Saturday, October 3, 2020

मीना, तुझे स्मरण कायम रहाणार...



जाऊन वर्ष झाले..

लहानपणापासून ते वयाच्या साठीपर्यंत केवळ कष्टमय जीवन जगणारी बहीण मिनाक्षी विश्र्वनाथ इनामदार.. जाऊन वर्ष झाले..आठवणीने मनात अनेक प्रसंग डोळयांसमोर येऊन जातात..ते आठवले की डोळ्यातून टचकन पाणी येते..खरेच कसे हे जगणे..याला काही आयुष्य म्हणावे.. अन्ननलिकेच्या कॅन्सरने तिचा शेवटही वेदनेला सामोरे होऊन झाला.. मागचे सारे आयुष्य चित्रासारखे समोर उभे रहाते..


लहानपणी घरची पिठाची गिरणी सुरू रहावी म्हणून तिच्या समोर इतरांची दळणे आणून ती परत त्यांच्याकडे देणे..हा ससेमिरा होता.. तिचे प्रयत्न तोकडे पडत होते..पण तिचे ते काम इमानदारीत सुरू होते..
डोक्यात आकडे, बाराखडी शिरायची नाही म्हणून शाळेला रामराम ठोकून ती घरातच काही बाही कामे करत राहिली..एखादे काम केले नाही म्हणून आईचा मारही तिने त्या काळी सहन केला.. बुद्धी कमी असल्याने शाळेचे द्वार बंद झाले. मग पाणी भरणे..दळणे आणणे.. पोचविणे.. जात्यावर दळण करणे..आदी शारीरिक कष्ट लादलेली कामे आई करून घेत..घरची थोडी आर्थिक कमाई वाढली.. पण यश नाही आले..घराला आणि तीच्या कामाला..गिरणी विकावी लागली शेवटी..
सतत तिला कमी लेखणे.. तिच्यावर डाफरणे .. खायला भार.. आणि भुईला भार..असे आयुष्याला झेलणे तिने सहन केले..तेही जमेल तेव्हढ्या आनंदाने..

खरे तर तिचे तिला मनाप्रमाणे वागणे कधीच जमले नाही .सतत अपरावलंबित्व तीच्या पाचवीला पुजले होते.. तीच सवय तिला आयुष्यभर जपावी लागली.. तिचे विश्व तेवढेच मर्यादित राहिले.. घराभोवती..आईच्या भोवती फिरत राहिले..शिक्षण नाही मग वाचनही नाही.. रेडिओ ऐकणे आणि कामे नेटाने करत राहणे तिच्या नशिबी होते.. मात्र ते तिने कमालीच्या प्रामाणिकपणाने केले..सर्वांच्या मर्जीनुसार..








मग ते चिंचा फोडणे असो की भावे सुपारिवाले यांचेकडे मदत करणे असो..आपल्या मर्यादित विश्वात ती रमत असे..यातून तिने तिचा असा प्रेमळ सहवास सर्वांना दिला..त्यात त्यांना आपलेसे केले..


शिक्षण नाहीच..

शिक्षण नाही..त्यामुळे तिला लिहिता वाचता येत नाही.. कसे होणार हिचे..हीच चिंता आई वडिलांना खात असायची..मी माझा स्वतंत्र मार्ग म्हणून सातारा सोडला आणि पुण्यात नोकरी स्वीकारली.. पण माझ्या पैशाची वडिलांना खूप जरूर होती.. ते त्यांचेपुरते मिळवत..गिरणी विकून तेही थोडे फार घरात काम करत राहिले..त्यात बहिणीच्या भविष्याची चिंता सारखी सतावत असायची..

माझे बऱ्यापैकी बस्तान बसल्यावर त्यांनी मीनाला घेऊन पुण्यात हिंगण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत कामासाठी ठेवण्याचे मनाशी पक्के केले.. तिला हिंगण्यातील संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी तिथल्या लोकांना गळ घातली..एका लाचार बापाची विनंती फळाला आली.. मीनाला संस्थेत दाखल करून घेतले.. दोघांनाही हायसे झाले..खरोखरच त्यानंतर पितृछत्र काही दिवसांनी हरपले..

