Thursday, October 17, 2024

उत्तम अभिनयाने आणि संगीताने सादर झालेली खणखणीत कलाकृती.. गोष्ट संयुक्त मानापमानाची..!


मराठी रंगभूमीवर १९२१ साली संगीतसूर्य केशवराव भोसले आणि नटसम्राट बालगंधर्व यांच्या एकत्र प्रयत्नातून टिळक फंडासाठी झालेल्या संयुक्त मानापमान या नाटकाने जो इतिहास घडविला त्यावर आधारित हे नाट्य...

यातली नाट्यमयता आणि तो काळ..आणि प्रत्यक्ष कलावंतांनी संगीत भूमिकांनी रसिकांवर केलेला परिणाम..त्याचा समजावर झालेला परिणाम सारेच या नाटकातून परिणामकारक बाहेर आले आहे.
शंभर वर्षाहून अनुभवलेल्या अभूतपूर्व घटनेला आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून अभिराम भडकमकर यांनी साकारलेल्या कलाकृतीला आपल्या लेखनातून मोठ्या हुशारीने ..कुठेही त्याचा इतिहास जसाच्या तसा बाहेर आणला.

मानापमान नंतर सौभद्र..नाटक करून बालगंधर्व यांना द्रौपदी नाटकाच्या कर्जातून बाहेर काढण्याचं केशवराव यांनी ठरविले होते..मात्र विषमज्वराने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची..आलेली बातमी कळताच बालगंधर्व यांच्या मनाला धक्का बसला..आणि तोच या नाटकाचा शेवटचा प्रवेश ठरला

.
हृशिकेष जोशी यांनी तेव्हढ्याच तयारीने रंगभूमीवर उभी करून..तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील अशी कलाकृती रसिकांच्या भेटीला आणली आहे..
तीच म्हणजे हे गोष्ट संयुक्त मानापमानाची.. हे नाटक.





संगीत नाटकाच्या आणि एकूणच नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना पाहताना यात विलक्षण अनुभव मिळेल.. आजची तरुण पिढी आपल्या परंपरेचे जतन किती उत्तम रित्या मांडण्याचे कौशल्य दाखवीत आहे ..हेच नाटक पाहून दाद द्यायला अभिमानाने तयार होईल..एव्हढी
ताकद या कलाकृतीत आहे हे नक्की.




अशी कलाकृती रसिकांच्या भेटीला आणल्याबद्दल आधी निर्माते नाट्यसंपदा कलामंचे अनंत वसंत पणशीकर आणि चंद्रमंगल आर्ट्स .. शौर्य प्रोडक्शनचे श्यामराज पाटील यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.
नांदी..ते भैरवी असा हा संगीत प्रवास कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाने नाटकात सजला..बहरला..
याला प्रदीप मुळ्ये यांचे प्रकाश आणि रंगसजावट आणि मधुरा रानडे यांची वेशभूषा अधिक तेजोमय करते.
मी पुण्यात १३ ऑक्टोंबर २४ रोजी प्रयोग पाहिला त्यात





ओंकार प्रभुघाटे... धैर्यधर ..गाणारा केशवराव



अजिंक्य पोंक्षे..भामिनी..बालगंधर्व
( पायाला दुखापत झाली असताना.. बँडेज बांधून त्यानी ज्या पद्धतीने भामिनीची पदे ..आणि सूत्रधाराच्या भूमिका केल्या..त्याला दाद द्यायला हवी..)





आशिष नेवाळकर...बालगंधर्व,( गद्य)
ऋषिकेश वांबुरकर..केशवराव .( गद्य)






श्यामराज पाटील .. लक्ष्मीधर,

प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, ऋत्विज कुलकर्णी, आशिष वझे, निरंजन जाविर, श्रीराम लोखंडे,अश्विनी जोशी..या कलाकारांनी आपल्या कलेतून आम्हाला हा विलक्षण देखण्या कलाकृतीचा आनंद दिला.
संगीत मार्गदर्शन आणि ऑर्गन - सुशील गद्रे
तबला - अथर्व आठल्ये..





* केशवराव यांचे तरतरीतपण..आणि कोल्हापुरी भाषेचा लहेजा..
* बालगंधर्व..यांच्यातला मृदू पण आयुष्यातील धक्के खाऊन आलेला सहजी स्वभाव..
* संगीत गाणाऱ्या बालगंधर्व यांच्या पुरुषाने स्त्री वेशात केलेल्या हळव्या आणि पद्यातून उमटणाऱ्या पदांच्या जागा..
* केशवराव आणि बालगंधर्व यांचे नट आणि नाटकासाठी..कलावंतांसाठी असलेले प्रेम..
आणि कलेविषशी निष्ठा..
*देशप्रेम..आणि टिळक यांचे प्रती असलेला भाव..
* त्या काळाचे दर्शन घविणारे प्रसंग..
* नाट्यप्रयोग सादर होण्यापूर्वी केशवराव..आणि बालगंधर्व यांच्यातले संबंध दाखविणारा दूध आणि पानाची देवाणघेवाण करणारा मेकअप करतानाचा प्रसंग..
* गद्य नट वेगळे..आणि संगीत भूमिका सादर करणारे पात्र वेगळे..
* नाटकाच्या लेव्हलच नाट्य हलते राहण्यासाठी केलेला उपयोग...
* मानापमान नाटकातील गाजलेल्या पदांची कलावंत म्हणून केलेले उत्तम सादरीकरण..
* एकाच नाटकात प्रयोगशील ..आणि तेव्हढेच उत्तम नेपथ्याचा केलेला उपयोग...
* इतिहास अभ्यासून लेखकाने तयार केलेली ही परिणामकारक नसऱ्य..
* नाटक सतत घडत रहाण्यासाठी हृषीकेश जोशी यांनी केलेला मंच वापर..
* तरुण कलावंत घेऊन सादर झालेला परिणामकारक संगीत नाटकांचा प्रयोग..
* नाट्यक्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनेला पुन्हा नव्याने उजाळा देणारी रांगमंचावरील घटना..
* तरुण कलावंतांनी आपल्या परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा हा उत्तम प्रयत्न..
* कालानुरूप बदलूनही काळाची पावले ओळखून केलेला हा नाट्य निर्मिती करण्याचा निर्णय..


_ सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Tuesday, October 1, 2024

रंगभूमीवरचा एक धमाल अनुभव ..स्थळ आले धावून..!

 


गिरीश ओक आणि संजय मोने या जोडीने पौर्णिमा तळवलकर यांच्या सोबत रंगभूमीवर दिलेला धमाल अनुभव दिला..स्थळ आले धावून..!

बरेच दिवसांनी  उभयतां भरपूर हसलो..मार्मिक .. विनोद..निखळ मनोरंजन..आणि नाटकातील सहज घडणारी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवून खूप समाधान वाटले..





निवृत्त झालेल्या शिक्षकाला ( संजय मोने )जोडीदार हवा असतो..तो मिळावा यासाठी त्याने आपले नाव एका विवाह संस्थेत नोंदवितो.. लांबून पाहिलेली एका कीर्तनकार बाई ( पौर्णिमा तळवलकर )आपली व्हावी याचा ध्यास घेतो..तिच्याशी  मनातून प्रामाणिकपणे प्रेम करतो..तिच्याशी लग्न करण्याची स्वप्ने पहात असतो..




त्यासाठी ती विवाह संस्थेत नाव नोंदवितो.. पण विवाह संस्थेचा चालक ( गिरीश ओक )हे बंध जुळविण्याच्या प्रयत्नात तोच  तिच्या प्रेमात पडतो...यातून एकाची निवड करण्यासाठी विविध मार्गातून  नेमका निर्णय काय होतो..आणि अखेरीस ही रेस कोण जिंकतो..ह्याची उत्तरे नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला मिळतील.



एका अर्थाने हा प्रेमाचा त्रिकोण.. यात मात्र  ज्याला जे हवे असते तेच अखेरीस प्राप्त होते हे विशेष.  एकाकी असलेल्या दोन ज्येष्ठ स्त्री..पुरुषांना..आपल्या एकाकी जीवनात जोडीदार हवा असतो..मग ती सहसुलभ भावना  तरुण पणी जशी जपावी तशी तयार होणे स्वाभाविक ..ही  प्रेमकहाणी पाहताना तुम्ही त्यात सहज गुंगून जात त्याचा मनमुराद आस्वाद घेता.



डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनी आपल्या  सहसुलभ ..खुसखुशीत संवादातून आणि त्यांच्या परिपक्व देहबोलीतून असे काही बेमालूमपणे नटवितात  की त्यातून ते रसिकांना दोन तास हास्यरसाचा  आनंद देतात. शरदचंद्र रामचंद्र चंद्रात्रे.. झकपक..स्मार्ट  आणि बेरक्या..मिश्किल..तर दुसरा   सुभाष शांताराम फडतरे.. आदर्श शिक्षक..सत्यावर विश्वास ठेवणारा, वरवर गबाळा.. पैशापेक्षा प्रेमाशी प्रामाणिक असलेला माणूस.



संजय मोने राधाकृष्णन् बनून श्रावणी याचेवर आपली छाप पडावी यासाठी घडविलेला अफलातून प्रसंग फारच उत्तम साकारला गेला आहे.. त्यात गिरीश ओक त्यांना..अतिक्रमण विभागाचे अधिकारी..आणि गुंडांशी  सामना करणारा रजनीकांत..बनवून हे काही दर्शन घडविले आहे..ते  पाहताना रसिक हासून हासून बेजार होतात..




आणि शेवटी श्रीकृष्णाच्या मंदिरात श्रावणी  कुणाच्या गळ्यात वरमाला घालणार ..ती उत्सुकता वाढविणारा प्रसंग ज्या काही पद्धतीने रांगवितात त्याला दाद द्यायला हवी.



पूर्णिमा तळवलकर यांनी तेव्हढीच तयारीने उभी केलेली श्रावणी मेहेंदळे यांची  ..व्यक्तिरेखा तुम्हाला सहज सुंदर भासेल. किर्तनकाराच्या भूमिकेत त्या शोभतात.. ठसका..प्रेम.. आणि उत्सुकता सारेच त्यांच्या अभिनयातून व्यक्त होते.

उत्तम नेपथ्य ( तिसऱ्या आंकातील  भव्य आणि देखणे कृष्ण मंदिर ), परिणामकारक प्रकाशयोजना, साजेसे पार्श्वसंगित..साऱ्यातून नाटक मनात घर करते..

हेमंत एदलाबादकर यांनी पहिल्या अंकात हास्य फुलविले..तर दुसरा अंक थोडा गंभीर करून.. नाटकातली रहस्य..आणि पुढे काय होईल ही  उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून  ठेवली आहे.


समाजातील एका वेगळा  विषय.. ज्येष्ठ असलेल्या..पण लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांचा प्रश्न नाटकाच्यमाध्यमातून हळुवार प्रेमकहाणीतून  नाटकातून अधोरिखित केला आहे.



ते जेव्हढे लेखक म्हणून मनात ठसतात तसे ते दिग्दर्शक म्हणूनही आपली कमाल दाखवितात..

रंगभूमीवर नाटक कसे दिसावे आणि ते सतत हालते राहून ते रसिकांच्या मनात कसे उतरेल याची काळजी त्यानी घेतली आहे.

