Sunday, September 22, 2024

३८ कृष्ण व्हीला.. खिळवून ठेवणारा अनुभव..!

३८ कृष्ण व्हिला...डॉ. गिरीश ओक ..डॉ. श्वेता पेंडसे .. खिळवून ठेवणारा अनुभव .. ! मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल..
देवदत्त कामत आणि नंदिनी मोहन चित्रे या दोन व्यक्तिरेखा तुम्हाला सव्वादोन तास त्या रंगवकाशात जखडून ठेवतात..आणि त्यातूनच ते एक खिळवून ठेवणारा खेळ थोडेही विचलित न होता तो पाहायला लाऊन त्यात गुंतवून ठेवतात..तुम्ही सम्मोहित झाल्यासारखे होता... होय..ही किमया दोन सशक्त पत्रांच्या म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे ..३८ कृष्ण व्हिला..या नाटकातून घडवितात..हे सत्य वास्तव आहे.. नाटक सुरू होते ते ..नंदिनी मोहन चित्रे यांच्या आगमनाने लेखकाच्या घरात.. कारण त्याने आपल्या पुस्तकाला मिळालेला साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार घ्यायला जावू नये..यासाठी तिने दिलेल्या नोटीस करणावरून.. तिच्या मते हे लेखन त्याचे स्वतः चे नसून आपला नवरा मोहन चित्रे याचे आहे.. यावरून.. पहिला अंक देवदत्त कामत नंदिनीला हे लेखन कसे आपले आहे हे समजावून सांगण्याच्या गोष्टीत.. तर दुसरा अंक सारा घडतो..ते मोहन चित्रे याने त्याने लिहलेले लेखन कसे आपल्या नावाने प्रसिद्ध केले हे सांगणारा याबद्दल ..
दोन परस्पर भिन्न घटना..आणि त्या केवळ उत्कट अशा भावस्पर्शी संवादातून..आणि दोन नटांच्या परस्पर भिन्न अशा व्यक्तिरेखेतून.. पहिल्या अंकात ती अती भावनिक..संवेदनशील..हळवी..रडवेली..तर तो आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत आपणच कसे योग्य आहे हे सांगण्याच्या स्थितीत.. तर दुसऱ्या अंकात मोहन चित्रे याची दापोलीत रात्रीच्या अंधारातील भेट..आणि त्यातून त्याचेवर असलेले समाजात वावरण्याची भीती असलेले दडपण यातून..त्यांचा आजार.. त्याने देवदत्त कामत ३८ कृष्ण व्हीला.. येथे विशिष्ठ जागी येऊन लीहलेल्या उत्तम कादंबरीच्या भोवतालच्या जगात.. समाजात वावरण्याची त्याची भीती आणि त्यापोटी देवदत्त यांच्या पहिल्या पुस्तकाला मिळालेले घवघवीत यश..आणि त्यानंतर पुढे त्यांना लिहण्यासाठी आलेली..निराशा..यातून मोहन यांनीच तुम्हीच आपली पुस्तके तुमच्या नावावर..तेही यक्ष या टोपण नावाने प्रकाशित करण्याची केलेली विनंती.. त्यातच नंदिनीचे हळवे मन..आणि तिला वाटणारी भीती..यातून नाटक उलगडत जाते.. आणि अखेरीस आपली नोटीस मागे घेऊन पुरस्कार घेण्यासाठी देवदत्त कामत यांनीच जावे यासाठी विश्वासाने केलेली मागणी...आणि .. नाटक काहीसे असं घडतं..आपण रसिक ते अतिशय मनापासून ते अनुभवतो. त्यांच्या देवदत्त कामत यांच्या अभिनयातून साकारलेल्या भूमिकेत ..(जेष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक ह्यांचं हे ५० वे नाटक..)आणि तेही आणि त्या श्वेता पेंडसे आहेत..त्यांना देवदत्त कामत आणि नंदिनी समजूनच त्यांच्यातलाच एक बनून नाटक पहातो.. केवळ दोन पात्रे असलेले नाटक.. घटनेतून नव्हे तर शब्दातून पुढे जाणारे.. उत्कंठा वाढविणारे एकेक पाऊल रंगभूमीवर पडत असताना ते सारे खरे म्हणून त्या व्यक्तीरेखे बरोबर वाहवत जातो.. त्याचे कारण एकच डॉ. गिरीश ओक..यांचा दमदार वावर..सहज केलेला अभिनय..आणि उत्तम वाक्यमांडणी... याउलट नंदिनी बनून नाटकाची लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी उभी केलेली संवेदनशील मनाची..हळवी..पण प्रसंगी कठोर असलेली तेव्हढीच तयारीने उभी केलेली व्यक्तिरेखा...यामुळे.. आणि हो..यातले मोहन चित्रे हे पात्र प्रत्यक्ष दिसत नाही पण त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे व्यक्तित्व..सतत जाणवते कारण ते पात्र नाटकभर आपल्या मनात कायम रहाते. एक बंदिस्त आणि रसिकांना खिळवून ठवणारा प्रयोग बांधणारे दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या उत्तम दिग्दर्शन कौशल्यामुळे हे नाटक अधिक अंगावर येते.. मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल.. असा वेगळा विषय अतिशय उत्तम रित्या मांडण्याचे धाडस केलेल्या डॉ. श्वेता पेंडसे यांचे नाटककार म्हणून रसिकांनी स्वीकारलेले हे नाटक त्यांच्याकडून अधिक चांगल्या विषयावरील..आणि मराठी रंगभूमी अधिक श्रीमंत करणारी कलाकृती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.. १९ मार्च २०२२ रोजी रंगभूमीवर आलेले हे नाटक पाहण्यासाठी आम्हाला २३५ प्रयोग वाट पहावी लागली याची खंत आहे.. पण दरसे आये..दुरुस्त आये..अशीच भावना आहे.. नाटक संपल्यावर इतके उत्तम , बंदिस्त ..आणि लेखन तसेच दोघांची कामेही अतिशय सुंदर असल्याचे रसिकांच्याकडून व्यक्त होत होते.. हीच तर नाटकाची खरी पावती आहे.. ज्यांनी अजून पाहिले नाही त्यानी आवर्जून हे नाटक पहावे ..! श्रेयनामावली लेखक: डॉ. श्वेता पेंडसे दिग्दर्शक: विजय केंकरे नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: अजित परब
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com