Thursday, August 27, 2009

गाण्यावर स्वतःचा ठसा


आजच्या पिढीतले विचारवंत गायक या यादीत सावनी शेंडे-साठ्ये हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांनी नेटाने केला. घरी आजी- कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या मार्गदर्शनाच्या मुशीतून सावनी यांचे गायन आकाराला येत गेले.

गानवर्धन, सुरेल सभा, सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या मैफलींना जायचा योग त्यामुळेच येत गेला. अनेकांचे ऐकल्यामुळे कानावर आपोआपच संगीताचे धडे नकळत गिरविले जाऊ लागले. डॉ. प्रभा अत्रे, माणिक वर्मा, शोभा गुर्टू यांच्यासारख्या थोर गायकांचे घरात येणे-जाणे होते. त्यांच्या संगीतविषयक चर्चा कानावरून गेल्या. रागांविषयक ज्ञान आणि सुरांचे पक्केपण म्हणजे काय, ते समजले. त्यात फायदाच झाला.

बालपणापासून कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, असा वडिलांनी दंडक घालून दिला होता. तो पाळल्यामुळेच आजीच्या एकसष्टीच्या निमित्ताने झालेल्या मैफलीत नाव पुकारले गेले सावनी शेंडे यांचे. आणि सावनी यांच्या नावामागे शास्त्रीय संगीताची जाण किती आहे, याचा प्रत्यय उपस्थितांना झाला. त्या वेळी त्यांचे वय अवघे दहा वर्ष होते.ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे रीतसर शास्त्रीय संगीताचे शिक्षण सावनी यांनी 12 वर्षे घेतले. संगीत परंपरेची जाणीव अधिक समृद्ध होत गेली.


"बंदिश कशी सजवायची याचे धडे मला आजही उपयोगी पडतात. माझ्यासारखे गाऊ नकोस. तुझे गाणे दिसायला हवे. हा उपदेश मनात साठवून माझी वाटचाल आजही सुरू आहे...' याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.""मैफली अनेक झाल्या; पण राष्ट्रपती भवनात माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्यासमोर मैफल करण्याचे आमंत्रण मिळाले, याचा आजही अभिमानपूर्वक उल्लेख करावासा वाटतो. आपल्या वाढदिवसाचा केक राष्ट्रपतींच्या हस्ते कापला जावा यापरते भाग्य ते कोणते,'' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

""आता अनेक राग विस्तृत अंगाने गाता गाता त्या रागातल्या रचना लिहिणे सुरू केले आहे. त्यातूनच नव्या बंदिशींचे पुस्तक प्रकाशित झाले. शास्त्रीय संगीताकडे तरुण वर्ग आकृष्ट व्हावा यासाठी रसिक आणि गायक यांचा संवाद घडावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,'' असे त्यांनी सांगितले.

सुभाष इनामदार,

पुणे

(सावनी शेंडे-साठ्ये यांची मुलाखत पाहण्यासाठी इ-सकाळच्या फिचर्स लिंकवर क्‍लिक करा)

Tuesday, August 25, 2009

उत्साहात दक्षतेकडे दुर्लक्ष नको!


स्वाईन फ्यूच्या साथीने गाजलेल्या पुण्यात आजपासून गणेशात्सवाला आरंभ झालाय.

आजच अडीच वर्षाच्या बालकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालायाची बातमी आलीय.

ऐकून मन विषण्ण झाले. भावताली नजर टाकली. सार्वजनिक मंडळांचे गणपती वाजत गाजत मंडपात विराजमान होण्यासाठी ढोल- ताशांच्या पथकांच्या आणि बॅंडच्या तालावर मिरवत आणले जात आहेत. स्वाईन फ्लू मुळे गेले काही दिवस पुणेकर तोंडावर मास्क वापरतना दिसत होते. आज मात्र या गर्दीत

या साऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यासारखे दिसते. उत्साहाला उधाण तर आता येतेय.

साथीच्या रोगापासून सावध होण्याची प्रतिज्ञा घेणारा पुणेकर या गर्दीत नाचायला, पहायला तेवढात उत्सुक दिसतोय. नाही म्हणायला काही निवडक मंडळानी स्वाईन फ्लूमुळे यंदा सजावटीला लगाम लावून या साथी पासून घ्यायची काळजी कोणती याचा बॅनर झळकवला आहे.

