Saturday, November 2, 2019

गृहिणी-सखी-सचिव...सुनीताबाई देशपांडे



( पूर्वार्ध )

“ काऽऽय हो ? काय म्हणताय ?” असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅंडलाईनच्या रिसीवर मधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाईलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅंडलाईनला अजून महत्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी १, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व असलेल्या पु लं च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा “ काऽऽय हो ” चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या – “ थांबा हं .... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.” त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीवर भाईंच्याकडे सोपवला.


मी साधारण १० वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता पु लं च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफिलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की – पु लं ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहित. पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पु लं च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्त्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे. 


माझं भाग्य असं की मी पु. ल. आणि सुनिताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनिताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक ८ नोव्हेंबर १९९८. पु ल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा?  त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पु लं च्या पुस्तकाच्या बरोबरच सुनिताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पु लं चे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनिताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते.  दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पु ल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले. तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.


सुनिताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनिताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’ चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक  पु लं नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे –सकळ’ चे. श्री पुं नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनिताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे –सकळ’ ची ती प्रत सुनिताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? पु लं सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनिताबाईंकडे पाहत होते. सुनिताबाईंनी पहिले पान उघडले आणि पु लं समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनिताबाईंनी साक्षात पु लं नाच अर्पण केले होते. पु लं च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणाच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.


सुनिताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या- “ जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.” असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पु लं ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पु लं शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनिताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पु लं नी मला हाक मारली व म्हणाले- “ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवयं. हा फोटो मला हवायं.” त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनिताबाईंनी परत एकदा वाकून पु लं ना नमस्कार केला अन तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन किती साधेपणा.



जून १२, २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं मालती-माधव मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पु लं नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” मी सुनिताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिश मध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनिताबाई म्हणाल्या – “ हे भाषांतर फारच गद्य वाटतयं. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.” त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या- “ हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.”  ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’ वर अवतरलेला पु लं चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.


सुनिताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांचीमाळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा “ काऽऽय हो ? अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो- “ पाचच मिनिटात पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.” आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली “ सुनीता देशपांडे १५.१०.२००३.” मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.


पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे. व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या  त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनिताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या – “ काल  तुम्ही मण्यांचीमाळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?” माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या – “ उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.” मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान –अन – पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले- “ अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.” पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनिताबाईंचे समाधान झाले होते.


अशी जागरुकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?




*(उर्वरित लेख उत्तरार्धात )*

- सतीश पाकणीकर , पुणे.
  प्रसिद्ध प्रकाशचित्रकार

Friday, November 1, 2019

भूतान - नैसर्गिक सुंदरतेने नटलेला देश




 

 

सात दिवस भूतानमध्ये फिरून आल्यानंतर तिथल्या अनुभवलेल्या गोष्टी आजही डोक्यातून बाहेर जात नाहीत. जयगांव (पश्चिम बंगालचे शेवटचे गाव) मधून फुतशोलिंग (भूतानची हद्द येथून सुरू होते) शहरात केवळ एका भिंतीमधून पलीकडे भूतान मध्ये शिरलो गाडीचा हॉर्न पूर्ण बंद झाला. धुम्रपान बंदी आणि खूप काळ चालतील असे पक्के रस्ते.. आणि सर्वात महत्वाचे मोठमोठ्या वृक्षराजीने बहरलेला आणि डोंगरद-यांनी सजलेला निसर्ग.


ओडीसी हॉलिडेज या पुणेस्थित कंपनीच्या प्रतिक घैसास या तरूण संचालकाबरोबर आम्ही आठजण भूतानची मजा अनुभवली. पुणे ते कोलकत्ता..तिथून बागडोगरा.. विमानाने.आणि तिथून आरामदायी गाडीने फुंतशोलिंग..येताना फुंतशोलिग ते बागडोगरा पुन्हा गाडीने. मग बागडोगरा ते नवी दिल्ली..आणि नवी दिल्ली ते पुणे..विमानाने.. त्यातली हा काही निरीक्षणे.