मंगल विजय केंकरे यांची ही निर्मिती पाहताना उत्तम  विनोदी नाटक रंगभूमीवर पाहिल्याचे समाधान मिळते.


स्थळ आले धावून..हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी आवर्जून जावे..आणि  सहज विनोद..आणि कलावंतांनी साकारलेल्या भूमिका..पाहून दाद द्यावी..!


- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com



Sunday, September 22, 2024

३८ कृष्ण व्हीला.. खिळवून ठेवणारा अनुभव..!

३८ कृष्ण व्हिला...डॉ. गिरीश ओक ..डॉ. श्वेता पेंडसे .. खिळवून ठेवणारा अनुभव .. ! मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल..
देवदत्त कामत आणि नंदिनी मोहन चित्रे या दोन व्यक्तिरेखा तुम्हाला सव्वादोन तास त्या रंगवकाशात जखडून ठेवतात..आणि त्यातूनच ते एक खिळवून ठेवणारा खेळ थोडेही विचलित न होता तो पाहायला लाऊन त्यात गुंतवून ठेवतात..तुम्ही सम्मोहित झाल्यासारखे होता... होय..ही किमया दोन सशक्त पत्रांच्या म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे ..३८ कृष्ण व्हिला..या नाटकातून घडवितात..हे सत्य वास्तव आहे.. नाटक सुरू होते ते ..नंदिनी मोहन चित्रे यांच्या आगमनाने लेखकाच्या घरात.. कारण त्याने आपल्या पुस्तकाला मिळालेला साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार घ्यायला जावू नये..यासाठी तिने दिलेल्या नोटीस करणावरून.. तिच्या मते हे लेखन त्याचे स्वतः चे नसून आपला नवरा मोहन चित्रे याचे आहे.. यावरून.. पहिला अंक देवदत्त कामत नंदिनीला हे लेखन कसे आपले आहे हे समजावून सांगण्याच्या गोष्टीत.. तर दुसरा अंक सारा घडतो..ते मोहन चित्रे याने त्याने लिहलेले लेखन कसे आपल्या नावाने प्रसिद्ध केले हे सांगणारा याबद्दल ..
दोन परस्पर भिन्न घटना..आणि त्या केवळ उत्कट अशा भावस्पर्शी संवादातून..आणि दोन नटांच्या परस्पर भिन्न अशा व्यक्तिरेखेतून.. पहिल्या अंकात ती अती भावनिक..संवेदनशील..हळवी..रडवेली..तर तो आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत आपणच कसे योग्य आहे हे सांगण्याच्या स्थितीत.. तर दुसऱ्या अंकात मोहन चित्रे याची दापोलीत रात्रीच्या अंधारातील भेट..आणि त्यातून त्याचेवर असलेले समाजात वावरण्याची भीती असलेले दडपण यातून..त्यांचा आजार.. त्याने देवदत्त कामत ३८ कृष्ण व्हीला.. येथे विशिष्ठ जागी येऊन लीहलेल्या उत्तम कादंबरीच्या भोवतालच्या जगात.. समाजात वावरण्याची त्याची भीती आणि त्यापोटी देवदत्त यांच्या पहिल्या पुस्तकाला मिळालेले घवघवीत यश..आणि त्यानंतर पुढे त्यांना लिहण्यासाठी आलेली..निराशा..यातून मोहन यांनीच तुम्हीच आपली पुस्तके तुमच्या नावावर..तेही यक्ष या टोपण नावाने प्रकाशित करण्याची केलेली विनंती.. त्यातच नंदिनीचे हळवे मन..आणि तिला वाटणारी भीती..यातून नाटक उलगडत जाते.. आणि अखेरीस आपली नोटीस मागे घेऊन पुरस्कार घेण्यासाठी देवदत्त कामत यांनीच जावे यासाठी विश्वासाने केलेली मागणी...आणि .. नाटक काहीसे असं घडतं..आपण रसिक ते अतिशय मनापासून ते अनुभवतो. त्यांच्या देवदत्त कामत यांच्या अभिनयातून साकारलेल्या भूमिकेत ..(जेष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक ह्यांचं हे ५० वे नाटक..)आणि तेही आणि त्या श्वेता पेंडसे आहेत..त्यांना देवदत्त कामत आणि नंदिनी समजूनच त्यांच्यातलाच एक बनून नाटक पहातो.. केवळ दोन पात्रे असलेले नाटक.. घटनेतून नव्हे तर शब्दातून पुढे जाणारे.. उत्कंठा वाढविणारे एकेक पाऊल रंगभूमीवर पडत असताना ते सारे खरे म्हणून त्या व्यक्तीरेखे बरोबर वाहवत जातो.. त्याचे कारण एकच डॉ. गिरीश ओक..यांचा दमदार वावर..सहज केलेला अभिनय..आणि उत्तम वाक्यमांडणी... याउलट नंदिनी बनून नाटकाची लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी उभी केलेली संवेदनशील मनाची..हळवी..पण प्रसंगी कठोर असलेली तेव्हढीच तयारीने उभी केलेली व्यक्तिरेखा...यामुळे.. आणि हो..यातले मोहन चित्रे हे पात्र प्रत्यक्ष दिसत नाही पण त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे व्यक्तित्व..सतत जाणवते कारण ते पात्र नाटकभर आपल्या मनात कायम रहाते. एक बंदिस्त आणि रसिकांना खिळवून ठवणारा प्रयोग बांधणारे दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या उत्तम दिग्दर्शन कौशल्यामुळे हे नाटक अधिक अंगावर येते.. मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल.. असा वेगळा विषय अतिशय उत्तम रित्या मांडण्याचे धाडस केलेल्या डॉ. श्वेता पेंडसे यांचे नाटककार म्हणून रसिकांनी स्वीकारलेले हे नाटक त्यांच्याकडून अधिक चांगल्या विषयावरील..आणि मराठी रंगभूमी अधिक श्रीमंत करणारी कलाकृती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.. १९ मार्च २०२२ रोजी रंगभूमीवर आलेले हे नाटक पाहण्यासाठी आम्हाला २३५ प्रयोग वाट पहावी लागली याची खंत आहे.. पण दरसे आये..दुरुस्त आये..अशीच भावना आहे.. नाटक संपल्यावर इतके उत्तम , बंदिस्त ..आणि लेखन तसेच दोघांची कामेही अतिशय सुंदर असल्याचे रसिकांच्याकडून व्यक्त होत होते.. हीच तर नाटकाची खरी पावती आहे.. ज्यांनी अजून पाहिले नाही त्यानी आवर्जून हे नाटक पहावे ..! श्रेयनामावली लेखक: डॉ. श्वेता पेंडसे दिग्दर्शक: विजय केंकरे नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: अजित परब
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Saturday, August 10, 2024