मात्र ज्या प्रमाणात मंडळानी आणि पर्यायाने मंडळींनी काळजी घ्यायला हवी आहे तेवढी ती घेतली जात नाही.श्री गजानन पहातोयस ना, तुझीच आराधना चालू आहे. आता तूच त्यांना संभाळ रे बाबा!.सोमवार पासून शाळा, महाविद्यालये आणि इतके दिवस बंद असलेली चित्रपट आणि नाट्यगृहेही पुन्हा चालू होताहेत. काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र त्या पाळताहेत किती? जणू काही घडलेच नाही असा वावर सार्वजनिक ठिकाणी सुरू झाला.

ज्याला स्वाईन फ्लूच्या संकटाची जाणीव झालीय तो नक्कीच काळजी घेईल. पण मग इतरांचे काय?एक मात्र नक्की गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची यंदा वानवा आहे. गणपती पहायला धावणारा उत्साही भक्त नेहमीसारखा सह कुटुंब सह परिवार गणपती पहायली बाहेर पडेल काय?सार्वजनिक उत्सवाच्या वेळी घ्यायची काळजी घ्यावी असे सांगणारे बोर्ड झळकताहेत. त्याची अंमलबजावणी करण्यातच साऱ्यांचेच भले आहे.तुम्हाला काय वाटते ?


सुभाष इनामदार ,पुणे

Friday, April 17, 2009

पहा पण प्रेमाणे !


तुम्हाला वाटेल लिहायला चुकलय. पण छे हो. मुद्दाम तसच काढलय.

मराठी माणूस अशा पाट्या लिहून प्रेमाची भाषा करतोय. पण प्रत्यक्षात तो स्वतःकडेही तेवढ्या प्रमाने पहाताना दिसत नाही.

कारण काय? तर वृत्ती.भाषा संस्कृती वाढली पाहिजे. ती टिकली पाहिजे असे सांगणारा हा मराठी बाणा.


मोडेन पण वाकणार नाही. असे ब्रीद घेऊनच वागतोय. मी मराठी हे स्वाभीमानाचे बीरुद मीरवतोय. पण प्रत्यक्ष वागण्यात त्याचा स्वाभीमान कुठे कच खातोय तेच कळत नाही.त्याला सतत सांगावे लागते की, बाबारे तू मराठी आहेस. भाषा जप. संस्कृती सांभाळ. अभिमानाने मिरव. सारे सांगून थकलेय. राज ठाकरेंनी तर मराठी माणसांचा स्वाभीमान जागृत करण्याचे व्रतच घेतले आहे. पण मला सांगा. त्याला ते झेपेल काय? सर्वममावेशक असा त्याचा स्वभाव. इतरांकडे वर मान करुनही न पहाण्याचा धर्म.

बोलण्यात ताठपणा पण वागण्याच बुजरा असा हा मराठी माणूस. छत्रपती शिवाजी महारांजांनी त्यांचा स्वाभीमान जागृत व्हावा म्हणून महेश मांजरेकरांच्या रुपात मराठी चित्रपट क्षेत्रातून मराठी बाणा जागवायचा प्रयत्न केला गेलाय. पण मला खरे सांगा, तो स्वभीमानी मराठी माणूस असा जागा होईल.

तो चाकरमानी बनलाय. धंद्यात आमची अन्यत्र शाखा नाही हे बीरुद अभीमानाने मिरवतोय.

काळ बदलला तरी तो काही बदल करुन घ्यायच्या मनस्थितीत नाही. भ्रष्ट समाजात वावरतोय. त्यांना जाब विचारायला कचरतोय.खाली मान घालून इतरांचे इमान राखण्यात स्वतःला धन्य समजतोय.

बुध्दी हे ज्याचे शस्त्र आहे. इमान हे त्याच्या रक्तात आहे. सर्वमावेशक अशी त्याची वृत्ती आहे. आज तो निद्रीस्त आहे. त्याला जागविण्यासाठी अनेक क्‍लुप्त्या केल्या जाताहेत.

तुम्हाला वाटते तो जागा होईल. आहे. राहिल?

मतदानाच्या दिवशी तो त्याची ताकद दाखवेल? तुमचा काय अंदाज आहे.......