संपूर्ण प्रवासात महिलांची व्यवसायात असलेली महत्वाची भागीदारी दिसते..दुकाने त्याच चालवितात.. लहान काय किंवा थ्री स्टार काय हॉटेलात त्यांचा सहभाग नजरेत भरतो.. तुमच्या मोठमोठ्या बॅगा देखील त्या उचलतात..तेव्हा त्यांची कीव येते..पण त्या ते काम हसत हसत करीत असतात. एका हॉटेलात तर लहानग्याला झोळीत बांधून त्याची आई अगत्याने सेवा करीत होती...तेंव्हा त्यांच्याविषयी आदर दुणावतो..




आम्ही फुतशोलिंग, थिंपू, पुनाखा आणि पारो एवढयाच भागात फिरलो..पण त्यातूनच एकूण भूतानच्या परिस्थितीविषयीचे आकलन होते. भूतानचे खरे सौंदर्य..त्या शेकडो मैल विखुरलेल्या डोंगर द-यातच आहे..तिथला भूभाग अणि स्वच्छ मोकळी हवा..





दाटलेले धुके..आणि त्यावर मधुनच टपकणारी..सोनेरी सूर्याची किरणे मन आणि शरिराला प्रसन्न करते..असंख्य रंगांची उधळण करणारा एक वेगळाच निसर्ग तुम्हाला खुणावतो. एका बाजुला रौद्र आणि दुसरीकडे शांतपणे पसरलेली आणि उंचच उंच बहरलेली वृक्षराजी पुन्हा पुन्हा हविहविशी वाटते.



















कुणीही वाहनांचा हॉर्न वाजवित नाही. रस्ता ओलांडताना जिथे पांढरे पट्टे आहेत तिथेच पलिकडे जायचे. वाटेत कुठेही उतरून कुठलाही विधी करणे दंडनिय अपराध होतो. त्यासाठी १०० रूपयांचा दंड आहे. त्यासाठी अगदी डोगर माथ्यावरही स्वच्छतागृहे सशुल्क आणि स्वच्छही आहेत. सारा प्रदेश चढाणीचा असल्याने वर जाणा-यांना प्राधान्य दिले जाते..अगदी तिथेही कुठलिही घाई दिसत नाही. कुशल आणि सुरक्षित वाहन चालविणारे वाहनचालक तुमची आणि वाहनाची सुरक्षा सतत घेत असतात. कुठेही टोल नाका नाही.












रस्त्यांवर टपरी दिसत नाहीत की भिकारी. बाजारपेठांसाठी वेगळी मुबलक जागा दिला आहे..तिथेच व्यापार चालतो.. एकच दाम. त्यात घासाघीस नाही. मात्र काही ठिकाणी तुम्ही भारतीय म्हणून किमतीत मात्र दुप्पट दाम वसूल केला जातो. सफरचंद गोड आणि भरपूर मिळतात. १०० ते १२० रुपये किलोने., आक्रोड मिळतात. पण सुकामेवा फारच कमी. गाजर, मोठमोठे मुळे. काकडी, तमालपत्र, पांढरा लसून, हिरवा घेवडा, लांबलजक वांगी, टोमॅटो..तुम्हाला भाजीच्या दुकानात सहजी दिसून येतील.


बाजारात काही दुकानात तांबड्या मिरच्यांची माळ लटकलेली दिसते. त्या वाळविण्यासाठी अडकविलेल्या असतात. हिरव्या, हिरव्या -तांबड्या, आणि लाल भडक पण मोठ्या मिरच्या सर्वत्र आढळतात. थंडी भरपूर असल्याने ते सारे लोक मिरचीची भाजी करतात. भात पण तोही पाणी काढलेला फडफडीत असतो. चवही वेगळीच असते. थोडा पित्तकारच. बटाटा रस्सा. जि-याची फोडणी घातलेली बटाटा भाजी फार रूचकर करतात. त्या बटाट्याला एक स्वाद आहे. काही ठिकाणी..फुलके मिळोले..पण तेही ३५ रूपयाला एक याप्रमाणे. बटाटे घातलेला परोठा सर्वत्र मिळतो. शाकाहारी मेडळींचे फारसे आडत नाही.. आम्ही एका रस्तावर कणीसहि भाजून खाल्ली.