लडाखमध्ये श्योक नदीच्या पात्रात जेंव्हा गाडी बंद पडते ....!

तसा आमचा लेह लडाख मधील प्रवास व्यवस्थित चालला होता. आम्ही रोवर्स डेन ..यांनी आयोजित केलेल्या श्रीनगर..कारगिल..आर्यन व्हॅली.. तुर्तुक.. नुब्रा व्हॅली..असा त्या विरळ हवा असलेल्या वातारणाशी स्वतः ला जुळवत या अनोख्या प्रदेशात उंच पर्वत, भव्य नद्या..आणि खारदुंगला पास सारख्या उंचीवरील अनोख्या आणि बोचऱ्या हवेचा मारा झेलत आम्ही ११ ज्येष्ठ नागरिक तिथल्या निसर्गाचा आनंद घेत ट्रॅव्हल्स बसने फिरत होतो.. आणि सुमुर भागातून फिरताना वातावरणात बदल होत असल्याचे जाणवले..मन थोडे नाराजी व्यक्त करीत होते..आणि सुमुर गावातून जवळच असल्या पनामिक इथल्या गरम पाण्याच्या कुंडाचा अनुभव घेऊन उत्तम सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी वास्तव्यासाठी दाखल झालो.. रात्रीच आमच्या सर्वांच्यात सामील झालेल्या कौस्तुभ दळवी यांनी जाहीर करून टाकले.. श्योक नदीच्या पात्रात ग्लेशियरचे पाणी वाढत आहे..उद्याचा पैंगोंग लेकला जाण्यावर कदाचित ब्रेक लागू शकुन आपल्याला लेह येथे जाणे भाग पडेल. आपण लेह वरून पैंगोंगला दुसऱ्या चांगल्या मार्गाने जाऊ शकतो.. पण तरीही आपण नदीच्या जवळ जाऊन नेमकी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.. तेंव्हा आपण उद्या चहा..नाश्ता न करता सकाळी ६ वाजता सूमुर सोडून निघणार आहोत... ठरले.. आम्ही ३० जुलै..२४ रोजी ठरल्या वेळी निघालो..दीड तासाच्या प्रवासानंतर श्योक नदीच्या काठी आलो..पहातो तर नदी पात्रातून जाणारा पैंगोंगचा रस्ता कुठेच दिसत नव्हता.. नदीचे पात्र बर्फ वितळत अधिक वेगाने वाढत आहे.. आता पुढे काय...हा प्रश्न आमच्यासमोर होता. दरम्यान आमच्या वाहन चालकाने माहिती काढली की पाणी कमी होण्यासाठी तासभर वाट पाहावी लागेल. मग आम्ही या नदीच्या काठी बाजूला घेतलेल्या गाडीत पाणी कमी होऊन आपल्याला जाता येईल असे वाटून तिथेच बसून राहिलो.. हळू हळू सुमारे वीस एक प्रवासी आणि खासगी गाड्या त्याचीच वाट पाहत तिथे थांबल्या होत्या..त्यातच पंधरा ते वीस बाईक रायडर देखील ह्याच प्रतीक्षेत असलेले दिसले.
नेहमी नदीला पाणी येऊन रस्ता बंद होतो म्हणून पर्यायी रस्ता करण्याचे काम सुरू केलेले दिसले.. त्या कामासाठी उभे असलेले तीन जेसीबी होतेच.. तासाभरात त्यापात्रात दोन जेसीबी पात्रात उतरून रस्ता निर्माण व्हावा म्हणून एका कोपऱ्यातील पाण्याच्या प्रवाहात नदीतील वाळू.. गोटे यांचा भराव टाकण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या दोन तासाच्या प्रयत्नानंतर एक काम करणारी जीप पात्रातून सुरक्षीत जाऊन परत आली देखील.. आम्ही आपापसात ठरवले होते..की या परिस्थितीत पाण्याशी खेळायचे नाही..आपण सरळ लेह येथे जाऊ.. पण अमच्या वाहनचालकाची जिद्द भारी .. त्याने नदीच्या पत्रातून जसा जेसीबीने रस्ता मोकळा करून जाण्याचे संकेत दिले ..तशी आमची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी प्रथम नदीपात्रात घालण्याचे ठरविले.. गाडी शिरली.. नदी पात्रातील गोटे.. दगड..यातून मार्ग काढत गाडी चालुही लागली. एका बाजूने वाट काढत गाडी पुढे सरकत होती..आणि अचानक गाडी उजव्या बाजूस असलेल्या त्या गोट्यात फसली.. गाडी वेगच घेत नव्हती.. ती तिथेच अडकली.. ना पुढे..ना मागे.. जागीच ठप्प..!
अचानक गाडीच्या चालकाच्या दरवाजातून पाणी गाडीत घुसत होते..मागूनही पाणी गाडीत येत असल्याचे जाणवले.. मग मात्र आम्ही सारेच घाबरलो..पण आपल्या मनाचा निग्रह करून पुढील स्थितीवर अवलंबून राहण्यासाठी सिद्ध झालो.. तशातच चालक खाली उतरला.. शेजारी जेसीबी चालक आणि त्याचा साथीदार हे सारे पहात होता.. गाडी जशी पात्रात फसल्याचे पाहिले मात्र काठावर ते दृष्य पहात असलेले इतर चालक मदतीला धावले.. तुम चिंता मत करो..हम तुमको..सही सलामत बाहर निकलेंगे.. म्हणत धीर देत होते.. तशातच गाडीतून लोखंडी साखळी..आणि नायलॉन दोरी काढली.. चालक आणि मदतीला आलेले लोक जेसीबीच्या सहाय्याने त्यातून गाडी खेचण्याचा प्रयत्न करीत होतेच.. पण ती साखळी आणि दोरी वजन न झेपल्याने तुटून आली. त्याला वजन उचलणे शक्य झाले नाही.. मग दुसरी जाड लोखंडी चेन आणली गेली.. त्यांचा प्रयत्न सुरूच होता..