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Sunday, April 12, 2009

कलावंताना निष्ठेपेक्षा पैशावर प्रेम अधिक


रसिकमोहिनी निर्मित चंद्रलेखा प्रकाशित चिरंजीव आईस. २०० वा प्रयोग,शुक्रवार बालगंधर्व रंगमंदीर पुणे. प्रमुख पाहुणे चंद्रलेखाचे मोहन वाघ आणि अ भा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार. वक्ते दिग्दर्शक दिलिप कोल्हटकर. निर्माती-भाग्यश्री देसाई. कलावंत- भाग्यश्री देसाई,कुणाल लिमये,उदय लागू, आशा तारे, उपेंद्र दाते आणि सुहासिनी देशपांडे.

---------------------------------------

"आजचे कलावंत प्रयोग अर्ध्यावर टाकून मध्येच निघून जातात. नाटकापेक्षाही सिरियल आणि सिनेमाकडे त्यांचा ओढा अधिक आहे. रंगभूमीच्या निष्ठेपेक्षा त्यांना ओढ आहे ती पैशाची.

भुमिकेच्या प्रेमापेक्षाही त्यांना पैशाचे प्रेम अधिक आहे.' अशी टिका जाहिरपणे केली

ती नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी.

स्थळ होते पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर. निमित्त होते रसिक मोहिनी निर्मित आणि चंद्रलेखा प्रकाशित "चिरंजीव आईस' या नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाचे. नाटकाच्या मध्यंतरातल्या छोटेखानी समारंभात मोहन वाघ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

गेले कांही दिवस नाट्यक्षेत्रात चिंतेची परिस्थिती आहे. ठराविक नाटके सोडली तर नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावलेली दिसते. भरत जाधव, प्रशांत दामले, मोहन जोशी तर काही प्रमाणात विक्रम गोखले यांची नाटके सोडली तर नाटकाला बुकींग नसते. एकेकाळी बालगंधर्वच्या तारखांसाठी निर्मार्त्यांमध्ये चढाओढ असायची. आज बुकींग नसल्याने रंगमंदिरात नाटकांपेक्षा लावण्या-तमांशांचे प्रमाण अधिक वाढलय. टाळ्यांपेक्षा शिट्ट्यांची दाद अधिक मिळताना दिसते.

अशा स्थितीत "चिरंजीव आईस' या नाटकाचा दोनशेवा प्रयोग साजरा व्हावा याचा आनंद. तर मला बरेच दिवसाने नजरेपुढे भरलेले प्रेक्षागृह पहायाचे भाग्य लाभल्याचा आनंद दिग्दर्शक दिलिप कोल्हटकरांना जाहिर पणे व्यक्त करावा लागावा याचे वाईट वाटते.अशाच महोत्सवी प्रयोगाला भरघोस उप्तन्नाचा प्रतिसाद मिळाल्याने निर्माते किशोर देसाई-भाग्यश्री देसाई यांना अधिक प्रयोग करण्याचा उत्साह निर्माण व्हावा हे या प्रयोगामुळे घडले.

भारतीय मुले अमेरिकेत स्थयिक झालीत. त्यांचेकडे पैसा आहे. पण स्वतः कडे आणि आपल्या माणसांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अमेरिकेत गेलेल्या आपल्या आईशी बोलायला. तीच्याशी गप्पा मारायला वेळ नाही. सतत काम आणि कामच. यानिमित्ताने भारतीय मातीत रूजलेल्या संस्काराचा आणि आईचा एकटेपणाचा अनुभव सांगणारे हे नाटक तेवढेच लक्ष वेधून घेते.

त्यातही नाट्यकलावंतांच्या निष्ठेचा प्रश्र मोहन वाघ यांनी काढून रंगभूमीवर कलावंतांची वानवा का आहे याचे एका परिने उत्तरच दिले.कलावंतही म्हणतात हेच तर पैसे मिळविण्याचे आमचे दिवस आहेत. मात्र एकदा स्विकारलेली भुमिका शेवटापर्यंत निभावणे हे ही महत्वाचे नाही काय ? हा प्रश्र अधिक मोलाचा आहे.

नाट्यक्षेत्र आज मंदिच्या गर्दीतून वाट काढते आहे. निर्माते आणि कलावंत या दोघांनीही रंगभूमिवरची नवी आव्हाने पेलण्याचे शिवधनुष्य निष्ठेने उचलण्याची वेळ आली आहे. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा नव्या विषयांची नवी नाटके समर्थपणे साकारण्याची गरज आहे. ती पेलण्याचे बळ दोघांनाही येवो हिच प्रामाणिक इच्छा !