रस्त्यातून अगदी डोंगरावरही महिला, मुली बिनदीक्कत फिरताना दिसतील, एकूणच नागरिक सुरक्षीत आणि काळजी घेणारे आहेत. गुन्हेगारी फारशी आढळत नाही.. बाजारूपणा कमी आणि खुशाली अधिक दिसते. हॉटेलमध्येही पैशाची कुणीही मागणी करत नाही..त्यांची ती अपेक्षाही दिसत नाही. चेह-यावर सतत हास्य आणि सेवेत प्रसन्नता असणारी ही मंडळी तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी झटत असतात.. एखादी गोष्ट पटली नसेल तरी ते नाराजी दाखवत नाहीत.







धार्मिकता एकीकडे आणि राजा राणीविषयीची आत्मियता दुसरीकडे.. प्रत्येक ठिकाणी राजा राणी आणि त्यांचा लहानगा मुलगा यांची छायाचित्रे अग्रभागी लावलेली असतात.. अगदी मंदिर, मॉनेस्ट्री, दुकाने, हॉटेलातही.




भूतानचे चवथे राजे जिगमे सिंग्ये वांगचुक  हे पर्यावरण प्रेमी आहेत. भुतानचा ६० टक्के भाग वनांनी युक्त हवा असे बंधन आहे.. म्हणून राजांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त  जागतिक पर्यावरणाचे दिवशी एका तासात १०० लोकांनी  एकत्र येऊन ४०८८५ झाडे लावली..याचा भूतानच्या सर्वसाधारण नागरिकाला अभिमान आहे..

राजाही आपल्या वाढदिवसादिवशी नागरिकांना भेट देतो.. मागील वर्षी त्याने त्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर ५० रुपये करून वेगळीच भेट दिली..

राजा- राणीला इथे आगळाच मान आहे.. घराघरात त्यांच्या तसबिरी पूजल्या जातात..

राजाचा जनतेवर अंकुश असल्याचे इथे दिसते..

बुध्दीझमवर विश्वास आणि भारताविषयी अपार प्रेम सतत वागण्यातुन पाझरत असते. पारंपारिक भव्य किल्ल्यांना ते झॉंंग म्हणतात.. पावित्र्य जपणे आणि ते कटाक्षाने इतरांनी पाळावे असा त्यांचा व्यवहार असतो.




डोंगराच्या भूभागावरची बर्फाच्या प्रदेशातली घरेही..उतरती तिन छपरांसारखी रेखीव असतात. त्यांची रचनाही एकसारखी..बाहेरून ती एकसारखी दिसावी असा दंडकच आहे..आत काहीही सुधारणा करा..पण ती एकसारखी असतात. सुबक आणि कलाकुसरीने युक्त. डोंगराच्या उतरणीवर वसलेली शहरे पाहताना आपण हारखून जातो.

शांतता. थंड हवा. प्रदुषण मुक्त फिरणे आणि मनमुराद आनंद देणारा भूतान आम्ही अनुभवला.. मनाला आनंद देणारा आणि कमालीचा स्वच्छ. पारो आणि पुनाखा नदीचे भव्य. पात्र आणि त्यातून वाहणारे नितळ पाणी.. भव्यता आणि सुंदरता यांचा संगम असलेला हा भूतान तुम्हालाही नक्की पहावासा वाटेल




- सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com







Sunday, October 20, 2019

स्वरसाधनेत मग्न असलेला श्रेष्ठ गायक हरपला

पं. विजय सरदेशमुख





उत्तम जुळलेले तानपुरे. त्यातून उमटणारे असंख्य सहनाद, कंठातून झरणारे स्वर आणि त्यातून व्यक्त होणारे बंदिशीवरचे अतोनात प्रेम हे पं. विजय सरदेशमुख यांच्या गायकीचे जाणवणारे ठळक विशेष!

गुरुजी गेल्यावर त्यांच्यावर लिहावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं! पण जे कधीच वाटत नसतं ते घडतं हे आयुष्यात अनेक वेळा आपल्या अनुभवास येतं.  ‘अपनी मढी में आप मैं डोलू’ ही कुमारजी आणि स्वत: विजय सरदेशमुखही गायचे त्या ‘युग न युग न हम योगी’ या निर्गुणी भजनातली ओळ त्यांच्या व्यक्तीमत्वाला तंतोतंत लागू पडते. आपल्या गुहेत बसून स्वरसाधना करणारा हा हरफनमौला कलाकार फार लवकर काळानं ओढून नेला!
खूप आठवणी दाटून येताहेत. गेल्या 25 वर्षांच्या सहवासातून, त्यांच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या आठवणी. सुरांवरचं अलौकिक आणि अखंड प्रेम, बंदिशींवरचं प्रेम ही त्यांची खासियत! तानपुरे उत्तम जुळल्याशिवाय मैफलच काय, कधी शिकवणं देखिल सुरू करायचे नाहीत ते. तानपुरा सर्व काही बोलतो, ते ऐका हेच त्यांचं सांगणं असायचं. अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता, ज्ञान, पांडित्य हे सर्व बाजूला टाकून आपली पेशकश करणारा हा कलाकार! ही गोष्ट सोपी नाही. त्यांच्या याच गुणामुळे या गायकीतली अभिव्यक्ती फार उच्च दर्जाची आहे. कुमारांचे विचार आत्मसात करून स्वबुद्धीनं गाणं ही सोपी गोष्ट नाही. गुरूचं अनुकरण स्वाभाविक असतं, परंतु ते विजय सरदेशमुखांनी टाळलं. अर्थात गायकीवर कुमारजींचा ठसा निश्चित होता, परंतु अनुकरण नव्हतं आणि ते तसं शक्यही नाही हे कुमारांची गायकी जाणणारे जाणतातच.
 1992-93 पासून श्रोता म्हणून आणि 1996 पासून शिष्या म्हणून मी पं. विजय सरदेशमुख यांची गायकी  ऐकते आहे. त्यांची गायकी म्हणजे अत्यंत प्रेमपूर्वक (कठोर नव्हे) केलेली स्वरसाधना आहे.
त्यांचे वडील पं. विठ्ठलराव सरदेशमुख हे गायक आणि पेटीवादक आणि संगीत व संस्कृतचे उत्तम जाणकार आणि शिक्षक.  घरातूनच विजय सरदेशमुखांना संगीताचा  वारसा लाभला.




भारतरत्न पं. भीमसेनजींना वडील साथ करीत असत, त्यामुळे घरी पं. भीमसेनजी, सुरेशबाबू माने, विदुषी माणिक वर्मा, पं. कुमार गंधर्व , पं. वसंतराव देशपांडे, विदुषी सिद्धेश्‍वरी देवी अशा अनेक सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाच्या गायक मंडळींची उठबस आणि चर्चा, गायन ही नित्याची गोष्ट होती. वडील गायनाचे वर्गही घरातच घेत असत. त्यामुळे गायन, गायनाविषयी बोलणे हे विजयजी मन लावून ऐकत असत, ग्रहण करीत असत. या सगळ्याला त्यांच्या आईची, कै. माईंची आणि पत्नी विंदाची मौलिक साथ होती.
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचं वडिलांकडे गायनाचं शिक्षण सुरू झालं. त्या वेळच्या अकरावीमध्ये संगीत विषय घेऊन त्यात ते पहिले आले. बाराव्या वर्षी कुमारांना प्रथम तानपुऱ्यावर साथ केली. त्यांच्या भगिनी वासंतीताई सांगतात की विजय त्या तानपुऱ्याच्या मोठ्या भोपळमागे जेमतेम दिसत होता. तेव्हापासून त्या झंकारणार तानपुऱ्यांची आणि गायकीची ओढ त्यांना लागली. वडील किराणा घराण्याचे विचार, गायकी अनुसरत असूनही कुमारांकडे शिकायला त्यांनी काहीच हरकत घेतली नाही हा त्यांचा विशेष! विठ्ठलराव सरदेशमुख अत्यंत मोकळ्या विचारांचे होते हे गुरुजी नेहमीच सांगत. कुमारजींचे विचार, गायन, गायकी याचं मनन- चिंतन सुरू झालं. दहा- बाराव्या वर्षांपासूनच विजयजींनी रेडिओवर गायन सुरू केलं. 1964 सालापासून कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर साथ करत राहिले. तानपुऱ्यातून राग-संगीत कसं उमलत- फुलत जातं याचं जणू शिक्षणच या साथीतून मिळत गेलं.
विजय सरदेशमुखांची पहिली जाहीर मैफल झाली तीच मुळी विदुषी हिराबाई बडोदेकरांच घरी.
1970 सालापासून विजय सरदेशमुखांनी कुमारजींकडे गायन शिकायला सुरुवात केली. वर्षातून एखादेवेळेस राहून आणि बाकी वेळा जमेल तसं देवासला जाऊन उणीपुरी बावीस वर्षं ते कुमारजींकडून विद्या ग्रहण करीत राहिले. याच वेळेस कौटुंबिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यानं  बी.कॉम झाल्यावर लगेचच बँक ऑफ इंडियात नोकरी सुरू केली तीही जवळजवळ सत्तावीस वर्षं. एकीकडे नोकरी, प्रपंच सांभाळून अतिशय निष्ठेनं विद्याव्यासंग वाढवून त्यात खोलवर बुडी मारून स्वर- लयीचं  ध्यान केलंअसं म्हटलं तर विजयजींच्या बाबतीत ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मैफली, प्रसिद्धी, पुरस्कार, याची अजिबात फिकीर न करता एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणं  स्वर-साधना करत रहाणं ही आजच्या काळात सोपी गोष्ट नाही. परंतु हा कलाकार स्वर-लयीत ध्यानस्थ राहिला, त्यामुळे अर्थातच सर्वदूर प्रसिद्धी, खूप सारे पुरस्कार (वत्सलाबाई जोशी आणि वसंतराव देशपांडे हे पुरस्कार त्यांना मिळाले होते) असे यांच्या वाट्याला आले नाहीत, त्याची फिकीर त्यांना कधीच नव्हती, परंतु एखाद्या रागातील स्वरस्थान मनासारखं लागलं नाही तर मात्र हा कलाकार अस्वस्थ होत असे. एरवी मृदुभाषी, नम्र स्वभावाचे विजय सरदेशमुख मैफलीत मात्र आवश्यक तिथं अतिशय नाजूक नक्षीकाम आणि जरूर असेल तिथं अत्यंत आक्रमक आणि जोरकस, दाणेदार, गमकेच्या ताना घेऊ शकत. असंख्य पारंपारिक बंदिशी आणि कुमारांच्या बंदिशी, ख्याल, टप्पा, तराणा हे सगळेच  सारख्याच समर्थतेनं गायचे ते. कुमारांच्या आक्रमक, चपळ गायकीत स्वविचारांची वेगळी भर घालून, आपली हळुवार गायकी ते उपज अंगानं खुलवीत नेत.
सवाई गंधर्व महोत्सव- पुणे, तानसेन समारोह- ग्वाल्हेर, घराना सम्मेलन- कोल्हापूर, तोडी महोत्सव- मुंबई, प्रयाग संगीत समिती- अलाहाबाद, विष्णु दिगंबर समारोह- दिल्ली, संगीत रिसर्च अकादमी- कोलकता आणि पुणे, मुंबईपासून सर्व प्रमुख शहरांत त्यांच्या मैफली झाल्या आहेत.
विशेष म्हणजे हा विद्यासंपन्न, सत्वशील कलावंत घरी मैफलीला बोलाविलं तर बिदागीची फिकीर न करता प्रेमानं  आपलं निखळ संगीत ऐकवायचा. त्यांचं गाणं ऐकताना तुमचीही गानसमाधी लागून जायची. सुसूत्रता आणि उस्फूर्त पेशकश यांचा अनोखा संगम या गायकीत  होता. आवर्तन भरणं  म्हणजे काय हे त्यांच्याकडूनच शिकावं.
ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा हे प्रकार तर ते तयारीनं आणि ताकदीनं ऐकवायचेच. पण त्यांचं निर्गुणी भजन एक अत्यंत वेगळी अशी पारलौकिक अनुभूती देतं.
रागसंगीताचं त्यांचं ज्ञान तर अतिशय संपन्न आहेच, पण भावसंगीत, चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे देखिल ते  उत्तम रीतीनं उलगडून सांगत असत.
एक दिवशी सकाळीच माझ्या घरी आले. वाटेत ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ हे झिंजोटी रागातलं गाणं कानावर पडलं असावं. त्यातला लावलेला शुद्ध निषाद किती सुंदर लागतो  हे मला गाऊन दाखवून, या संगीतकारांची सौंदर्य दृष्टी किती मार्मिक होती हेही नमूद केलं. ‘निठुर पिया’ हे लताबाईंचं गाणं ऐकल्यावर संगीतकार जयदेवनं अहीर भैरव कसा वापरला आणि लताबाईंनीही ते किती सहजतेनं केलं हे त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं विषद केलं. एस. डी. बर्मनच्या आवाजातले स्वरलगाव गावेत तर आमच गुरुजींनीच. मी हॉस्पिटल मध्ये असताना वारंवार भेटायला यायचे. ‘सुन मेरे बंधू रे’ या गाण्यातल्या साथी मधला स्वरलगाव किती वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहे, तो कसा ऐकावा आणि शिकावा हे त्यांनी मला एकदा शिकवताना सांगितलं होतं.  मी ते गाऊन दाखवता का असं विचारल्यावर त्या हॉस्पिटलमधल्या छोट्या खोलीत या हरफनमौला कलाकारानं कोणतेही आढेवेढे न घेता इतकं सुंदर गायलं. ही आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. शिष्येकडे जाऊन इतक्या साधेपणानं गायचं, सहजतेनं बोलायचं, शिकवायचं . अशा अनेक प्रसंगांतून त्यांचं माणूसपणही मला उमगत गेलं.
संगीतातील सुंदर तत्त्वांची ओळख करून देणं, आवाज, गळा आपल्या स्वाधीन करून घेणं याची शिकवण देणं म्हणजे संगीत शिकविणं असं ते मानायचे आणि त्यानुसार विद्यादानाचं काम करत. शिकताना स्वरलयीशी थोडीही तडजोड करून चालायची नाही. यावर गुरुजी (विजय सरदेशमुख) फार बोलत नसत, पण त्यांची अस्वस्थ मुद्रा आपला स्वर तंतोतंत लागत नाही हे जाणवून देत असे. आणि शिष्याला सूचकतेचा मार अधिक लागतो. तबला हा फक्त तालवाद्य नसून तो तिसरा तानपुराच असतो त्याचं प्रात्यक्षिक मैफलीत त्यांच्या मागे साथ करताना आणि शिकताना मिळत गेलं. तानपुरा समजल्याशिवाय संगीत समजणार नाही असं ते मानत. याचं प्रत्यंतर त्यांच्या मैफलीत आणि शिकताना अर्थातच यायचं. कित्येक वेळा पाऊण एक तास तानपुरा लावण्यात जायचा आणि त्यानंतरच शिकवणं सुरू व्हायचं. परंतु हा वेचक वेळ सार्थकी लागलेला असतो यात शंकाच नाही.
मारवा, तोडी, ललत, देसी.... अशा अनेक रागांमधले सूक्ष्म स्वरभेद जाणून घ्यायचे म्हटलं तरी हा जन्म पुरणार नाही!
मला सहजी घराबाहेर पडता येत नाही हे जाणून एकदा मझाकडे माझ्या गुरुबंधूची, प्रीतम नाकीलची शिकवणी घेतली त्यांनी. ती संध्याकाळ माझ्या घरात अविस्मरणीय श्याम-कल्याण घेऊन आली.
संगीताइतकीच त्यांची तीव्र बुद्धिमत्ता सर्व प्रांतांत सारखीच चालायची. त्यांचं भाषाप्रभुत्व फार कमी लोकांना माहीतीय! संस्कृतमधली सुभाषितं, श्लोक त्यांना मुखोद्गत होते.  संस्कृतमधली कोणतीही शंका विचारली तरी तत्काळ निरसन होत असे. हस्ताक्षर अत्यंत स्पष्ट आणि सुंदर होतं. एकदा डेझर्टेशन या शब्दाचा माझ्याकडून चुकीचा उच्चार झाल्यावर म्हणाले  ‘पुन्हा सांगा, काय म्हणालात?....’ अशा कितीतरी आठवणी आहेत.
माझ्याकडे ते शेवटी गायले ते अखेरचं भजन ‘मैं जागूं, म्हारा सतगुरू जागे
आलम सारी सोवै.....’ हेच खरं!!




