Thursday, May 8, 2008

रंगमंचाच्या पाठीमागची कलात्मकता त्याने चितारली कॅनव्हासवर...

शाम भुतकर. नाटकाचा नेपथ्यकार, वेशभुषाकार, प्रकाश आणि रंगभुषाही केलेला हरहुन्नरी कलाकार. चित्रपटाचा कलादिग्दर्शक म्हणूनही नाव कमावले. अनेक कल्पनांचा अविष्कार साकारला. कधी मनाजोगता तर कधी मेड टू ऑर्डर . शिवाय म्यूरल आर्टिस्ट म्हणूनही वेगळी ओळख झाली.

त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनावर आधारित ही ध्वनिचित्रफित...

तीस वर्षाच्या कालावधीनंतर "स्वमधला कलावंत जागा झाला. पाच वर्षाच्या कालावधीनंतर मुंबईच्या जहांगीरआर्ट गॅलरीची दारे उघडली. आणि शामची बोटांना , कपड्यांना रंगाचा आनंददायी स्पर्श झाला. १२ ते १७ ंमेच्या प्रदर्शनासाठी रंगमंचाच्या पोकळीत तयार झालेल्या छाया-प्रकाशाच्या खेळाची आंदोलने मनात नाचत पुढे येऊ लागली. गेल्या दीड-दोन महिन्यात बोटांना कल्पनेची साद लाभली. आणि साकारली प्रदर्शनातली चित्रमय गॅलरी.
पुण्यात शाम भुतकरांनी याच चित्रांने प्रदर्शन भरवले. चित्रकार, कलावंत आणि शिल्पकारांची ,चाहत्यांची शाबासकी मिळाली. आता तो मुंबईच्या कलादालनात स्वतःला साकारायला सिध्द झाला आहे.
थोडे मागे वळून पाहताना कलावंत कसा घडला ते कळते. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे तर....
माझा निर्मिर्तीच्या संदर्भातला प्रवास हा अवकाशाच्या पोकळीला स्वतःचा अर्थ,रंग,आकार देताना चालूच आहे. अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून मला सभोवतालचा परिसर ,माणसं. आजूबाजुचा निसर्ग यांच्यासंदर्भात पाहण्याची दृष्टी रंग आणि आकारांच्या ओढीतूनच निर्माण झाली.
अवकाशातील विस्तिर्ण सांजवेळ आणि मध्यरात्रही अनुभवली. त्यातल्या रंग-सावलीच्या खेळाने मन माझे वेडावून गेले.
त्यातूनच आकाशातले आकार, कवडसे चित्रातून कॅनव्हॉसवर प्रकटले.....
त्याच्या या रंगाच्या प्रवासाची आणि निर्मितीमधल्या काही अविष्काराचे आपणही साक्षीदार व्हावे यासाठी शाम भुतकरांच्या शब्दामधून साकारलेली ध्वनीचित्रफित सादर करीत आहोत. त्याच्या दृष्टीने आहे हा नाट्यमय चित्रानुभव !

Tuesday, May 6, 2008

भिन्न कादंबरीचे वेगळेपण दाहकतेत !

केशवराव कोठावळे ट्रस्टतर्फे अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते
महाजन यांच्या "भिन्न' कादंबरीला केशवराव कोठावळे पुरस्कार
सोमवारी प्रदान करण्यात आला.
यावेळी कविता महाजन यांच्या दाहक अनुभवाचे बोल
साहित्यप्रंमींना अनुभवता आले.

कार्यक्रमाची ही ध्वनीचित्रफित....

Friday, May 2, 2008

मराठी असे आमुची शिक्षणभाषा....

मराठीत शिक्षण घेऊन मानाने समाजातल्या दोन भिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.अनिल अवचट आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी मराठी अभ्यास मंडळात मराठी शिक्षण घेऊनही जीवनात कसे समृध्दपण आले. याची केलेली चर्चा मराठी भाषीकांना स्फूर्तीदायक ठरली.

