्यक्रमातून भावे यांचे दर्शन आणि त्यांची गायनातली तल्लीनता महाराष्ट्रातल्या रसिकांना आता कळून येत होती..
नोकरीच्या मर्यादा ओळखून ते गायनसेवा रुजू करीत असत.. 

नोकरीत असताना त्यांनी ज्या एकमेव संगीत नाटकात भूमिका केली त्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कट्यार काळजात घुसली.. यात.. मीही त्यात एक कलाकार म्हणून सामिल झालो होतो. पंच्च्याहत्तर सालापासून श्रीपाद भावे यांच्याशी संबंध आला.. गाण्यासोबत अभिनयाचे अंगही त्यांच्यात होते..पण ते पुढे नाटचकाकडे अधिक वळलेच नाहीत.


 कट्यारमध्ये त्यांची खांसाहेबांचे शिष्य असलेल्या चांदची भूमिका छान होत असे. . आम्ही त्याचे पंचवीस तरी प्रयोग केले असावेत. 

सगळ्याशी मनमोकळे वावरणारे भावे..कलावंत आणि सहभागी तंत्रज्ञात लाडके होते.. निगर्वी स्वभाव ..मिळून मिसऴून वागण्याने भावे सर्वांना आपलेसे करत.. कसदारपणे तान घेणे आणि त्यातील स्वरात आपला ठसा उमटविणे हे त्यांचे विशेष गुण होते. अभंगातला ताल आणि स्वरातील भाव ते सहजपणे व्यक्त करत.. 

 श्रीपाद भावे यांच्या जाण्याने एक दिलदार मनाचा..मित्र गमावला यांचा निषाद वाटतो.. 

 वडीलांच्या वाहतूक व्यवसाला मदत करून प्रसंगी त्यांनी गाडीही चालविली आहे.कष्टाची तयारी आणि संघर्षमय आयुष्यातून वर येऊन ते आपल्या बंगल्यात उत्तम वास्तव्य करीत होते..

त्यांच्या या चटका लावून जाणा-या वृत्ताने संतवाणीतला खणखणीत आवाजाचा गायक हरपला आहे..
त्यांच्या स्मृतीस आदरांजली.. 



 - सुभाष इनामदार, पुणे..
 subhashinamdar@gmail.com

Friday, July 17, 2020

आठवणीत कायम कोरले एन डी आपटे ..गेले






अनेकांना घडविणारे एन डी आपटे सर..

कालच्या सकाळमध्ये आम्हा अनेकांना घडविणाऱ्या एन डी आपटे सर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि खूप काही शिकविणाऱ्या या गुरूंच्या आठवणीने मन हेलावून गेले..
पुण्याच्या माडीवले कॉलनीतील तळमजल्यावरचे घर समोर आले.. आणि त्यांच्या स प समोरच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील त्यांच्या वर्गातील सारे चित्र स्पष्ट डोळ्यासमोर आले.. जिद्दीने आणि तळमळीने विद्यादान सढळ हाताने करणारे अतिशय प्रेमळ , हळुवार बोलणारे एन डी समोर उभे राहिले.. खरे तर त्यांच्या पाठीवर फिरलेल्या हातानेच तर मी पदवीधर बनलो.. कितीही शंका अगदी ती बारीक असली तरी सरांनी ती सविस्तरपणे निरसन केली आणि त्यामुळेच वाणिज्य शाखेतील अवघडलेले कोडे आयुष्यात सहजी सुटून गेले..
त्यांनी कधी फी मागितली असे आठवतच नाही.. किती मुलांनी त्यांची फी बुडविली याचे गणित त्यांनी कधी केलेच नाही..
बी एम सी सी महाविद्यालयातली प्राध्यापक पद सोडून ते आपल्या स्वतंत्र वर्गात ते रमून गेले.
पण त्यांचे खरे प्रभुत्व होते ते सहज सोपे इंग्रजी अधिक समजेल अशा भाषेत सांगण्याची लकब..तेच त्यांचे महत्व ओळखून  संपादक सदा डुंबरे यांनी त्यांना  साप्ताहिक सकाळ मध्ये त्याचे सदर सुरू केले..त्या निमित्ताने ते जेंव्हा सकाळमध्ये येत तेंव्हा मी ई सकाळचा वृत्तसंपादक म्हणून रुजू होतो..ते आवर्जून भेटत .. सविस्तर गप्पा मारत..
बोलणे , गप्पा मारणे आणि शिकविणे हे त्यांचे आवडते विषय..

पॅन्ट, साधा शर्ट , डोळ्यावर सतत खाली ओघळणारा चष्मा आणि हातात मोठी पिशवी घेऊन ते सहजपणे पाठीवर हात ठेऊन गप्पा मारत..