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Thursday, April 2, 2009

गगनातला सायंतारा निस्तेज झाला!


भावगीताला स्वतःच्या स्वतंत्र प्रतीभेची ओळख करून देणारा शांत निर्मळ स्वर आज त्या दूर देशा निधून गेला. गजाननराव वाटवे या व्यक्तिमत्वाची आठवणच उरली.

सोपी आणि सुबोध चालीतून कवीतेतल्या शब्दांना रसिकांच्या ऱ्हदयी घालणाऱ्या या महान संगीतकाराला अखेरचा सलाम.भावगीतात स्वतःचे युग निर्माण करताना नविन कवींना आणि त्यांच्या कवीतांना निवडून त्यांना चाली देण्याचे मोठे काम वाटव्यांनी केले.

व्यक्तिमत्वातला साधेपणा त्यांच्या चालीतूनही बाहेर येत होता. निगर्वी आणि अतिशय साधा कलावंत म्हणून त्यांची ओळख कायम मनात ठसली.गाण्याच्या नवीन कार्यक्रमाला वाटवे नेहमीच हजर असत. तरूण कलावंताला सतत सल्ला देताना त्यांनी कधीही आळस केला नाही.

काळी पॅंट . खोचलेला पांढरा शर्ट आणि काळा कोट घातलेले वाटव्यांचे व्यक्तिमत्व सदा प्रसन्न असे. छाप पडावी असे व्यक्तिमत्व नसले तरी रसिकांच्या प्रेमाने त्यांना नेहमीच उत्साह वाटे.

एके काळी मेळ्यातून गाणी म्हणणारे वाटवे गाजले ते गणपती उत्सवातल्या भावगीतांच्या कार्यक्रमातून. "कसा ग बाई केला, कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबडा" म्हणताना ती लडीवाळता त्यांच्या सूरातून रसिकांना मोहवीत गेली. "गगनी उगवला सायंतारा" सारखी काव्ये वाटव्यांच्या स्वरांनी अजरामर झाली. त्यांच्या आवाजाचा पोत तरल, साधा आणि शांत स्वरांची बरसात करणारा होता.

त्यांच्या गायकीत तो आवेश नव्हता. मात्र गाताना तल्लीनता इतकी जे गातील त्यात वाटव्यांचा टच जाणवत होता.गेले कांही दिवस तब्येतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमाला ते येत नसत. पण जे भेटायला जात त्यांच्या कडे नवीन काय चालू आहे याची विचारणा नक्कीच व्हायची. मध्यंतरी एच एम व्ही ने वाटव्यांच्या दुर्मिळ भावगीतांची सीडी काढली तेव्हाचा तो शेवटचा जाहिर समारंभ असावा. त्यांच्या बोलण्यात गहिवर होता. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाने भारून गेल्याचे समाधान होते. आयुष्याचे सार्थक झाल्याची जाणीव होती. एकूणच ते तृप्त होते.

मध्यंतरी त्यांना बोलता येत नव्हते. मात्र कागदावरचा संवादातून ते प्रकट होत होते.समईतल्या मंद प्रकाशा सारखा त्यांचा स्वर भावगीतांना उजळून गेला. नवकवींना प्रसिध्द करवून गेला.

नवीन गायकांना आदराचे स्थान असणारे गजानन वाटवे आज अखेरच्या प्रवासाला निघालेत. त्यांच्या सोज्वळ स्वरांना. भारावलेल्या सूरांना आणि कायमच रसिकांच्या मनात घर केलेल्या थोर व्यक्तिमत्वाला ही शब्दरूप भावांजली!

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Wednesday, March 25, 2009

संस्कृती पाळा, जबाबदार बना


गुढी पाडवा. भारतीय संस्कृतीला बहर आणणाऱ्या तेजोमय दिवसाचे नाव.

आरोग्यदायी कडुलिंबाचा डहाळा आणि साखरेची गाठी या दोहोंनी गुढीचे तोरण उभे राहील.

मंदीच्या कडू वातारणाचा साज लेऊन यंदाची गुढी उभी राहणार आहे. नेत्यांच्या, पक्षांच्या आश्‍वासनांच्या साखरेनी त्यावर तात्पुरता लेप लावला जाईल.