होय ,आम्ही मराठीत शिकलो....
महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले यांच्या अनुभवातून मराठीत शिक्षण घेतल्याने आपला फायदा काय झाला ? याविषयीचे अनुभव मराठी अभ्यास मंडळात सांगीतले गेले.
त्यांच्या शब्दातच ते ऐका...

ज्ञानाची भाषा आज इंग्रजी आहे. ती यायलाच हवी. पण संस्कृतीची ओळख आणि भाषेची संपन्नता अनुभवण्याठी मराठीतूनच शिक्षण घेण्याची ठाम भुमिका मांडली. अकरावी नंतरचे तात्रिक ज्ञान मात्र परकीय भाषेत असल्याची खंत व्यक्त करून अच्युत गोडबोले यांनी संगणकाची तांत्रीक भाषा मराठीत देण्यासाठी आपण तीन पुस्तके लिहली असल्याचे सांगीतले. चवथे पुस्तक लवकरच येत असल्याची माहिती दिली. मात्र इतर लेखन मात्र मराठीतच करण्याचा आपला निर्धार पुन्हा जाहिर केला.
आजचा तरूण वर्ग पैशाच्या मागे लागला असून त्याला जगण्यासाठी अधुनिक सुविधा लागतात. मराठी मातीचा गंध तो वर्ग विसरत चालल्याची खंत त्यांच्या बोलण्यात व्यक्त झाली.
मराठी अभ्यास मंडळाच्या कार्याची माहिती करून देताना प्र.ना परांजपे यांनी मराठी शाळेतही उत्तम इंग्रजी शिकविण्यासाठी सरकारने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.. पुण्या-मंबईसह अनेक शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खेदही प्रकट केला.

Thursday, May 1, 2008

कथ्थक नृत्याला कार्पोरेट जगात स्थान देण्याचा प्रयत्न

पुण्यतल्या कथ्थक नृत्यात करियर करण्याची जिद्द बाळगणाऱ्या शर्वरी जेमीनिस यांना यंदाचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बीसमील्ला खॉंन यांच्या नावाने दिला जाणारा "युवा पुरस्कार" जाहिर झाला आहे. याच महिन्याच्या २९ तारखेला दिल्लीत तो समारंभपूर्वक दिला जाईल. यानिमित्ताने त्यांचेशी संवाद साधला.

त्याचा काही भाग आपण इथे व्हीडीओतून ऐकू शकता.
चित्रपटाच्या ऑफर येऊनही नृत्याला अधिक प्राधान्य देऊन त्यातच करियर करायची जिद्द बाळगून सिरियलसह चित्रपटाला नकार दिला गेला.
आजच्या कार्पोरेट जगतात कथ्थक नृत्याला वेगळे स्थान देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नवे मार्ग शोधून पारंपारिक नृत्याला दर्जेदार करणे हाच शर्वरी जेमिनीस यांचा ध्यास राहणार आहे.
शास्त्रीय संगीताच्या पारंरारिक पठडीत राहूनही कथ्थकला विविध प्रकारे सादर करण्याचा ध्यास त्यांच्यात आहे.
लहानपणापासून नृत्यकलेची साधना करून आता कुठे याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्यामुळे आपल्यावर आता आधिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांच्याशी बोलण्यातून आली.
कथ्थक नृत्यासाठी महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळतोय म्हणून वेगळी जबाबदारी आपल्यावर आहे. ती प्रेरणा अपल्याला भाग्यवान ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटाला आवश्‍यक असणारे सारे गुण अंगी असूनही शर्वरीने सारे लक्ष्य कथ्थकवर केंद्रित करायचे ठरविले आहे.
केलेल्या भूमिकात समाधान मिळाले मात्र नृत्याचा रियाज आणि सातारा,बीडसह लावण्यांना गर्दीकरणाऱ्या रसिकांना कथ्थकमध्ये असणारी भावना पोचविणे आपल्याला अधिक प्रेरणामय वाटत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
शर्वरीच्या या पुरस्काराने पुण्याला आणि आपल्या गुरू रोहिणी भाटे यांचाही सन्मान झाला आहे.
कृष्ण-राधेच्या पारंपारिक रचनातल्या त्या भावना युनिव्हर्सल आहेत मात्र काळाप्रमाणे त्यात कांही बदल करून रसिकांना आनंद देणारी रचना गावोगावी सादर करणे याचा ध्यास मला अधिक मोलाचा वाटतो,अशी भावना शर्वरीच्या संवादातून व्यक्त झाली.

