
हिशोब करता
आयुष्याचे
हाती उरतो
एक कवडसा...
असे म्हणत म्हणत मूळच्या पुण्याच्या पण पतीच्याबरोबर तीन खंडात ( त्रीखंडातही म्हणायला हरकत नाही) फिरस्तीपणाने जीनव जगलेल्या ...
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयाची पदवी संपादन करुन आता केवळ शब्दांत इमले उभारणा-या...
उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या `विभोर` या कविता संग्रहाचे कालच्या आणि आजच्या पिढीच्या आघाडीच्या कवीयत्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते झोकात प्रकाशन तर झालेच..

मराठी भाषेपासून दूर जाउनही नवे शब्द..नवी चाहूल
देत मराठी कवींच्या मांदायळीत एक आश्वासक नाव घेऊन आपल्या याच संग्रहातल्या कांही कवीतांना घेऊन संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबध्द केलेल्या मराठी अल्बमचे साग्रसंगीत अगदी दणक्यात पं. प्रभाकर जोग यांच्या हस्ते याच समारंभात अनावरण केले गेले.
अगदी अरुणा ढेरेंच्या शब्दात सांगाय़चे म्हणजे `देखणा` समारंभ पुणेकरांच्या साक्षीने `विभोर`मय झाला होता.
नवखेपणाच्या खुणा त्यांच्या कवीतेते जवळजवळ नाहीत असा आश्वासक सूर लावून अरुणा ढेरेंनी त्यांच्या कवीतेतल्या विलक्षणपणाची स्तुती केली... ती करताना त्या सांगतात, ` त्यांच्या कवीतेतून कानांना आणि डोळ्यांना पंचेद्रियांची ताकद मिळते, जगण्यातले बारकाने शांतपणे कवीतेतून व्यक्त करण्याची उज्जला अन्नछत्रे यांची तडफड त्यांच्या कवीतेत जाणवते..जगण्यातले हरवलेपण या कवीतेत पकडणारी ही कवीता असल्याचे सांगून त्यांच्याकडून अधिक मागणी करावी अशी विलक्षण ताकद स्पष्ट होत असल्याचे त्या सांगतात. शब्दातला अनुभव संगीतकार मिलिंद जोशी यांनी तेवढ्याच ताकदीने पोचविल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात.

यानिमित्ताने या कवीता संग्रहाला प्रस्तावना लिहिणा-या डॉ. निलिमा गुंडी, पं. प्रभाकर जोग, उत्कर्षचे सुधाकर जोशी, सीडीचे निर्मीते फाऊंटन म्युझिक कंपनीचे संचालक कांतीभाई ओसवाल, रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, आणि यामागचे महत्वाचे नाव म्हणजे अरुण अन्नछत्रे सा-यांनी समारंभाला रंगत आणली.
मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेल्या चार गीतांची झलकही संगीताच्या ट्रॅकवर उपस्थितांना ऐकता आल्यामुळे कवीतेचा पोत आणि त्याला लाभलेले सुरेलपण अनुभवता आले. रुद्रतांडव अशा शंकराच्या विविध तालवाद्यातून निघालेले निनिद आणि त्याला सुयोग्य अशी दमदार , तडफदार शब्दांची जोड देऊन रघुनंदन पणशीकरांनी ते इतके सुंदर नटविले आहे की, त्या गाण्यासाठी का होईना ही सीडी विकत घ्यावीशी वाटेल...एकूणच संगीत देताना शब्दानां अधिक सुरेल करताना भारतीय वाद्यमेळीतून वातावरणाला आणि शब्दांना पोषक अशा सूरावटी तयार करुन त्या तेवढ्याच ताकदीच्या गायकांकडून गाऊन घेऊन हा अल्बम ऐकण्यासारखा सजविला आहे...
रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, अन्नछत्रे यांची सध्या रोमानियात बारावीत शिकत असलेली कन्याका चैतन्या हिने या सीडीत एक नवोदित गायिका म्हणून घेतलेला सहभाग हा अभिमानाचा भाग होता..तिनेही यातल्या दोन कवींतांना आपल्या आवाजात सादर केले.
स्वतः उज्ज्वला अन्नछत्रे यांनी या सीडीत आपल्या आवाजत कवीतेचे वाचन करुन त्यातली तरलता आणि शब्दमाधुर्य रसिकांपर्यत पोचविले आहे.
उज्ज्वला अन्न्छत्रे यांची कालची अवस्था त्यांच्याच शब्दात सांगायची म्हणेज..
स्निग्ध सावळ्या अंधारी मी
माझी मजला सापडते
माझ्याशी हो ओळख माझी
नाते मजसी मम जुळते...
अशी झाली होती...आपल्याच कवीता ऐकताना त्या मलाच समजावून सांगताहेत असा भास होत असल्याचे त्या सांगतात.
संगीतकाराने कवितेचा आवाज व्हायचे असते.. एका ओळीत संगीतकाराचे या सीडीतले स्थान समर्पक शब्दात मिलिंद जोशी यांनी मांडले.
आपल्या प्रस्तावनेत डॉ. गुंडी या कवितांचे आणि कवयीत्रीचे मर्म सांगतात. त्या लिहितात, कवयित्रीकडे कवीतालेखनासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, रचनेला चैतन्याचा स्पर्श देणीरी उत्स्फूर्तता आणि कवितेला आशयाची डूब देणारी चिंतनशीलता असल्याची ग्वाही यातील प्रत्येक कवितांमधून मिळते. या कवितांमध्ये आई आणि मुलगी असा आधिच्या आणि नंतरच्या पिढ्य़ांशी असलेला स्त्रीत्वाचा अनुबंध व्यक्त करणा-या रचना आहेत. निसर्गचित्रांनीही हे विश्व संपन्न आहे. यातील निसर्गचित्रे तरल आणि भावविभोर आहेत...( स्वत कवयित्री उत्तम चित्रकार असल्यामुळे पुस्तकाचे कव्हर आणि आतली चित्रेही त्यांनीच रेखाटली आहेत.)
`विभोर`च्या निमित्ताने मराठी भाषेची नाळ कायम ठेवणा-या असंख्य कलावंतांना आणि साहित्यिकांना तसेच कवींना मनोमन सलाम करावासा वाटतो...इथे आम्ही इंग्रजाळलेपण जपत भाषेचे मूळ सौंदर्य विसरत चाललो आहोत..पण उज्ज्वला अन्नछत्रेंसारखे अनेकजण ती भाषा..तीचे आपले पण संस्कृती आणि तिचा लहेजा सांभाळतातहेत..वाढवित आहेत.....आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

`विभोर`च्या समारंभात गायक रविंद्र साठे, संगीतकार मिलिंद जोशी, पडद्यामागचे सूत्रधार अरुण अन्नछत्रे, सौ. उज्ज्वला अन्नछत्रे, नव्याने गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली चैतन्या अन्नछत्रे आणि गायक व संगीतकार रघुनंदन पणशीकर....
सुभाष इनामदार,पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596726
No comments:
Post a Comment