खेडी ओस पडताहेत. शहरे विस्तारीकरण चाललेय. स्वतःकडे पाहताना दुसऱ्याचे भानही तो विसरायला लागलाय.शेतकरी कामगार मिळत नाहीत म्हणून ओरड करताहेत. तर शहरातला युवक बेकार फिरतोय. महागाईचा तारू ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनतर सामान्याला जगण्यातला थोडा आनंद देणारा हा गुढी पाडवा महत्वाचा.

संस्कृती म्हणजे तरी काय? भुकेलेल्या घास द्या. शेजाऱ्यावर प्रेम करा. मुलांना जगाचे भान द्या. जेष्ठांचा आदर करा. कुणी रस्त्यात पडले तर त्याला हात देऊन उठवा. दुसऱ्यांचा आदर करा हे सांगणे.आज तीच दुर्मीळ होताना दिसत आहे.

राग, लोभ, भय, मत्सर या चौघांचे राज्य वाढतेय. जनमानसात जात-धर्माचे वचर्स्व वाढलेय.बुध्दिच्या शक्तिपेक्षा बळाची शक्ति वापरणाऱ्याचे प्रमाण जास्त होते आहे. समाज संकुचित बनू पाहतोय. "स्व"च्या पलिकडे पाहण्याची दृष्टी अधू बनत चाललीय.जगण्यासाठी काम आणि कामासाठी धावणे वाढलेय. समाजाचे आपण देणे लागतो ह्याचा विसर पडतोय. घरातला संवाद कमी झालाय. टीव्ही भोवती कुटुंब फिरतय.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने यंदा लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहतेय. त्यांच्यापेक्षा मी चांगला. आश्‍वासनांची खैरात होती आहे.दुचाकीवाला नॅनो घ्यायला निघालाय. रस्ते, वीज, पाणी या मुलभुत गोष्टीकडे डोळेझाक होतीय. प्रश्‍न माहित आहेत पण ते सुटत नाहीत.यंदा नक्की मार्गी लावणार अशी आश्‍वासने मिळताहेत. सामान्याला जगणे मुश्‍कील करून सोडणारे हे दिवस.

सणाला सामोरे जाताना उद्याची काळची करण्याचे दिवस. म्हणूनच सावध व्हा. संस्कृती जपताना जबाबदारीचेही भान ठेवणे हेच या गुढी पाडव्याचे सांगणे.

सुभाष इनामदार,पुणे.

email- subhashinamdar@gmail.com

Sunday, March 15, 2009

रागरससिध्दांत साकारताना किशोरी आमेणकर..




गुरूने दिला ज्ञानरूपी

वसाआम्ही चालवू तो पुढे वारासाः

या प्रार्थना गीताचे
शब्द पुरेपुर सार्थ करणारा सोहळा नुकताच पुण्यात अनुभवला. पद्मविभूषण गानसरस्वती
श्रीमती किशोरी आमोणकरांनी सिध्द केलेल्या "स्वरार्थरमणी "या पुस्तक प्रकाशन
सोहळ्याचे वेळी. त्यांची गायिका म्हणून किर्ति आहेच .पण या सोहळ्याच्या निमित्ताने
त्या गायन शास्त्राचे स्वरूप किती सहजपणे शब्दातून कसे स्पष्ट करू शकतात याचा
जाहिरपणे प्रत्यय आला.

स्वरांची, रागांची मांडणी करताना त्यामागचा विचार ऐकणारा बालगधर्व
रंगमंदिरातला रसिक ते ऐकताना गाण्याइतकाच तल्लीनपणे ते मनात साठविताना अनुभवित
होतो. रागरससिध्दांत मांडताना किती विचार करून शास्त्रिय संगीताच्या रागांचे विवेचन
करणारा ग्रंथ साकारला त्याची तेव्हा कल्पना येते. रागाचा विस्तार करताना त्याच्या
स्वरांमधून तयार होणारा रस (म्हणजे आनंद ) अणि त्याची विविध रूपे साकारताना
होणाऱ्या स्वरांचे दर्शन त्यांच्या या अभ्यासपूर्ण विचारातून सार्थपणे बाहेर येते.
गायक गाताना रागांचा . त्यातल्या प्रत्येक सूराचा विचार कसा करत असतो याची जाणिव
त्यांची मुलाखत ऐकताना झाली.