Tuesday, April 29, 2008

बासरीच्या सूरातच अमर ओक बहरत आहेत

मराठी आणि हिंदी गीतांच्या वाद्यमेळ्यात पुण्याच्या अमर ओक यांची बासरी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे टाईम्स म्युझिकने बासरीला महत्व असलेल्या गीतांची सीडी बाजारात आणली आहे. शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात डॉ.सलील कुलकर्णी,आनंद मोडक या दोन संगीतकारांच्या उपस्थितीत सीडी रसिकांसमोर उलघडली. त्यानिमित्त सादर झालेल्या "अमर बन्सी" कार्यक्रमातून त्यांच्या बासरीच्या सूरावटीने वाहवा मिळवीली. बासरीचा नाद आणि त्याच्या सूरांनी अमरच्या वादनकौशल्याचे दृष्य परिणाम दाखविले.
बासरीचा सूर आता कुठे घुमू लागला... पहिला भाग
झीच्या सारेगमतल्या बऱ्याच गाण्यातून अमर ओकांच्या बासरीच्या सूराची फुंकर न ऐकली नाही असा प्रेक्षक असणे महाकठीण.
अमर ओकांचा प्रवास असा झाला... भाग दुसरा
वडी लांच्या सोबत बासरीच्या क्‍लासला जाणारा अमर बालपणीच बासरीच्या प्रेमात पडला. कालांतरांने वडीलांनी क्‍लासला रामराम ठोकला. पण अमरने मात्र बासरीची तालीम कायम ठेवली.
घरची परिस्थिती बेताची. तरीही आई-वडीलांनी अमरची बासरीवादनाची कला जपली-वाढविली. कॉलेज,पुढे एमसीएससाठीही अमरने अभ्यास केला. पण एकाच ठिकाणी आठ-आठ तास बसून रोज तेच ते काम करायचे या नोकरीच्या चौकटीत रहाणे त्याला पसंत नव्हते. नियतीने त्याची गाठ घालून दिली ती अशोक हांडेंशी. त्याच्या कार्यक्रमात बासरीची साथ करताना दुबई,सिंगापूरचा दौरा मिळाला. पैसा मिळाला.कला सहवास लाभला.
आणखी एक बांलावणे आले ते किशोरजी व्यास यांच्या कार्यक्रमात भजनाला बासरीची साथ करण्याची. कृष्ण-राधेच्या गोकुळात रंगणारा आणि बासरीच्या मोहक सूरावर गोपींसह गायींनाही नादावणारा हा बासरीचा सूर तिथेही रंगला. भक्तीची ही नवी प्रेरणा बासरीतून आळविण्याचे भाग्य लाभले.
शिवरंजनीच्या "सूर-ताला"ची नवी दिशा पकडली. अमरचे बासरीचे कौशल्य इथेही बहरले. कार्यक्रमांची साथ करताना हृदयनाथ मंगेशकेर,अनुराधा पौडवाल,सुरेश वाडकर,सुधीर फडके,उषा मंगेशकरांच्या सभोवताली बासरीचे सूर घुमू लागले. संगीतकारांचा लाडका बासरीवादक म्हणूव रेकॉर्डींगलाही बोलावणी आली. झीच्या "सारेगम"तर अमरचे नाव आजही गाजत आहे.
साथीचे वाद्य म्हणून असलेल्या बासरीच्या कार्यक्रमाने मनाने तो रमला मुंबईत मुक्कामही ठोकला. मुंबईत स्टुडिओतील उठबस वाढली. पण कलेचा साधक म्हणून ते अतृप्तच राहिले.
बासरीला महत्व असणाऱ्या गीतांची निवड केली.. नव्या फ्यूजनची रचना केली. आणि टाईम्स म्यूझिकने त्यांची साडी बाजारात आली.
साथ करता करता स्वतःच्या वादनाकडे अधिक लक्ष देऊन यातूनच नवनिर्मिती करावी अशीच यापुढची अमर ओक यांची वाटचाल असेल

