Wednesday, January 13, 2010

स्नेह द्यावा स्नेह घ्यावा !

तिळागूळाच्या स्नेहासारखे बांधले जावू
एकमेकांच्या नात्यांतले बंध द्रुढावत नेवू
माणसातली नाती विरघळताना दिसताहेत
रक्ताचेच आपले दुरावताना दिसताहेत
बंधात नांदायचे आहे खरे
धुंदीत नाचायचे आहे खरे
जगण्यासाठी आज लढाई आहे
नेत्यांच्या वागण्यात काय अर्थ आहे ?
रक्ताचा रंग सर्वांचाच जर सारखा आहे ?
तर माणसातले नाते दुरावत का चालले आहे?

करू संकल्प,
घेऊ शपथ,
नात्यांमधली वीण अधीक दृढ करू......

Thursday, November 19, 2009

सुनिताबाईंच्या प्रतिभेचे देणे

पुलोत्सवाच्या सातव्या महोत्सवात रसिकांनी अनुभवली सुनीताबाई देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
पुलं ऊर्फ भाईंनी लिहिते राहावे. त्यांच्या अंगच्या गुणांनी विविधरंगी बनावे यासाठी सुनिताबाईंनी कित्येकांचा रोष ओढवून घेतला. पुलंजवळ जायचे असेल तर सुनिताबाईंच्या मर्जीत आधी उतरा मग पुलदर्शन घडेल असा संकेतच जणू बनला होता.मात्र स्वतःमधील कला, लेखनाची ताकद, अभिनयाचे पैलू दडवून ठेवून त्यांनी पुलंसाठी एका अर्थाने आपल्या गुणांचा होम करून भाईंचा लेखन कुंड सतत प्रज्वलित ठेवला.
त्या स्वतः कवी नाहीत. पण कवींबद्दल विलक्षण आदर. त्यातूनच मर्ढेकर, बोरकर आणि आरती प्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम ज्या ताकदीने त्यांनी सादर केला त्याला तोड नाही. पुलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आशय संस्थेच्या संयोजकांनी सुनिताबाईंच्या प्रतिभेला रसिकांजवळ उलगडण्याचा प्रयत्न केला.ज्यांनी तो अनुभवला त्यांना धन्य वाटले. आणि सुनिताबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा मान मिळाला.
त्यांच्या ध्वनिचित्रफितीतून जे विलक्षण उलगडले ते थोडक्‍यात दाखविण्याचा प्रयत्न इथे केला आहे, इतकेच.त्यांच्या कवीतेतल्या सादरीकरणातपण त्यांच्या अंगचे विविधअंगी पैलू स्पष्टपणे दिसून येत होते. पण स्वतःला जाळत पुलंना उजळविण्याचा यज्ञ केवढा महान होता याची दखल घेण्यासाठी हा शब्दप्रपंच.