- डॉ. शुभदा कुलकर्णी
shubh.sangeet@gmail.com

Thursday, October 10, 2019

प्रेमाने मने जिंकणारी बहिण गेली..






कर्करोगासारख्या आजाराचे निदान झाल्यापासून ते चिरशांती मिळेपर्य़त तिने आपला लढा जिद्दीने लढला.. निकराने आणि कमालीच्या सहनशिलतेने . आपले आतले दुखणे आतच गिळून आक्टोबरच्या चार तारखेला सकाळी आपला प्रवास संपविला. शिक्षण नसुनही सर्वांना आपलेसे करून  मिनाक्षी विश्वनाथ इनामदार ...ह्या नावाने आपली ओळख निर्माण करून आपले कार्य अनेकांच्या स्मृतित कोरले..

आज त्याचे स्मरण होते..कारण. ती बत्तीस वर्षे आण्णांच्या म्हणजे महषी कर्वे यांच्या संस्थेत स्वयंपाकघरात मदतनिस स्हणून पडेल ते काम केले.. भांडी उचलणे. एडली पीठ तयार करणे. आजींना डबे पोचविणे. गिरणीत दळण दळणे... एक ना अनेक.



बुध्दीची कुवत समी असल्याने तीला केवळ सही करणे..काही अक्षरांची ओळख होणे.. इथपर्य़ंत जाता आले. पण आयुष्याच्या व्यवहारी जगात मात्र तीने आपला ठसा कायमचा उमटविला तो आपल्या मनमिळावू स्वभावाने आणि प्रेमळ बोलण्या-वागण्यातून. आजही संस्थेत मला मीनाचा भाऊ म्हणूनच ओळख लाभली..याचे श्रेय तिच्या तिथल्या कामावरील निष्ठेला जाते.




वयोमानाप्रमाणे निवृत्त झाल्यावर तिने आपण वृध्धाश्रमात राहू असा निर्णय मान्य केला..आणि तिथेही तिने आनेक आजींना लळा लावला.. एकूण चाळीस वर्षांचा हा संस्थेत रहाण्याचा कालखंड आमच्या परिवारास केवळ आनंद देत गेला..त्याचे कारण तिचे तिथले उत्तम वास्तव्य..आपल्यापासून कुणालाही त्रास होऊ नये..तरीही आमच्या घरी तिचे जाणे येणे कायमच पुढच्या पिढीला हवेहवेसे वाटत राहिले..आजही तिच्या आठवणीने सारेच निराश होऊन जातो..कष्ट करून तिच्या नशीबी देवाने असा दुर्धर आजार का दिला याचे कोडे पडते..


ती गेल्यानंतर तिथल्या आनंदनिवास मधील खोलीत आवराआवर करण्यास उभयता गेलो असता..समोरच्या खोलीतील लेखिका आणि सहनिवासी जयश्री शंकरन यांनी तिच्यावर लिहलेला एक लेखच माझ्या स्वाधीन गेली..मीना गेली हे त्याना खरेच वाटत नव्हते.
तोच लेख त्यांच्या शब्दात देत आहे..



माझी एक सुंदर अबोल मैत्री..

होय, मला माझ्या जवळजवळ शेजारीच रहाणारी ही माझी अबोल मैत्रीण मनापासून आवडते. ही माझी मैत्रीण माझ्याच इमारतीत सहा वर्षापासून रहाते आहे. ही माझी मैत्रीण अत्यंत मितभाषी आहे. आणि माझ्या निरिक्षणानुसार ही माझी मैत्रीण संपूर्ण दिवसभरात दहा संपूर्ण वाक्येच जेमतेम बोलते. तिला मी किती वाजले हे सांगितले की बरे वाटते. आणि मीही तिला उत्साहाने आजचा वार , तारीख , महिना ..सांगत असते. मी तिला निक्षून सांगितले आहे की बाकी कुणालाच ही माहिती विचारायची नाही. तिने माझ्या प्रस्तावास आजवर होकार दिला आहे.
माणसाचे ओठ खोटे बोलू शकतात पण डोळे.. कधीही केव्हाही नाही.. याप्रमाणे या मैत्रीणीच्या डोळ्यातील माझ्याबदद्लची प्रेमभावना माझ्या ह्दयाला स्पर्श करते . मी तिला कधी माझी मैत्रीण ..तू का ..मी तुझी मैत्रीण असे म्हटले की तिला फारच आवडते..



या मैत्रीणीला काही वर्षीपूर्वी बाराखडीची प्राथमिक पुस्तके दिली होती आणि तिने शिकण्याचा प्रयत्नही केला होता. पण ते तेवढेच राहिले. काही वेळ संस्थेत कार्यक्रम असला की ही मैत्रीण प्रेमास्वरूप आई.. वात्सल्यसिंधू आई..ही कविता बिनचूक म्हणते ..काही वेळा दोन वाक्ये माईक हातात धरून आत्मविश्वासाने बोलते..हे हे आठवते.

ही मैत्रीण सध्या मोठ्या आजारपणातून उठली आहे.. घरातल्या घरात आणि जवळच चालत असते. अथवा ही संस्थेच्या आवारात देवाकरीता फुले गोळा करताना दिसतेथोडी जपमाळ घेऊन जप करताना पहातेमी पेटी वाजवित असले किंवा काही वाचन, लेखन करीत असले तर अगदी थोडी वेळ माझ्या खोलीत खुर्चिवर येऊन बसते.,
या मैत्रीणीचे माझ्या खाण्याकडे कधीही आजिबात लक्ष नसते.
चार पाच वर्षीपासून डॉ. शैल्यकुमारांकडे, पोड रोडला मी जाते. मला त्यावेळी खोकला झाला होता. तेव्हा तिची सोबत मला आठवते.
आमच्याच संस्थेतील माजी सचिव मुकुंद जोशी यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी दोघी एकाच रिक्षातून जाऊन आलो. दुस-या दिवशी या मैत्रीणाने आपली पेटी उघडून , “ जयश्री , मी तुला रिक्षाचे किती पैसे द्यायचे आहेत.. “असे विचारले.  तेव्हा मी तिला म्हणाले , “मला तुझ्याकडून रिक्षाचे पैसे नकोत ..पण मला तू पैशासंबंधी विचारावे असे वाटले हे म्हणणे मला खूप आवडले ”.
आता ही मैत्रीण मला ,... जय़श्री, तुला ताक पाहिजे.. गोड आहे.. असे विचारण्याची वाट पहात आहे..

ही मैत्रीण.. अगं तुगं म्हणते म्हणते तेव्हा ते ऐकण्यात मला खूप समाधान लाभत होत. पण मी तिला मीना.. तुला रेडिओवरची गाणी आहेत का असं विचारत असे..

माझ्या दोन वर्षांपूर्वीच्या डाव्या हाताच्या दुखण्याच्या वेळी आणि आता चार महिन्यापूज्र्वी उजव्या हाताच्या वेळी या मैत्रीणीने मला कितीतरी गोष्टींसाठी आपणहून सहकार्य केले.
कुकरचे झाकण लावणे, कात्रीने कापून दूध पिशवी उघढणे, परकरची नाडी बांधणे..अशा. कित्येक.
मला या माझ्य़ा सुंदर , अबोल मैत्रीणीचा अभिमान वाटत आहे. या माझ्या मैत्रिणीचे नाव आहे मिनाक्षी उर्फ मीना इनामदार..

शुक्रवार, चार आक्टोबर दोन हजार एकोणिस मीनाच्या पवित्र स्मृतिस हा लेख समर्पित करीत आहे..


-जयश्री शंकरन्,
आनंद निवास, वृध्दाश्रम
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
कर्वेनगर, पुणे.