Friday, April 18, 2008

जेव्हा स्वरसत्ता आणि काव्यसत्ता एकाच वेळी कोसळते...

कविवर्य ग्रेस आणि संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकरांनी पुणेकरांना आपापल्या राज्याची सफर करून आणली, त्या कार्यक्रमाचे नाव होते- "ताऱ्यांच्या प्रहरापाशी'. यात दुर्बोध वाटणाऱ्या काव्याचे भाष्यकार नागपूरचे कवी ग्रेस यांनी शब्दांच्या भावविश्वात रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या वेगळ्या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफित पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा......ग्रेस याच्या भाषेत अबोधता असली तरी भावनेत बहर सामावलेला होता. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांच्या हिंदोळ्यावर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातला प्रेक्षक झुलत होता.
शिरीष थिएटर्सच्या शिरीष रायरीकर यांनी "ताऱ्यांच्या प्रहरापाशी' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संत ज्ञानेश्वर, मीराबाईंच्या रचनांबरोबरच ग्रेस यांच्या रचनांचे इथे सादरीकरण झाले.
कवीच्या प्रतिभेची ताकद आणि संगीतामुळे येणारी नादमयता याचे मिश्रण होऊन हे स्वरमय अमृत रसिकांच्या कानी पडते. त्याचे वर्णन शब्दात करणे अवघड. मृदंग-तबला आणि एकतारीच्या साथीने संगीताला श्रीमंती प्राप्ती झाली होती. कवीच्या शब्दांतली ताकद आणि संगीतकाराने दिलेली चाल यात कधी संगीतकार प्रभावी होतो, तर कधी काव्याला अधिक साद मिळते. शब्द-सूरांचा हा प्रवास आपण प्रत्यक्ष ऐकलेलाच बरा.
ही दोन प्रतिभेची लेणी जेव्हा समोरा-समोर येतात तेव्हाच रसिकांच्या मनावर स्वरसत्ता आणि काव्यसत्ता एकाचवेळी कोसळते. स्वरांच्या जादूचा आनंद घेताना आता काव्यशिल्पातून ग्रेस काय बोलणार, याची उत्सुकता रसिकतेला पडते. मधूनच राधा मंगेशकरही काही गीते सादर करतात.
एखाद्या मंद हळव्या बोलामध्ये आयुष्याला स्पर्शून जाण्याची जर ताकद येत असेल आणि ती ताकद कोणत्या पद्धतीने येते, ते सांगताना ग्रेस काव्यात सांगतात-
"सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला...'
दुःख आणि निर्मितीच्या क्षेत्रातले सगळे ऐवज बायकांच्या स्वाधीन आहेत हे खरे आहेत, हे सांगताना स्त्रियांच्या शापाविषयी सांगताना ते बोलून जातात-
निर्मिती आणि सौंदर्याची अधिसत्ता यांच्या अमृताचे आणि जहराचे सगळे बेमालून घटक स्त्रीच्या आत्म्यात अणि व्यक्तिमत्त्वात नियंत्याने इतके सैरभैर करून मिसळून दिलेले आहेत की तिच्या प्रत्येक ग्लोरीला ग्लॅमरचा शाप भोगतो.
कवितेच्या सुबोधतेविषयी ग्रेस बोलतात... ज्या डंखदार पद्धतीने आपण सुबोधतेची अपेक्षा करता अशी कुठलीही सुबोधता जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही,
ग्रेस यांचे गूढ बोलणे आणि हृदयनाथांच्या भावस्पर्शी चालींतून दोन वेगवेगळ्या झऱ्यांचे पाणी रसिकांची तहान भागवते, यात शंका नाही.
अशा पद्धतीचे प्रतिभेला बोलते करण्याचे कार्यक्रम अधिकाधिक होणे, यातच मराठी रसिकांच्या रसिकतेची साक्ष पटते.