सुभाष इनामदार,पुणे

सुनिताबाईंच्या आठवणीला समर्पित सातवा पुलोत्सव

आताशा मी नसतेच इथं.... सुनिताबाईंच्या आवाजातल्या या कवितेने सातव्या पुलोत्सवाची सांगता झाली खरी पण ती दुखाःचे सावट घेऊनच.
पुलोत्सव रविवारी आणि सुनीताबाई शनिवारी रात्री निर्वतल्या. शो मस्ट गो ऑन ह्या सुनिताबाईंच्या शिस्तीनुसार ८ ते १८ नोव्हेंबरचा पुलोत्सव रद्द न करता ठरल्यावेळी पार पडला. सर्वच कार्यक्रम पार पडले. पण तरुणाईला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो शेवटच्या दिवशी होतो तो पुढे-मागे करावा लागला इतकेच.समारोप समारंभ सुनितार्बांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अर्पण केला गेला.
मंगला गोडबोले यांनी या खास त्यासाठी लेखन आणि निवेदन करून स्मिता तळवलकर, डॉ. गिरीश ओक यांनी सुनिताबाईंच्या पुस्तकातील उतारे वाचून गृहिणी-सखी आणि सचिव म्हणून पु लंच्या आयुष्याला कसे वळण दिले याचे भान रसिकांना आले. डॉ. जयंत नारळीकरांनी लंडन ते आयुकातल्या प्रवासात पु ल आणि सुनिताबाईंनी कशी आस्थेवाईक चौकशी करून आयुकाला देणगी दिली याच्या आठवणी सांगितल्या. प्राध्यापिका रेखा इनामदार-साने यांनी सुनिताबाईंच्या शिस्तीच्या कल्पनांची महती सांगून आहे मनोहर तरी..या पुस्तकाने संसार काटेकोरपणाने सांभाळून पु लं सारख्या लेखकाला कशा पद्धतीने सांभाळल्याचे चित्र तर आहेच पण ते करतानाच स्वतःच्या कवितांची आवड, आणि वाचनाची सवय कायम ठेवली हेच दिसून येते.
सातव्या पुलोत्सवाने सुनिताबाईंचे मोठेपण अधिक व्यापक प्रमाणात रसिकता पोचविले. त्यांच्या कविता सादर करण्याची पद्धती इतकी विलक्षण होती की समीक्षकांनी जे चारशे पानी पुस्तक लिहून सांगता येत नाही ते त्यांच्या स्वाभाविक आणि उत्कट वाचन सामर्थ्याने सहजी कळून येते.त्यांच्या कविता वाचनाची महती आणखी एक की त्याची कुणी नक्कल म्हणूनही सादर करू शकत नाही.
"फलाटदादा" ऐकताना आपण भान हरपून जातो. एवढी शक्ती त्यांच्या कवीता वाचनात असते हे इथे सिध्द झाले.
सुनिताबाईंच्या आयुष्याचा पटच जणू पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात साकार होत होता.कधी शब्दातून तर कधी चित्रफीतीतून सुनिताबाईचे आयुष्य इथे उलगडले होते. ते पाहताना एकच जाणवले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र प्रतिभा तर आहेच. पण पुलंमुळे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले हे नक्की.
आहे "मनोहर" तरी....
या पुस्तकाला नाव काय द्यायचे याची चर्चा सुरू होती. वेगळी नावे समोर येत होती. गाडी चालवत दोघे चालवत असताना इतका बेकरीसमोर थांबली होती. बेकरीचे नाव होते मनोहर बेकरी. पुलंनी सुनतीबाईंना विचारले आहे मनोहर तरी... हे नाव कसे वाटेल. आणि पुस्तकाचे नाव नक्की झाले. आहे मनांहर तरी.कधीतरी आम्हालाही गृहीत धरा... असा टोलाही त्यांनी मारला.

सुभाष इनामदार, पुणे.

Tuesday, November 17, 2009

ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त


धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्‍यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.


त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत वाढलेला ध्येय्यवादी कलासक्त व्यक्तिमत्त्व . राजदत्त.राजा परांजपेंच्या पठडीत वाढलेल्या राजदत्तांचे चित्रपटही समाजातल्या संस्कारांना आकार देणारे, भावभावनांचे प्रकटीकरण करणारे आणि व्यवसायापेक्षाही कलेला अधिक उठाव देणारे.


त्यांचा आठवणीतला पहिला चित्रपट म्हणजे संत गाडगे महाजांवरचा " देवकीनंदन गोपाला "हा चित्रपट. नंतर शापित आणि अलीकडला लक्षात राहणारा म्हणजे पुढचं पाऊल. त्यांच्या अजिंक्‍य देवने नायकाची भूमिका केलेला म्हणजे सर्जाही आठवतो.कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दिग्दर्शकाने दूरदर्शनवर केलेली मालिका गोट्या आजही आठवते ती त्यांच्या दिग्दर्शमामुळे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी मालिकेच्या दिलेल्या शीर्षक गीताने.संस्करभारतीचे अध्यक्षपद भूषविणारे राजदत्त यांचे विचारही प्रभावीपणे सतत रसिकांच्या कानी पडत असतात. चित्रभूषण पारितोषिकाचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.


मनोरंजन हा कलेचा प्रमुख हेतू न राहता, समाजप्रबोधन हाही कलेचा विषय असावा. आणि कलेशी संबंधित प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी त्यांचा आग्रही मागणी असते. ते स्वतःही ते कटाक्षाने पाळतात. म्हणूनच आजच्या मनोरंजन जमान्यात राजदत्तांसारखे अनेकजण मागे पडल्याचे चित्र दिसते.


सावरकर हे त्यांचे दैवत. हिंदुत्व हा धर्म. आणि कला हे जीवनाचे धेय्य. अशा कलासेवेत अविरत कार्य करणाऱ्या धेय्यवादी दिग्दर्शकाला गदिमांच्या नावाने दिला जाणार गदिमा पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेमकरणाऱ्या अनेकविध रसिकांना आनंद झाला आहे.