मग आम्हीच म्हटले की आम्ही पाण्यातून चाल स्थिती असेल तर गाडीतून खाली उतरू.. म्हणजे गाडीचे वजन कमी होऊन गाडी जेसीबीला उचलणे शक्य होईल.. ठरले.. आम्ही सारे पुरुष आणि महिलावर्ग.. देवाचे नाव घेत .. बुट..चप्पल काढून हातातील वस्तूंसह गाडीच्या बाहेर सुमारे चारशे पावले चालत आलो.. कुणी स्तोत्र पठण..तर कुणी अथर्वशीर्ष म्हणत त्या रेती दगडातून चालत जिथे पाणी कमी होते तिथे पोचलो.. इकडे जेसीबी क्रेन गाडीला जोरदार उचलत बाहेर काढत होती.. अखेर काही वेळातच..त्यांच्या प्रयत्नाला यश आले..गाडी बाहेर आली मात्र.. गाडी पाण्यात गेल्याने गाडीचा सेन्सर काम करेनासे झाले.. गाडीचा एक पार्ट बदली केला..मग गाडीच्या अंगात प्राण आले..
आणि सारे ज्येष्ठ नागरिक पुन्हा एकदा मदतीसाठी धावलेल्या माणसांना बक्षिसी देऊन गाडीत विराजमान झाले.. जणूकाही ते आमच्यासाठी देवदूत बनून मदतीला धावल्याची यामागे भावना होती. आणि हा प्रसंग कुणावर येऊ नये असे म्हणत पुढील वाटचालीसाठी सामोरे गेलो..
वेगळा अनुभव पुढेही आहे.. नदीचे प्रवाह.. पाण्याचा खळाळणारा प्रवाह..आणि खाचखळग्याचे रस्ते पार करत गाडीने आघम चौकात आलो आणि डाव्या दिशेने गेलो..तर पैंगोंग आणि उजवीकडे गेलो तर साठ किलोमिटर दूरच्या रस्त्याने लेह १०७ किलो मिटर.. मग वाहनचालक पैंगोंग कडील रस्त्याने गाडी हाकत होता.. वाटेत. दोन गाड्या सांगत होत्या..पैंगोंग लेक साठी जाण्याचा रस्ता बंद आहे..पण चालकाने तशीच गाडी दामटली.. पुढे लडाखी प्रदेशातील गाडी दिसली..त्यांच्या आणि आमच्या चालकाचा संवाद झाला.. त्यातून कळले की किमान चार दिवस हा मार्ग मोकळा होणार नाही.. मग माग चालकाला परतण्या शिवाय पर्याय नव्हता..
मग पुन्हा त्या आघम चौकात आलो.. आणि गाडी वरीला पास वरुन शक्ती..आणि मग लेह कडे..जाण्याचे नक्की झाले.. आपल्या नशिबात पैंगोंग अनुभवणे आज नाही हे आम्ही मनाशी नक्की केले.. मग गाडीने उजव्या दिशेने लेह साठी धाव घेतली मात्र... गाडी घाटातील चढावार चढत नव्हती.. त्यासाठी चार वेळा सर्वांसह प्रयत्न झाले..पण तेच फळ.. आता तर आपण भोवऱ्यात अडकल्याचा भास होत होता. दरम्यान एक टेम्पो ट्रॅव्हल्स जी त्या चौकातील मालकाची होती..त्यांना खालच्या गावात धार्मिक कार्यासाठी जायचे होते..त्यांना चालकाने गाडी दाखविली..अमच्यासाठी ते गाडीचे डॉक्टरच होते.. त्यांनीही प्रयत्न केला.. पण गाडीच्या बॅटरी मध्ये पाणी गेल्याने गाडी वेग घेत नसल्याचे स्पष्ट झाले. ही गाडी लवकर दुरुस्त होणे शक्य नाही..संध्याकाळचे साडेसहा वाजले.. डोळ्यापुढे अंधार..ना पैंगोंग..ना लेह..मध्येच अडकलो..
शेवटी त्या गाडीच्या मालकाला विनंती केली..त्यानी ती मान्य करून आम्हाला शक्ती पर्यंत ..सुमारे ६२ किलोमिटर ..सोडण्याचे मान्य केले.. दरम्यान मोबाईल रेंज मिळून लेह मधून शक्ती साठी गाडी मागविण्यात आली.. आम्ही आघम मधून निघालो. इथे रात्र आठ नंतर होते.. बाहेर काळोख ..त्यात काचेतून वारा घोंगावतोय.. आमची ही गाडी छोटी असल्याने दाटीवाटीने प्रवास सुरू झाला.. दीड तासाच्या घाट माथ्याच्या प्रवासा नंतर त्या चालकाने सांगितले..इथे गाडी चढत नाही..गाडी चढामुळे मागे येत आहे.. तुम्हाला थोडे उतरून चालत यावे लागेल.. बाहेर वारा.. जबऱ्या थंडी..कुणाला चालायला अडचण..कुणाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता..मात्र तरीही आलिया भोगाशी..ठरवून आम्ही चालत पुढे गेलो.. सारे दमलेले..थकलेले..मनावर ओझे.. अखेरीस वरि ला पास करून शक्ती पर्यंत आलो..तर लेह मधून येणारी गाडी शक्तीच्या पुढे १५ किमी पुढे येऊन आमची वाट पहात चालक उभा होता.. मग सारेच हुश्श झाले..त्यात सामान आणि बरोबरचे सारे टाकून लेह साठी निघाली.. रात्री साडेबाराच्या सुमारास लेह येथे मुक्कामी दाखल झालो.. असा तो सारा ३० जुलै..२४ चा दिवस..आम्हाला तिथल्या आठवणी देत मागे पडला..आम्ही तो दिवस कायम स्मरणात ठेऊ.
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@ gamil.com

Monday, May 27, 2024

अलौकिक शांताबाई...

अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..! शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या.. कवितेच्या शब्दात दडलेला आशय आणि संगीतकाराने शब्दातून तो अर्थ कसा बाहेर आणला याचे प्रात्यक्षिक आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून ठळकपणे समोर आणला. प्रतिभा मग ती कवीची वा गीतकाराची असो..कशी फुलत जाते आणि संगीत देताना संगीतकाराने त्याला कसे फुलवून बाहेर आणले आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.
खरे तर अपर्णा संत या उत्तम गायिका म्हणून आपल्याला दिसल्या..पण इथे त्या दिसतात कविता..आणि गाणी यांच्यातील दडलेले नाते सांधणारी आशयाला आपल्या विश्लेषणातून बाहेर आणणारी विचारवंत म्हणून.. अनेक कवितेतील अर्थ..आणि संगीतकाराने त्याला स्वरातुन दिलेला योग्य न्याय याची अपर्णा संत यांनी अनेक उदाहरणातून रसिकांना दाखले देत समजावून सांगितले आहे.. शांता शेळके यांच्या अनेक कवितांना त्यानी आपल्या निवेदनातून प्रगट केले..पण पैठणी या कवितेला ज्या तन्मयतेने सादर केले ..ते एक उत्तम उदाहरण सांगता येईल. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आपल्या लहानपणी शांताबाई ..आणि अरुणा ढेरे कशा भेटल्या आणि त्यानी कसे गाणे ऐकले आणि पुण्यात हृदयनाथ मंगेशकर यांची कशी भेट घडवून आणली..आणि आयुष्याला कशी योग्य दिशा दिली ते अपर्णा संत आपल्या शब्दातून व्यक्त करतात.
अलौकिक शांताबाई... मध्ये अपर्णा संत स्वतः न गाता आपल्या किरण भिडे नायर ( मागे उभा मंगेश, ही वाट दूर जाते, हे श्यामसुंदर राजसा ), श्रुती देवस्थळी (माझी न मी राहिले, निळ्या आभाळी कातरवेळी, पहा टाकले पुसूनी डोळे , आणि अखेरचे जिवलगा राहिले दूर घर माझे ), पूर्वा जठार ( विकल मन आज..हे नाट्यगीत, ऋतू हिरवा) , चिन्मयी तांबे (हे एक झाड आहे, कळले तुला काही) या शिष्यांना गाणी सादर करायला लावून .. ती उत्तम तयारीने करायला लावून त्यांना नवा आत्मविश्वास दिला..
तर शुर आम्ही सरदार, तोच चंद्रमा नभात, रुपास भाळलो मी..श्रुती देवस्थळी सह, आणि अजब सोहळा..ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर यांना आमंत्रित करून ती गाणी तयारीने सादर केली.
याशिवाय शांताबाईंच्या बालगीतांसाठी.. इरा वेदपाठक आणि स्वरा बंकापुरे या छोट्या मुलींना तयार करून त्यांचेकडून दोन गाणी रसिकांना ऐकवली. त्यातले किलबिल किलबिल रसिकांनी डोक्यावर घेतले. अपर्णा संत आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी राजा सारंगा..ह्या कोळी गीतातल्या सुंदर हार्मनी मधून रसिकांना मंत्रमुग्ध केले.. गाण्याला स्वराने आणि शब्दाने ती धून पुन्हा पुन्हा आळविणाऱ्या गीताने वातावरण भारावून गेले होते. या पाठीमागे असलेल्या उत्तम संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनाही दाद द्यायला पाहिजे..हे गाणे जून मध्ये शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला भावपूर्ण वंदन म्हणून सादर करण्यासाठी तयार केले होते.
संपूर्ण कार्यक्रमाची साथ केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अजय अत्रे आणि प्रसन्न बाम यांनी उत्तम संगत करून तो रंगतदार केला. त्यांचीही यांच्या यशामागे मेहनत दिसली.
अलौकिक शांताबाई... याची संकल्पना, संहिता आणि निवेदन करून अपर्णा संत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले..खरोखर असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत आणि तयारी करून तो सादर करावा लागतो..त्याचे सारे श्रेय गायक..गुरू..आणि संगीत अभ्यासक अपर्णा संत यांना मनापासून द्यायला हवे.. यासाठी डॉ. अरुणा ढेरे मुद्दाम उपस्थित होत्या..आणि सुजाण रसिक सभागृहात दाद देत होता. अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना रसिक तिकीट काढून गर्दी करतात ही आगळी गोष्ट आहे..
- सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, May 7, 2024

तू अन् मी..शब्द सुरांचा हा हिंदोळा...

शब्द शब्द जणू साद मनीची सूर चेतवीती याद मनीची गाणी अशी ती लळा जिव्हाळा शब्द सुरांचा हा हिंदोळा... असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला..
काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला.. कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कुमार आणि श्रुती यांच्या संसाराला पंचवीस वर्षे.. कुमारजी यांची पन्नाशी आणि संगीत क्षेत्रातील तीस वर्षे असा हा एकूण प्रवास सुरू आहे..तेही उभयतांच्या जोडीने..एकमेकांच्या साक्षीने..
कुमार करंदीकर यांनी संवादिनी संगतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.. अनेक नामवंत गायकांच्या मैफलीला साथ केली.. त्यांना गजानन वाटवे यांचे मार्गदर्शन लाभले नंतर.. काही रचना संगीतबद्ध केल्या.. आणि ते शशिकला शिरगोपिकर यांचेकडे गजल शिकण्यासाठी वळले..आणि त्यात गजल समजून त्या पेटीवर साथ करीत गायला सुरुवात केली..त्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले..आणि गायक..साथीदार.. संगीतकार म्हणून नाव कमावले..
तसेच श्रुती करंदीकर..यांनी रीतसर गायनाचे शिक्षण घेतले..गजानन वाटवे यांचेकडे सुगम गायनाचे धडे घेतले.. आणि मराठी - हिदी.. गाण्यांची मैफल सुरू केली..कुमार प्रमाणे गजल कडे त्याही वळल्या ..स्वतः गाण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली..आणि दोघे मिळून असा नवा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.. उत्तम शब्दांची जाण..कवितेची निवड..आणि संगीत देण्याची तयारी..यातून हिंदोळा प्रस्तुत.. तू अन् मी.. असा नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी घेऊन रसिकांना आपल्या अभ्यासपूर्ण गाण्यातून बांधून ठेवण्याची हातोटी साधली.
कार्यक्रमात नेहमीची गाणी न घेता नव्या रचना ..घेऊन त्यातील शब्दांना कानात साठविण्याची संधी त्यानी यानिमित्त घेतली.. नवीन चाली आणि नव्या रचना इथे ऐकायला मिळणार याची खात्री असूनही रसिकांनी या गाण्यांना .. चालींना तशीच दाद दिली..हे कौतुकास्पद आहे. तू सप्त सूर माझे.. कुमार..मग तुझ्याचसाठी कितीदा..हे श्रुती यांचे गाणे ऐकत आनंद घेत दाद देत..स्नेहल दामले यांच्या सहज आणि उत्स्फूर्त निवेदनाने गाणी ऐकत रसिक तृप्त होत होते.. धुंद तू धुंद मी, तू येता या फुलांना अशी दोघानी स्वरांनी नटविलेली गाणी त्यातले भाव अधिक उठावदार करत होती..
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.. इलाही जमादार यांची गजल मधूनच वास्तवाची भान देणारी ठळकपणे अधोरेखित होते..ती कुमार करंदीकर यांच्या उत्तम सादरीकरणातून. मधूनच. आपल्या चुका कबूल करत जाहल्या काही चुकाचे दर्शन श्रुती देत होत्या.. कधी कुठे भेटणार..मग फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे. श्रुती..आणि मोहूनिया तुजसंगे..असे कुमार म्हणत गजाजन वाटवे यांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला. सांजवेळी सोबतीला घेऊन श्रुती करंदीकर.. कुमार यांच्या अधिक जवळी गेल्या.. तर संजीवनी बोकील यांच्या ढळे वाऱ्याचा पदर..सारखे मालकंस रागात बांधलेले गाणे मनात खोलवर परिणाम करून जाते.. मराठी गजलकडे वळताना गडे सोडून दे रुसवा..ही दीपक करंदीकर यांची नवी रचना कुमार तेव्हढ्याच आत्मीयतेने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवितात.. मग सुरू होतो..शशिकला शिरगोपीकर यांची तयार करून घेतलेल्या उर्दू गजलांची .. बात निकलेगी तो.. तुमको देखा तो.. तुमको हम दिलमे.. दीलमे एक लहरसी.. तुम अपना रंजो गम.. सारख्या गजल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात..त्या कुमार आणि श्रुती दोघानी ताकदीने सादर केल्या. त्याला शशिकला शिगोपिकर यांनी उपस्थित राहून दादही दिली. ये दिल तुम बिन..हे दोघानी ताकदीने सादर केलेली रचना.. आणि गो जरासी बातपर..ही गजल अर्थासह पेश करून कुमार करंदीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गाण्याचा आनंद दिला. अखेर रंजिश ही सही..ही रचना कुमार..श्रुती यांनी रसिकांच्या मनात साठवून ठेवताना ..ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है..हेच दाखवून दिले.. नवीन रचना आणि त्यात जुन्यांची आठवण करत..हा शब्द सुरांचा प्रवास पुढेही नवीन मालिकेत सुरू ठवण्याचे आश्वासन देऊन.. तू अन् मी.. चा पहिला एपिसोड इथेच संपवितात..
यासाठी अरुण गवई..केदार तळणीकर..आणि मिहिर भडकमकर यांची स्वर तालाची संगत शब्दांना अधिकाधिक परीपूर्ण करत होती.. आणि स्नेहल दामले यांचे ओघवते शब्द मनाला अधिक भिडत होते..कधी कधी कमीत कमी शब्दातून गहरा असर व्यक्त करत होता.. असे प्रयोग रसिकांना नक्कीच भावतात..पण त्यासाठी त्यांची अधिकाधिक उपस्थितीची गरज आहे.. तरच हे नव्या रचना सादर करायला कलावंताना प्रोत्साहन मिळेल. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Sunday, March 31, 2024

व्हायोलीन वादनाचे अप्रतिम सादरीकरण..

गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलीन परंपरेचा उत्तम आविष्कार चारुशीला गोसावी यांच्या वादनातून साकारला... डॉ. विकास कशाळकर
गजाननबुवा जोशी यांच्याकडे चाळीस वर्षांपूर्वी ज्या श्री रागाने सुरवात केली त्या रागाचे अप्रतिम सादरीकरण करून चारुशीला गोसावी यांनी आपल्याला पुनः प्रत्ययचा आनंद दिल्याची भावना ज्येष्ठ गायन गुरू आणि अभ्यासक डॉ. विकास कशाळकर यांनी एस एम जोशी सभागृहात व्यक्त केली. संगीत साधनेची चाळीस वर्षे या निमित्ताने पुण्याच्या व्हायोलीन वादक चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय आणि सुगम व्हायोलीन वादनाची मैफल व्हायोलीन गाते तेंव्हा..या नावाने रविवारी ३१ मार्च २४ ला रसिकांसमोर सादर केली.
यावेळी चारुशीला गोसावी यांनी श्री रागाने शास्त्रीय व्हायोलीन वादन करून त्यामुळे भारावून जाऊन डॉ. विकास कशाळकर यांनी त्यांच्या वादनात दाखविलेले स्वरांचे दर्जे आणि लयीचे प्रभुत्व त्यांच्या वादनात होते याबद्दल आपल्या बोलण्यात कशाळकर यांनी चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची दाद देऊन..आजकाल कलाकार गॅलरी साठी वाजवितात .पण गोसावी यांनी केलेले वादन स्वतः साठी होते म्हणून ते अधिक दर्जेदार होते याची कबुली दिली. आणि गजाननबुवांची परंपरा तुम्ही नक्की पुढे न्या ..असे सुचविले. तबला वादक मोहन पारसनीस यांनी कलाकार काय वाजवितो याचे भान ठेऊन चारुशीला गोसावी यांना केलेली साथ मोलाची होती..याबद्दल ज्येष्ठ तबला गुरू पांडुरंग मुखडे यांनी कौतुक केले आणि चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय व्हायोलीन वादनात उत्तम तारेवरची कसरत उत्तम स्वर तालात साधली याबद्दल खास शब्दात त्यांनी मनोगतात त्यांची स्तुती केली. स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी चारुशीला यांच्या वक्तशीर आणि अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करून प्रामाणिक, मेहनत घेऊन कार्यक्रम सादर करते याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. पुण्यात अनेक कार्यक्रम सादर होत असताना या व्हायोलीन कार्यक्रमासाठी सभागृह पुरेपूर आनंद घेत रसिकांच्या उपस्थितीने भरलेले होते..
आरंभी शास्त्रीय व्हायोलीन वादनात श्री आणि त्यानंतर किरवाणी रागातली धून सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली.. त्यांना तबला साथ तेव्हढ्याच आत्मीयतेने आणि तयारीने मोहन पारसनीस यांनी केली होती. सुगम संगीतात स्वतःची ओळख व्हायोलीन वाद्यावर करून चारुशीला गोसावी प्रभात समयो पातला, जगी आंधळी मी तुला पाहते, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर लळा जिव्हाळा सारखे भावपूर्ण अवघड गीत, कारे धरिला सारखी बैठकीची लावणी, नकोस नौके परत फिरू हे गीतरामायणातले आगळे गाणे, पराधीन आहे जगती सारखे अर्थपूर्ण गीत. तर तुझे गीत गाण्यासारखे भावगीत....आणि चारुशीला गोसावी यांची शिष्या वैष्णवी काळे यांनी आईये मेहेरबान..सादर करून रसिकांची पसंती मिळविली.
मग मधुबन मे राधिका सारखे नृत्य..ताल.. लय याला महत्व असणारे लोकप्रिय हिंदी गाणे, पाकिझा मधील ईन्ही लोगोने.. आणि शेवटी हे सुरांनो चंद्र व्हा...ह्या भावपूर्ण गाण्याने आजच्या व्हायोलीन गाते तेंव्हा..या कार्यक्रमाची सांगता झाली.. संपूर्ण कार्यक्रम म्हणजे उत्तम व्हायोलीन वादनाची अवीट मैफल अशी काही रंगत गेली त्याला यथोचित अशा निवेदिका विनया देसाई यांच्या उत्तम शब्दाने.. साथ संगत विनीत तिकोनकर, उद्धव कुंभार आणि आदिती गराडे त्यांच्या कमालीच्या हुशारीने वाजविलेल्या वाद्यातून लाभली.. पंडित भालचंद्र देव यांच्या पत्नी निलाक्षी देव यांच्या हस्ते कलावंताना स्नेह प्रतिक देण्यात आले.. तर रसिकांच्या वतीने आनंद आणि कल्याणी सराफ यांनी गोसावी यांना गुलाबाची परडी देऊन सन्मान केला. रवी मेघावत यांच्या उत्तम ध्वनीव्यवस्थापनामुळे गाणी ऐकण्याचे उत्तम समाधान रसिकांना घेता आले. तीन तास व्हायोलीनची संगत लाभलेल्या रसिकांना चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची शास्त्रीय आणि सुगम मैफल अनुभवता आली.
- सुभाष इनामदार, पुणे