शेवटपर्यंत तो साधेपणा कधीही लोप पावला नाही..आणि ती समजवण्याची तळमळ कमी झाली नाही..

संगीत, क्रिकेट आणि बँकिंग अश्या विषयात त्यांचे सखोल विचार असत.. वक्तृत्वाची छाप नसली तरी विषय समजून सांगण्याची त्यांची हातोटी  विलक्षण होती..

माडीवाले कॉलनीतल्या वास्त्यव्यायानंतर कर्वे रस्ता परिसरात ते रहायला गेले आणि थोडा नेहमीचा दुरावा कमी झाला..

आपल्या स्वभावाने आणि शिकविण्याने त्यांनी अनेक मित्र जमविले.. त्यांच्यामुळे कितीतरी विद्यार्थी पदवीधर होण्याचे स्वप्न साकार करू शकले..

त्यांच्या ८१ व्या वाढदिवशी आपल्या सौंभाग्यवतीं सह टिपलेले हे प्रसन्न छायाचित्र  



एन डी  आपटे यांच्यासारखे सालस, सरळ आणि हळवे व्यक्तिमत्व आता दिसणार नाही..याचे दुःख आहे..पण त्यांनी घडविलेल्या अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या अनेक क्षेत्रातल्या मुशाफिरीने ते सतत समाजात कायम स्मरणात रहातील..

त्यांच्या कर्तुत्वाला आम्हा सगळ्यांचा अखेरचा सलाम..आणि आदरांजली..




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com






Sunday, July 12, 2020

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...






छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत.



एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत.



घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत.



घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी.



मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण.






घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.






अशी फुलवली बाग



ःबागेसाठी जागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली.



नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.



आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला.












वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली. आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली.






गच्चीवरील बाग






ःरो-हाऊसच्या बाजूच्या भागात फरशी घालताना तयार झालेली खताची माती सहा बाय चारच्या जागेवर गच्चीवर टाकली. त्या खाली प्लॅस्टिकचे कापड अंथरले. त्या बेडवर शेतीसारखे भाजीचे बी टोकले. आज कोथिंबीर, पालक आणि मेथी एकत्रित नांदत आहेत. भाज्यांवरोबर लसणाच्या कुड्याही लावल्यात. त्यातूनही हिरवे अंकुर डोकावू लागलेत. सहा मोठ्या सिमेंटच्या कुंड्यांतून गुलाब, लिंबू आणि डाळिंबाची रोपे लावली. कुंडी लावताना खाली थोडा विटांच्या भुग्याचा थर त्यावर माती, मातीवर ओला कचरा असे करत कुंडी भरली. गुलाब फुललाय. मात्र लिंबे आणि डाळिंबाची वाट पाहतोय.निशिगंध, मोगरा, चार-प्रकारची जास्वंद. कोरफड, गुलाब, शेवंती, जाई, बह्मकमळ आणि छोट्या कुंड्यांतून मनी प्लॅंट, पुदिना वाढतोय. कुंड्यांत मात्र वारंवार माती उकरावी लागते नवी माती भरावी लागते. कधी काही कुंड्यांतली माती कमी करून बागेतला पानांचा थर देऊन त्यावर माती पसरली जाते. पाणीही सतत घेता कधी भांडभर तर कधी पूर्णपणे झाडावर पाण्याचा फवारा करतो.मध्यंतरी बायोकल्चर वापरून कुंडी कशी भरावी ते पाहिले. कुंडीमध्ये खाली विटांच्या तुकड्यांचा थर, नंतर भाजीपाल्याचा ओला कचरा, वर बायोकल्चर, परत ओला कचरा अशी कुंडी भरून त्यात रोप लावले. आता त्याला महिना पुरा होतोय. फुले भरभर उमलतात. गुलाबाच्या रोपांची पाने वाढताहेत. जास्वंदीच्या फांदीची वाढ होतेय. सारेच आनंदाचे. वाढत्या बहरलेल्या झाडांचे.






येत्या काही दिवसांत बाकीच्या गच्चीत मातीचे बेड करून त्यात भाजीपाल्याची लागवड करायची आहे. घरची पालेभाजी खाण्यातल्या आनंद काही वेगळाच आहे. हे सर्व करताना एक पथ्य पाळलंय, की रासायनिक खत वापरायचे नाही. लागलेच तर शेण खत घालायचे. हे सारे जपण्याचा छंद लागलाय. त्यात वेळ कसा जातो ते कळत नाही. मातीच्या कुपीतून बाहेर येणाऱ्या या हिरवळीची मजा चाखल्याशिवाय कळणार नाही






सुभाष इनामदार, पुणे-



९८८१८९९०५६