राजदत्तांना तमाम मराठी जनांचा प्रणाम.

आम्हाला तुमचा अभिमान आहे.


सुभाष इनामदार, पुणे

Thursday, November 12, 2009

प्रगतीची वाट


शिकण्याची इच्छा हाच मुळात प्रगतीचा पहिला टप्पा. यासाठी वयाची अट नाही. सध्याच्या युगात घर बसल्याही शिक्षण मिळू शकते. यासाठी तुम्ही संगणक साक्षर व्हायला हवे.पूर्वी असे म्हणत बापाची चप्पल मुलाच्या पायात येऊ लागली की समजावे तो आता मोठा झालाय. त्याला बरोबरीच्या नात्याने वागवा. लहानपणी थोडा राग आला तर मुलावर हात उगारला जायचा.

आता तोच मुलगा तुमचा मार्गदर्शक होऊ शकतो. मीही काही संगणकावर काम करीत असलो तरी त्याच्या इतके संगणक ज्ञान मला नाही. आजच मी त्याचेकडून पहिला धडा गिरवला. आणि काय सांगू असा गुरू माझ्या घरी असावा आणि मला त्याची ओळख नसावी. हे थोडे विचित्र वाटले.


आजची पिढी काळाला ओळखून आहे. त्यांच्यात धाडस. जिज्ञासू वृत्ती आणि मेहनत करायची तयारी आहे. लाथ मारू तिथे पाणी काढू अशी त्यांची जिद्द आहे. फक्त ती वाया जात नाही ना ? याची काळजी घ्या. बस्स.हा अनुभव सांगावा म्हणूनच हे चार शब्द नोंदविले. इतकेच.


सुभाष इनामदार, पुणे

Sunday, November 1, 2009

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशिला गोसावी


कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा व्यक्‍त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर" आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे

Sunday, September 13, 2009

संगीत नाटकाचा प्राणवायू-विनायक थोरात


शिलेदारांच्या नाटक कंपनीत आजही जे नाव कायम आहे त्यात ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांचे नाव येते.

संगीत नाटकाचा ठेका आणि ताल सांभाळतच त्यांना संसाराचा तोल सांभाळला आहे. गायकाच्या गायनाला मदत करत गायकाचे गायन फुलवत नेणारे त्यांचे वादन आजही त्याच पद्धतीने सुरू आहे.

जयराम शिलेदारांबरोबर संगीत नाटकाला तबला वादनाची साथ करण्याची प्रतिज्ञाच जणू त्यांनी घेतली आहे. सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ अशा पारंपरिक नाटकात संगीत पदांचा भरणा आहे. यात साकी, दिंडीसारखी थिरकत नेणारी नजाकतही बेफाट आहे. त्याला त्याच पद्धतीचे खास वादन थोरातांच्या बोटातून निघत असते.

नाही म्हणायला "स्वरसम्राज्ञी' या विद्याधर गोखले यांच्या नाटकातल्या एका प्रसंगात रंगमंचावर येऊन वादन करायचा प्रसंग असल्यामुळे विनायकराव प्रकाशात झळकले. अन्यथा त्यांची जागा प्रेक्षकांना पाठकरून गायकांच्या पदांना बोटांच्या नजाकतीने साथ करणे.शिलेदार मंडळीचा कुठेही कार्यक्रम करणार असली तरी तबला वादक म्हणून विनायकराव ठरलेले.

त्यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांना तालमधुरता देण्याचे काम अविरत पार पाडले. मात्र ते करताना स्वतःचा बडेजाव त्यांनी कधीही मिरविला नाही. शांत आणि सहनशील स्वभावामुळेच जणू त्यांच्या साथातली संयम जाणवतो. उगाचच तबल्यावर थिरकत करून मला किती तबला येतो याचे दर्शन त्यांच्या वादनात कधीही आढळणार नाही.