Tuesday, April 15, 2008

सांगलीच्या बाल कलाकारांनी पुणेकरांना ऐकविले गीतरामायण...

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली शिक्षण संस्थेने बाल कलाकारांच्या गायनाने पुण्यात कुश-लव रामायण गातीचा आविष्कार सादर करून पुणेकरांची शाबासकी मिळविली.
या गीतरामायणाची झलक ऐकण्यासाठी ईथे क्‍लिक करा....
आंतर्नाद ही बाल कलाकारांच्या सुप्तगुणांना व्यासपीठ देणारी संस्था.संस्थेच्या विविध शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन ह्या कार्यक्रमासाठी बाल गायकांची निवड केली गेली.माजी आणि आजी विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीतरामायण स्वर-तालाने मंत्रमुग्ध करणारे होते.
प्रा. अशोकराव घारपूरे यांच्या प्रेरणेतून आणि तुषार आपटे यांच्या मार्गदर्शनातून गीत रामायणाचा हा तेजस्वी आविष्कार सिद्ध झाला.माधव आणि आशा खाडिलकरांनी मुलांना मार्गदर्शन केले.त्यातून घडलेले हे गीतरामायण मुलांच्या सांगीेतिक कौशल्याची प्रचिती देतात.
अमृता जोशीच्या निवेदनाने रामायणपर्व उलगडत जाते.सायली जोशी,सुकृत ताम्हणकर,छोटी गायीका शिरीन केळकर,श्रीरंग जोशी,अभिषेक काळे,स्वराली अभ्यंकर,आर्या खाडिलकर,यशश्री जोशी स्वप्नावी कुलकर्णी या विद्यार्थी गायक-गायीकांनी स्वराला परिश्रमाची जोड देऊन सुधीर फडके-ग.दि.मांच्या गीतांना भावभावनांनी समृद्ध करून शब्दांना तालीच्या बांधेसूद परिमाणात तोलून पुन्हा त्या गीतरामायणाची आठवण करून दिली.वाद्यवृंदातली विद्यार्थीवर्गच होता.संवादिनी-स्वानंद कुलकर्णी,आणि तबला-परेश पेठे यांचा उल्लेख करायलाच हवा.मुलांच्या आंतर्नादला साद दिलेल्या सांगलीच्या संस्थेचे खरच कौतूक करायला हवे.
पुण्यतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातल्या प्रयोगाला दाद देण्यसाठी पु.ना. गाडगीळचे मालक दाजीकाका गाडगीळ आणि चेकमेट या मराठी चित्रपटाचे संगीतकार चंद्रशेखर महामुनी हजर होते.दोघांनीही मुलांच्या कलेला मनापासून दाद दिली.

Sunday, April 13, 2008

...आता कापूसकरांना स्वतःची कलाकृती साकारायचीय !