एका अर्थाने "अभ्यासोनी प्रकटावे" म्हणजे काय याचे
दर्शन इथे झाले. जमलेले सर्वच चाहते शास्त्रिय संगीत जाणणारे नव्हते. पण तरीही
किशोरीताई जे विवेचन करीत होत्या ते एकाग्रतेने ऐकताना तोही त्यांच्या पुस्तकासाठी
केलेल्या विचाराने भारावून जात होता.हे पुस्तक साकारताना त्यांनी भरताच्या
नाट्यशास्त्राचाही अभ्यास करून राग मांडताना तोही एक नाट्यासारखा परिणाम करू शकतो
हेही त्यांनी पुस्तकातून उदाहरणातून दाखवून दिले.

गाताना त्यातले नाट्य कसे साकारले जात आहे ते
पाहण्याचा आपल्याला ध्यास लागल्याचे त्या सांगतात.राग साकारताना त्यातल्या भावालाही
किती महत्व आहे याचेही वर्णन त्या करतात.रंगमंचावर आपण स्वरातून राग साकारतो म्हणजे
स्वर बोलतो. तो गातो. तो जिवंत असतो. स्वरांची साधना केल्याशिवाय हे कळत नाही असे
किशोरीताई सांगतात. स्वरांचा समूह आळवताना रंगमंचावर स्वराभिनयच साकारत असतो
म्हणूनच गायन ही कला जशी आहे तसाच तो रंगमंचावरचा आविष्कारही आहे. जो श्रोत्यांच्या चेहऱ्यातूनही दिसतो. इथे श्रोताही तेवढाच महत्वाचा.

राग साकारताना किशोरीताई तल्लीन होतात तेवढ्याच
च्या स्वरांविषयी, रागांविषयी बोलतानाही होतात. म्हणूनच हा पुस्तक सोहळा अनुभवताना
त्यांच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या वाक्‍यांनाही वाहवाची दाद मिळते.
सुभाष इनामदार, पुणे

email-subhashinamdar@gmail.com

Tuesday, February 10, 2009

इंद्रायणी काठी जाहला आनंद


पुण्यात वाहणारे नद्यांचे पाणीही आज आनंदाने गाऊ लागले. पाण्याचा प्रवाह जरी आज खळाळत नसला तरी जेव्हा केव्हा तो बरसत होता तेव्हाची आठवण आज नक्की होणार आहे.

किराणा घराण्याची गायकी आपल्या मेहनतीने गळ्यावर चढविली. सवाई गंधर्वांच्या घरात पहाटे पाण्याच्या घागरी वाहिल्या आणि त्याच मनोभावे ते स्वरही कानात साठविले. त्या स्वरांचा सुगंध गदग पासूनच दरवळू लागला. पुढे तो गावोगावी पसरत गेला. शास्त्रीय संगीताच्या मैफलीतल्या गायनाने त्यांच्या स्वरांना पंख लाभले. पंखांत बळ निर्माण झाले आणि असे एकही शहर नसेल जीथे पंडीतजींच्या गायनाची मैफल झाली नाही.


आपल्या गुरूंच्या नावाने पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून हा स्वरोत्सव आजही अव्याहत सुरू आहे. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत आणि अभंगाना पंडीतजींनी सुस्वर बनविले. अजरामर केले.आज त्यांची तब्येत साथ देत नाही. तरीही ते मनात सुरांची सेवाच करताहेत. भीमसेन जोशी नावाचा सन्मान पुण्यात स्थिरावला आणि पुणेही धन्य झाले. आज पंडीतजींबरोबर पुणेही या महान गायकाच्या सहवासाने स्वतःला धन्य समजते. पुणेकरांना त्यांची नावलौकिक मिळवून दिला.

एक गोष्ट मात्र मोकळेपणाने सांगावीशी वाटते. त्यांची गायकी भारतातच नव्हे तर जगात आपली शैली प्रस्थपित करीत होते तेव्हाच जर हा सन्मान मिळाला असता तर त्याचे मोल अधिक वाढले असते. पंडीत जसराज म्हणतात त्याप्रमाणे हा सन्मान मिळायला उशीर झाला खरा. पण तो मिळाला हे विसरून चालणार नाही. आज सारेच संगीत प्रेमी आनंदाने अभंगवाणीचे सूर आळवतील.