बहीण हिंगण्यात स्वयंपाक घरातील मदतनीस म्हणून कामाला लागली.पडेल ते काम केले..वृद्धाश्रमात डबे पोचविणे..दळण दळणे..मोठ्या रगड्यावर इडली पीठ तयार करणे..




बहिणीविषयी संस्थेत प्रेम

बहीण कशालाच मागे हटली नाही..जेवण, रहाणे सोडून कपडेही मिळत.. तिथल्या प्रमुख पदाधिकार महिलांना ती आपल्या कामाने पसंत पडली..आयुष्याला नवी दिशा मिळाली..पण शारीरिक कष्ट सुरूच राहिले..पहिले ५० रुपये पगार मिळाला..पुढे ती सासत्याने आणि आपल्या वर्तणुकीने ३१ वर्षे ती संस्थेच्या विविध वसतीगृहात कामे करून लोकप्रियता आणि ममता मिळविली..पण यातही समाधानाने आणि आनंद मानून बहीण टिकून राहिली..

मुली, बाई आणि संस्थाचालक मीनाचे कौतुक करीत राहिले.. मात्र कधीतरी डोक्यात वेगळेच विचार येत..कधी भरकटत असे.. पण आपल्याला इथेच रहायला हवे हे तिने जाणले..माझ्या घरी दिवाळी आणि मे च्या सुट्टीत येत राहिली..घरच्या माझ्या मुलांची लाडकी आत्या बनली..सौच्या मनात मिनाताईंविषयी प्रेम कायम राहिले..आपला भाऊ आणि वहिनी ..भाचे आपल्याला नेहमी जपतील असा विश्वास तिला कायमस्वरूपी होता.. हे ती बोलूनही दाखवी.

तीन वर्षे मोठ्या असलेल्या बहिणीला जपणे आणि काळजी घेणे हे आई वडिलांनी आपल्यावर सोपविलेले काम तेवढ्याच मनोमनी करण्याचे माझे ध्येय होते..

सुमारे ३१ वर्षांच्या सेवेनंतर ती निवृत्त झाली..काही महिने माझेकडे होती..पण आपल्यानंतर तिची देखभाल उत्तम व्हावी म्हणून आम्ही साऱ्यानी तिला संस्थेच्या वृद्धाश्रमात ठेवले..

अखेरीस कर्करोगाने ग्रासले

तिथेही वयाच्या ६७ वर्षांपर्यंत तिची जगण्याची इच्छा शक्ती बळकट होती.
आता मात्र कष्ट नाही केवळ आराम.. ते दिवसही तिने समाधानात घालविले.. मात्र जेवण व्यवस्थित न केल्याने.. आणि स्वतःची आबाळ केल्याने तिची अन्ननलिका आकुंचन पावली..शेवटी निदान कर्करोगाचे झाले..त्यातही तिने बहुत सोसले.. पण ते जगणे शेवटी पहावत नव्हते..परमेश्वराने तिला आर्थिक समर्थ बनविले होते.. दिनानाथला डॉ. धनंजय केळकर यांनी शस्त्रक्रिया केली..त्यांनंतरही बहिणीने काही महिने सोसले..पण अखेरीस तिला सिल्पा सेन्टर मध्ये वेदनाशामक औषधे आणि शेवटही वेदनावीरहीत व्हावा म्हणून दाखल करावे लागले.. त्यातच ४ ऑक्टोबर २०१९ ला ती आम्हाला सोडून गेली.. शांतपणे..






हे सारे लिहिताना डोळे भरून येताहेत..शरीर थरथरतेय..पण अखेरीस बहिणीचे कर्म करावे लागले..



साऱ्या वेदना शांत झाल्या..त्या देहाने आयुष्यभर सोसले ते इथे संपले..









आजही तिची आनंदी मूर्ती डोळ्यासमोर येते..आणि सांगावेसे वाटते..

मीनाताई..खूप सहन केलेस..एकटीने..संयमाने आणि प्रामाणिकतेने..पण तू धीराची.. शिक्षण नसताना तुझ्या संयमाने ..वागण्याने आम्हाला खूप शिकवून गेलीस..तुझ्या आठवणी मनात कायम स्मरणात राहतील..आयुष्य तू समृद्ध केलेस..आम्हावर असाच कायम लोभ ठेव..
आदरांजली !



- तुझाच भाऊ

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com