-"शिल्प बनविताना त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव सर्वांत महत्त्वाचे. चेहरा पाहून त्या व्यक्तीच्या मनात काय असेल ते शिल्पातून व्यक्त व्हायला हवे. देहबोलीतून ते दिसायला हवे. करमरकरांसारखे काम व्हायला हवे आहे. त्यासाठी मेड टू ऑर्डरची कामे बंद करून स्वतःला जे भावते ते करण्यासाठी यापुढचा वेळ देणार आहे. पुण्याजवळच्या भूगावमधल्या आपल्या स्टुडिओत प्रसिद्ध शिल्पकार शरद कापूसकर ई-सकाळशी बोलत होते.
त्यांच्याशी झालेल्या गप्पा ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा..आर्ट रिन्युअल सेंटर या जगातल्या प्रतिष्ठेच्या ऑनलाइन संग्रहालयात शरद कापूसकरांचे अवचितबाबांचे शिल्प जगभरातल्या शंभर शिल्पातून निवडले गेले. जगन्मान्यता पावलेल्या कलासमीक्षकांकडून पुण्यातल्या या शिल्पकाराच्या शिल्पाची आणि चित्राची निवड झाली आहे. याचे निमित्त साधून शरद कापूसकरांच्या स्टुडिओत दाखल झालो.
एक एकरात विसावलेल्या या कलाउपासकाच्या स्टुडिओत सगळीकडे शिल्पांचे अवशेष. कुठे त्यांचे फोटो तर त्यांच्या छोट्या प्रतिकृतींचे आराखडे. कलाकार, संगीतकार, द्रष्टे नेते, प्रख्यात व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात काही काळ काढताना आपणही भारावले जातो.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कलाकृतीतून नंतर वेगवेगळ्या साच्यातून अवतरणारी कलाकृती कशी होते याची तांत्रिक माहितीही कापूसकरांनी दिली.
ंमुंबईच्या जुहू चौपाटीवर साकारलेल्या शिवाजीराजे आणि संभाजीराजांची मावळ्यासोबत शिल्पकृती १९९४ मध्ये हाती आली आणि कापूसकरांच्या स्टुडिओत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांची ये-जा सुरू झाली. चांदणी चौकापासून तीन किलोमीटरवरच्या भूगावात एक शिल्पकार राहतो याचे भान गावच्या सरपंचाला झाले. देऊसकर, व्यंकटेश माडगूळकर, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर अशा दिग्गज मंडळींत कापूसकरांच्या दालनात दाखल व्हायची. निवांतपणा आणि कलेविषयीची असक्ती यातून कापूसकरांची कलासेवा बहरत गेली. आजही ते आणि त्यांची पत्नी दोघेच घरट्यात स्वच्छंदी जगतात. बायकोलाही स्कल्प्चर करण्याचा नाद. त्याही अभिनव मधूनच शिकल्या. त्यांच्या वेगवेगळ्या छोट्या कलाकृतींचाही इथे पसारा दिसतो. दोघांच्या कलासाधक जीवनाची साक्ष हा परिसर देतो.
दोन मदतनिसांच्या सहवासात शिल्पे इथे तयार होत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिल्पकलेचा हा पुजारी अनेकांना पुतळ्यांमधून (कदाचित हा शब्द त्यांना आवडणार नाही) अजरामर करत शाडू, माती, दगड आणि मानवी चेहऱ्यांच्या भावपूर्ण वातावरणात स्वतःचे अस्तित्वच हरवून इतरांना घडवत आहे,
डॉ. विनय मांडके इथे शिल्प बनून हृदयमित्रांच्या मदतीसाठी ब्रॉंझमध्ये उभे आहेत. चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद साकारताहेत,
मास्टर दीनानाथ, माई मंगेशकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जे.डी. बिर्ला, गंगूबाई हनगल, पं. रामनारायण, सूर्यकांत-चंद्रकांत, बेळगावचे के. बी. कुलकर्णी, श्री. पु. भागवत अशा मातब्बर मंडळींच्या सहवासाने कापूसकरांचे दालन सधन बनले आहे.
मेणाच्या कलाकृतीची ऑफर आली होती पण ती त्यांनी मादाम पुसाच्या संग्रहालयाकडे पाठवून नम्रपणे नकार दिला. केस मोकळे सोडलेली सोनाली कुलकर्णी १९९५ सालची इथे आहे. स्त्रियांची विविध रूपांतली शिल्पे नजर खिळवून ठेवतात.
मंचरच्या मातीत कुस्ती खेळलेला हा मल्ल पुण्यात चंद्रकांत परब यांच्या सान्निध्यात गणपतीच्या मूर्ती बनवू लागला. चेहऱ्यांचे भाव-देहबोली शिकण्यासाठी सलग दोन वर्षे शिवाजीनगरच्या बस स्टॅंडवर रात्री दोनपर्यंत चित्रे काढत बसले. अभिनवच्या कलाशिक्षणानंतर कागदावरच्या रंगीत चित्रात कापूसकरांचे मन रमेना. थ्री-डायमेन्शन असलेल्या शिल्पकृतीतले भाव मातीच्या शाडूने काढण्याचे वेड घेतले. एस. एम. पंडित आणि देऊसकरांच्या शाबासकीने प्रेरणा दिली आणि कापूसकरांमधला शिल्पकार पाहता पाहता घडत गेला. एकसे एक कलाकृती हातून बनल्या गेल्या.
आता त्यांना वेध लागले आहेत मनाप्रमाणे स्वतःसाठी काम करण्याचे. साथीला कलावंत पत्नीची साथ आणि सोबतीला विस्तीर्ण निसर्ग.