कलाश्रीतला तो "स्वरदेव" तृप्तपणे भारतरत्न हा सन्मान घेताना धन्य पावला असेल. त्या स्वरदेवाच्या स्वरांना आणि त्याच्या प्रतीभेला तमाम भारतीयांचा मानाचा मुजरा!स्वर आज थंडावलाय पण तो एकेकाळी बरसत होता. महासागरासारखा खळाळत होता याची आठवण होते आहे.


सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com

Friday, January 30, 2009

पुण्यातल्या कलावंतांना हे कळणार तरी कधी?

दिवसभरात पुण्यात दोन-तीन सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात.कुठे अरंगेत्रम तर गाण्याची मैफल. आठवणीतली गाणी, ओठावरची गाणी नाही तर जुन्या संगीतकारांच्या गीतांचा बहारदार नजराणा.
खरे म्हणजे (आणि ते खरही आहे) इथ गल्ली-बोळात ( अणि आता तर पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातही) कलावंतांची खाण आहे. प्रत्येकालाच मोठे नाव मिळेल अशी शक्‍यताही नाही (ती त्याची अपेक्षाही नसते) तरीही त्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो.
आज सारे कलावंत कलेसाठी कला करत नाहीत. पोटासाठी नोकरी किंवा व्यवसाय असतोच. हौसेला ही आवड जोपासत असतो.
बहुधा संस्था कार्यक्रम करते. कधी कॅसेटच्या निमित्ताने तो होत असतो तर कधी स्वतःची कमाई टाकून तो स्वतःच सादर करीत असतो.
कार्यक्रम करण्यात गैर काहीच नाही. ते व्हायलाच हवे. नाहीतर त्याची तालीम आणि तीही रसिकांसमोर गायची- वाजवायची सवय कशी होणार?
होते इतकच त्यात जे सहजी शक्‍य आहे ते व्यावसायिक पध्दतीचे सादरीकरण मात्र होत नाही.
यासाठी पैसा जादा लागतो असे आजिबात नाही .इथे लागते ती सादरीकरणातील सफाई. निवेदक आरामात मांडी घालून आपले तेच ते विनोद वा किस्से लोकांवर आदळत असतो. वादकही रंगमंचावरच्या चौकोनी मंचावर बसून वाजवताहेत. त्यांच्या वादनात खोड काढत नाही पण त्यामुळे त्यातली जोश, उत्साह उणावतो आणि दिसतोही. गायक वही घेऊन गाण्यातले बोल आळवित असतो तेही बसून. (सगळेच जण असे करतात हा दावा मुळीच नाही)कार्यक्रम पाहताना स्वरांचा रवंथ केल्याचे फिलिंग येते.
ऐकणाऱ्याला आणि सादर करण्यालाही उभारी येईल अशी ती मैफल असावी. संख्या कमी असली तरी हरकत नाही. पण जे कराल ते पुन्हा-पुन्हा पहायला आवडेल असेच हवे.
रंगमंचावर कार्यक्रम करताना तो "सादर" होत असतो याची जाणिव ठेऊन जर केला तर तो अधिक मनपसंद होईल.
अशोक हांडेंचे कार्यक्रम त्यासाठी पहा. ती सफाई हवी. प्रकाशाची, ध्वनीची इवढी गरज नाही. पण प्रेक्षकांसमोर कार्यक्रम मांडावा कसा ते त्यातून समजेल.
एक नक्की. कलावंतात खोट काढण्यासाठी हे सांगत नाही. तर पुण्याचा तुरा मानाच्या पगडीतला शिरपेच म्हणून मिरवावा,हिच इच्छा!

सुभाष इनामदार, पुणे
subhshinamdar@gmil.com

Friday, January 23, 2009

मधूप मुदगल यांचे श्रवणीय गायन

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील तिसरा दिवस

मधूप मुदगल यांच्या गायनाने आरंभापासून रंगत गेला.

स्वरास्वराचा बारकाईने केलेला विचार. गमकयुक्त ताना.

आर्वतनातील शिस्त यामुळे त्यांचे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाले. हार्मोनियची साथ डॉ. अरविंद थत्ते यांची तर भरत कामत यांनी तबल्याची साथ केली.

- सुभाष इनामदार, पुणे