गायकाला फॉलो करणे अवढेच कां ते नेटाने करीत असताना दिसतात.संगीत नाटकांची आज चलती नाही. प्रपंच मात्र पुढे न्यावाच लागतो. तशाही स्थितीत जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदारांच्या नाटकाशिवायच्या मैफली करीत आहेत. याशिवाय शिष्यांना मार्गदर्शन करून उदरनिर्वाह सुरू आहे.गेली सुमारे चाळीस वर्षे एकनिष्ठ सेवा करणारा हा ज्येष्ठ साधक पाहिला, अनुभवला की आपोआपच नतमस्तक व्हावेसे वाटते. प्रसार माध्यमांची चलती असलेल्या युगात संगीत कार्यक्रमांचे दालन खुले झाले आहे. तरी स्वतःचे स्वत्व जपून तबला वादनाचे कसब रंगदेवतेच्या चरणी अर्पण करणाऱ्या या साथीच्या कलावंतांची दखल घेण्याची गरज वाटली .म्हणूनच आज विनायकराव थोरांतावर लिहिले.

अशी शेकडो साधक मंडळी असतील. त्यांचेही मोल तेवढेच आहे. त्यांसाऱ्यांना वंदन !

सुभाष इनामदार, पुणे

बालकवितेत ठसा उमटविणाऱ्या डॉ. संगीता बर्वे


व्यवसायाने डॉक्‍टर; पण लहानपणापासूनच साहित्याकडे ओढा असणाऱ्या संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या कवितांची तीन पुस्तके बाजारात आली आहेत.

"गंमत झाली भारी,' "खारूताई आणि सावलीबाई'; तसेच "झाड आजोबा' ही ती तीन पुस्तके आणि "हुर्रे हुप्प' हे चौथे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मुलांच्या मनाला सुखावणाऱ्या कल्पनांना आपल्या कवितेतून साकारणाऱ्या त्यांच्या प्रतिभेला आता कुठे धार चढू लागली आहे. मुलांच्या विश्वात रममाण होता होता त्यांच्या कलाकलाने त्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातल्या शब्दांना कवितेत आणण्याची कामगिरी संगीता बर्वे यांनी केली. नुकत्याच "गंमत झाली भारी' आणि "सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडीही फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.

त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्‍टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे

कुठेतरी खोलवर

आत आत काही

उसळत फेकाळत

वर येऊ पाही

त्यांची प्रतिभा सतत काही तरी सांगत असते.

समाजाशी, त्यातल्या प्रश्‍नांची नोंद आणि कधी जीवनाचा अर्थही सांगून जाते. "पॉप्युलर'ने काढलेल्या "दिवसांच्या वाटेवरून' या पुस्तकात त्यांचे सामाजिक भान प्रत्येक कवितेत दिसेल.

बालपणीच्या आठवणींचा उजाळा घेताना लक्षात येते, की संगीता प्रभाकर गोंगे, मु. पो. बेलापूर, ता. श्रीरामपूरच्या. वडील शाळेत चित्रकला शिक्षक. संगीताला चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद. पहिल्या केलेल्या कवितेच्या चार ओळी जेव्हा वर्गात सर्वांसमोर म्हणून दाखवल्या तेव्हाच बाईंनी ही मुलगी पुढे कवयित्री होईल, असे भाकीत वर्तविले होते.

शाळेच्या सुट्टीत खेळापेक्षा नव्या नव्या कल्पनांना शब्दांत बांधून स्वतःच्या हाताने कथेचे हस्तलिखित करायचा छंद लागला. वडील मुखपृष्ठ तयार करायचे. अशा तशी बाडे तयार व्हायची. त्यात कधी कविताही उमटते.शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर बीएमएस केले. आता डायटेशियनचा अभ्यासक्रमही पुरी केलाय. मराठी घेऊन एमए केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा साहित्यभूषणचा अभ्यासक्रमही पुरा केलाय. ललितलेखनाची आवड आणि संवेदनशील मन यामुळे कवितेचा छंद जोपासला गेलाय. तसे त्यांना पुरस्कारही मिळालेत.

खरे म्हणाल, तर त्यांचे सांगणे आता कवितेतून व्यक्त होते. त्यांचे मनच कविमन आहे.

आता जे सुचते ते कवितेमधून.आठवी ते दहावीतल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा रसास्वाद घेणाऱ्या पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.

दहा वर्षांत लिहिलेल्या कवितांचा संग्रह "मृगतुष्णा'द्वारे रसिकांच्या भेटीला आला. त्याला प्रस्तावना शांता शेळके यांची आहे.

लग्नानंतर मालती पांडे-बर्वेच्या गाणाऱ्या घरात त्या सून म्हणून आल्या. दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या विश्वात रमल्या आणि त्यातूनच बालकवितांचा जन्म झाला. आज त्यांच्या कवितांचा स्वप्नांचे पंख लाभलेत. छोट्यांच्या दुनियेत शब्दाने त्या वावरताहेत. त्यांना कवयित्री म्हणून मिरवायला आवडेल.

तशी त्यांची प्रतिभा सर्वत्र संचार करणारी आहे. सुजाण रसिकांच्या मनात रेंगाळणाऱ्या कविता कागदावर उमटविणाऱ्या या कवीच्या आगामी प्रवासासाठी शुभंभवतू!

सुभाष इनामदार,

पुणे


(संगीता बर्वे यांच्याशी साधलेला संवाद पाहण्यासाठी "ई-सकाळ'च्या फीचर्स लिंकवर क्‍लिक करा)

Sunday, September 6, 2009

व्यथा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराची ...



  • (मराठी रंगभूमीवर स्वतःची प्रतिमा कोरलेल्या, स्वर्गीय आवाजाची जादू असलेल्या बालगंधर्वांच्या नावाने पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली. मात्र आज तिथे होत असलेले मनोरंजन कार्यक्रम पाहून स्वतः बालगंधर्व काय म्हणत असावेत, याचे काल्पनिक शब्दचित्र...)

अरेरे, काय अवस्था केलीय या नाट्यमंदिराची. मायबापहो, तुम्ही तरी कसे सहन करता हे सारे. संगीत नाटकांसह मराठीतील चांगली नाटके मी आजपर्यंत इथे पाहत आलोय! आज संगीत नाटके इथे होतायत तरी कुठे. जी काही होताहेत तीही दोन-अडीच तासात संपताहेत. काटछाट केलेली नाटके मायबाप प्रेक्षक सहन करताहेत. ना नाटकाचा मजा, ना संगीताची लयलूट. वन्समोअरला तर संधीच नाही. पण कधीतरी ती मी अनुभवतो आहे. अजून तरी संगीत नाटक पुरते मृतप्राय झालेले नाही. "घाशीराम..'सारख्या नाटकांना संगीत नाटक म्हणण्याची रीत काही नाटकवाल्यांनी सुरू केली होती. पण आज ते तरी कुठे होतेय.मायबापहो, तर सांगत काय होतो, नाटकांसाठी माझ्या नावाचे थिएटर उभारले गेले. पण आज त्या रंगमंदिरात नाटकांपेक्षा लावण्यांची अधिक वर्णी लागलीय. त्यांचीही कला आहे. त्यातही संगीत आहे. पण त्यात संगीत कमी आणि सौंदर्य अधिक दिसतेय. आणि येणारा प्रेक्षक तरी कुठला? पान खाऊन बचाबचा थुंकणारा. शिट्ट्या मारून दाद देणारा. मलाही लोककलेबाबत आदर आहे. नव्हे, आमच्याही पदांच्या काही चाली तिथूनच संगीत नाटकात आल्यात. पण म्हणून माझ्या नावाच्या थिएटरमध्ये असे लावण्यांचे पेव मी पाहतो आहे. 'दादा ते आले ना' प्रमाणे मला म्हणावेसे वाटते, "दादा ते नको ना!' नाटकांचे प्रयोग कमी होताहेत. प्रेक्षक तुमच्या त्या चौकोनी खोक्‍यातले कार्यक्रम पाहत घरीच सुखावत चाललाय.

मायबाप कमी झालेत. मग नाटकांची संख्याही रोडावलेली दिसते. त्या मातब्बर नाटकसंस्थांचे प्रयोगही फारसे माझ्या रंगमंदिरात होत नाहीत. एकूणच नाटकांची अवस्थाही बिकट होत चाललेली दिसतेय. हाउसफुल्लची पाटी आणि त्याला घातलेला हार पाहण्याचे नशीब तर माझ्या वाटेला आता यापुढे दिसेल की नाही याबद्दल मलाच शंका आहे.म्हणून मग आर्यभूषणची जागा या माझ्या रंगमंचानं घ्यावी ना?. हाय रे दैवा. काय काळ आलाय!नाटके कमी आणि लावण्या अधिक मी अनुभवतोय. वैतागलोय आता.


माझे "नाव' तेही आता बदलून टाका एकदाचे!


सुभाष इनामदार, पुणे