Tuesday, April 8, 2008

पिता-पुत्राच्या संतूर वादनाने झंकारली गुढी पाडव्याची पहाट

गुढी पाडव्याची पहाट झंकारत गेली शिवकुमार शर्मा आणि राहूल शर्मा या पिता-पुत्रांच्या संतूर वादनाच्या जुगलबंदीच्या अविस्मरणिय मैफलीने.
चैत्र शुध्द १ शके १९३० म्हणजे ६ एप्रिल २००८.
नव भारत विकास फौंडेशनने आयोजिलेल्या "नवी चैत्र पालवी"ने संतूर वादनाने पुणेकरांना आगळा आनंद दिला.गणेश कला-क्रिडा रंगमंचावर सादर झालेल्या मैफलीची तबला साथ केली होती आनंदो चटर्जी यांनी आणि
पखावजवर साथ केली भवानीशंकर यांनी.


अनोख्या जुगलबंदीत नटलेल्या संतूर वादनाचा हा कांही भाग...

....असा रंगला गुढी पाडवा स्वरोत्सव !

सर्वोदय प्रतिष्ठानने पुणे महापालिकेच्या सहकार्याने साखर संकुलात सादर केलेल्या शिवाजीनगर भागातला पहिला भव्य सांस्कृतिक महोत्सव काल रंगला.
पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले आणि पालिकेचे अनेक नेते आमि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत "वळू"या मराठी चित्रपटाच्या कलावंताचा सत्कार केला गेला.मराठी तरूणाइवर जादू केलेल्या डॉ.सलील कुलकर्णी अणि अवधूत गुप्ते या जोडीने सादर केलेल्या मराठी गीतांनी पुणेकरांना तृप्ततेचा आनंद दिला.
"अग्गोबाई ढगोबाई" या सलीलयांच्या गाण्याला मुलांनी रंगमंचावर नाचण्याचा आनंदही घेतला.अवधूत गुप्तेंच्या "कांदे पोहे"या नव्या आगामी चित्रपटातल्या गीताने वन्समोअर मिळविला.संदिप खरेंच्या" ढिंगपाडी ढिपांग" या गाण्याला सलील-अवधूत दोघांनी केलेली स्वर-तालांची बहार रसिकांना ठेका धरायला भाग पाडले.
समीरा गुजर हिने निवेदकाच्या भूमिकेत कार्यक्रमाची उंची वाढविली.
सुरेखाचे "मेंदिच्या पानावर" ,",सांज ये गोकुळी"ला योगीता बर्वे-चितळे,लावणीची बहार उडवून दिली ती सई टेमघरे या गायीकेने.तीनही गायींकांनी परिसरात आपल्या आवाजाची जादू पसरली.
अनिल भोसलेंनी आयोजिलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाला पाच दिवस रसिकाश्रय लाभणार आहे हे नक्की.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा....